प्रभादेवी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रभादेवी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १ ऑगस्ट, २०२४

प्रभादेवीकर रमेश परब यांना अभिवादन !

 प्रभादेवीकर रमेश परब यांना अभिवादन !

राजकीय आणि  दैनंदिन सामाजिक जीवनात उत्तुंग विचारांची उंची असलेली आणि सतत प्रभादेवी आणि दादर विभागात वावरणारी हसतमुख व्यक्ती म्हणजे माझे मित्र आणि  सर्वांच्या परिचयाचे 'जगनमित्र' म्हणजे रमेश परब ! आज पहाटे वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांचे दुःखद निधन झाल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले. त्यानंतर दुःखाची हळहळ व्यक्त करणारे त्यानंतर अनेकजण भेटले.
शरीराने कमी उंचीचे परंतु सृदुढ बांध्याचे असलेल्या रमेश परब यांची मुंबई आणि कोकणातल्या राजकारणाच्या अभ्यासाची उंची व जाण मात्र फार प्रगल्भ होती. साधारण १९८० च्या विद्यार्थी दशेपासून मी त्यांच्या संपर्कात आलो आणि पक्का मित्र झालो. देशाचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा माननीय शरद पवार साहेब आणि कुठल्याही राजकीय पेचप्रसंगात मुंबईत  शरद पवारांना खंबीर साथ सोबत करणारे स्वर्गीय गोविंदराव फणसेकर या दोघांचा  लाडका 'मानसपुत्र' म्हणूनही रमेश यांची ओळख होती. 

शरदरावांनी राजकीय जीवनात कोणतीही बरी वाईट घेतलेली भूमिका असो गोविंदराव आणि त्यांच्यानंतर रमेश परब यांनी सातत्याने त्यांचे समर्थनच केले आणि राजकीय जीवनात अपयश आले तरी त्यांना साथसोबत दिली. आजही राष्ट्रवादीच्या फाटाफुटी नंतर ते त्यांच्या सोबतच होते. 
शरद पवारांनी पुलोद स्थापन करताना  समाजवादी काँग्रेस पक्ष काढला आणि सैतान चौकी येथील काँग्रेसचे कार्यालय टिळक भवन ताब्यात घेतले. हे करताना संघर्ष करणारी प्रसंगी दांडुकेशाहीची भाषा करणारे  आणि त्याठिकाणी दिवसरात्र ठाण मांडून बसणारे कार्यकर्ते पहारा देत होते, ते म्हणजे गोविंदराव फणसेकर, सदानंद तांडेल, गोविंदराव शिर्के, रमेश परब, अरुण मेहता, बबन गवस हे होते. मुंबईत काँग्रेस कमकुवत होती त्यामुळे पुढची बरीच वर्षे म्हणजे शरदरावांचा पुन्हा काँग्रेस प्रवेश होईर्यंतच त्याठिकाणचा कारभार ठप्प होता. 

मधल्या कळात  राजकीय क्षेत्रात वावरताना विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुक लढवण्याची त्यांना संधी मिळाली, परंतु शिवसेना पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या या दादर प्रभादेवी भागात त्यांच्या वाट्याला अपयशच आले. काही वर्षापूर्वीच्या एका मनपा निवडणुकांच्या वेळी त्यांना दै सामना कार्यालयात बोलावून ते रहात होते त्या प्रभागातून शिवसेनेच्या वतीने निवडणुक लढण्याची ऑफर दिली. परंतु त्यांनी ती नम्रपणे नाकारली आणि आपल्या पक्षातर्फे निवडणुक लढवून पराभूत सुद्धा झाले. आज कोण कुठल्या पक्षात आहे हे न सांगता येणाऱ्या बदलत्या परिस्थितीत रमेश परब पक्षाचे किती निष्ठावान आणि शरद पवारांचे खंबीर समर्थक होते हे लक्षात येतेय. विशेषतः प्रतिभाताई पवार यांच्या किचनपर्यंत परब यांचा खुला वावर होता. मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस वाढविण्यासाठी मुंबईचे मागील काही वर्षात त्या त्या वेळचे झालेले अध्यक्ष राजकीय पोळी भाजून व  लाभार्थी होऊन दुसरीकडे गेले...रमेशराव मात्र एक टेबल खुर्ची टाकून स्टँडर्ड मिल प्रभादेवीच्या नाक्यावर कायम शरद पवारांचा बॅनर लावून लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी  बसले. आणि न चुकता १२ डिसेंबरला सांस्कृतिक कार्यक्रम आखत शरदरावांचा वाढदिवस आपल्या सहकाऱ्या समवेत नाक्यावर भव्य प्रमाणात करीत राहिले.

एलफिन्स्टन रेल्वे स्टेशनचे नाव प्रभादेवी  व्हावे यासाठी मी  दैनिक सामना 

मध्ये १९९२ सली लेख लिहिला, रमेशने  माझा हा लेख वाचल्यानंतर त्यावेळी मला सांगितले रवी याचा पाठपुरावा चालू ठेव, मी नंतर पुढे अनेक वर्षे रेल्वेमंत्र्यांकडे लेखी पाठपुरावा ठेवला आणि २००५ नंतर कंटाळलो. सुरेश प्रभू रेल्वे मंत्री झाल्यानंतर एके दिवशी रमेश परब यांनी मला फोन करून बोलावले आणि यासंबंधी त्यांनीसुद्धा सातत्याने केलेल्या पाठपुराव्याची त्यांची फाईल दाखवली. त्यात त्यावेळच्या माझ्या लेखाची झेरॉक्स प्रत सुद्धा होती. सुरेश प्रभू असताना पुन्हा मी या मागणीसाठी माझ्याकडचा पत्रव्यवहार रेल्वेभवन दिल्लीला पाठविला. प्रभुसाहेबांचे पी.ए. महाजन साहेब यांची दादर पूर्व - फाळके रोडला भेट घेतली, रमेशराव यांनीसुद्धा पत्रव्यवहार पुन्हा सुरूच ठेवला होता. आणि त्याला यश आले, दिनांक १९ जुलै २०१८ रोजी रमेश परब आणि धनंजय खाटपे (यांना हा इतिहास माहीत आहे ) यांचा अभिनंदनाचा फोन आला.

श्री सिद्धिविनायक मंदिराला लागूनच गेल्या ७० - ८० वर्षांपासून पूज्य साने गुरुजी यांच्या नावाने ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी सुशोभित मैदान होते, भूमिगत मेट्रो स्टेशनसाठी ते वापरण्याचे ठरले. रमेश परब यांच्यासह अनेकांनी 'मैदान बचाव' अशी भूमिका घेतली त्यामुळे त्याठिकाणी मैदानाचे अस्तित्व ठेवून विकास होणार आहे असा प्लॅन मंजूर झाला. गेल्या वर्षी रमेश मला प्रभादेवीतच भेटले होते, म्हणाले रवी या गार्डनमध्ये दर्शनी भागावर साने गुरुजींचा एक चांगला भव्य पुतळा असावा असे वाटतेय, शासनाकडे त्याचा आपण पाठपुरावा करूया.  
शासकीय पत्रावर कसा करावा याचे उत्तम ज्ञान रमेश परब यांना होते. प्रभादेवी मातेच्या मंदिराला तीनशे वर्ष झाली तेव्हा हा उत्सव भव्य सोहळ्याच्या स्वरूपात व्हावा अशी भूमिका ज्यांनी घेतली त्यात आमदार सदा सरवणकर , नगरसेवक संतोष धुरी, या सोहळ्याचे नेतृत्व करणारे धनंजय खाटपे, वडापाववाले सुभाष सारंगबंधू, संजय नगरकर, महेश सावंत, संतोष गोळपकर, चेतन खाटपे, संजय बारस्कर, भूपेंद्र देवकर, अरुण भोगटे, सर्वपक्षीय कार्यकर्ते व प्रभादेवीतील युवक युवतींनी घेतली होते त्यात रमेश परब सुध्दा अग्रभागी होते. 'न भूतो न भविष्यती' असा भव्य कार्यक्रम हजारोंच्या उपस्थितीत अत्यंत जल्लोषात पार पडला. उद्योजक आणि  प्रभादेवीकर असलेले चेतन खाटपे यांनी त्यावेळी हेलिकॉपटर्स मधून मंदिरावर पुष्पवृष्टी केली होती. 
प्रभादेवी येथे अनेक सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा संस्था आहेत. यांच्यामध्ये सध्या कार्यरत असलेल्या अनेक कार्यकर्त्यांना रमेश यांनी समाजसेवेचे बाळकडू आणि प्रोत्साहन दिलेले आहे. रमेश यांच्यामुळे "आम्ही प्रभादेवीकर" म्हणून घडलो असे सांगणारे अनेकजण सध्या भागात भेटतात.
ज्येष्ठ मार्गदर्शक आणि मित्रवर्य  रमेश परब यांना भावपूर्ण श्रद्धांजली !







- रवींद्र मालुसरे
अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई 
(घरकुल सोसायटी, श्री साई सुंदर नगर)



इतर पोस्ट वाचण्यासाठी समोरची 👉अनुक्रमाणिक clik करा 


सोमवार, २४ जुलै, २०२३

लहान मुलांना मोबाइलपासून दूर ठेवा - डॉ तात्याराव लहाने

 लहान मुलांना मोबाइलपासून दूर ठेवा डॉ तात्याराव लहाने

प्रभादेवीत मोफत नेत्र चिकित्सा शिबिर संपन्न



 

मुंबई : (रवींद्र मालुसरे ) - आजकाल बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांमध्ये तरुणांचे आणि लहान मुलांचे प्रमाण वाढत आहे. चष्म्याचा नंबरतिरळेपणा हे बऱ्याचवेळा डोळ्यांची जडणघडण होताना निर्माण झालेल्या अडचणीमुळे होतात आणि त्यावर तितकेच चांगले उपायही उपलब्ध आहेत. परंतु हल्ली डोळ्यांची नीट काळजी आणि डोळ्यांवर निष्कारण वाढवलेला ताण यामुळे होणारे आजार वाढत आहेत. आज कामे संगणकावर अवलंबून असतात. संगणकमोबाईलटॅबआयपॅड या सर्वांतून प्रकाश डोळ्यामध्ये पडतो. ही सर्व यंत्रे आपण डोळ्यांपासून एक फुटापेक्षा कमी अंतरावर ठेवतो. यातून सततच्या पडणाऱ्या प्रकाशामुळे डोळ्यांच्या बाहुल्या आकुंचन पावतात आणि कालांतराने डोळ्यातील स्नायू स्पासमच्या स्थितीत जातात. त्यामुळे नजर कमी होते. डोळे दुखणे सुरु होते आणि काही वेळ काम केल्यानंतरलगेच डोळ्याचा थकवा जाणवायला सुरुवात होते. दिवसांतून ८-१० तासांपेक्षा अधिक वेळ संगणकावर काम करताना आपल्या डोळ्यांची उघडझाप बंद असते आणि दृष्टीपटलावरील अश्रू तरंग सुकून जातात. डोळे वारंवार थंड पडतात. त्यामुळे डोळ्यांचे इन्फेक्शन वारंवार होते.  यातील सर्वात गंभीर बाब म्हणजे ५-१८ या वयोगटातील मुला-मुलींमध्ये या आजाराचे वाढते प्रमाण दिसून येते. अपत्य लहान असल्यापासूनअगदी वयाच्या पहिल्या वर्षापासून त्याच्या / तिच्या हातात खेळणी म्हणून टॅबमोबाईल आयपॅड अशा वस्तू दिल्या जातात. त्यातून येणाऱ्या प्रकाशामुळे डोळ्यांना लवकर चष्म्याचा नंबर लागतो. मुलांना अगदी लहान वयापासून कोरड्या डोळ्यांसाठी औषधे सुरु करावी लागतात. डोळे हे माणसाच्या जगण्याचेच नव्हे तर आनंदाचे साधन असल्याने मायबापांनो काळजी घ्या असा सल्ला डॉ तात्याराव लहाने यांनी प्रभादेवीकरांना दिला.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शाखा क्रमांक १९३ चे शाखाप्रमुख संजय भगत यांच्या आयोजनातून तसेच विभग प्रमुख महेश सावंत यांच्या सहकार्याने प्रभादेवी महापालिका शाळेत शिबिराचे आयोजन केले होते त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रभादेवीतील नागरिकांकरिता सुप्रसिद्ध नेत्र चिकित्सक पद्मश्री तात्याराव लहाने,  डॉक्टर रागिणी पारिखडॉक्टर सुमित लहाने यांच्या रघुनाथ नेत्रालयाचे नेत्र चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराला माजी केंद्रीय मंत्री शिवसेना नेते अनंत गीतेमाजी परिवहन मंत्री दिवाकर रावते, आमदार सुनील शिंदे, विभाग प्रमुख महेश सावंत, आशिष चेंबूरकरश्रद्धा जाधवआरती कीनरे ,उद्योजक अनिल मानेविभाग संघटक शशी पडते ,राजू पाटणकरनिरंजन नलावडे,  मा. शाखा प्रमुख लक्ष्मण भोसले,  नगरसेविका हेमांगी वरळीकरउपविभाग संघटक सूर्यकांत बिर्जेउप विभाग प्रमुख कैलास पाटीलयशवंत विचलेअभय तामोरेरेखा देवकरहिरु दासविनायक देवरुखकर ,शाखाप्रमुख विनय अक्रेशाखा समन्वयक गणेश देवकर, चंदन साळुंखे, रत्नाकर चिरनेरकरअभिजीत कोठेकररवी पड्याचीकीर्ती मस्केसंजना पाटीलवैष्णवी फोडकर, युवा सेनेचे मुंबई समन्वयक सागर चव्हाणअभिजीत पाताडेजाई सोमणयुवा विभाग अधिकारी सप्नील सूर्यवंशीगुर्शिन कौरसाईश मानेचिंतामणी मोरेसौरभ भगत तसेच विभागातील व शिवसेना संघटनेतील मान्यवरांनी भेट दिली सदर शिबिर आयोजित केल्याबद्दल नागरिकांनी शिवसेनेचे तसेच शाखाप्रमुख संजय भगत यांचे आभार व्यक्त केले. शिबिर यशस्वी करण्याकरिता कार्यालय प्रमुख सुशांत वायंगणकर सुजन मंत्रीसुरेश झित्रे व इतर पदाधिकाऱ्यांसह युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व महिला पुरुष शिवसैनिकांनी विशेष परिश्रम घेतले. शिबिरात प्रभादेवी व परिसरातील ६२५ नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.


बुधवार, ३ मे, २०२३

सेंच्युरी बाजार जवळील भूतबंगला, फकीरशेठ चाळ आणि जांभेकर महाराज

 सेंच्युरी बाजार जवळील भूतबंगला, फकीरशेठ चाळ आणि जांभेकर महाराज 


पंजाबमधून श्रीरामकृष्ण महाराज जे निघाले ते सुरतमध्ये आले. परंतु सुरत हे त्यांचे कार्यक्षेत्र ठरणारे नव्हते. श्रीयुत कामेरकर या नावाचे मुंबईतील गृहस्थ सुरत येथे काही कामानिमित्त गेले असताना, कोणीतरी मराठी बोलणारा बुवा सुरतेच्या स्मशानात येऊन राहिला आहे अशी बातमी त्यांना लागली. त्यामुळे त्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाल्याने ते त्यांच्या भेटीसाठी गेले. तुम्ही मुंबईला चला अशा त्यांच्या विनंतीवरून मग महाराज मुंबईला आले. मुंबई हे त्यांचे कार्यक्षेत्र व्हायचे होते. मुंबईतील दुःखीकष्टी लोकांना उपकारक सहकार लाभावयाचा होता. ते मुंबईत कसे आले आणि तेथे येऊन त्यांनी कोणत्या स्वरूपाचे कार्य केले याची विस्तुत माहिती याविषयी तुम्हाला या लेखावरून होईल. अक्कलकोटच्या श्रीसमर्थ महाराजांची त्यांनी एकनिष्ठेने उपासना व भक्ती करून त्यांना प्रसन्न करून घेतले. स्वामींची श्रीरामकृष्ण महाराज जांभेकर यांच्यावर संपूर्ण कृपा होती. श्री जांभेकर महाराजांनी अनेक सिद्धी प्राप्त करून घेतल्या होत्या आणि त्यांचा सदुपयोग त्यांनी लोककल्याणासाठीच केला. कोणतीही सिद्धी असो, ती सहजसाध्य नसते. त्यासाठी अपरंपार कष्ट करावे लागतात. महाराजांनी आरामाच्या व सुखी जीवनाचा त्याग केला त्यामुळेच ते पुढे  सिद्ध पुरुष होऊ शकले. महाराज त्यांच्याकडे येणाऱ्या माणसाची कुवत ओळखत असत. बहुतेक स्वार्थ साधण्यासाठी येत असत. हे जाणत असतानाही त्यांनी प्रत्येकाला शाश्वत सुखाचा मार्ग दाखविला. त्यामुळे आजही निष्ठावंत भक्तांना त्यांचे अस्तित्व जाणवत असते. त्यांचा पोशाख साधा असे. ते लुंगी नेसत. अंगात तोकड्या हाताची कफनी, डोक्यास साईबाबासारखे फडके गुंडाळीत. 

श्री जांभेकर महाराज सेंच्युरी बाजार सिग्नलच्या अगोदर लुकास कंपनीच्या समोर असलेल्या ज्याठिकाणी आज जयंत अपार्टमेंट आहे त्या ठिकाणी  'भूतबंगला' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका घरात राहत असत. त्या घरात कोणीही राहायला तयार नसे. कारण त्या घरात भुतांचे वास्तव्य होते अशी सर्वांची समजूत होती. महाराज तेथे राहावयास आले व काही दिवस सुखात राहिले. येथे राहायला आल्यानंतर त्यांची ख्याती उत्तरोत्तर वाढत गेली. तो बंगला आपण कायमचा विकत घ्यावा असे वाटून त्याच्या ख्रिश्चन मालकाशी त्यांनी बोलणे केले होते. परंतु तो काही केल्या विकायला तयार होईना. त्यामुळे विठ्ठल मंदिरजवळ म्हणजे श्रीदत्त  मंदिरासमोरील चंपावाडीत  त्यांनी प्रभादेवीतच एका आगरी समाजातील व्यक्तीचे म्हणजे 'फकीरशेट' यांचे घर भाड्याने घेतले. 

तेथे घरापुढे आलेल्या लोकांना बसण्याउठण्यासाठी मोकळी जागा होती. मात्र घर भाड्याने देऊन फकीरशेट तो शेजारीच एका झोपडीत राहू लागला. त्याच्यापाशी नावाप्रमाणेच काही नव्हते. राहते घर भाड्याने गहाण पडले होते, नोकरी धंदा नव्हता. कुरुंबासह आयुष्याचे दिवस कसेबसे ढकलत होता. महाराजांना त्याची ही गरिबी लक्षात आल्यानंतर त्याच्यासह कुटुंबाला चांगले कपडे घातले. आणि त्याला 'फकीरशेट' या नावाने संबोधण्यास सुरुवात केली. संपूर्ण कुटुंबाचा रुबाब वाढला. त्यामुळे पुढे ते सर्वांचे फकीरशेट झाले. ते घर म्हणजेच महाराजांचा मठ झाला. आणि त्याला नंतरच्या काळात आपोआप मठाचे स्वरूप आले. देवपूजा, आरती, प्रसाद वैगरे  सुरु होऊन त्या घराचे पावित्र्य व माहात्म्य वाढले. भक्तमंडळी दिवसेंदिवस वाढत्या प्रमाणात त्या मठात येऊ लागले. येणाऱ्यांचे हेतू सफल होऊ लागले. तेथे सतत नंदादीप तेवत असे. महाराजांच्या नाना प्रकारच्या लीला तेथे चालत असत. ज्यांचे हेतू सफल होत ते तेलाचे व तुपाचे डबे तसेच लागेल तेवढे धान्य वैगरे आणून देत असत. रोज शेकडो लोक भोजन करून तृप्त होऊन जायचे. कधी काही कमी पडत नसे. महाराजांनी कधीही स्वतःजवळ पैशांचा संग्रह केला नाही. ते फक्त एकवेळ भोजन करायचे. बहुतेक दिवस उपवास करायचे. कधी कधी बेचाळीस दिवस उपोषण करीत. सकाळी व रात्री एक पेला दूध एवढाच त्यांचा त्या काळात आहार असे. ही सर्व अनुष्ठाने ते लोककल्याणासाठी करीत असत. पहाटेच्या प्रहरी काकड आरती होत असे व आरतीसाठी दोन-अडीचशे माणसे एकत्र जमायची. तर अन्नप्रसादाचा कार्यक्रम सायंकाळी सातपर्यंत चालायचा. गरीबी आणि धनिक अन्नसंतर्पणाच्या कार्यक्रमाला येत असत. 

जांभेकर महाराजांचा जीवनपट अवघा १८९८ ते १९४० म्हणजे अवघ्या ४२ वर्षाचा त्यापैकी फक्त १९३० ते १९४० दहा वर्षे प्रभादेवीत राहिले. १० जानेवारी १९४० रोजी त्यांनी शिवाजीपार्क स्मशानभूमीजवळ समाधी घेतली. आज त्याठिकाणी 'श्रीरामकृष्ण जांभेकर मठ' आहे आणि धार्मिक कार्य अखंडितपणे सुरु आहे.

- रवींद्र मालुसरे 

अध्यक्ष,मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई  

९३२३११७७०४


मंगळवार, २० डिसेंबर, २०२२

प्रभादेवीतील आगरी सेवा संघ

 प्रभादेवीतील आगरी सेवा संघ


आज प्रभादेवीत आगरी सेवा संघाच्या वतीने वार्षिक कार्यक्रम भव्यदिव्य स्वरुपात साजरा होत आहे, सन २०११ मध्ये वरळी कोळीवाड्याच्या जनता शाळेत अमृत महोत्सव अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत झाला होता.

त्यावेळी १२ डिसेंबरला मुंबईतील काही दैनिकातून मी यासंदर्भात लेख लिहून संस्थेच्या कार्याचा आढावा घेऊन मुंबईकरांना ओळख करून दिली होती. यानंतरच्या ११ वर्षात भटचाळ येथे आगरी सेवा संघ चौक, मुरारी घाग मार्ग येथे माजी नगरसेवक मोतीराम तांडेल चौक, खाडा येथे आगरी सेवा संघाचे समाजमंदिराची स्वतःची वास्तू अशी कामे उभी राहिली आहेत.
काळाच्या ओघात संस्थेची स्थापना करणारे काही समाजधुरीण ज्यांनी संस्थेला उर्जितावस्था दिली, आर्थिक ताकद दिली, समाजातील सर्व थरात पोहोचवली असे समाजधुरीण काळाच्या पडद्याआड गेले आहेत, काही वयोवृद्ध झाल्याने घरी आहेत मात्र पद्माकर म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली अलीकडची तरुण पिढी सातत्याने कार्यरत आहे. यातूनच कैलास पाटील, संजय भगत, नरेंद्र बांधणकर, कोठेकर, ज्योति जुईकर असे बरेचजण राजकीय क्षेत्रात पुढे जात आहेत. गुणवत्ता असलेले अनेक तरुण वैद्यकीय क्षेत्रासह आधुनिक तांत्रिक युगात मोठमोठ्या हुद्यावर काम करीत आहेत.....या नवीन पिढीसमोर इतकेच आहे, आपल्या पूर्वजांनी बोलीभाषेसह जोपासलेली मूळ संस्कृती जपण्याची गरज आहे.
-------------------------------
"अगोदर प्रकाशित झालेला लेख"

सन १९३५ च्या दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर आगरी सेवा संघाची स्थापना झाली. आज २०२२ च्या दसऱ्याला ८७ वर्षे पूर्ण झाली आहेत. मुंबई शहरात अनेक ठिकाणी आगरी समाजाची वस्ती फार मोठ्या प्रमाणावर विखुरलेली आहे. त्यापैकी प्रभादेवी, वरळी कोळीवाडा, सास्मिराच्या मागे भटचाळ, वडाळा, भोईवाडा, स्यान्डहर्स्ट रोड, चुनाभट्टी, मानखुर्द अशी ठळक ठिकाणे आहेत. परंतु प्रभादेवी आणि  वरळी कोळीवाडा येथे ही संख्या विलक्षण आहे. कामगार वस्तीतील या ठिकाणी गेल्या २० वर्षतात विलक्षण बदल होतो आहे. मुख्यतः  चाळी आणि झोपडपट्टयांनी व्यापलेला हा भाग सध्या टोळेजंग टॉवर्सनी व्यापलेला आहे. त्यामुळे आगरी समाजासह बहुजनांची काळाच्या ओघात प्रतिष्ठा वाढली आहे. शैक्षणिक, सामाजिक, सहकार, उद्योजकता व राजकीय क्षेत्रात तीन दशकापूर्वी अत्यंत मागास असलेला या समाजातील अनेक तरुण कायापालट झालेल्या या समाजातील अनेक तरुण उच्च शिक्षित झाला आहे. इतकेच नव्हे तर बदललेल्या जागतिकीकरण आणि उदारीकरणाचा वेध घेत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवीत आहे. काहींनी तर परदेशात चांगल्या कंपनीमध्ये नोकऱ्या मिळवल्या आहेत. शिक्षणाबरोबरच सधनता आणि समृद्धी आल्याने समाजात चंगळवाद बोकाळला आहे, सर्वच समाजातील अलीकडची युवापिढी शिकली आहे पण जगाच्या बाजारात वावरताना प्रगल्भ बौद्धिक वाढ व्हावी यासाठी अवांतर वाचन करीत नाही, बहुसंख्यजण सोशल मीडियाच्या आहारी गेल्याने स्वकेंद्रित झाली आहे, असाच सूर मागच्या पिढीचा असतो. असे असतानाही या समाजातील अलीकडच्या पिढीने प्रभादेवी परिसरात राजकीय  अस्तित्व निर्माण करतानाच समाजाची सदानंद वाडीत (खाडा ) स्वतःची वास्तू उभी केली आहे.
देशाचा स्वातंत्र्यापूर्वी म्हणजे १९३५ चा आसपासचा काळ हा मुंबई शहरात विशेषतः कष्टकरी कामगारांच्या जीवनात अत्यंत महत्वपूर्ण घडामोडी व उलथापालथी करणारा होता. मुंबई गिरणी कामगार युनियनच्या नेतृत्वाखाली १९२८ मध्ये गिरणी कामगारांचा प्रदीर्घ असा ६ महिन्यांचा जागतिक नोंद करणारा बलाढ्य संप लढला गेला होता. महात्मा गांधी यांनी पुकारलेला १९३० च्या  मिठाचा सत्याग्रहाचा देशव्यापी लढ्यात मुंबईवासीय ब्रिटिश साम्राज्याला हादरे देण्यासाठी लढाऊ बाणाने उतरला होता. १९३४ साली राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन खऱ्या अर्थाने कामगार विभाग ओळख असलेला वरळी येथे राष्ट्रीय लढ्याची धार तेजस्वी करीत मोठ्या प्रमाणात यशस्वी धार तेजस्वी करीत मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले होते. १९३५ मध्ये पुन्हा गिरणी कामगार संपाचा घोषणा वातावरणात दुमुदुमु लागला होता. अशाच वातावरणात त्यावेळचे आगरी समाजातील धुरीण समाजाला एकत्र करावे या भावनेने विचार करीत होता. मुंबई शहराशेजारी असलेला अलिबाग तालुक्यातील पोयनाड,  सांबार,  फणसापुर, पेण तालुक्यातील वडखळ, वाशी, आमटेम, शहाबाज, चरी, शहापूर, पेझारी, कासू, गडब, पिटकीरी या विभागातील आगरी बांधव गिरणी - कारखान्यात अंगमेहनत करून सेंच्युरी बाजार, वरळी कोळीवाडा या भागात स्वतःचा किंवा भाड्याच्या चाळीत राहत होता. तर इकडे ग्रामीण भागातला बांधव निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून आपली खारटण जमिनीच्या तुकड्यांवर दिवसरात्र काबाडकष्ट करून त्यावर आपला संसार सावरण्याचा प्रयत्न करीत होता. एकंदर एका बाजूने निसर्गाची आपत्ती तर दुसऱ्या बाजूला मागासलेपणामुळे हा समाज हलाकीच्या परिस्थितीत जखडला गेला होताच, परंतु त्याचबरोबर आणखी एक जबरदस्त आणि तितकेच महत्वाचे असे कारण होते, ते म्हणजे सर्वांगीण सामाजिक मागासलेपणा व त्यासोबतचा अशिक्षितपणा. अनेक प्रकारचा अनिष्ट अपप्रवृतींना तो बळी पडलेला होता. पोलीस-कोर्ट कबजाच्या हेलपाट्यांच्या बरोबर पैशाचीही उधळपट्टी करीत असे. केवळ मीपणाचा दिखाऊ हौसेपोटी लग्नसमारंभ किंवा इतर प्रसंगी कर्ज काढून वारेमाप खर्च करण्यात तो धन्यता मानत असे. व्यसनाबरोबरच अंधश्रद्धेचा आहारी जाऊन बुवाबाजी,  भगतगिरी, देवदेवस्की, भुताटकी यांचा सारखा फसवणूक होणाऱ्या गोष्टीना तो सहज शिकार बनत होता. त्या काळात अशा परिस्थितीत अडकल्याने त्याला आपला मायभूमीस मुकून मुंबईचा रस्ता धरावा लागला होता.

इकडे मुंबईत आलेल्या या आगरी बांधवांवर शहरी वातावरणात इतर पुढारलेला समाजाशी सामाजिक, व्यावहारिक, धार्मिक व इतर संबंध व संपर्क आल्यामुले त्यांचे आचार,  राहणीमान,  चालीरीती, बोलीभाषा यावर कळत नकळत प्रागतिक असा हळूहळू का होईना पण चांगला परिणाम बदल होऊ लागला होता. शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण वाढत होते. त्यामुळे विशेषतः युवकांना आपल्या समाजातला सर्वच अनिष्ट गोंष्टींविरुद्ध लढा देण्याचे विचार त्यांच्यात घोळू लागले होते. याच सुमारास १९३२ - ३३ सालांत आगरी समाजातील मुंबईचे दोन गरीब होतकरू तरुण जी एल पाटील व भाऊराव मुकुंद पाटील हे विश्वविद्यालयाची पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल समाजातर्फे त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला होता. अशा या महत्वपूर्ण सामाजिक घटनेपासून स्फूर्ती घेऊन प्रभादेवी, वरळी, कोळीवाडा भागातील प्रमुख युवकांनी आगरी समाजाला संघटीत करून मागासलेपणा विरुद्धच्या लढ्यास हात घालण्यास सुरुवात केली. आणि अशा तऱ्हेने अखेर १९३५ साली दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर एक भव्य संमेलनाचे आयोजन करून आगरी सेवा संघाची स्थापना करण्यात आली. समाज वस्तीचा अशा सर्व भागातून त्या त्या भागाचे प्रतिनिधी निवडून घेऊन संघाचा कार्यकारिणीची रचना करण्यात आली. विशेष म्हणजे संघाचे कार्यकर्ते श्रमजीवी वर्गातील गिरणी कामगार होते. १९३६ सालचा राष्ट्रीय काँग्रेसचा महाराष्ट्रातील पहिल्या मंत्रिमंडळाच्या आमदानीत संपूर्ण दारूबंदीचा कायदा पास करण्यात आला.
कामगार भागांत त्याचे आगरी सेवा संघाने स्वागत केले. थाळीनाद, प्रचार बैठका राबवून दारूबंदीचा हा संदेश संघाने परिणामकारपणे घरोघरी पोचविला होता. तसेच संघाच्या कचेरी शेजारीच मोफत वाचनालय सुरु करण्यात आले होते. दैनिके, मासिके याबरोबरच ३०० निवडक पुस्तकांचा भरणा असलेले छोटेसे ग्रंथालय संघाच्या सभासदांसाठी विनामूल्य चालविले होते. हे ग्रंथालयाला संघाचे एक निष्ठावंत कार्यकर्ते आणि माजी जनरल सेक्रेटरी कै विठ्ठल बा पाटील यांचा स्मरणार्थ आजगायत चालू आहे. तसेच कुस्ती, चेअर बॅलन्सिंग, लेझीम, दांडपट्टा इत्यादी व्यायाम प्रकार तज्ज्ञा शिक्षाकडून विनामूल्य शिकविले जात असत. त्याचप्रमाणे गोकुळाष्टमी निमित्त गोविंदा पथक, दसरा संमेलन,  संघाचा आर्थिक उन्नतीसाठी चित्रपट किंवा नाट्यप्रयोग,वधु-वर संशोधन मंडळ, इयत्ता १० वी, १२ वी तसेच पदवीधर झालेला यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार, वैद्यकीय शिबीर असे अनेक कार्यक्रम यशस्वीपणे होत असतात. संघाच्या अशा तऱ्हेने चालविलेला या सर्वांगीण समाजकार्याची दखल घेऊन मुंबई महानगरपालिकेने १९३९ साली भटाच्या चाळीत १ रुपया नाममात्र दराने भाड्याने संघाच्या कार्यालयासाठी जागा दिली. जी एल पाटील यांनी आगरी सेवा संघाचे कार्य हे आपले जीवन कार्यच मानले होते.

बेस्टमधील कामगारांची संघटना आणि आगरी सेवा संघ अशी दुहेरी कामगिरी ते पार पाडीत असत. संबंध देशभर कम्युनिष्ठांच्या धरपकडीचे सत्र सुरु झाले असताना त्यांना अटक झाली आणि ते ४ वर्षे नाशिक कारागृहात स्थानबद्ध होते. त्यामुळे अप्रत्यपक्षपणे संघाचा कार्यावर परिणाम झालाच. थोडी शिथिलता आणि विस्कळीतपणा आला. परंतु अभिमानाची बाब अशी की बिकट प्रसंगी संघाचा तरुण कार्यकर्त्यांनी संघटितपणे पुढे होऊन धैर्याने व नेटाने संघाचा कारभार हाती घेतला. संघाच्या कार्याप्रती जी एल यांची निष्ठा एवढी होती की, १९५२ साली जेलमधून सुटल्यानंतर ते प्रथम संघाच्या ऑफिसवर आले. त्यानंतर झालेला १९५२ सालचा मुंबई कॉर्पोरेशन निवडणुकीत ते नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यांच्या पश्चात संघाचे अध्यक्ष रामचंद्र  बांधणकर यांच्या नेतृत्वाखाली प्रमुख कार्यवाह राजेंद्र टेमकर, कार्यवाह अशोक पाटील, कोषाध्यक्ष नरेंद्र बांधणकर यांनी ही संघटना टिकविण्यासाठी आणि यंदाचे अमृत महोत्सवी वर्ष अनेक सामाजिक उपक्रमांनी साजरे करण्यासाठी अहोरात्र झटत आहेत.






- रवींद्र मालुसरे
अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई 
9323117704 





बुधवार, २६ जानेवारी, २०२२

प्रभादेवी म्युनिसिपल सेकंडरी स्कुलमधील ४० वर्षानंतर वर्ग भरला.

 ४० वर्षानंतर SSC चा वर्ग भरला पुन्हा घंटा वाजली, धडे गिरवले


कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु होणार की नाहीत असा राज्यात संभ्रम असताना .... प्रभादेवी म्युनिसिपल सेकंडरी स्कुलमधील ४० वर्षापूर्वीच्या १९८२ च्या SSC च्या शाळेच्या वर्गाची बॅच पुन्हा एकदा त्यावेळचे शिक्षक सर्वश्री वासुदेव दिंडोरे सर, भालचंद्र पिळणकर सर, चौधरी सर, अरुणा केळकर मॅडम, अस्मिता गोविंदेकर मॅडम यांच्या उपस्थितीत घंटा वाजली...वर्ग भरला...यस सर - यस मॅडम 'हजर' म्हणत पट भरला...फळ्यावर त्याची नोंद झाली. ओळख परेड होत सर्वांना करीत 'पास' करीत गोल्ड मेडल प्रदान करण्यात आले, मधली सुट्टी झाली, डब्यातून खाऊ खाल्ला, टेबलावरचे डस्टर दाखवत शिक्षकांनी पुन्हा एकदा उर्वरित आयुष्यासाठी सुखी जीवनाचे धडे आपल्या भाषणातून दिले, राष्ट्रगीत होऊन शाळा सुटली. त्यावेळी व्रात्य असलेले प्रशांत भाटकर-गणेश तोडणकर कार्यक्रमाच्या प्रसंगी 'मॉनिटर' होते त्यामुळे अपेक्षेपेक्षा जास्त कार्यक्रम यशस्वी झाला,...

आज तुमच्यापैकी काहींचे चेहरे तर काहींची नावे आठवताहेत, निसर्गाचा आणि काळाचा हा महिमा आहे, पण शाळेतील गोड आठवणींना उजाळा देण्यासाठी तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने हजर राहिलात, आपल्या एकमेकांना भेटण्याचे प्रचंड कुतूहल असणार, त्यामुळेच हे आज घडले. तुम्ही होतात म्हणून शाळा आणि आम्ही होतो. त्यामुळे बदल घडला असला तरी तुम्ही आताच्या शाळेच्या इमारतीत आठवणींना उजाळा देण्यासाठी तुम्ही इच्छा होईल तेव्हा जात जा असे भावनिक उदगार वासुदेव दिंडोरे सर यांनी आपल्या भाषणात काढले. अस्मिता गोविंदेकर मॅडम आपल्या भाषणात म्हणाल्या की, जुन्या आठवणी अत्तरासारख्या कुपीमध्ये साठवून ठेवा, आणि जेव्हा केव्हा मनात निराशा येईल तेव्हा त्यांची स्मरण करा, नक्कीच ताजेतवाने व्हाल. ४० वर्षानंतर तुम्ही पुन्हा शाळेचा वर्ग भरवत आहात व तुम्ही भेटणार असे समजल्यानंतर एक शिक्षिका म्हणून मला जास्त आनंद झाला आहे. हे माझे शिक्षक आहेत असे जेंव्हा तुम्ही अभिमानाने आमची ओळख करून देता त्यावेळच्या भावना मला शब्दात व्यक्त करता येत नाहीत. माझ्या मुलांच्यावर जसे प्रेम होते तीच भावना तुमच्याही बाबतीत होती, तुम्ही नावलौकिक मिळवावा आणि महापालिका शाळेत शिकलो आहोत याचा न्यूनगंड न राहता तुम्ही भविष्यात मोठे व्हावे याहेतूने कदाचित तुम्हाला मी त्यावेळी मारले असेल, परंतु आज विठ्ठलाच्या भेटीसाठी जी तळमळ असते तीच ओढ आणि हुरहूर आज माझ्या मनात दाटली आहे. असे भावुक उदगार अरुणा केळकर मॅडम यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले. तर चौधरी सर म्हणाले की, मी वर्गाकडे येतो आहे असे दिसले की, तुमच्या वर्गात शांतता पसरायची त्यामुळे मला नक्कीच विसरला नसाल, खरं तर मी खाजगी शाळेतली चांगल्या पगाराची नोकरी सोडून गरीब मध्यमवर्गीय मुलांना चांगले शिक्षण देता यावे हे एक धेय्य मनाशी बाळगून महापालिका शाळेत शिक्षक म्हणून रुजू झालो. अनेकांना त्यावेळी याचे आश्चर्य वाटले होते पण, माझ्या कार्यकाळात तुमच्यातले अनेक गुणी विद्यार्थी भेटले त्यांची नावेही मी अजून विसरू शकलो नाही, त्यामुळे प्रभादेवी ही शाळा माझी आवडती शाळा ठरली. सुप्रसिद्ध कलाशिक्षक भालचंद्र पिळणकर सर यांनी ४० वर्षांपूर्वी सेंडऑफ देताना 'तुज पंख दिले देवाने कर विहार सामर्थ्याने' आणि 'या लाडक्या मुलांनो तुम्ही मला आधार नव हिंद युगाचे तुम्हीच शिल्पकार' ही दोन गाणी म्हटली होती ती पुन्हा वाढत्या वयातही सुरेल आवाजात म्हटली.                      
      
तर विद्यार्थ्यांच्या वतीने रवींद्र मालुसरे हे कार्यक्रमाची प्रस्तावना करताना म्हणाले की, शाळा सोडल्याच्या दाखल्यावर शाळेच्या नावाचा फक्त शिक्का आहे परंतु आमच्या मनामनात आणि आठवणीत कायमचे गेली ४० वर्षे तुम्ही राहिलात याचे एकमेव कारण म्हणजे तुम्ही निरपेक्षपणे आम्हाला घडण्या-बिघडण्याच्या वयात चांगले संस्कार देण्याचे काम केलेत. आज आशीर्वाद देण्यासाठी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलात आम्हाला स्मरणरंजन करण्याची संधी दिलीत, तोच आनंद आमच्या चेहऱ्यावर दिसतो आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमाच्या तासाला महेश पै, प्रशांत भाटकर, गणेश तोडणकर, उमेश शिरधनकर यांनी गाणी तर संगीता पाटणकर, मीनाक्षी बोरकर यांनी आपले विचार मांडले.
कार्यक्रमाला शुभांगी पेडणेकर-विलणकर, शुभांगी भुवड-बैकर, मिनाक्षी बोरकर-मोपकर, साधना बोरकर, सविता गाड-धुरी, संगीता पाटणकर-जाधव, सुनंदा धाडवे, सुरेखा चव्हाण, कल्पना किर-आंबेरकर, शोभा पोटे, रेखा चव्हाण-सुभेदार, प्रतिभा खाटपे-बहिरट, कांचन शिर्के-शिंदे, भारती चव्हाण या माजी विद्यार्थीनी तर रविंद्र मालुसरे, प्रशांत भाटकर, सचिन पाताडे, रमेश राऊळ, नरेश म्हात्रे, महेश पै, जगन्नाथ कदम, अविनाश हुळे, गणेश तोडणकर, विजय विलणकर, संतोष गुरव, गुरुनाथ पटनाईक, नंदकुमार लोखंडे, उमेश शिरधणकर, पांडुरंग वारिसे, दिनेश पांढरे, शेखर भुर्के, अनिल कदम, किशोर किर, हनुमंत नाईक, दिनकर मोहिते, शैलेश माळी, राजू दोडे, संजय धामापूरकर, दिनेश मोकल, दीनानाथ शेळके, दत्ताराम बोरकर, विश्वनाथ म्हापसेकर, संदीप केणी हे माजी विद्यार्थी उपस्थित होते.
रवींद्र मालुसरे
अध्यक्ष
मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई
9323117704






बुधवार, २० मे, २०२०

प्रभादेवीची 'प्रभावती' माता


प्रभादेवी मातेचे मंदिर : तीन शतकांचा ठेवा 


मुंबई नगरीला सोन्याची नगरीम्हटले जाते. पण त्यापेक्षा तिला मंदिराची नगरी म्हणणेच अधिक संयुक्तिक ठरेल. मुंबई नगरीत जवळ जवळ ४८१ पेक्षा अधिक मंदिरे आहेत. त्यापैकी सर्वात जास्त मंदिरे मारुतीची,त्याखालोखाल क्रमांक येतो शंकर मंदिरांचा तर देवींची मंदिरे हि पुरातन आहेत.
तत्कालीन मुंबई बेटावरच्या रूढी व परंपरा बदलत्या काळासोबत अस्तंगत होत गेल्या आणि त्याच ओघात मुंबापुरीतील वार्षिक जत्राही काळाच्या पडद्याआड जाऊ तत्कालीन मुंबई बेटावरच्या रूढी व परंपरा बदलत्या काळासोबत अस्तंगत होत गेल्या आणि त्याच ओघात मुंबापुरीतील वार्षिक जत्राही काळाच्या पडद्याआड जाऊ लागल्या. सद्य:स्थितीत जेमतेम हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत यातल्या काही जत्रा मुंबईत उरल्या आहेत. वाड्यावस्त्यांची मुंबई गगनभेदी होत आकाशाला भिडत  चालली आहे. मुंबईची जीवनशैली बदलली तरी काही परंपरा अजूनही टिकून आहेत. त्यातील एक म्हणजे प्रभादेवीची जत्रा. पारंपरिकतेची कास धरत हा जत्रोत्सव जुन्या मुंबईचा ठेवा जपत असल्याचे दिसून येत आहे. वर्षभर शांततेत असलेले प्रभादेवीचे मंदिर या जत्रेच्या काळात ऐरवी कॉर्पोरेट असलेला भाग ४० वर्ष मागे गेलेला दिसतो. या जत्रेच्या निमित्ताने सध्या या मार्गावर मिठाई, पेठा, हलवा, चांदेरकर खाजा असे जिन्नस; तसेच खेळणी, इतर खाद्यपदार्थ, हार, फुले, प्रसाद आदी वस्तूंची दुकाने थाटली आहेत.  मुलांसाठी आकर्षणाचा भाग असलेले आकाशपाळणेही गर्दी खेचत असतात. मौत का कुँवामधील कानठळ्या बसवणारा फटफटीचा आवाज ...प्रचंड उंचीवरून खाली येताना पोटात गोळा आणणाऱ्या आकाश पाळण्याचा थरार...सहकुटुंब मोटारीत बसून किंवा स्कूटरवर एकत्र कौटुंबिक फोटो काढण्याची हौस पुरवणारा फोटो स्टुडिओ...पिपाण्यांचा आवाज...असे बरेच काही वर्षानुवर्षे तसेच आहे. प्रभावतीदेवी ही अनेक ज्ञाती-समाजांची कुलदेवता असल्याने, समाजाच्या विविध स्तरांतून तिच्या दर्शनासाठी भक्तगण येथे येत असतात. जत्रेच्या दिवसांत तर भाविकांची देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी उसळते. पौष महिन्यातल्या शाकंभरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर या जत्रेला प्रारंभ होतो. 

१९९२ पासून मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष म्हणून मी (रवींद्र मालुसरे) वर्तमानपत्रातून लेखन केले त्याचबरोबर प्रभादेवी  जनसेवा समितीचे अध्यक्ष धनंजय खाटपे, कार्याध्यक्ष- सुभाष सारंग आणि प्रमुख कार्यवाह-संजय नगरकर, सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते रमेश परब यांच्या   पुढाकाराखाली  स्थानिक जनता एल्फीस्टन रेल्वे स्टेशनला 'प्रभादेवी'  नाव  द्यावे  अशी  श्रद्धापूर्वक मागणी करीत होती. मी तर १९९२ च्या नंतरच्या सर्व रेल्वेमंत्र्यांशी सातत्याने पत्रव्यवहार केला. आमच्या या मागणीला  केंद्रसरकारने योग्य न्याय दिला.व अखेर नामकरण करण्यात आले. तसे  पहिले  तर  गानतपस्वी किशोरीताई  आमोणकर, कॉम्रेड डांगे, सुलोचनादीदी, स्नेहल  भाटकर,कबड्डी महर्षी बुवा साळवी, पद्माकर  शिवलकर,संजय मांजरेकर,तारक राऊळ आदी कला -क्रीडा  क्षेत्रातली  गुणवान  मंडळीही  याच  प्रभादेवी मंदिरापासून हाकेच्या अंतरावरची.
२५ जानेवारी १९९२ शनिवार, दैनिक सामना 
प्रभादेवीचा प्राचीन इतिहास मोठा रंजक आहे. प्रभादेवीचं मंदीर आता जिथं पाहातो, ते हिचं मूळ ठिकाण नव्हे. श्री प्रभादेवीचं मूळ मंदीर होतं मुंबईच्या माहिमात. नेमकं कुठं आणि कुणी बांधलं ह्याचा शोध घेताना, दोन वेगळ्या प्रकारची माहिती मिळते. पहिली माहिती मिळते ती 'महिकावतीच्या बखरी'त. सदर बखर सन १४४८ ते सन १५७८ या दरम्यान लिहिली गेलेली असून, यातील एक घटना सन ११४० पासून चालुक्य कुळातला राजा प्रताप बिंबाच्या मुंबईतल्या आगमनापासून सुरु होतात आणि सन १३४० च्या आसपास कुठेतरी संपतात. या दोनशे वर्षांच्या काळात मुंबईवर राज्य केलेल्या राजांचा इतिहास सांगणारी ही बखर आहे.
'महिकावातीची बखर' सांगते की, श्री प्रभावती ही मुंबईचा चालुक्य कुलाचा राजा प्रताप बिंबाची देवता. चालुक्यांची कुलदेवता श्री शाकंभरी, जिला प्रभावती असंही नांव आहे. त्याची कोकण प्रांतातली मूळ राजधानी केळवे-माहिम हातची गेल्यानंतर, सन ११४० च्या दरम्यान मुंबईतील माहिम येथे नविन राजधानी केली. राजधानी स्थापन करताना आपली कुलदेवता श्री प्रभावती हिचं देऊळ स्थापन केलं असावं, बखरीत असं कुठेही म्हटलेलं नाही, मात्र असा तर्क केल्यास तो चुकीचा ठरणार नाही. कारण आताचं मंदिर दक्षिणोत्तर असून आताच्या श्री प्रभादेवीच्या मंदीरात तिच्या डाव्या-उजव्या हाताला असणाऱ्या श्री कालिका आणि श्री चंडिका देवींच्या मूर्ती..! श्री प्रभावती, श्रीचण्डिका आणि श्री  कालिका या मुख्य देवतांव्यतिरिक्त या मंदिरात श्री सर्वेश्वरआणि श्री लक्ष्मीनारायण यांचीही स्वतंत्र गर्भगृह आहेत. मंदिराच्या बाहेर  प्रवेशद्वाराच्या उजव्या हाताला श्री शितलादेवी, श्री  हनुमान व श्री खोकलादेवीच्या मूर्ती आहेत. मंदिरात दोन दीपमाळाही आहेत. मंदिरात असलेला प्राचीन नंदी नव्याने स्थापन करण्यात आली आहे.  श्री कालिका देवी ही राजा प्रताप बिंबाचे सरचिटणिस गंभिरराव सूर्यवंशी यांची कुलदेवता, तर श्री प्रभादेवीच्या डाव्या हाताला असलेली श्री चंडीका देवी, राजा प्रताप बिंबाचे पुरोहीत असलेल्या हेमाडपंतांची कुलदेवता असल्याचा उल्लेख राजा प्रताप बिंबाने त्याच्या कुलदेवतेसोबत, त्याच्या या दोन महत्वाच्या अधिकाऱ्यांच्या कुलदेवतांना बरोबरीचं स्थान देऊन  त्यांचा सन्मान केला असावा किंवा या कुलदेवता असलेल्या समाजाला आपल्या राज्यात बरोबरीचं स्थान आहे असा संकेत दिला असावा असं वाटण्यास जागा आहे. शिलाहारानंतर देवगिरीचे यादव मुंबई बेटावर आले. असे सांगतात की यादव वंशाचा राजा बिंब ऊर्फ भीमदेव याने आपली राजधानी माहीम येथे स्थापन केली होती व त्याने आपल्यासमवेत काही लोक आणून तिथे वसाहत उभारली. नारळाची झाडे लावली आणि घरे व मंदिरे बांधली. त्याच्या आश्रितांपैकी प्रभू पळशीकर, ब्राह्मण आणि पांचकळशी त्याच्याबरोबर इथे आले व माहीमच्या आसमंतात त्यांनी वस्ती केली.

श्री प्रभादेवीच्या मंदिराच्या अनुषंगाने दुसरी माहिती मिळते, ती श्री. कृष्णराव रघुनाथजी नवलकर उपाख्य के. रघुनाथजी या पाठारे प्रभू समाजातील लेखकाने इसवी सन १८९०-९५ सालात लिहिलेल्या 'The Hindu Temples of Bombay' ह्या पुस्तकात. ह्या पुस्तकात श्री प्रभादेवीचं मंदीर शके १२१७ (सन १२९५) मध्ये माहिममधील 'कोटवाडी' इथे उभारल्याचा उल्लेख केला आहे. या मंदिरात श्री प्रभादेवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना सन १२९४-९५ मध्ये झाल्यावर पुढची दोनेकशे वर्षाच्या  शांतते नंतर पंधराव्या शतकाच्या अखेरीस पोर्तुगीज भारतात आले. इ.स. १५३४ मध्ये त्यांनी गुजरातचा सुलतान बहादुरशहाला युद्धात नमवून वसई प्रांत, बेटे व सभोवतालचा समुद्र यांचा ताबा मिळ‍वून पोर्तुगालचा राजा आणि त्याचे वारस यांचे या भागावर आधिपत्य प्रस्थापित केले. अशा रीतीने मुंबई बेटे ख्रिस्ती धर्मियांच्या मालकीची झाली. पोर्तुगीज मिशनऱ्यांनी मूळ स्थानिकांचे धर्मांतर सुरू केले. धर्मांतर करून ख्रिस्ती होणाऱ्या लोकांना त्यांनी सर्व तऱ्हेच्या सवलती व देणग्या दिल्या. ज्यांनी धर्मांतर करण्यास विरोध केला त्यांची मानहानी करून छळ सुरू केला. त्यांना गुलामासारखी वागणूक देत सक्तीने मोलमजुरी करण्यास सांगण्यात येत असे. ख्रिस्ती धर्माधिकाऱ्यांनी स्थानिक मंदिरे व मूर्ती यांचा सूडबुद्धीने विध्वंसही केला. यावेळी बचावासाठी ही मूर्ती बांद्रे येथील एका विहिरीत लपवण्यात आली. हा काळ होता साधारणतः सन १५१० ते १५२० च्या दरम्यानचा. पुढे जवळपास दोनशे वर्षांपेक्षा जास्त काळ ही मूर्ती विहिरीच्या तळाशी पडून राहिली. पाठारे प्रभू समाजाच्या श्याम नायक यांना देवीने स्वप्नात येऊन दृष्टांत दिला की, मला विहिरीतून काढून माझी मंदिरात प्रतिष्ठापना कर. त्याप्रमाणे नायक यांनी इ.स. १७१४ मध्ये देवीची स्थापना करून १७१५ मध्ये मंदिरांचे बांधकाम पूर्ण केले. पाठारे-प्रभूंची देवी म्हणून तिचे नामकरण प्रभावती असे करण्यात आले. म्हणजे इसवी सन १७१५ सालात आताच्या मंदीरात तिची प्रतिष्ठापना केलेली आहे. असा शिलालेख प्रभादेवीच्या मंदिरात पाहायला मिळतो. म्हणजे आताच्या प्रभादेवीच्या मंदिराला  ३०८ वर्ष होत आहेत. या मंदिरातील देवीची मूर्ती मात्र कमीतकमी सातशे पंचवीस ते जास्तीत जास्त आठशे पंचानऊ वर्षांपूर्वीची आहे असं म्हणण्यास जागा आहे. त्या मंदिराचे मूळ मालक कृष्णनाथ जयानंद कीर्तीकर. परधर्म आक्रमकांच्या याच मोहिमेत श्री प्रभादेवीचं मंदीर जमिनदोस्त करण्यात आल्याचा उल्लेख के. रघुनाथजींच्या पुस्तकात आहे.
मुंबईच्या जडणघडणीत मोलाचा वाटा होता तो गिरणी कामगारांचा. या देवीचा आजुबाजूचा परिसरही सेंच्युरी, स्टँडर्ड, बॉम्बे डाईंग आदी गिरण्यांचा. हजारोंनी राहणाऱ्या गिरणी कामगारांच्या अनेक चाळी व वाड्यांचा हा परिसर. ही सर्वच मंडळी गावागावातून कामानिमित्त मुंबईत आली, त्यामुळे साहजिकच गावातल्या (विशेषतः कोकणातल्या) जत्रांचे स्वरूप येथेही आले. आज याच परिसरातील गिरण्या-चाळी-झोपडपट्ट्या, वाड्या नामशेष होऊन चकाचक कॉर्पोरेट कंपन्या किंवा टोलेजंग टॉवर्स  आले असले तरी गेल्या ५० वर्षांतले जत्रेचे स्वरूप आणि देवींच्या प्रती असलेला भक्तिभाव किंचितही कमी झालेला नाही. प्रभादेवीची जत्रा लहानपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आनंद देणारी असते. या जत्रेच्या निमित्ताने अनेक माहेरवासिनी देवीची ओटी भरण्याच्या निमित्ताने वा नवस करण्याच्या निमित्ताने खास आपल्या सासरी येत असतात

- रवींद्र मालुसरे
९३२३११७७०४


                               प्रभादेवी मंदिराला ३०० वर्षे पूर्ण झाल्यानंतर 
                          महाराष्ट्र टाइम्समध्ये हा लेख प्रकाशित झाला होता. 

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत सत्याची कास धरून पत्रकारिता करावी.

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत  सत्याची कास धरून पत्रकारिता करावी. सतरावे शतक प्रबोधनाचे ,  अठरावे शतक वैचारिकतेचे ,  एकोणीसावे शतक प्रगतीचे...