सोमवार, ११ डिसेंबर, २०२३

बैल दिवाळी इतिहास, संस्कृती आणि शेतीचे धागे विणणारा सण





बैल दिवाळी

इतिहास, संस्कृती आणि शेतीचे धागे विणणारा सण

कोकणातला बैलपोळा म्हणजे देव दिवाळी. आपल्या कृषिप्रधान संस्कृती मधील महत्वाचा सण. ‘मार्गशीर्ष प्रतिपदाया दिवसाला कोकणात आगळेच महत्त्व आहे. कोणत्याही संस्कृती कोशात धार्मिक व्रतवैकल्यांच्या ग्रंथात माहिती नसलेला सण म्हणजे देवदीपावली(बैलदिवाळी ). हा दिवस कोकणातदेव दीपावलीकिंवादेवदिवाळीया नावानं साजरा होतो. पोलादपूर तालुक्यात 'बैल दिवाळी' म्हणून साजरा होतो.  सर्जा-राजा वा ढवळ्या-पवळ्या या बैलजोडीच्या शिंगांना रंग फासण्याचा त्यांना गोंडे बांधण्याचा हा दिवस. गाई, बैल, वासरे, म्हशी, रेडे यांच्या शिंगांना रंग लावून, त्यांना गोडधोड खायला घालून हा सण साजरा करण्याची प्रथा आहे. या देवदीपावलीचा  उत्साह आबालवृद्धांच्या अंगी संचारलेला असतो. दिवाळी या नावातच उत्साह आहे, आनंद आहे. दिवाळीच्या सणामागील आशय मात्र आपल्याला फार थोडा माहिती असतो. जरा विस्ताराने जाणून घेऊया दिवाळी सणाची माहिती -

दिवाळी येते ती शरद ऋतूचा आनंद मनात घेऊनच ! आपली भारतीय संस्कृती ही शेतीवर आधारलेली आहे. शारदीय नवरात्र आणि दसरा संपला की पाठोपाठ कोजागिरीची रात्र पूर्ण चंद्रबिंब घेऊन येते. आटवलेल्या केशरी दुधासह आपण ही रात्र जागवतो. या दिवसालानवान्न पौर्णिमाअसेही म्हणतातकारण शेतातून नुकत्याच हाती आणलेल्या धान्याची कणसे देवीला अर्पण केली जातात. या समृद्धीचा आनंद मनात असतानाच पाठोपाठ रमा एकादशी येते. आपण ज्या काळात दिवाळी साजरी करतो त्या काळात अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. पण ज्यावेळी समाज अधिक प्रमाणात फक्त शेतीवर अवलंबून होता त्याकाळात शेतात पिकलेले धान्य ज्यावेळी कोठारात भरेल आणि विकले जाईल तो काळ समृद्धीचा मानला जाणे स्वाभाविक होते. त्यामुळे धान्याची मुबलकता असताना आणि शरद ऋतूचा आल्हाद असताना दोन्हीचा एकत्र आनंद घेण्यासाठी दिवाळी धाकटी दिवाळी आणि थोरली दिवाळी सणाची योजना झालेली दिसते. प्रसिद्ध गोवंश अभ्यासक पशुतज्ज्ञ मिलिंदजी देवल यांनी या सणामागची कारणमीमांसा फार चिकित्सकपणानं उलगडून दाखवलीय.







ओला-चारा बैल माजले- लेझीम चाले जोरात

शेतकरी मन प्रसन्न झाले- ढामटीकी ढूमढूम।।

एका सुप्रसिद्ध मराठी कवीच्या या ओळी सत्यातच उतरलेल्या असतात. भारत कृषिप्रधान देश आहे. येथील शेती पावसावर अवलंबून आहे. म्हणून शेतकरी आकाशाकड़े नजर लावून पावसाची वाट पाहत बसतो. पाऊस पडताच पिके तरारून उठतात. फुलझाडांना बहर येतो. फुलांचा सुगंध आसमंतात दरवळतो. तुकड्या-तुकडय़ांत विभागलेली अडचणीच्या जागेत, डोंगरात, कडय़ाकपारीत असलेली शेती कसायला, शेतक-याला बैल हा जीवाभावाचा सखासोबती वाटतो. शेतकरी आपल्या बैलजोडीची कसोशीनं निगा राखतो. रानवनातला हिरवागार चारा (गवत) आणि पेंड घालून  बैलाला तजेलदार बनवलेला असतो.  थंडी पडायला सुरुवात झालेली असते. कोकणातली थंडी म्हणजे हाडं गोठवणारी. ओला चारा कसदार झालेला असतो. कोवळी उन्हं आल्हाददायक वाटू लागतात. अशा वेळी कोकणातील शेतकरी जवळजवळ शेतीच्या कामातून मोकळा झालेला असतो. टपोर्या भरलेल्या भाताच्या लोंब्या उभ्या पातीला पेलवेनाश्या झाल्या आणि दाण्यांसह पानंही सोन्यागत पिवळी पडायला लागली, म्हणजे समजायचे की आता भात काढणीला आले आहे. उन्हाळी भाजीपाला, नाचणीची कापणी संपलेली असते, अशा वेळी पशुधनाप्रति आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस निवडला गेला असावा, असं मिलिंद देवल यांनी सांगितलं. मार्गशीर्षातील शुद्ध प्रतिपदा म्हणजे देवदीपावली हे संस्कृती परंपरेतील सण आपण डोळसपणानं स्वीकारायला हवेत.






धाकट्या दिवाळीची म्हणजे शहरात फटाक्यांची आतषबाजी करंज्या-लाडू-फरसाण, आणि  दारात कंदील ही दिवाळीची सुरूवात होते ती अश्विन वद्य द्वादशीला म्हणजे गोवत्सद्वादशीला.  या सणातही  पशूधनाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचं एक माध्यम आहे. थोरली दिवाळी मात्र मार्गशीर्ष महिन्याच्या नव्या दिवसाला साजरी होते. या दिवसाच्या तयारीसाठी आधीपासूनच धामधूम सुरू होते. कोकणातील देवदिवाळी म्हणजे जणू बैलपोळाच !
अरडं मरड बैल खरडं
देव दिवाळी गाई म्हशी ओवाळी
गाई म्हशी कुणाच्या,लक्ष्मणाच्या,
लक्ष्मण कुणाचा, आईबापाचा ...
दे माय खोबऱ्याची वाटी,
वाघाच्या पाठीत घालीन काठी...!

हे गीत आठवलं की जाणीव होते देव दिवाळीची, पोलादपूर तालुक्यात गावागावात ही दिवाळी उत्साहात आणि आनंदात साजरी होत असते.  या ऐतिहासिक दिवाळीच्या वर्णनाच्या काही नोंदी तत्कालीन पेशवाई दप्तरातील कागदपत्रांमध्ये आढळतात.  या दिवाळीपूर्वी दोन महिने आधी काही शेतकरी आपल्या बैलांना रानातला हिरवागार चारा आणि पेंड घालून धुष्टपुष्ट करतात. शरीराने मस्तवाल झालेला  बैल पाहूनच आणि तो मारकुटा असला तर  उरात धडकी भरली पाहिजे अशी त्यांनी त्याची तयारी केलेली असते. बैल दिवाळीच्या अगोदरच्या आठवड्यापासून आपल्या बैलावर  प्रेम करणारा शेतकरी किंवा गावात असलेली शाळकरी मुलं बैलांच्या शिंगांना रंगबेरंगी गोंडा लावण्यासाठी रानातून खवशीचे झाड तोडून आणतात. त्याच्यावर दिवसरात्र बरीच मेहनत केल्यानंतर त्यापासून गोंडा बनवतात. गोंडा तयार झाल्यानंतर त्याची विणलेली वीण आणि त्याला लावलेला रंगबेरंगी रंग फारच आकर्षक दिसतो

त्यानंतर आदल्या दिवसापासूनच बैलाच्या शिंगाना तो गोंडा बांधण्यासाठी आणि तो सहज कुणी उपटू नये यासाठी मेहनत घेतात. बैलाच्या शिंगाना गुळ आणि चुना लावून तो अधिक घट्ट चिटकेल तो गोंडा सहजासहजी कुणालाही उपटता येणार नाही असा प्रयत्न यामागे असतो.  आपल्या सजवलेल्या बैलाकडे त्या दिवशी तर घरधनीण (गृहलक्ष्मी) आणि बैलाचा मालक ( बळीराजा ) मायेने निरखून पाहत असतात. शेतकऱ्याचे हृदय अभिमानाने फुलून जात असते  कारण तो मनोमन कबूल करीत असतो की त्याची मेहनत आणि घाम त्याच्या विश्वासू बैलाच्या घामाशी अखंडपणे गुंफलेले आहे, जो पेरणी, पालनपोषण आणि कापणी या शाश्वत नृत्यात आपला भागीदार झालेला असतो म्हणून घरात असलेली धान्याची कणगी भरलेली असते.

त्या दिवशी शक्यतो घराघरात वडे-मटणाचा झणझणित बेत ठरलेला असतो. सोयरे धायरे पाहुणचारासाठी आलेले असतात. हे सजवलेले बैल ज्या पूर्वपरंपरागत खाचरात दिवाळी साजरी होते त्या ठिकाणी आणून बांधून ठेवले जातात.  गावातील आबालवृद्ध आणि आजूबाजूच्या गावातील पैपाहुणे, सगे-सोयरे त्या खाचराच्या बांधांवर हातात काठी घेऊन उभे असतात. सोडल्यानंतर मस्तवाल बैल गर्दीच्या दिशेने जर अंगावर आला तर त्याला हुसकावण्याचा प्रयत्न होतो.  गावऱ्हाटीच्या परंपरेनुसार त्यानंतर दिवाळीला सुरुवात होते. मानकऱ्यांच्या प्रथेनुसार एका अंगणात गावातील मुख्य एकत्र येतात. त्याठिकाणी फुले-रांगोळीचा कना काढून त्यावर बैलांना बांधण्यासाठीचा मजबूत जाडीचा एक दोरखंड (सोल) ठेवलेला असतो. ग्रामदेवतेला गाऱ्हाणे घालून त्याची पूजा केली जाते 







त्यानंतर परंपरेचा मानाचा बैल त्याठिकाणी आणून त्याला सोल लावून वाजंत्र्यांसोबत तो गावदेवी आणि हर हर महादेवाचा गजर करीत दिवाळीच्या खाचरात घेऊन जातात. सोलाच्या मध्यभागी बैल बांधलेला असतो तर दोन्ही बाजूने १५-२० तरबेज गडी ती सोल पकडून असतात. त्या खाचरात एका ठिकाणी मांगोळी उभारलेली असते. तो बैल त्या ठिकाणी आणल्यास त्याला बकऱ्याचे कातडे लावलेल्या लांब काठीने हुसकावले जाते, त्यामुळे तो बैल वाजंत्र्याच्या तालावर नाचायला लागतो. बैल जर मारकुटा आणि रागीट असला तर तो ढुशी मारून सोलकऱ्यांना लोळवतो किंवा खाचरात असणाऱ्यांना शिंगाने मारायला धावतो. बैल त्या मंगोलीच्या खालून जायला पाहिजे असा दंडक आहे. थोडावेळ असे केल्यानंतर त्या बैलाला बांधलेला गोंडा उपटण्यासाठी दिवाळीसाठी आलेल्या सोयऱ्यांना बोलावले जाते अनेकदा काही हौशी व्यक्ती स्वतःच बेधडकपणे पुढे जातात, आणि बैलाशी झुंजण्याचा व गोंडा उपटण्याचा प्रयत्न करतात. काहीवेळा एखादा उत्साही गडी बैलाच्या ताकदीचा अंदाज न आल्याने जखमी होतो.  यानंतर जेव्हढे बैल दिवाळीसाठी आणलेले असतात ते एकामागोमाग एक खाचरात आणले जातात आणि वाजंत्र्याच्या तालावर नाचवले जातात. काही गावात दुपारनंतर  रेड्यांच्या झोंब्या होत असत. मात्र आता ही परंपरा थांबली आहे. 

पोळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्रात वेगवेळ्या पद्धतीने विशेषतः पोलादपूर तालुक्यात सावित्री-कामथी-ढवळी खोऱ्यात हा एक महत्त्वपूर्ण कृषी उत्सव  असतो.  नांगर आपल्या हातात असतो, पण पुढे जमीन नांगरण्याची ताकद आणि चैतन्य बैलाच्या हृदयातून येते. ज्यांच्या घामाने मातीचे पोषण होते. आशेचे बीज पेरले जाते आणि श्रमाने शेतातले सोने हातात येते. जेव्हा बैल पुढे जातो म्हणजे आमच्या उदरनिर्वाहाचा मार्ग नांगरतो म्हणूनच समृद्धी येते अशी बळीराजाच्या मनाची धारणा आहे.  या सणाद्वारे ग्राम्य संस्कृती गावकऱ्यांची एकता व केवळ उपजीविकाच नाही तर ग्रामीण भारताची भावना देखील टिकवून ठेवण्यास मदत होते. अलीकडच्या काळात वाडीवस्त्यांवरील तरुणाईने उदरनिर्वाहासाठी शहरांकडे धाव घेतली आहे. गावच्या गावे आणि वाड्यावस्त्या ओस पडत चालल्या असताना ही देवदिवाळी साजरी करण्यासाठी हौसेने आपल्या गावी जाणारी तरुणाई आजही मोठ्या प्रमाणात आहे. शिकल्या सावरल्या आजकालच्या पिढीला शारीरिक ताकद दाखविण्यासाठी उद्युक्त करणारा हा सण म्हणजे कदाचित वेडेपणा वाटेल परंतु आपले वाडवडील म्हणजे बळीराजा यांनी ही कृषी संस्कृती जोपासण्या सोबतच पूर्वापार पशुधनही जोपासत आला आहे. मित्रानो पोलादपूर तालुक्यातील हा एक सण आहे जो परंपरेच्या पिढ्यानपिढ्या ओलांडतो आहे. एक परंपरा अशी आहे जी इतिहास, संस्कृती आणि शेतीचे धागे कृतज्ञता आणि आदराच्या मायेमध्ये विणली जाते. शेतकर्‍यांची लवचिकता, बैलांची ताकद आणि समाज आणि संस्कृती टिकवून ठेवणार्‍या कृषी जीवनशैलीचे सौंदर्य साजरे करण्याच्या या बैल दिवाळीच्या दिवशी स्थानिक परंपरेनुसार तुम्ही मनापासून जर यात सामील झालात तर तुम्हाला मनापासून आनंद, उत्साह देण्यासाठी ही दिवाळी येते व संध्याकाळी होते तेव्हा मात्र ती मनाला हुरहुर लावून.





- रवींद्र मालुसरे
अध्यक्ष,मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई
९३२३११७७०२ 

संदर्भ सहकार्य : ह.भ.प. रामदादा ह मालुसरे (साखर)


1 टिप्पणी:

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत सत्याची कास धरून पत्रकारिता करावी.

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत  सत्याची कास धरून पत्रकारिता करावी. सतरावे शतक प्रबोधनाचे ,  अठरावे शतक वैचारिकतेचे ,  एकोणीसावे शतक प्रगतीचे...