प्रभादेवीकर रमेश परब यांना अभिवादन !
गुरुवार, १ ऑगस्ट, २०२४
प्रभादेवीकर रमेश परब यांना अभिवादन !
सोमवार, २४ जुलै, २०२३
लहान मुलांना मोबाइलपासून दूर ठेवा - डॉ तात्याराव लहाने
लहान मुलांना मोबाइलपासून दूर ठेवा - डॉ तात्याराव लहाने
प्रभादेवीत मोफत नेत्र चिकित्सा शिबिर संपन्न
मुंबई : (रवींद्र मालुसरे ) - आजकाल बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांमध्ये तरुणांचे आणि लहान मुलांचे प्रमाण वाढत आहे. चष्म्याचा नंबर, तिरळेपणा हे बऱ्याचवेळा डोळ्यांची जडणघडण होताना निर्माण झालेल्या अडचणीमुळे होतात आणि त्यावर तितकेच चांगले उपायही उपलब्ध आहेत. परंतु हल्ली डोळ्यांची नीट काळजी आणि डोळ्यांवर निष्कारण वाढवलेला ताण यामुळे होणारे आजार वाढत आहेत. आज कामे संगणकावर अवलंबून असतात. संगणक, मोबाईल, टॅब, आयपॅड या सर्वांतून प्रकाश डोळ्यामध्ये पडतो. ही सर्व यंत्रे आपण डोळ्यांपासून एक फुटापेक्षा कमी अंतरावर ठेवतो. यातून सततच्या पडणाऱ्या प्रकाशामुळे डोळ्यांच्या बाहुल्या आकुंचन पावतात आणि कालांतराने डोळ्यातील स्नायू स्पासमच्या स्थितीत जातात. त्यामुळे नजर कमी होते. डोळे दुखणे सुरु होते आणि काही वेळ काम केल्यानंतर, लगेच डोळ्याचा थकवा जाणवायला सुरुवात होते. दिवसांतून ८-१० तासांपेक्षा अधिक वेळ संगणकावर काम करताना आपल्या डोळ्यांची उघडझाप बंद असते आणि दृष्टीपटलावरील अश्रू तरंग सुकून जातात. डोळे वारंवार थंड पडतात. त्यामुळे डोळ्यांचे इन्फेक्शन वारंवार होते. यातील सर्वात गंभीर बाब म्हणजे ५-१८ या वयोगटातील मुला-मुलींमध्ये या आजाराचे वाढते प्रमाण दिसून येते. अपत्य लहान असल्यापासून, अगदी वयाच्या पहिल्या वर्षापासून त्याच्या / तिच्या हातात खेळणी म्हणून टॅब, मोबाईल , आयपॅड अशा वस्तू दिल्या जातात. त्यातून येणाऱ्या प्रकाशामुळे डोळ्यांना लवकर चष्म्याचा नंबर लागतो. मुलांना अगदी लहान वयापासून कोरड्या डोळ्यांसाठी औषधे सुरु करावी लागतात. डोळे हे माणसाच्या जगण्याचेच नव्हे तर आनंदाचे साधन असल्याने मायबापांनो काळजी घ्या असा सल्ला डॉ तात्याराव लहाने यांनी प्रभादेवीकरांना दिला.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शाखा क्रमांक १९३ चे शाखाप्रमुख संजय भगत यांच्या आयोजनातून तसेच विभग प्रमुख महेश सावंत यांच्या सहकार्याने प्रभादेवी महापालिका शाळेत शिबिराचे आयोजन केले होते त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रभादेवीतील नागरिकांकरिता सुप्रसिद्ध नेत्र चिकित्सक पद्मश्री तात्याराव लहाने, डॉक्टर रागिणी पारिख, डॉक्टर सुमित लहाने यांच्या रघुनाथ नेत्रालयाचे नेत्र चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराला माजी केंद्रीय मंत्री शिवसेना नेते अनंत गीते, माजी परिवहन मंत्री दिवाकर रावते, आमदार सुनील शिंदे, विभाग प्रमुख महेश सावंत, आशिष चेंबूरकर, श्रद्धा जाधव, आरती कीनरे ,उद्योजक अनिल माने, विभाग संघटक शशी पडते ,राजू पाटणकर, निरंजन नलावडे, मा. शाखा प्रमुख लक्ष्मण भोसले, नगरसेविका हेमांगी वरळीकर, उपविभाग संघटक सूर्यकांत बिर्जे, उप विभाग प्रमुख कैलास पाटील, यशवंत विचले, अभय तामोरे, रेखा देवकर, हिरु दास, विनायक देवरुखकर ,शाखाप्रमुख विनय अक्रे, शाखा समन्वयक गणेश देवकर, चंदन साळुंखे, रत्नाकर चिरनेरकर, अभिजीत कोठेकर, रवी पड्याची, कीर्ती मस्के, संजना पाटील, वैष्णवी फोडकर, युवा सेनेचे मुंबई समन्वयक सागर चव्हाण, अभिजीत पाताडे, जाई सोमण, युवा विभाग अधिकारी सप्नील सूर्यवंशी, गुर्शिन कौर, साईश माने, चिंतामणी मोरे, सौरभ भगत तसेच विभागातील व शिवसेना संघटनेतील मान्यवरांनी भेट दिली सदर शिबिर आयोजित केल्याबद्दल नागरिकांनी शिवसेनेचे तसेच शाखाप्रमुख संजय भगत यांचे आभार व्यक्त केले. शिबिर यशस्वी करण्याकरिता कार्यालय प्रमुख सुशांत वायंगणकर , सुजन मंत्री, सुरेश झित्रे व इतर पदाधिकाऱ्यांसह युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व महिला पुरुष शिवसैनिकांनी विशेष परिश्रम घेतले. शिबिरात प्रभादेवी व परिसरातील ६२५ नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
बुधवार, ३ मे, २०२३
सेंच्युरी बाजार जवळील भूतबंगला, फकीरशेठ चाळ आणि जांभेकर महाराज
सेंच्युरी बाजार जवळील भूतबंगला, फकीरशेठ चाळ आणि जांभेकर महाराज
पंजाबमधून श्रीरामकृष्ण महाराज जे निघाले ते सुरतमध्ये आले. परंतु सुरत हे त्यांचे कार्यक्षेत्र ठरणारे नव्हते. श्रीयुत कामेरकर या नावाचे मुंबईतील गृहस्थ सुरत येथे काही कामानिमित्त गेले असताना, कोणीतरी मराठी बोलणारा बुवा सुरतेच्या स्मशानात येऊन राहिला आहे अशी बातमी त्यांना लागली. त्यामुळे त्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाल्याने ते त्यांच्या भेटीसाठी गेले. तुम्ही मुंबईला चला अशा त्यांच्या विनंतीवरून मग महाराज मुंबईला आले. मुंबई हे त्यांचे कार्यक्षेत्र व्हायचे होते. मुंबईतील दुःखीकष्टी लोकांना उपकारक सहकार लाभावयाचा होता. ते मुंबईत कसे आले आणि तेथे येऊन त्यांनी कोणत्या स्वरूपाचे कार्य केले याची विस्तुत माहिती याविषयी तुम्हाला या लेखावरून होईल. अक्कलकोटच्या श्रीसमर्थ महाराजांची त्यांनी एकनिष्ठेने उपासना व भक्ती करून त्यांना प्रसन्न करून घेतले. स्वामींची श्रीरामकृष्ण महाराज जांभेकर यांच्यावर संपूर्ण कृपा होती. श्री जांभेकर महाराजांनी अनेक सिद्धी प्राप्त करून घेतल्या होत्या आणि त्यांचा सदुपयोग त्यांनी लोककल्याणासाठीच केला. कोणतीही सिद्धी असो, ती सहजसाध्य नसते. त्यासाठी अपरंपार कष्ट करावे लागतात. महाराजांनी आरामाच्या व सुखी जीवनाचा त्याग केला त्यामुळेच ते पुढे सिद्ध पुरुष होऊ शकले. महाराज त्यांच्याकडे येणाऱ्या माणसाची कुवत ओळखत असत. बहुतेक स्वार्थ साधण्यासाठी येत असत. हे जाणत असतानाही त्यांनी प्रत्येकाला शाश्वत सुखाचा मार्ग दाखविला. त्यामुळे आजही निष्ठावंत भक्तांना त्यांचे अस्तित्व जाणवत असते. त्यांचा पोशाख साधा असे. ते लुंगी नेसत. अंगात तोकड्या हाताची कफनी, डोक्यास साईबाबासारखे फडके गुंडाळीत.
श्री जांभेकर महाराज सेंच्युरी बाजार सिग्नलच्या अगोदर लुकास कंपनीच्या समोर असलेल्या ज्याठिकाणी आज जयंत अपार्टमेंट आहे त्या ठिकाणी 'भूतबंगला' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका घरात राहत असत. त्या घरात कोणीही राहायला तयार नसे. कारण त्या घरात भुतांचे वास्तव्य होते अशी सर्वांची समजूत होती. महाराज तेथे राहावयास आले व काही दिवस सुखात राहिले. येथे राहायला आल्यानंतर त्यांची ख्याती उत्तरोत्तर वाढत गेली. तो बंगला आपण कायमचा विकत घ्यावा असे वाटून त्याच्या ख्रिश्चन मालकाशी त्यांनी बोलणे केले होते. परंतु तो काही केल्या विकायला तयार होईना. त्यामुळे विठ्ठल मंदिरजवळ म्हणजे श्रीदत्त मंदिरासमोरील चंपावाडीत त्यांनी प्रभादेवीतच एका आगरी समाजातील व्यक्तीचे म्हणजे 'फकीरशेट' यांचे घर भाड्याने घेतले.
तेथे घरापुढे आलेल्या लोकांना बसण्याउठण्यासाठी मोकळी जागा होती. मात्र घर भाड्याने देऊन फकीरशेट तो शेजारीच एका झोपडीत राहू लागला. त्याच्यापाशी नावाप्रमाणेच काही नव्हते. राहते घर भाड्याने गहाण पडले होते, नोकरी धंदा नव्हता. कुरुंबासह आयुष्याचे दिवस कसेबसे ढकलत होता. महाराजांना त्याची ही गरिबी लक्षात आल्यानंतर त्याच्यासह कुटुंबाला चांगले कपडे घातले. आणि त्याला 'फकीरशेट' या नावाने संबोधण्यास सुरुवात केली. संपूर्ण कुटुंबाचा रुबाब वाढला. त्यामुळे पुढे ते सर्वांचे फकीरशेट झाले. ते घर म्हणजेच महाराजांचा मठ झाला. आणि त्याला नंतरच्या काळात आपोआप मठाचे स्वरूप आले. देवपूजा, आरती, प्रसाद वैगरे सुरु होऊन त्या घराचे पावित्र्य व माहात्म्य वाढले. भक्तमंडळी दिवसेंदिवस वाढत्या प्रमाणात त्या मठात येऊ लागले. येणाऱ्यांचे हेतू सफल होऊ लागले. तेथे सतत नंदादीप तेवत असे. महाराजांच्या नाना प्रकारच्या लीला तेथे चालत असत. ज्यांचे हेतू सफल होत ते तेलाचे व तुपाचे डबे तसेच लागेल तेवढे धान्य वैगरे आणून देत असत. रोज शेकडो लोक भोजन करून तृप्त होऊन जायचे. कधी काही कमी पडत नसे. महाराजांनी कधीही स्वतःजवळ पैशांचा संग्रह केला नाही. ते फक्त एकवेळ भोजन करायचे. बहुतेक दिवस उपवास करायचे. कधी कधी बेचाळीस दिवस उपोषण करीत. सकाळी व रात्री एक पेला दूध एवढाच त्यांचा त्या काळात आहार असे. ही सर्व अनुष्ठाने ते लोककल्याणासाठी करीत असत. पहाटेच्या प्रहरी काकड आरती होत असे व आरतीसाठी दोन-अडीचशे माणसे एकत्र जमायची. तर अन्नप्रसादाचा कार्यक्रम सायंकाळी सातपर्यंत चालायचा. गरीबी आणि धनिक अन्नसंतर्पणाच्या कार्यक्रमाला येत असत.
जांभेकर महाराजांचा जीवनपट अवघा १८९८ ते १९४० म्हणजे अवघ्या ४२ वर्षाचा त्यापैकी फक्त १९३० ते १९४० दहा वर्षे प्रभादेवीत राहिले. १० जानेवारी १९४० रोजी त्यांनी शिवाजीपार्क स्मशानभूमीजवळ समाधी घेतली. आज त्याठिकाणी 'श्रीरामकृष्ण जांभेकर मठ' आहे आणि धार्मिक कार्य अखंडितपणे सुरु आहे.
- रवींद्र मालुसरे
अध्यक्ष,मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई
९३२३११७७०४
मंगळवार, २० डिसेंबर, २०२२
प्रभादेवीतील आगरी सेवा संघ
प्रभादेवीतील आगरी सेवा संघ
आज प्रभादेवीत आगरी सेवा संघाच्या वतीने वार्षिक कार्यक्रम भव्यदिव्य स्वरुपात साजरा होत आहे, सन २०११ मध्ये वरळी कोळीवाड्याच्या जनता शाळेत अमृत महोत्सव अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत झाला होता.
त्यावेळी १२ डिसेंबरला मुंबईतील काही दैनिकातून मी यासंदर्भात लेख लिहून संस्थेच्या कार्याचा आढावा घेऊन मुंबईकरांना ओळख करून दिली होती. यानंतरच्या ११ वर्षात भटचाळ येथे आगरी सेवा संघ चौक, मुरारी घाग मार्ग येथे माजी नगरसेवक मोतीराम तांडेल चौक, खाडा येथे आगरी सेवा संघाचे समाजमंदिराची स्वतःची वास्तू अशी कामे उभी राहिली आहेत.काळाच्या ओघात संस्थेची स्थापना करणारे काही समाजधुरीण ज्यांनी संस्थेला उर्जितावस्था दिली, आर्थिक ताकद दिली, समाजातील सर्व थरात पोहोचवली असे समाजधुरीण काळाच्या पडद्याआड गेले आहेत, काही वयोवृद्ध झाल्याने घरी आहेत मात्र पद्माकर म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली अलीकडची तरुण पिढी सातत्याने कार्यरत आहे. यातूनच कैलास पाटील, संजय भगत, नरेंद्र बांधणकर, कोठेकर, ज्योति जुईकर असे बरेचजण राजकीय क्षेत्रात पुढे जात आहेत. गुणवत्ता असलेले अनेक तरुण वैद्यकीय क्षेत्रासह आधुनिक तांत्रिक युगात मोठमोठ्या हुद्यावर काम करीत आहेत.....या नवीन पिढीसमोर इतकेच आहे, आपल्या पूर्वजांनी बोलीभाषेसह जोपासलेली मूळ संस्कृती जपण्याची गरज आहे.
-------------------------------
"अगोदर प्रकाशित झालेला लेख"
सन १९३५ च्या दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर आगरी सेवा संघाची स्थापना झाली. आज २०२२ च्या दसऱ्याला ८७ वर्षे पूर्ण झाली आहेत. मुंबई शहरात अनेक ठिकाणी आगरी समाजाची वस्ती फार मोठ्या प्रमाणावर विखुरलेली आहे. त्यापैकी प्रभादेवी, वरळी कोळीवाडा, सास्मिराच्या मागे भटचाळ, वडाळा, भोईवाडा, स्यान्डहर्स्ट रोड, चुनाभट्टी, मानखुर्द अशी ठळक ठिकाणे आहेत. परंतु प्रभादेवी आणि वरळी कोळीवाडा येथे ही संख्या विलक्षण आहे. कामगार वस्तीतील या ठिकाणी गेल्या २० वर्षतात विलक्षण बदल होतो आहे. मुख्यतः चाळी आणि झोपडपट्टयांनी व्यापलेला हा भाग सध्या टोळेजंग टॉवर्सनी व्यापलेला आहे. त्यामुळे आगरी समाजासह बहुजनांची काळाच्या ओघात प्रतिष्ठा वाढली आहे. शैक्षणिक, सामाजिक, सहकार, उद्योजकता व राजकीय क्षेत्रात तीन दशकापूर्वी अत्यंत मागास असलेला या समाजातील अनेक तरुण कायापालट झालेल्या या समाजातील अनेक तरुण उच्च शिक्षित झाला आहे. इतकेच नव्हे तर बदललेल्या जागतिकीकरण आणि उदारीकरणाचा वेध घेत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवीत आहे. काहींनी तर परदेशात चांगल्या कंपनीमध्ये नोकऱ्या मिळवल्या आहेत. शिक्षणाबरोबरच सधनता आणि समृद्धी आल्याने समाजात चंगळवाद बोकाळला आहे, सर्वच समाजातील अलीकडची युवापिढी शिकली आहे पण जगाच्या बाजारात वावरताना प्रगल्भ बौद्धिक वाढ व्हावी यासाठी अवांतर वाचन करीत नाही, बहुसंख्यजण सोशल मीडियाच्या आहारी गेल्याने स्वकेंद्रित झाली आहे, असाच सूर मागच्या पिढीचा असतो. असे असतानाही या समाजातील अलीकडच्या पिढीने प्रभादेवी परिसरात राजकीय अस्तित्व निर्माण करतानाच समाजाची सदानंद वाडीत (खाडा ) स्वतःची वास्तू उभी केली आहे.
देशाचा स्वातंत्र्यापूर्वी म्हणजे १९३५ चा आसपासचा काळ हा मुंबई शहरात विशेषतः कष्टकरी कामगारांच्या जीवनात अत्यंत महत्वपूर्ण घडामोडी व उलथापालथी करणारा होता. मुंबई गिरणी कामगार युनियनच्या नेतृत्वाखाली १९२८ मध्ये गिरणी कामगारांचा प्रदीर्घ असा ६ महिन्यांचा जागतिक नोंद करणारा बलाढ्य संप लढला गेला होता. महात्मा गांधी यांनी पुकारलेला १९३० च्या मिठाचा सत्याग्रहाचा देशव्यापी लढ्यात मुंबईवासीय ब्रिटिश साम्राज्याला हादरे देण्यासाठी लढाऊ बाणाने उतरला होता. १९३४ साली राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन खऱ्या अर्थाने कामगार विभाग ओळख असलेला वरळी येथे राष्ट्रीय लढ्याची धार तेजस्वी करीत मोठ्या प्रमाणात यशस्वी धार तेजस्वी करीत मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले होते. १९३५ मध्ये पुन्हा गिरणी कामगार संपाचा घोषणा वातावरणात दुमुदुमु लागला होता. अशाच वातावरणात त्यावेळचे आगरी समाजातील धुरीण समाजाला एकत्र करावे या भावनेने विचार करीत होता. मुंबई शहराशेजारी असलेला अलिबाग तालुक्यातील पोयनाड, सांबार, फणसापुर, पेण तालुक्यातील वडखळ, वाशी, आमटेम, शहाबाज, चरी, शहापूर, पेझारी, कासू, गडब, पिटकीरी या विभागातील आगरी बांधव गिरणी - कारखान्यात अंगमेहनत करून सेंच्युरी बाजार, वरळी कोळीवाडा या भागात स्वतःचा किंवा भाड्याच्या चाळीत राहत होता. तर इकडे ग्रामीण भागातला बांधव निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून आपली खारटण जमिनीच्या तुकड्यांवर दिवसरात्र काबाडकष्ट करून त्यावर आपला संसार सावरण्याचा प्रयत्न करीत होता. एकंदर एका बाजूने निसर्गाची आपत्ती तर दुसऱ्या बाजूला मागासलेपणामुळे हा समाज हलाकीच्या परिस्थितीत जखडला गेला होताच, परंतु त्याचबरोबर आणखी एक जबरदस्त आणि तितकेच महत्वाचे असे कारण होते, ते म्हणजे सर्वांगीण सामाजिक मागासलेपणा व त्यासोबतचा अशिक्षितपणा. अनेक प्रकारचा अनिष्ट अपप्रवृतींना तो बळी पडलेला होता. पोलीस-कोर्ट कबजाच्या हेलपाट्यांच्या बरोबर पैशाचीही उधळपट्टी करीत असे. केवळ मीपणाचा दिखाऊ हौसेपोटी लग्नसमारंभ किंवा इतर प्रसंगी कर्ज काढून वारेमाप खर्च करण्यात तो धन्यता मानत असे. व्यसनाबरोबरच अंधश्रद्धेचा आहारी जाऊन बुवाबाजी, भगतगिरी, देवदेवस्की, भुताटकी यांचा सारखा फसवणूक होणाऱ्या गोष्टीना तो सहज शिकार बनत होता. त्या काळात अशा परिस्थितीत अडकल्याने त्याला आपला मायभूमीस मुकून मुंबईचा रस्ता धरावा लागला होता.
इकडे मुंबईत आलेल्या या आगरी बांधवांवर शहरी वातावरणात इतर पुढारलेला समाजाशी सामाजिक, व्यावहारिक, धार्मिक व इतर संबंध व संपर्क आल्यामुले त्यांचे आचार, राहणीमान, चालीरीती, बोलीभाषा यावर कळत नकळत प्रागतिक असा हळूहळू का होईना पण चांगला परिणाम बदल होऊ लागला होता. शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण वाढत होते. त्यामुळे विशेषतः युवकांना आपल्या समाजातला सर्वच अनिष्ट गोंष्टींविरुद्ध लढा देण्याचे विचार त्यांच्यात घोळू लागले होते. याच सुमारास १९३२ - ३३ सालांत आगरी समाजातील मुंबईचे दोन गरीब होतकरू तरुण जी एल पाटील व भाऊराव मुकुंद पाटील हे विश्वविद्यालयाची पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल समाजातर्फे त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला होता. अशा या महत्वपूर्ण सामाजिक घटनेपासून स्फूर्ती घेऊन प्रभादेवी, वरळी, कोळीवाडा भागातील प्रमुख युवकांनी आगरी समाजाला संघटीत करून मागासलेपणा विरुद्धच्या लढ्यास हात घालण्यास सुरुवात केली. आणि अशा तऱ्हेने अखेर १९३५ साली दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर एक भव्य संमेलनाचे आयोजन करून आगरी सेवा संघाची स्थापना करण्यात आली. समाज वस्तीचा अशा सर्व भागातून त्या त्या भागाचे प्रतिनिधी निवडून घेऊन संघाचा कार्यकारिणीची रचना करण्यात आली. विशेष म्हणजे संघाचे कार्यकर्ते श्रमजीवी वर्गातील गिरणी कामगार होते. १९३६ सालचा राष्ट्रीय काँग्रेसचा महाराष्ट्रातील पहिल्या मंत्रिमंडळाच्या आमदानीत संपूर्ण दारूबंदीचा कायदा पास करण्यात आला.
कामगार भागांत त्याचे आगरी सेवा संघाने स्वागत केले. थाळीनाद, प्रचार बैठका राबवून दारूबंदीचा हा संदेश संघाने परिणामकारपणे घरोघरी पोचविला होता. तसेच संघाच्या कचेरी शेजारीच मोफत वाचनालय सुरु करण्यात आले होते. दैनिके, मासिके याबरोबरच ३०० निवडक पुस्तकांचा भरणा असलेले छोटेसे ग्रंथालय संघाच्या सभासदांसाठी विनामूल्य चालविले होते. हे ग्रंथालयाला संघाचे एक निष्ठावंत कार्यकर्ते आणि माजी जनरल सेक्रेटरी कै विठ्ठल बा पाटील यांचा स्मरणार्थ आजगायत चालू आहे. तसेच कुस्ती, चेअर बॅलन्सिंग, लेझीम, दांडपट्टा इत्यादी व्यायाम प्रकार तज्ज्ञा शिक्षाकडून विनामूल्य शिकविले जात असत. त्याचप्रमाणे गोकुळाष्टमी निमित्त गोविंदा पथक, दसरा संमेलन, संघाचा आर्थिक उन्नतीसाठी चित्रपट किंवा नाट्यप्रयोग,वधु-वर संशोधन मंडळ, इयत्ता १० वी, १२ वी तसेच पदवीधर झालेला यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार, वैद्यकीय शिबीर असे अनेक कार्यक्रम यशस्वीपणे होत असतात. संघाच्या अशा तऱ्हेने चालविलेला या सर्वांगीण समाजकार्याची दखल घेऊन मुंबई महानगरपालिकेने १९३९ साली भटाच्या चाळीत १ रुपया नाममात्र दराने भाड्याने संघाच्या कार्यालयासाठी जागा दिली. जी एल पाटील यांनी आगरी सेवा संघाचे कार्य हे आपले जीवन कार्यच मानले होते.
बेस्टमधील कामगारांची संघटना आणि आगरी सेवा संघ अशी दुहेरी कामगिरी ते पार पाडीत असत. संबंध देशभर कम्युनिष्ठांच्या धरपकडीचे सत्र सुरु झाले असताना त्यांना अटक झाली आणि ते ४ वर्षे नाशिक कारागृहात स्थानबद्ध होते. त्यामुळे अप्रत्यपक्षपणे संघाचा कार्यावर परिणाम झालाच. थोडी शिथिलता आणि विस्कळीतपणा आला. परंतु अभिमानाची बाब अशी की बिकट प्रसंगी संघाचा तरुण कार्यकर्त्यांनी संघटितपणे पुढे होऊन धैर्याने व नेटाने संघाचा कारभार हाती घेतला. संघाच्या कार्याप्रती जी एल यांची निष्ठा एवढी होती की, १९५२ साली जेलमधून सुटल्यानंतर ते प्रथम संघाच्या ऑफिसवर आले. त्यानंतर झालेला १९५२ सालचा मुंबई कॉर्पोरेशन निवडणुकीत ते नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यांच्या पश्चात संघाचे अध्यक्ष रामचंद्र बांधणकर यांच्या नेतृत्वाखाली प्रमुख कार्यवाह राजेंद्र टेमकर, कार्यवाह अशोक पाटील, कोषाध्यक्ष नरेंद्र बांधणकर यांनी ही संघटना टिकविण्यासाठी आणि यंदाचे अमृत महोत्सवी वर्ष अनेक सामाजिक उपक्रमांनी साजरे करण्यासाठी अहोरात्र झटत आहेत.
अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई
9323117704
बुधवार, २६ जानेवारी, २०२२
प्रभादेवी म्युनिसिपल सेकंडरी स्कुलमधील ४० वर्षानंतर वर्ग भरला.
४० वर्षानंतर SSC चा वर्ग भरला पुन्हा घंटा वाजली, धडे गिरवले
कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु होणार की नाहीत असा राज्यात संभ्रम असताना .... प्रभादेवी म्युनिसिपल सेकंडरी स्कुलमधील ४० वर्षापूर्वीच्या १९८२ च्या SSC च्या शाळेच्या वर्गाची बॅच पुन्हा एकदा त्यावेळचे शिक्षक सर्वश्री वासुदेव दिंडोरे सर, भालचंद्र पिळणकर सर, चौधरी सर, अरुणा केळकर मॅडम, अस्मिता गोविंदेकर मॅडम यांच्या उपस्थितीत घंटा वाजली...वर्ग भरला...यस सर - यस मॅडम 'हजर' म्हणत पट भरला...फळ्यावर त्याची नोंद झाली. ओळख परेड होत सर्वांना करीत 'पास' करीत गोल्ड मेडल प्रदान करण्यात आले, मधली सुट्टी झाली, डब्यातून खाऊ खाल्ला, टेबलावरचे डस्टर दाखवत शिक्षकांनी पुन्हा एकदा उर्वरित आयुष्यासाठी सुखी जीवनाचे धडे आपल्या भाषणातून दिले, राष्ट्रगीत होऊन शाळा सुटली. त्यावेळी व्रात्य असलेले प्रशांत भाटकर-गणेश तोडणकर कार्यक्रमाच्या प्रसंगी 'मॉनिटर' होते त्यामुळे अपेक्षेपेक्षा जास्त कार्यक्रम यशस्वी झाला,...
आज तुमच्यापैकी काहींचे चेहरे तर काहींची नावे आठवताहेत, निसर्गाचा आणि काळाचा हा महिमा आहे, पण शाळेतील गोड आठवणींना उजाळा देण्यासाठी तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने हजर राहिलात, आपल्या एकमेकांना भेटण्याचे प्रचंड कुतूहल असणार, त्यामुळेच हे आज घडले. तुम्ही होतात म्हणून शाळा आणि आम्ही होतो. त्यामुळे बदल घडला असला तरी तुम्ही आताच्या शाळेच्या इमारतीत आठवणींना उजाळा देण्यासाठी तुम्ही इच्छा होईल तेव्हा जात जा असे भावनिक उदगार वासुदेव दिंडोरे सर यांनी आपल्या भाषणात काढले. अस्मिता गोविंदेकर मॅडम आपल्या भाषणात म्हणाल्या की, जुन्या आठवणी अत्तरासारख्या कुपीमध्ये साठवून ठेवा, आणि जेव्हा केव्हा मनात निराशा येईल तेव्हा त्यांची स्मरण करा, नक्कीच ताजेतवाने व्हाल. ४० वर्षानंतर तुम्ही पुन्हा शाळेचा वर्ग भरवत आहात व तुम्ही भेटणार असे समजल्यानंतर एक शिक्षिका म्हणून मला जास्त आनंद झाला आहे. हे माझे शिक्षक आहेत असे जेंव्हा तुम्ही अभिमानाने आमची ओळख करून देता त्यावेळच्या भावना मला शब्दात व्यक्त करता येत नाहीत. माझ्या मुलांच्यावर जसे प्रेम होते तीच भावना तुमच्याही बाबतीत होती, तुम्ही नावलौकिक मिळवावा आणि महापालिका शाळेत शिकलो आहोत याचा न्यूनगंड न राहता तुम्ही भविष्यात मोठे व्हावे याहेतूने कदाचित तुम्हाला मी त्यावेळी मारले असेल, परंतु आज विठ्ठलाच्या भेटीसाठी जी तळमळ असते तीच ओढ आणि हुरहूर आज माझ्या मनात दाटली आहे. असे भावुक उदगार अरुणा केळकर मॅडम यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले. तर चौधरी सर म्हणाले की, मी वर्गाकडे येतो आहे असे दिसले की, तुमच्या वर्गात शांतता पसरायची त्यामुळे मला नक्कीच विसरला नसाल, खरं तर मी खाजगी शाळेतली चांगल्या पगाराची नोकरी सोडून गरीब मध्यमवर्गीय मुलांना चांगले शिक्षण देता यावे हे एक धेय्य मनाशी बाळगून महापालिका शाळेत शिक्षक म्हणून रुजू झालो. अनेकांना त्यावेळी याचे आश्चर्य वाटले होते पण, माझ्या कार्यकाळात तुमच्यातले अनेक गुणी विद्यार्थी भेटले त्यांची नावेही मी अजून विसरू शकलो नाही, त्यामुळे प्रभादेवी ही शाळा माझी आवडती शाळा ठरली. सुप्रसिद्ध कलाशिक्षक भालचंद्र पिळणकर सर यांनी ४० वर्षांपूर्वी सेंडऑफ देताना 'तुज पंख दिले देवाने कर विहार सामर्थ्याने' आणि 'या लाडक्या मुलांनो तुम्ही मला आधार नव हिंद युगाचे तुम्हीच शिल्पकार' ही दोन गाणी म्हटली होती ती पुन्हा वाढत्या वयातही सुरेल आवाजात म्हटली.
रवींद्र मालुसरे
अध्यक्ष
मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई
9323117704
बुधवार, २० मे, २०२०
प्रभादेवीची 'प्रभावती' माता
प्रभादेवी मातेचे मंदिर : तीन शतकांचा ठेवा
२५ जानेवारी १९९२ शनिवार, दैनिक सामना |
प्रभादेवी मंदिराला ३०० वर्षे पूर्ण झाल्यानंतरमहाराष्ट्र टाइम्समध्ये हा लेख प्रकाशित झाला होता.
वैशिष्ट्यीकृत पोस्ट
सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत सत्याची कास धरून पत्रकारिता करावी.
सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत सत्याची कास धरून पत्रकारिता करावी. सतरावे शतक प्रबोधनाचे , अठरावे शतक वैचारिकतेचे , एकोणीसावे शतक प्रगतीचे...
-
संकल्पपूर्ती दाता : स्व. तानाजीदादा मालुसरे १३ सप्टेंबरला पहाटे गाढ झोपेत असताना मोबाईल वाजला. फोनमधून आवाज आला... तानाजीआण्णा सिरीयस आहेत...
-
प्रभादेवी श्री विठ्ठल मंदिर : इतिहास , परंपरा आणि नैमित्तिक कार्यक्रम आंतरराष्ट्रीय मुंबई नगरीला ‘सोन्याची नगरी’ किंवा जगभरात आपल्या भार...
-
बैल दिवाळी इतिहास , संस्कृती आणि शेतीचे धागे विणणारा सण कोकणातला बैलपोळा म्हणजे देव दिवाळी . आपल्या कृषिप्रधान संस्कृती मधील मह...