रमेश सांगळे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
रमेश सांगळे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १ ऑक्टोबर, २०२१

दारुच्या व्यसनातून पतीला बाहेर काढणाऱ्या सोशिक पत्नीच्या संघर्षाचीही ही कहाणी





*मद्यपी लोक हो, जीवन मातीमोल करू नका 

त्याकरिता वाचावेच लागणारे हे आत्मकथन !*


https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=4771461299581344&id=100001525637794

वरील लिंक क्लिक करा .... महत्वाचा व्हिडीओ जरूर ऐका 

ही आहे शालेय वयापासून सिगारेट आणि दारु पिण्याच्या व्यसनामुळे जीवन मातीमोल करणाऱ्या माणसाची सत्यकथा.

दारुच्या व्यसनामुळे जीवनाची कशी दुर्दशा होते ? या पुस्तकातील पहिली सात-आठ पृष्ठेच वाचल्यावर मद्यपी आणि सर्वसामान्यांच्या अंत:करणात खोलवरच्या 
कप्प्यात शरमेने ढवळाढवळ होते. 

इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या सुमारास सिगारेट-बिअरने केलेल्या मजेच्या नशेने या माणसास दारुडा म्हणून शिक्कामोर्तब केले. शिकाऊ उमेदवारी करताना आणि पुढे 
प्रख्यात लार्सन आणि टुब्रो या कंपनीत काम करीत असताना दिवसरात्र दर दोन-चार तासांनी अगदी हातभट्टीचीही दारु पिणाऱ्या या माणसाला दारुने इतके गुरफटून घेतले, की कंपनीने नोकरीवरुन काढण्याची नोटीस काढली. 

ही आहे रमेश सांगळे या माणसाच्या दारुच्या अतिव्यसनामुळे घरादाराची आणि शरीराची कशी दुर्दशा होते आणि त्यातून मुलेबाळे व घर कसे पोळून निघते याची कहाणी.

जी सत्य कहाणी आहे, दारुच्या व्यसनात असणाऱ्या आणि सर्वसामान्यांसाठीही एका हाती येईल, अशी ही या पुस्तकाची ताकद आहे. 

*तरीही या पुस्तकाची आणि व्यसनाधीन सांगळे यांची मुख्य ताकद आहे त्यांच्या दिवंगत पत्नी नंदाताई, ज्यांनी मेलेले मासे जसे पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जातात, त्या परिस्थितीत 
असणाऱ्या सांगळेना दारुपासून परावृत्त करुन जीवानोन्मुख बनवून माणूसपणाच्या प्रवाहात आणून ठेवले.* 

दारुच्या व्यसनातून पतीला बाहेर काढणाऱ्या सोशिक पत्नीच्या संघर्षाचीही ही कहाणी आहे, जी सर्वांकरिता प्रेरक आहे. 

रवींद्र मालुसरे 

अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई  

मंगळवार, २३ मार्च, २०२१

व्यसनमुक्तीचा दूत : रमेश सांगळे

 व्यसनमुक्तीचा दूत : रमेश सांगळे



एका मांजरीला ९ वेळा जन्म मिळतो. असे म्हटले जाते. हे खरे आहे की नाही हे मला माहित नाही. पण माझ्या एका मित्राच्या बाबतीत त्याच्या २९ वर्षांपूर्वीच्या आयुष्याचा पट ऐकल्यानंतर हे खरे आहे की, त्याला २ वेळेस जन्म मिळाला. पहिल्यांदा नैसर्गिक आयुष्य मिळाले. म्हणजे जेंव्हा त्यांच्या आईने जन्म दिला. आणि दुसरा जन्म बायकोमुळे 'क्रिपा व्यसनमुक्ती' केंद्र येथे मिळाला. जेथे त्यांचे चांगल्या निर्व्यसनी मनुष्यामध्ये रुपांतर झाले. फक्त बोलण्यापुरते नाही तर त्याच्या वागण्यात आणि एकंदर व्यक्तीमत्वामध्ये त्यानंतर खुप फरक पडला. याच केंद्रामध्ये तो परत परत चांगला विचार करायला व वागायला शिकला. आणि समाजातला उपयुक्त असा नागरिक बनला.
रमेश भिकाजी सांगळे हा युवक शालांत परीक्षा पास होऊन, लार्सन अँड टुब्रो लिमिटेड पवई येथे १५ सप्टेंबर १९७७ साली शिकाऊ कामगार म्हणून रुजू झाला. आणि प्रशिक्षण पूर्ण करून १३ डिसेंबर १९८१ साली कामगार म्हणून कायम झाला. कंपनीच्या सहलीच्या निमित्ताने पहिल्यांदा बिअरचा ग्लास उचलून त्याने स्वताच्या ओठाशी लावला. जिभेवर रेंगाळलेल्या याच पहिल्या घोटाने पुढे त्याचे जीवन आणि कुटुंब उद्ध्वस्त झाले. अतिशय सावकाश, मजेसाठी दारूने त्याच्या जीवनात प्रवेश केला. आणि मग दारू म्हणजे मजा, आनंद, जल्लोष असा ठसा त्याच्या मनावर उमटला. प्रचंड मजा येऊ लागली. त्याला दारू खुप मोठी-मोठी स्वप्ने दाखवू लागली. सुरुवातीला त्याला वाटले इतरांप्रमाणे मी सर्वसामान्यपणे दारु पिऊ शकेल. पण अचानकच यात बदल झाला. त्याला त्याचे व्यसन जडले. आणि त्याचा त्याच्यावर ताबाच  उरला नाही. त्यामुळे त्याचा परिणाम कंपनीतील कामावर होऊ लागला, कामावरची गैरहजेरी वाढली. त्यामुळे चार्जशीट, नोटिसा मिळाल्या. दारू ही त्याच्या जीवनाची समस्या झाली. या अविवेकी दारूपायी वारंवार पैशाची चणचण त्यामुळे बायकोशी रोजची भांडणे व मारहाण यामुळे संसार रोज मोडू लागला. असे का झाले ? का होत आहे ? व मला दारू एवढी का प्यावी लागत आहे ? हे त्याला कळेनासे झाले. आता तर दारू पिण्यासाठी घरात चोऱ्या, खोटं बोलणे सुरू झाले. पैसे अपुरे पडू लागल्यामुळे दारूचा दर्जा घसरला. घरातील सर्वजण हरले होते. प्रतिष्ठित कंपनीतील एक कामगार रस्त्यावरील दारुड्याचे जीवन जगायला लागला. शेवटी एका प्रसंगात तर बायकोला जाळण्याचा असफल प्रयत्न करीत, स्वतः देखील रेल्वेखाली आत्महत्या करण्यास गेला होता. एका चांगल्या मुलाचा दारूने राक्षस केला होता. त्या दारूच्या नशेत बायकोच्या चारित्र्यावर संशय घेवू लागला. बायकोवर नाही-नाही ते आरोप करू लागला. नराधमासारखा वागू लागला. वेड लागल्यासारखा बडबडू लागला. मग मात्र बायको घाबरली, घरचे हादरले व त्याची दारू सोडविण्याचे प्रयोग सुरू झाले. मद्यपाश हा एक आजार आहे. आणि आपण या आजारला बळी पडलो आहोत हे त्याला समजले पण उमजत नव्हते. जेव्हा हे प्रमाण वाढले तेव्हा त्याचे मित्र , कामावरील वरिष्ठ अधिकारी यांनी त्याला दारु सोडण्याचा सल्ला दिला. परिणामी त्याने त्यांच्याशी मैत्री कमी केली. निरनिराळ्या जागा बदलून मित्र बदलून त्याचे पिणे चालूच होते. परंतु जेंव्हा डॉक्टरांनी सल्ला दिला की, याचे अजुन दारु पिणे धोक्याचे आहे. तेंव्हा त्याचा त्यावर विश्वास बसला नाही. नंतरही दारू सोडण्याचे खूप प्रयत्नही केले गेले. आणाभाका घेतल्या, परंतु नाही जमले. पुन्हा पहीले पाढे पंच्चावन. नातेवाईक आणि मित्रांनी पुन्हा पुन्हा खूप समजाविण्याचा प्रयत्न केला. पण एक दारूडया दुसऱ्यांचे सहसा ऐकत नाही. कारण आडवा येतो त्यांचा अहंकार व तो याबाबत दुस-यांनाच दोषी धरतो. त्याने दारूचे व्यसन सोडावे म्हणून बायकोने गंडे, दोरे, अंगारे, धुपारे, बाबा, बुवा इत्यादी सर्व प्रयोग त्याच्यावर करून पहिले. परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. तिच्या पदरी निराशाच आली. नंतर तिच्याच प्रयत्नाने एल अँड टी मधील त्याचे विभागीय व्यवस्थापक पी.एल.चावला, कामगार कल्याण विभागाच्या लीला करकरीया यांच्या सांगण्यानुसार त्याला बांद्रे येथील फादर जो परेरा यांच्या क्रिपा व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करण्यात आले. 


तो दिवस होता मंगळवार दि. २४ मार्च १९९२. तशी त्याची पण इच्छा होतीच दारू सोडण्याची. परंतु त्याला आपण व्यसनमुक्त होण्याची शाश्वती नव्हती. इथे आल्यावर त्याला इथले वेगळेच चित्र दिसले. प्रत्येक चेहरा वेगळा होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगळा भाव होता. कोणी बळजबरीने ऍडमिट केल्यामुळे रागात होता, कोणी आत्मविश्वासाने ओथंबत होता, कोणी व्यसनमुक्ती होईल की नाही यामुळे साशंक होता. त्यात स्वत:च्या अनुभवातून शिकत चांगल्या बदलासाठी प्रयत्नशील असणारे पेशंट पण होते. त्यांना विश्वास होता की प्रयत्न केला तर माणूस बदलू शकतो. व्यसनाधीनता या मानसिक आजारातून बाहेर पडण्यासाठी व्यक्तीने प्रथम अपयशाची जबाबदारी स्वत:ची स्वत: घ्यायला हवी. माणूस अपयशाची जबाबदारी इतरांवर टाकायला लागतो. त्यामुळे व्यसनाधीन व्यक्ती व्यसनामध्ये अधिकाअधिक गुरफटत जाते. मुद्दा असा आहे की, आपण व्यसनात गुरफटलो हा एक उत्तम प्रतीचा मूर्खपणा केला हे ठणठणीत पणे मान्य करायला खूप मोठ मन लागतं, आणि हा स्वतःचा अपराध रमेशने मनापासून तेथे स्वीकारला होता. त्याने त्याच्यासाठी घेतलेला हा एक योग्य निर्णय होता. सुरुवातीच्या दिवसांत त्याला बरेच काही उमगू लागले. खरे तर त्याला तेथे मिळालेला सुविचार ‘one day at a time’ चा अर्थ इथे कळला. आणि समुपदेशातून बरेच काही म्हणजेच आपला ‘प्रत्येक दिवस हा आजचाच दिवस’ असतो. कालची रात्र पडद्याआड गेली. उघाच्या दिवसाची सावली सुध्दा नाही आली, सत्य आहे आजचा दिवस, आत्ताचा तास, आणि हातातला आत्ताचा क्षण! डिप्रेशन आणि ऍडिक्शन या दोन्हीमधून बाहेर पडण्यासाठी आहे त्या वास्तवाचा स्वीकार करायला हवा. तिथेच व्यसनमुक्तीचा मार्ग सुरू होतो. दारू सोडणं ही प्रवासाची सुरूवात आहे. अंतिम बिंदू नव्हे. व्यक्तिमत्वात आमूलाग्र बदल घडविण्याचे प्रयत्न हा उपचाराचा भाग आहे. व्यसन करण्याची कृती थांबविणे म्हणजे वरवर दिसणाऱ्या लक्षणावरचा उपाय... "treatment of symptoms" या शब्दाचा अर्थ आहे "treatment of diseases within" आणि व्यक्ती आहे तोवर व्यक्तिमत्त्व आहे. आणि त्याबद्दलचे गुणदोषही आहेत. त्यामुळे उपचाराची प्रतिक्रिया सतत चालूच राहणार. अगदी अखेरच्या क्षणापर्यत !  स्वत:ला स्वत:च्या मनाशीच बऱ्याच लढाया लढाव्या लागणार हे त्याच्या काही दिवसातच लक्षात आले. काळानुसार अनुभवांची समृध्दी आली. तरी त्या लढाया संपत नाहीत. बऱ्याच वेळा त्यांचे  स्वरूप बदलेल. हा निश्चयसुद्धा मनाशी कोरून ठेवला. ‘सोचो तुम क्या चाहते हो, जो चाहते हो वही मिलेगा, जो सोचते हो वही देखो, जो देखते हो वही मॉँगो, ओर जो मॉँगेगा वही मिलेगा ! रमेशने जेव्हा व्यसनमुक्ती केंद्रातील शिबिर पूर्ण करून आत्मविश्वासाने बाहेर नव्याने पाऊल ठेवले. तेव्हा प्रत्येक संधीचा उपयोग करायचा व यश मिळेपर्यत सातत्याने प्रयत्न सुरू ठेवायचे याची खूणगाठ त्याने मनाशी बांधली.



या केंद्रात दाखल होऊन एकूण १६१ दिवसांचा कार्यक्रम कालावधी त्याने पूर्ण केला. तेथे सर्वोत्कृष्ट समुपदेशक लाभले होते, त्यांनी त्याला एका भावाप्रमाणे व्यसनातुन बाहेर येण्याकरता सल्ला दिला. आणि मदत केली. या केंद्रामधील वास्तव्यामुळे त्याच्यामध्ये खुप बदल घडुन आला. हा बदल फक्त व्यसनमुक्त होणे हा नव्हता. तर योगासनांमुळे तो शारिरीक द्रुष्ट्या चांगला झाला. तसेच रागावर नियंत्रण कसे मिळवावे हे शिकला. तसेच शिस्त काय असते, तसेच कठीण प्रसंगाना कसे सामोरे जावे हे देखील शिकला. केंद्रातील उपचारने त्याला दारुला नाही म्हणायला शिकवले. आणि सुरुवातीला जेंव्हा कधी दारु पिण्याचा विचार त्याच्या मनात येत असे तेंव्हा तो केंद्रामधले वास्तव्य आठवत असे. जो त्याला योग्य असा विचार करायला आणि निर्णय घ्यायला शिकवत असे.
 आई, पत्नीआणि मुलाबाळांना, जवळच्यांना व्यसनामुळे दिलेला त्रास फार भयंकर होता. हे उमजू लागले. 'दारुडा' म्हणून समाजाकडून मिळविलेली पदवी त्याने तेथेच टाकून देऊन, मनाशी संकल्प केला. यापुढे व्यसनाधीन व्यक्तींचे जीवन आणि त्याचे कुटुंब उद्धवस्त होऊन द्यायचे नाही. देवाने दिलेले बोनसरुपी पुनर्जीवन व्यसनमुक्तीच्या कार्यास अर्पण करायचे त्यांने ठरवले. कंपनीतील शिफ्ट ड्युटी, कामाचा ताण संभाळून बाहेर व्यसनमुक्ती कार्यास सुरुवात केली. नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य आणि मिरॅकल फौंडेशन मुंबई या संस्थेची व्यासपीठे त्याला या कामाला बळ देण्यासाठी मिळाली. या व्यासपीठावरून व्यसनविरोधी प्रचार, प्रसार, प्रबोधन सुरु झाले. निर्व्यसनी तरुण पिढी घडविण्यासाठी शाळा, महाविद्यालय विद्यार्थी, महिला, युवक, कामगार, मजूर, आदिवासी बांधव यांचे मेळावे भरवून स्वानुभव कथन करू लागला. व्यसनाधीन व्यक्तींसह त्यांच्या कुटुंबियांचे समुपदेशन चालू केले. स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करून निस्वार्थी भावनेने करीत असलेल्या या सर्व कामाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने २ ऑक्टोबर २०१३ रोजी नागपूर येथील व्यसनमुक्ती साहित्य संमेलनात 'राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार देऊन रमेशला सन्मानित केले गेले. या पुरस्काराची मिळालेली रक्कम रूपये १५,०००/- यात पदरचे रूपये १०,०००/- मिळवून स्वतःच्या गावच्या विकासासाठी हा निधी दिला. २०१२ साली लार्सन अँड टुब्रो लिमिटेड कंपनीमधून स्वेच्छानिवृत्ती घेऊन पूर्णवेळ व्यसनमुक्तीचे कार्य मुंबईसह महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात करण्यास सुरुवात केली. व्यसनमुक्ती केंद्रात मिळालेल्या 'आजचा दिवस फक्त ' या मंत्रावर रमेश २४ मार्च २०२१ रोजी त्यांच्या व्यसनमुक्त जीवनाची २९ वर्षे म्हणजेच १०५८८ दिवस पूर्ण करीत आहे. याचे सारे श्रेय ते त्यांची पत्नी कै. नंदा रमेश सांगळे यांना देतात. कारण तिने सावित्रीचा वसा घेतला. आपला पती व्यसनमुक्त व्हावा. यासाठी जिद्दीने प्रयत्न केले नसते तर रमेशरावांचा भिंतीवर हार घातलेला फोटोच २९ वर्षांपासून बघायला मिळाला असता.
आपल्याकडे व्यसन हा एक आजार आहे याची माहीती नसते. इथुन सर्व समस्या सुरु होते. आजार आहे हे जरी लक्षात आलं तरी त्यावर कुठलेही औषध उपलब्ध नाही. याची कल्पना नसते. कल्पना असली तरी ती स्विकारली जात नाही. आजाराचा चिवटपणा लक्षात घेतला जात नाही. त्यातुन निरनिराळे प्रयोग माणसे करु लागतात आणि व्यसनाच्या जाळ्यात पुन्हापुन्हा गुरफटत जातात. बरीच माणसे आणि त्यांचे नातेवाईक आपापले अनुभव सांगताना हे मान्य करतात की दारुचे व्यसन हा एक आजार आहे. हे आम्हाला माहीतच नव्हतं. हे माहीत होणं गरजेचं असतं. कारणं फार मोठ्या अपराधी भावनेतुन त्यामुळे माणसाची सुटका होते. त्याच्या कुटूंबियांचीही सुटका होते. कारण आपल्या नशीबी हे काय दुर्दैव आलं? या भावनेने ती मंडळी होरपळुन निघत असतात. त्यामुळे व्यसन हा आजार आहे. तो आपल्याला झाला आहे. आणि त्यावर कायम स्वरुपाचे औषध नाही. या गोष्टीचा स्विकार ही व्यसनाच्या विळख्यातुन निघण्याची पहिली पायरी असते. पण ही पहिली पायरी चढणं बहुतेकांना जड जातं. व्यसनाधीनांना आता दारु कायमची सोडावी लागणार. हा विचारही सहन होत नाही. व्यसनाच्या काळात व्यसन कमी करण्याचा प्रयत्न बहुतेकांनी केलेला असतो. त्यात यश येत नाही हेही त्यांना माहित असतं. काही जण अनेक महिने दारु बंद करुन पाहतात आणि त्यानंतर पुन्हा व्यसन सुरु होऊन ही मंडळी व्यसनाचा तळ गाठतात.
व्यसनी माणसाच्या मनात हे विचार तर घरच्यांच्या मनात आणखी काही वेगळेच असते. व्यसनमुक्ती केंद्रात दाखल होताना माणसे हतबल झालेली असतात. याला बरा करा आम्ही त्याला बसुन खायला घालु म्हणणारी माणसे आपला माणुस केंद्रामधून परत आल्याबरोबर त्याने काम शोधावे म्हणुन मागे भुणभुण लावतात. याचा अर्थ त्याने आयुष्यभर बसुन खायचे असा नसतो. पण व्यसनातुन बाहेर पडलेल्या माणसाची परिस्थिती नाजुक असते. त्याला स्वतःला सावरायला थोडासा वेळ हवा असतो. अनेक वर्षे वाया गेलेली असतात. अनेक हिशेब पुन्हा बसुन नव्याने करायचे असतात. साऱ्या आयुष्याची घडी पुन्हा बसवायची असते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्यसनापासुन दुर राहायचे असते. अशावेळी थोडासा ताणतणाव हा व्यसनाकडे वळवायला कारणीभुत होऊ शकतो. घरच्यांना त्रास दिलेला असतो त्यामुळे संबंधांमध्ये कडवटपणा आलेला असु शकतो. अशावेळी दोन्हीकडुन समजुतदारपणाची आवश्यकता असते. काहींच्या हे लक्षात येत नाही. त्यामुळे संशय घेणे सुरु होते. बाहेरुन आल्यावर निरखुन पाहणे, तोंडाचा वास घेणे हे प्रकार सुरु होतात. काही जणांना हे सहन होत नाही आणि आपण इतका स्वतःवर संयम ठेऊनही ही माणसे आपल्यावर संशय घेतात यामुळे त्यांना नैराश्य येते. आणि ते पुन्हा दारुकडे वळतात. व्यसनामुळे समाजापासुन दुरावलेली व्यक्ती ही डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता असते. आपल्याला कुणी बोलावत नाही, सर्वजण टाळतात, घरातल्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये आपला सल्ला कुणी विचारत नाही, सणासमारंभाला आपल्याला आमंत्रण नसतं. हे माणसाला जाणवत असतं. ही जाणीव अतिशय खचवणारी असते. समाज आणि व्यक्ती यातल्या सामंजस्याचे संतुलन साधणे हा व्यसनमुक्तीतला महत्त्वाचा टप्पा आहे असे त्यांना वाटते.
आपणच बदलायला हवं, समाज बदलणार नाही किंवा तो बदलणं आपल्या आवाक्याबाहेरचं आहे. हे समजवुन द्यायला एक उदाहरण हमखास दिलं जातं. आपण पाऊस थांबवु शकत नाही. आपण त्यापासुन बचाव करण्यासाठी छ्त्री घेऊ शकतो. मुळात पाऊस आणि माणसात नेमका फरक आहे तो हाच. पाऊस विचार करीत नाही. निसर्ग नियमाप्रमाणे पडतो. माणसं विचार करतात.
आपल्या नातेवाइकांमध्ये, मित्रांमध्ये, ओळखीच्या लोकांमध्ये व्यसनाच्या आहारी गेलेले अनेक लोक असतात. मात्र योग्य वेळी डोळे उघडून व्यसनाधीनतेच्या दु:खदायक चक्रातून बाहेर उडी मारून पुन्हा नव्याने आयुष्याची घडी बसवणे खरोखरी धैर्याचे काम आहे. दरम्यानच्या काळामध्ये रमेश सांगळे यांनी बऱ्याच चांगल्या सवयी लावून घेतल्या आहेत. मुख्य म्हणजे वाचन, वाचकांच्या सदरातून पत्रलेखन सुरू केले. रोज किमान तासभर वाचन चालूच ठेवले. विषयाचे बंधन न ठेवता चांगली चांगली पुस्तके वाचून काढली. पुस्तकांचा छोटासा संग्रह केला. चित्रपट, नाटक बघणे गाणी ऐकण्याचा छंद जोपासला. मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, मिरॅकल व्यसनमुक्ती केंद्र या संस्थांच्या कार्याशी जोडून घेतले आहे. त्यांनी एक ठरवले आहे की रिकामे बसायचे नाही. मोकळ्या वेळात काही ना काही चांगले काम करत राहायचे. जिथून जे शिकायला मिळेल ते शिकत राहायचे. आपल्याला पुढे कामी येईल की नाही हा विचार न करता शिकत जायचे. व्यसनमुक्तीची २९ वर्षे पूर्ण होताना रमेश सांगळेना गत आयुष्याबद्दल विचारले तेव्हा ते म्हणाले, खरे सांगायचे म्हणजे माझ्या व्यसनाधीनतेबद्दल मला वाईटही वाटत नाही आणि पश्चात्तापदेखील होत नाही. व्यसन हा एक आजार आहे, हे जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील मान्य केले आहे. तो मला झाला आणि वेळेवर मिळालेल्या योग्य उपचारांमुळे मी त्यातून बाहेर पडू शकलो. व्यसन एक स्वभावदोष आहे, जो अनुभवी लोकांच्या मार्गदर्शनानुसार नियंत्रित करता येतो. आपण लहानपणापासून काही गोष्टी वाचतो, ऐकतो आणि त्या आपल्या मनावर कोरल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे, मी अमुक एक चूक केली आणि बरबाद झालो किंवा मी अमुक निर्णय योग्य घेतला आणि माझे आयुष्य सुधारले, क्रमाने केलेल्या चुका व क्रमाने घेतलेल्या चुकीच्या निर्णयांची मालिका व्यसनाधीन होण्यास कारणीभूत ठरतात. सुधारणा हीसुद्धा एक प्रक्रिया आहे. क्रमाने घेतलेल्या योग्य निर्णयांची मालिका सुधारणा घडवून आणते. म्हणून अनुभवी लोकांचे मार्गदर्शन खूप आवश्यक असते. याबरोबरच उच्चशक्तीवरचा विश्वास महत्त्वाची भूमिका बजावतो. माझ्यावर परमेश्वराची कृपा आहे, आणि माझ्या पत्नीने घेतलेल्या कणखर भूमिकेमुळे मला वेळेवर मदत मिळाली. मी सुदैवी आहे की, आयुष्याच्या सुरुवातीलाच ऐन उमेदीत मला हा धडा मिळाला. 


आज संपूर्ण आयुष्यभर बेडवर काढावे लागणाऱ्या, शरीराने विकलांग असलेल्या माझ्या एकुलत्या एक ३५ वर्षीय मुलाची सर्व जबाबदारी माझ्याकडे देऊन, माझी पत्नी नंदा हिचे ६ महिन्यापूर्वी दुःखद निधन झाले आहे. आता यापुढे घरात मुलाचा आणि समाजातील व्यसनाधितांचा पालक म्हणून निवृत्तीनंतरही हिमतीने आणि निस्वार्थीपणे आयुष्याच्या साठीनंतरही उमेदीने जगणार आहे. हे त्यांनी आत्मविश्वासाने सांगितले.
(रमेश सांगळे ९८२१५७४८९१ )


--- रवींद्र मालुसरे 
(अध्यक्ष,मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई) ९३२३११७७०४

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत सत्याची कास धरून पत्रकारिता करावी.

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत  सत्याची कास धरून पत्रकारिता करावी. सतरावे शतक प्रबोधनाचे ,  अठरावे शतक वैचारिकतेचे ,  एकोणीसावे शतक प्रगतीचे...