महात्मा गांधी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
महात्मा गांधी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २ ऑक्टोबर, २०२१

महात्मा गांधीजी कळणार नाहीतच

 

मेल्यानंतरही माणूस जिवंत राहतो काय ? तो माणूस कसा आहे यावर त्याचे उत्तर अवलंबून आहे किंवा तो माणूस कशासाठी जगत होता यावरही अवलंबून आहे.

मारूनही जीवंत राहातो...प्रेषित म्हणून जगाला प्रेरणा देत नतमस्तक व्हायला लावतो तो "गांधी"
स्वातंत्र्य-संघर्षात, जीवन संग्रामात माणसाची कुळी लावणाऱ्याने जगावे कसे व मरावे कसे यांची मोलाची शिकवण देणारा गांधी नावाचा एक भणंग महात्मा जन्माला आला होता. केवळ भाषणापूरता, कृतीपुरता, किंवा लौकिकापुरताच लोकोत्तर नव्हे तर साध्या साध्या दैनंदिन गोष्टीत, अविर्भावात व श्वासोच्छ्वासात लोकोत्तर वाटणारा हाडामासाचा कुणी एक 'गांधी' नावाचा माणूस या भारत भूमीत वावरला यावर आजच्या पिढीचा विश्वास बसणार नाही. स्वातंत्र्यानंतरच्या काळात काहीशा उशिराने जन्मलेल्या आमच्या पिढीला गांधी फक्त पाठ्यपुस्तकातून माहित होते, गांधींना पाहिलेली वा त्यांच्या हाकेला ओ देत चळवळीत भाग घेतलेली पिढी संपत चालली आहे. पडद्यावरचा गांधी मात्र घराघरांत पोहोचला.
ब्रिटिश निर्माता रिचर्ड एटनबरो यांनी १९८२ मध्‍ये ‘गांधी’ हा तर राजकुमार हिरानी यांनी २००६ मध्‍ये ‘लगे रहो मुन्नाभाई’ चित्रपट आणला. प्रेक्षकांच्‍या पसंतीस उतरलेल्‍या या चित्रपटात दिलीप प्रभावळकर यांनी गांधीजींची व्‍यक्‍तिेरखा साकारली होती.


निष्पाप माणसाचं जेव्हा जालियनवाला बागेत क्रूर हत्याकांड केले जाते तेव्हा हा महात्मा गांधींनी ब्रिटिशांना इशारा दिला होता, 'तुम्ही जा नाही तर तुम्हाला जावे लागेल.' गांधीजी हे केवळ निर्भय नेते नव्हते तर शाश्वत सत्याचा आग्रह धरणारे आणि तेच ध्येय उराशी बाळगणाऱ्या समुदायाचे नेतृत्व करणारे होते. अफगाणिस्तान पासून बांगलादेश पर्यंत सर्वधर्मीय स्वातंत्र्याच्या ध्येयापोटी गांधींना नेता मानून एकत्र
आले होते, कारण गांधींच्या नेतृत्वात लोकांना जगण्याची नैतिकता स्पष्ट दिसत असे. गांधी म्हणजे निर्मळ, अधिक उन्नत, उदात्त, निर्भयता, धैर्य आणि त्याग यांचे जीवंत प्रतीक होते म्हणूनच नायक या नात्याने स्वीकारले होते.

गांधींचा निर्भयपणा, बावनकशी सच्ची प्रामाणिकता आता कुठेच दिसत नाही. मूल्यहीन समाजात आपण एकमेकांना, परस्परांना ओरबाडून घेण्यात मग्न आहोत.
गांधीहत्येपूर्वीच तुकडे झालेल्या या अवाढव्य देशात आजच्या घडीला आमच्या तरुण पिढीला दिसतोय उध्वस्त जीवन जगणारा अफाट जनसमुदाय. बंद उद्योग, बेकारी आणि बेशिस्त, बेजबाबदार राजकारणी आणि त्यामुळेच लोकशाहिवरचा लोकांचा उडत चाललेला विश्वास आपण पाहतोय.
गांधीने गोऱ्यांचे राज्य खालसा केले पण गेल्या ७४ वर्षात आपल्याच काळ्या माणसांच्या राज्यात जातीय दंगे, राजकीय हिंसाचार आणि प्रांतीय संकुचित दृष्टीचा उदोउदो चौफेर ऐकू येतोय !
खून, मारामाऱ्या, गुंडगिरी, हिंसाचार व क्रौर्य यांचा सुळसुळाट असलेल्या गुन्हेगारी दुनियेतच आपण जगतोय. त्यातूनच अस्थिरता, असुरक्षिता यांनी आम्हाला पुरतं घेरलेय. आजच्या धकाधकीच्या, धावपळीच्या समाजजीवनात वासना, विकृती, द्वेष, लोभ, स्पर्धा, मत्सर, लाचारी आणि स्वार्थ, राजकिय वारसदारी या प्रवृत्तींना उधाण आलंय आणि त्याचमुळे वैफल्य भावनेने युवकाला ग्रासले आहे.


गांधींनी आयुष्यभर ज्या स्वप्नांना जिवापाड जोपासले त्यांची होत असलेली होळी आपण पाहतोय. काँग्रेसने गांधींच्या 'रामराज्य' या संकल्पनेचा पार विचका केला तर ज्यांनी गांधींच्या हत्येचे समर्थन केले तेच 'गांधीवादाचा बुरखा' पांघरून त्यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होत आपल्याकडे मते मागत आहेत.
गांधीजी मध्ये काय होते, अतिशय विशुद्ध अशी सत्यसाधना आणि करुणेचा ओलावा..... म्हणूनच मित्रांनो महात्मा गांधी या व्यक्तीची हत्या होऊ शकली मात्र त्यांच्या विचारांची नाही. ज्या शतकात विंधवस्क बॉम्ब जन्माला आला त्याच शतकात मोहनदासचा जन्म झाला जो पुढे जगाच्या अंतापर्यंत
एक प्रेषित म्हणून 'महात्मा गांधी' नावाने शिल्लक राहणार आहे.
- रवींद्र मालुसरे
अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई 

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत सत्याची कास धरून पत्रकारिता करावी.

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत  सत्याची कास धरून पत्रकारिता करावी. सतरावे शतक प्रबोधनाचे ,  अठरावे शतक वैचारिकतेचे ,  एकोणीसावे शतक प्रगतीचे...