वाचक संवाद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वाचक संवाद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १३ मे, २०२०

*वाचक संवाद*

*या संपादकाने पाडला आयुष्यावर प्रभाव*


लोकसत्ताचे संपादक विद्याधर गोखले 


लहानपणापासुनच दररोज वर्तमानपत्र वाचण्याची -खरं तर त्या वयात वर्तमानपत्र पहाण्यात किंवा चाळण्यातच - अधिक मजा असावयाची , मात्र रोजच्या रोज *लोकसत्ता* घरीच येत असल्यामुळे वाचावयास मिळे ! बालोद्यान , क्रीडाजगत , नाटक - सिनेमा जाहिराती या पलिकडे फारसे वाचन जात नसे ! अग्रलेख किंवा संपादक वगैरेचा काहीच गंध नव्हता ! त्यावेळी लोकसत्तेचे संपादक कै. ह. रा. महाजनी होते आमच्या जवळच एक सदगृहस्थ (मोहन नेरुरकर) रहात , ते अधुनमधुन वर्तमानपत्रांत कविता , चुटकले पाठवित व ती छापुन आली माझ्या वडिलांना दाखविण्यास येत त्यांच्या गप्पा गोष्टीतुन वर्तमानपत्रीय लिखाणाचे कुतुहल आणि गोडी लागली!वय वाढले थोडे शहाणपण , समज आली वाचनाबरोबरच लिखाणाची आवड लागली अर्थातच पत्रलेखन सुरु करावयाचे वाटले,लोकसत्तेपासुनच सुरवात केली ! अग्रलेख वाचुनच संपादकांना प्रतिक्रिया कळवू लागलो लोकसत्ताचे संपादक विद्याधर गोखले यांचे लिखाण प्रेरणादायी ठरले

*अण्णा गोखले* म्हणजे बहूआयामी व्यक्तिमत्व ! संस्कृत - उर्दू भाषेवरील त्यांचे प्रभुत्वतसेच अतिशय मिष्कील आणि गपीष्ट - मोकळा दिलदार स्वभाव ! लेखक , वक्ता , नाटककार , सामाजिक - शैक्षणिक - राजकीय क्षेत्रातील वावर यामूळे अण्णा गोखले हे संपादक या नात्याने अधिक लोकप्रिय ठरले असावेत ! वर्तमानपत्रीय तंत्रज्ञान त्यातील बारकावे तसेच वाचकांची रुची ओळखुन आपल्या दैनिकांची माडणी सजावट करणे तसेच आपल्या दैनिकाची आकर्षक जाहिरात करणे सर्व स्थरातील वाचकवर्गास आवडेल असे लेखनस्तंभ , सदरे सचित्र प्रसिध्द करणे अशा नाना प्रकारे अण्णा गोखले यांनी लोकसत्ता एका वेगळ्याच उंचीवर नेला ! सामान्य वाचक , जाहिरातदार , वितरक विक्रेते यांची एक फळी निर्माण झाली ! संपादक , अग्रलेख हे म्हणजे बोजड , अनाकलनीय , फाजील पांडित्य झाडत
गांभीर्यपूर्ण लिखाण - हा गैरसमज अण्णा गोखले यांनी आपल्या मनमोकळ्या , खुमासदार लज्जतदार परन्तू दर्जेदार ,व्यासंगी प्रतिभावंत लेखणीव्दारे दूर केला ! या त्यांच्या सकारात्मक लेखनशैलीचा कळत नकळत माझ्या छोटेखानी लेखन प्रवासावर माझा मोठा प्रभाव पडला आहे !!












शरद वर्तक, दहिसर 
९८६९२०६४१०

=======================================================================

ठाणे जीवनदीप वार्ता - रवींद्र घोडविंदे 



वृत्तपत्र असो अथवा कोणतेही माध्यम यामध्ये संपादक हा महत्वाची भूमिका बजावत असतात. संपादकीय लेखन ही मानवी जीवनावर,निसर्गावर व अन्य घटकांवर अवलंबून तसेच राजकीय,आर्थिक व शैक्षणिक आदींची सविस्तर लेखन पद्धती यामध्ये केली जाते. महाविद्यालयीन जीवनात द्वितीय वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अभ्यासक्रम पूर्ण करताना "जीवनदीप वार्ता" या वृत्तपत्राची सुरुवात झाली. मुळातच या जीवनदीप महाविद्यालयाचे संस्थापक रवींद्र घोडविंदे हे पत्रकार असल्याने त्यांनी ठाणे जीवनदीप वार्ता वृत्तपत्राची स्थापना २०१६मध्ये केली. त्यांच्या हाडातच भिनलेली ही पत्रकारिता आम्हा विद्यार्थ्यांना चांगलीच फायदेशीर ठरली. आठवड्यातून हे संपादक आम्हा विद्यार्थ्यांच्या भेटीला आवर्जून यायचे.तेव्हा त्यांचे पत्रकारितेतील अनुभव आणि त्यांनी केलेले संपादकीय लेखन पद्धतीचा आढावा आम्हाला सविस्तर सांगायचे तेव्हा पासून माझ्या लिखाणाला चांगलीच चालना मिळाली.

माझ्या आयुष्यातील प्रथमच संवाद साधलेले हे संपादक माझे मार्गदर्शक म्हणून नेहमी राहिले. तेव्हा पासून विविध घटकांवर लेखन करण्याची सवय लागली. महाविद्यालयीन जीवनात प्रथमच वाचनात आलेला "आयुष्यातील टर्निंग पोंइन्ट" यावर आधारित लेख होता त्या संपादकांच नाव नाही आठवत परंतु हा लेख खूप च काही देऊन गेले.आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी मनात जिद्दी असली की हरण्याची भीती राहत.सुरुवातच एवढी आकर्षक आणि सुस्पष्ट भाषेत होती की खरचं ते आयुष्य मी प्रत्येक्षात अनुभवते असा त्यावेळी भास झाला.मी ग्रामीण भागातली असल्याने मुलींना शिक्षणापासून वंचित रहावं लागतं हे मी प्रत्येक्षात अनुभवले मुलींना शिक्षण घेण्याची इच्छा असली तरी त्यांनी "चूल आणि मूल"हीच स्वप्न बघावी.या पलीकडे त्यांचं विश्व नाही.ही कन्सेप्ट मुळात चुकीची आहे .कुठेतरी नेहमी भेडसावणारा हा प्रश्न ही परिस्थिती बदलायला हवी.परंतु आयुष्यातील टर्निंग पॉईंट या लेखाने खरचं आयुष्य जगायला शिकवलं.तेव्हापासून एकच जिद्द प्रत्येक मुलींनी स्वप्न पहावी आणि ती पूर्ण करण्याची हिम्मत प्रत्येकी मध्ये निर्माण व्हावी.पुन्हा एकदा ज्या संपादकीय लेखनाने माझ्या आयुष्याला नव्याने चालना मिळाली त्या संपादकाचे आज ही आभार मानते त्यांच्या एका लेखामुळे कोणाच्यातरी आयुष्यात नवी उम्मीद निर्माण झाली.












कु. गीता पं. गायकर
मानिवली(ग्रामीण) ,टिटवाळा
8433817672

========================================================================

अग्रलेखाचा बादशाह -  नीलकंठ यशवंत खाडीलकर 



अखंड जीवन एखादा ध्यास घेऊन जगण्यारा व्रतस्थ व्यक्तिमत्त्वाचा अंत कधी होऊ शकत नाही. केवळ सूर्यास्त होतो आणि त्या व्यक्तीच्या जीवनाने व्यापलेली एक संपूर्ण पिढी सूर्योदय बनून उगवते आणि आपल्या तेजाने जग व्यापून टाकते. नवाकाळ चे संपादक मा. नीलकंठ यशवंत खाडीलकर हे असेच व्रतस्थ व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे शरीर इहलोकातून परलोकात गेले पण त्यांचे विचार , त्यांचा प्रत्येक प्रहार, त्यांचा प्रत्येक प्रहार, त्यांचा प्रत्येक शब्द हा मराठी माणसाच्या मनात धगधगता निखारा बनून जिवंत आहे आणि हा निखारा बनून जिवंत आहे आणि हा निखारा बनून जिवंत आहे आणि हा निखारा असाच सदैव लढत राहील, अयोग्य ते भस्म करीत राहील आणि योग्य त्याला दिशा दाखवित राहील, अशी व्यक्तीमत्वे दुलॅभ असतात, दैनिक नवाकाळचे संपादक वाचकांच्या मनात लढवय्या मराठी माणसांत अग्रलेखांचे बादशाह म्हणून प्रेमाच्या, आपुलकीच्या स्थानवर राहिले पञकारीता म्हणजे काय याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नीलकंठ खाडीलकर होते. चार हजार खप असताना 'नवाकाळ' चे दुधारी शस्त्र त्यांनी हाती घेतले आणि जनतेशी एकनिष्ठ राहण्याचा काटेरी मुकूट मस्तकावर पेलवत हे शस्त्र केवळ आणि केवळ जनतेच्या भल्यासाठी वापरले, कधीही आयुष्यात त्यांनी एका शब्दानेही जनतेशी प्रतारणा केली नाही. ' ताठ कणा आणि मराठी बाणा हे नवाकाळचे व्यक्तीमत्व त्यांच्या कणखरतेतून घडले पञकारीता ही लेखनापुरती मयाॅदीत न ठेवता खिळे जुळवून पाने तयार करणे , मशीन चालविणे, पेपरच्या गठ्ठयावर बसून पासॅल बांधणे ते 'नवाकाळ' चे आथिर्क नियोजन करणे त्यांनी एक हाती करून दाखविले मी नेहमी नियमित नवाकाळचे अग्रलेखांचे वाचन करतो तसेच एका साप्ताहिकत अग्रलेख लिहीण्याचा प्रयत्न केला होता ज्या वाचकांनी नवाकाळचे अग्रलेख आवर्जुन वाचा बोध घेण्यासारखे असतात अग्रलेखाचा बादशाह यांचा माझ्यावर प्रभाव पडला आहे.












अरूण विष्णू पराडकर,डोंबिवली 
9969159768

========================================================================

"चौफेर संपादक : माधव गडकरी"



इयत्ता आठवीत असतानाच चांदोबा, परीकथा, विक्रमादित्य आणि वेताळ कथा यांनी वाचनाची गोडी लावली होती, नवाकाळच्या बालगोपाळांच्या राज्य या सदराने ती आणखी वाढवली. आणि त्याचा परिणाम असा झाला साधारण नववीत असतानाच पैसे खर्च करून पेपर (नवाकाळ) विकत घेण्याची सवय लागली. आणि दहावीत असताना त्या सदरात लिहायलाही लागलो. मी ज्या प्रभादेवी महापालिका शाळेत शिकत होतो ती त्यावेळच्या दैनिक मुंबई सकाळ प्रेसच्या गेटसमोरच होती. बाजूच्या दत्तमंदिरात गेलो की गेट मधून सहज तिकडे डोकवायचो. असाच एके दिवशीच्या प्रयत्नात एका व्यक्तीने सकाळच्या आवारात हटकले आणि जवळ बोलावले, तू समोरच्या शाळेत शिकतोस काय ? मी हो आणि दहावीला आहे असेही भीत भीतच म्हणालो, माझे बाबा पण संडास रोडला छापखान्यात काम करतात, मला दर दिवाळीला ते तिथे घेऊन जातात. तेव्हा ते सद्गृहस्थ म्हणाले, पेपर वाचतोस का , चल तुला पेपर देतो. आतमध्ये एका केबिनमध्ये घेऊन गेले. बाहेरच्या माणसाला सांगितले, अरे पेपर आणि चहा घेऊन ये. हे झाल्यानंतर तिथून थोड्या वेळाने मी आनंदात निघालो, कारण आयुष्यात पहिल्यांदाच ५-६ दिवसांचे सकाळ पेपर हातात होते. ओळख करून न घेता निघताना मी म्हणालो, माझ्या बाबांच्या कारखान्यात खाऊच्या खोक्यावरचे रंगबेरंगी फ्यान्सी पेपर छापतात. आणि त्याच्या पुढच्या आठवड्यात विविध रंगांच्या पेपरचा रोल घेऊन त्यांना देण्यासाठी व भेट घेण्यासाठी गेलो. पण गेटवरच्या वॉचमनने सोडलेच नाही, मी केबिनमध्ये बसणारे आणि सफारी घातलेल्या साहेबांना हे द्याल का ? असे सांगितल्यानंतर तर त्याने दुसऱ्याला सांगितले, अरे हे माधव गडकरी साहेबांना देऊन ये. पुन्हा भेट झाली नाही, पण नाव समजले.
त्यांनी काय लिहिलेय या उत्सुकतेपोटी घरी येऊन पेपर चाळले, आणि 'चौफेर' हे सदर दिसले त्यावर आणि पेपरमध्ये सुद्धा संपादक म्हणून त्यांचे नाव माधव गडकरी असे दिसले. तेव्हापासून सकाळच्या वाचनाची जी गोडी लागली ती अजूनपर्यंत ३८ वर्षे तशीच कायम आहे. (आताचा लॉकडाऊन काळ सोडला तर ). 'सकाळ' चहाबरोबर लागतोच इतकी नाळ घट्ट जोडली गेलीय. तेव्हापासून ते नंतर २००० पर्यंत म्हणजे गडकरी लोकसत्ता मध्ये गेले तरी मी हे चौफर सदर नियमित वाचत राहिलो.

या सदरात एकीकडे समाज प्रबोधन तर दुसरीकडे विचार मंथन असा एक धागा त्यांनी सतत जपला. पुढे 'रविवारचा दृष्टिक्षेप' हे सदर मी वाचत असे. सुरुवातीला सकाळचा खप वाढविण्याचा त्यांचा प्रयत्न होता आणि त्यासाठी त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले, दा ब कुलकर्णी, लक्ष्मणराव केळकर, जी डी इस्वलकर, भाई बेलवलकर, शांताराम भोगले, उरणकर, विजय दळवी, गणेश केळकर,ज्ञा भि गावडे, विजय बांदल, यांच्यासारख्या पत्रलेखकांना सकाळ कार्यालयात बसायला जागा देऊन एकत्र येऊन शेकडो जणांची संघटना बांधण्यासाठी सहकार्य केले, जी संघटना पुढे बेहेरेंच्या हाकेने आपल्या मराठी वृत्तपत्र लेखक संघात विलीन झाली.....माझ्यासारखा विद्यार्थी दशेतच एक वाचक घडवला आणि इतकेच नव्हे तर पुढे पत्रलेखक आणि संघटनेच्या प्रति एकनिष्ठ असलेला कार्यकर्ताही घडवला. याचे श्रेय अनेक जणांना जसे जाते तसे त्यापैकी माधवराव बिनीचे होत.
सन १९८४ ते १९९२ या काळात गडकरी लोकसत्ताचे संपादक होते आणि या कारकिर्दीने तर त्यांच्या पत्रकारीतेवर कळस चढविला. या काळात त्यांनी अनेक विषय हाताळले, त्यांना वाचा फोडली, सार्वजनिक हितासाठी वाद ओढवून घेतले, उच्च न्यायालयाच्या बेअदबीचे दोन खटले झाले आणि ते जिद्दीने लढले. एक झुंजार पत्रकार, लोकहितवादी संपादक आणि फर्डे वक्ते म्हणूनही त्यांनी महाराष्ट्र-कर्नाटक-गोवा पिंजून काढला.
संघाने पत्रलेखकांच्या चळवळीसाठी ज्यांनी योगदान दिले त्यांना जेव्हा पुरस्कार देण्याचे ठरवले, तेव्हा १९९४ ला अर्थात त्यांच्या नावाची घोषणा झाली. त्यापूर्वी ते १९८५ मध्ये संघाच्या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहिले होते. गडकरींच्या लेखनाचे एव्हढे गारुड माझ्यावर झाले होते की, त्यांची निर्धार ते लोकसत्ता, अष्टपैलू आचार्य अत्रे, असा हा महाराष्ट्र खंड 1-2, माओ नंतरचा चीन, चौफेर-1, सभेत कसे बोलावे, संयुक्त महाराष्ट्राचे महारथी, गाजलेले अग्रलेख, दृष्टीक्षेप ही पुस्तके संग्रही आजही ठेवली आहेत.

कोणताही संपादक हा चेहऱ्याने नव्हे तर लेखणीने ओळखायला पाहिजे ही नवी विचारसरणी त्यांनी सुरु केली. आणि आयुष्यभर त्याच्याशी इमान राखून पत्रकारितेचा धर्म पाळला. जे अनुभवले ते लेखणीतून उतरवले. समाजातल्या अनेक वंचितांना भरघोस मदत मिळवून दिली. माधवरावांचे व्यक्तिमत्त्व वरकरणी आणि लेखणीतूनही खूप कठोर व कडक स्वभावाचे वाटले तरी अंतरंगात ते अतिशय मृदू स्वभावाचे होते असे या व्यक्तिमत्त्वाबद्दल २ जून २००६ रोजी त्यांच्या निधनानंतर मान्यवरांच्या श्रद्धांजली लेखणीतून अधिक कळले.












- रवींद्र मालुसरे, प्रभादेवी
९३२३११७७०४

=======================================================================

सन्मित्रकार - स. पां. जोशी



जो इतरांसाठी जगतो,त्याचे जगणे खरे सार्थकी लागते, याची प्रचिती,ठाण्याच्या दैनिक संमित्राचे संपादक मला भेटल्यावर आली. वास्तविक स्वातंत्र्य मिळाल्यावर,वृत्तपत्रे तद्दन व्यावसायिक व्हावयाला लागली. पण सचोटी, चिकाटी, प्रामाणिकपणा,अफाट जनसंपर्क, कामाचा झपाटा, ग्रहणशक्ती,आकलन,संवादाची हातोटी, सातत्य, सूक्ष्म निरीक्षण, प्रुफ रीडिंग आग्रह, गुणवत्तेची ओढ,हे सर्व गुण मला त्यांचे आवडले. ह्या सर्वांचा खूप मोठा परिणाम, माझ्या आयुष्यावर झाला.मुख्य म्हणजे माझ्या सारख्या नवख्या पत्रलेखन करणाऱ्या मला,खूप प्रोत्साहन वेळोवेळी दिले. १९७६ पासून फवत वाचकपत्रे पाठविणारा मी आवडत्या संपादकांनी प्रेरणा दिल्याने १९९३ ते २००० पर्यंत फक्त ७वर्षात २३९ वेळा लेखन सन्मित्र मध्ये करू शकलो.

तीन वर्षे सामाजिक, सांस्कृतिक बातम्या पाठवू लागलो. प्रशासक पद्माकर भंडारी, यांना श्रध्दांजली ही माझी पहिली बातमी,योग्य ते संपादकीय संस्कार करून प्रकाशित केली.बाजारपेठ बंद होणार,ह्या बदलापूरच्या माझ्या बातमी ला त्यांनी मुखपृष्ठावर, मुख्य बातमी म्हणून स्थान दिले,त्यावेळेस मी नतमस्तक झालो. कार्यक्रम वृत्तान्त,सविस्तर पुस्तक परिचय,व्यक्ती परिचय,कर्तृत्ववान महिला,लेखमाला,असे सर्वागीण लेखन करण्यास त्यांनी मला प्रवृत्त केले. एक वर्षी,माझ्या वाढ दिवसापूर्वीच मी एक वाचकपत्र लिहिले. ते वाढदिवस कृतज्ञता दीन म्हणून पाळतो व मातृ भाषेचे ऋण फेडतो असे लिहिले. माझे भाग्य थोर ह्या संपादकाने त्यावर पूर्ण अग्रलेख लिहिला व मला आश्याऱ्याचा सुखद धक्का दिला .
अनिल पालये, बदलापूर
9822152135



वैशिष्ट्यीकृत पोस्ट

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत सत्याची कास धरून पत्रकारिता करावी.

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत  सत्याची कास धरून पत्रकारिता करावी. सतरावे शतक प्रबोधनाचे ,  अठरावे शतक वैचारिकतेचे ,  एकोणीसावे शतक प्रगतीचे...