उमरठ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
उमरठ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २५ नोव्हेंबर, २०२३

"स्व. यशवंतराव चव्हाण आणि स्व. अंबाजीराव मालुसरे यांचा दोस्ताना

 

"स्व. यशवंतराव चव्हाण आणि स्व. अंबाजीराव मालुसरे यांचा दोस्ताना" 

स्व यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त एक आठवण


द्वैभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी १ नोव्हेंबर १९५६ रोजी सूत्रे हाती घेतली. त्यावेळची घडलेली गोष्ट. साताऱ्याच्या जेलमधला आपला एक सहकारी सर्वात मोठया पदावर बसल्याचा सर्वाधिक आनंद साखर गावच्या स्वातंत्र्यसेनानी अंबाजीराव मालूसऱ्यांना झाला. आणि ते तडक मुंबईत दाखल झाले. करीरोडला खोजा चाळीतील नातेवाईकांकडे उतरल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते जुन्या मंत्र्यालयाकडे निघाले. सोबत त्याच चाळीतील घाटावरचा वसंत पाटील नावाचा तरुण होता. धोतर, सदरा, फेटा आणि घुंगराची काठी या वेशभूषेत अंबाजीराव मंत्र्यालयाच्या गेटवर पोहोचल्यानंतर तडक आतमध्ये घुसले...त्यावेळी आजच्या इतकी कडक सुरक्षा बंदोबस्त नसे. पोलीस अडवू लागले तेव्हा बेडर अंबाजीराव मोठया आवाजात म्हणाले, मी यशवंताला भेटायला आलोय. त्याचे हाफीस कुठं आहे ते सांगा. ते पोलीस काहीच ऐकायला तयार नव्हते...इकडे अंबाजीरावांचे दरडावणे चालूच होते. मी साखर गावचा पाटील. सुभेदार तान्हाजीरावांचा वंशज. जाऊन सांगा यशवंतरावाला अंबाजीराव आलाय म्हणून. हा आरडाओरडा ड्युटीवरच्या एका मोठ्या अधिकाऱ्याने ऐकल्यावर जवळ आला आणि म्हणाला, आजोबा १० मिनिटे इथे थांबा मी येतो लगेच. तो अधिकारी आतमध्ये गेला, यशवंतराव चव्हाणांना केबिनमध्ये चिठ्ठी पाठवून प्रसंग कळवला. त्या अधिकाऱ्याला यशवंतरावानी केबिनमध्ये बोलावून सांगितले, तुम्हीच त्यांना लगेच माझ्याकडे घेऊन या.....आणि पुढच्या काही क्षणात यशवंतराव आणि अंबाजीराव या दोन मित्रांची ह्रदयभेट झाली.

या भेटीमागची पार्श्वभूमी काय होती. जिव्हाळ्याचे संबंध निर्माण होण्यामागे असे काय घडले होते...तर याची बीजं देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात रोवली गेली होती. 

यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचा कराड येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. बालपणीच त्यांचे पितृछत्र हरपले होते. त्यांच्या आईने त्यांचा सांभाळ केला. यशवंतरावांना आईकडूनच आत्मनिर्भरता आणि देशभक्तीची शिकवण मिळाली होती. 

१९३० साली महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली, तेव्हा त्यामध्ये त्यांनी भाग घेतला. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनातही ते सामील झाले होते.  सातारा जिल्ह्यातील भूमिगत चळवळीत त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. यातून पुढे प्रतिसरकार (पत्री सरकार) स्थापन झाले, पण त्यावेळी ते तुरुंगात होते; याच तुरूंगात अंबाजीराव सुध्दा अटकेत होते. 

१९४२ च्या लढ्याचा फारसा प्रभाव पोलादपूर मध्ये नव्हता, महात्मा गांधींच्या आदेशानंतर पोलादपूर मधील वृद्ध कार्यकर्ते स्व गोपीनाथ लालाजी गांधी यांनी हालचाल सुरू केली. महात्मा गांधी व वल्लभभाई पटेल हे महाड व पोलादपूरला येऊन गेल्यानंतर चळवळीला गती मिळाली. श्री नानासाहेब पुरोहित यांचा मोर्चा महाडला येणार आणि मामलेदार कचेरी ताब्यात घेणार याची बातमी पसरली. मोर्चा निघाल्यानंतर ब्रिटीश सरकारने राक्षसी भूमिका घेत अनेकांवर अन्याय व अत्याचार सुरु केले. अनेकांना अटक केली. त्यावेळी पोलादपूर मधील गोपीनाथभाई गांधी, डॉ गणेश अनंत करमरकर, दत्तात्रय काशिनाथ जोशी, दत्तात्र्येय गणपत साबळे, बाळकृष्ण पीतांबर तलाठी, अंबाजीबुवा मालुसरे, विठ्ठल गणपत शेठ इत्यादींनी मोठा सत्याग्रह केला.

गोऱ्या सार्जंटना महाबळेश्वरला जाता येऊ नये यासाठी तिन्ही खोऱ्यातील काही समाजधुरीणांना सोबत घेऊन घाट तोडला होता. आणि पोलादपूर महालाच्या कचेरीसमोर वंदे मातरम च्या घोषणा देत तिरंगा फडकावला होता. याचा पुढारपणा करणाऱ्या अंबाजीबुवांना अटक करून प्रथम वरळी नंतर श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर जेल मध्ये  घेऊन गेले. विसापूर जेल दौंड आणि मनमाड या रेल्वे-लाईनवर असलेल्या विसापूर स्टेशनपासून दोन-तीन मैलांवर आहे. एखाद्या ओसाड वाटणा-या माळावर बांधलेला हा जुना जेल बऱ्याच लांबून पाहिल्यावर मनामध्ये एक प्रकारची भीती निर्माण करतो.

 त्याचवेळी एस एम जोशी, यशवंतराव चव्हाण, आचार्य भागवत यांना येरवडा तुरूंगातून विसापूरला आणले होते. तात्या डोईफोडे, दयार्णव कोपर्डेकर हेसुद्धा होते. योगायोगाने स्वातंत्र्यात भाग घेणाऱ्या सर्वांना एकाच ठिकाणी ठेवले होते, त्या बराकीतच यशवंतराव - अंबाजीराव होते. जेलमध्ये सुद्धा हे चळवळे गप्प राहतील ते कसले. दुसऱ्या दिवशीच भल्या पहाटे हे सर्व कैदी एकत्र आले. दहीहंडीचा मनोरे रचण्याचा खेळ सुरु केला.  तब्येतीने शरीरयष्टीने चांगल्या बांध्याचे आणि जाडजूड व ताकदीने असलेले खालच्या थराला उभे राहतील असे ठरले, अर्थात यशवंतराव व अंबाजीराव खालच्या थरासाठी उभे राहिले. चार थर रचल्यानंतर शेवटच्या थरावर चढलेल्याने लपवून ठेवलेला तिरंगा ध्वज बाहेर काढून फडकावला. त्याचबरोबर सर्वजण वंदेमातरम आणि भारतमाता की जय म्हणून घोषणा  जोरदार देऊ लागले. मग काय अधिकाऱ्यांची फलटण आली. सर्वांना काठीने फटकावू लागले. सर्वांना दरडावून दमबाजी करून गेले.....पुन्हा दुसऱ्या दिवशी असेच घडले. आता मात्र याचा बंदोबस्त करण्याचे त्यांनी ठरवले. त्यांनी चौकशी सुरु केली....यातले म्होरके कोण ? तीन-चार जण पुढे झाले, यात यशवंतराव आणि अंबाजीराव होतेच. त्यांना बाजूला घेऊन अर्थातच अधिक मार बसला. 

जेलमध्ये काढलेल्या या आठवणी यशवंतरावानी लिहिल्या आहेत. ते लिहितात  एक वर्ष संपल्यानंतर या जेलमधून आमची बदली विसापूर जेल इथे झाली. एक वर्ष म्हणजे माझ्या मताने माझे एक प्रकारे विद्यापीठीय जीवन होते.  

विसापूर जेल म्हणजे अत्यंत कष्टदायी जेल, अशी त्याची ख्याती होती. हवामान चांगले नाही, पाण्याची कमतरता, फार कडक बंदोबस्त व कठोर अधिकारी असलेला जेल, अशी या जेलची ख्याती होती. गुजरात आणि मुंबई येथून आलेले अनेक प्रमुख नेते आणि कार्यकर्ते या जेलमध्ये गेले वर्षभर राहत होते. या जेलला अनेक बराकी होत्या आणि प्रत्येक बराकीतल्या सत्याग्रहींतून एक प्रमुख ‘स्पोक्समन’ निवडला जात असे. त्या बराकीतील सत्याग्रही कैद्यांचे जे प्रश्न असतील, ते हा पुढारी सोडवून घेत असे. मुंबईचे प्रसिद्ध नेते स. का. पाटील त्यावेळी विसापूर जेलमध्ये होते. त्यांनी जेलमध्ये अतिशय व्यवस्थित आणि संपन्न अशी लायब्ररी उभी केली होती. 

याचवेळी त्यांनी उमरठच्या नरवीर तान्हाजी - सूर्याजी मालूसऱ्यांच्या समाधीचा इतिहास आणि भौगोलिक परिस्थिती चर्चेत समजावून सांगितली. त्यानंतर पुढे  अंबाजीरावांची तुरूंगातून सुटकाही झाली. मात्र दोघांचा हा स्नेह कायम राहिला...भेटीगाठी होत राहिल्या आणि वाढलाही. पुढे एप्रिल १९६५ ला जेव्हा उमरठला नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण यशवंतरावांच्या शुभहस्ते करण्याचा कार्यक्रम ठरला तेव्हा आवर्जून स्वातंत्र्यसेनानी अंबाजीरावांचा विशेष सत्कार करण्याचा आदेश त्यांनी दिला होता, परंतु चीन ने भारतावर आक्रमण केले...यशवंतरावाना त्यावेळचे पंतप्रधान पं नेहरूंनी देशाचे सरंक्षणमंत्री म्हणून बोलावले. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे अनावरणासाठी आल्यानंतर त्यांनी तालुक्यातून जमलेल्या हजारो जनसमुदयासमोर अंबाजीरावांचा आदर सत्कार केला. त्याचा वृत्तांत त्यावेळच्या दैनिक लोकसत्ता मध्ये फोटोसह प्रकाशित झाला ते माझ्या संग्रही आजही आहे. 


लोकनेते, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचा आज स्मृतिदिन... त्यानिमित्ताने आठवणीला हा उजाळा !

- रवींद्र मालुसरे

अध्यक्ष-मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई

मंगळवार, ६ डिसेंबर, २०२२

गिरिदुर्गांचा वाटाड्या.... दुर्गमहर्षी आप्पासाहेब परब

 गिरिदुर्गांचा वाटाड्या.... दुर्गमहर्षी आप्पासाहेब परब

                            रवींद्र मालुसरे (अध्यक्षमराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई)









आप्पा परब ..... 

एक सामान्य गिरणी कामगारदादरच्या रानडे रोडवरच्या फुटपाथवर जुनी पुस्तकेदिवाळी अंकनियतकालिके विकणारे विक्रेतेप्रख्यात नाणी संग्राहक व नाणी तज्ज्ञ  ते इतिहास संकलक - संशोधक हा आप्पांचा जीवनप्रवास ऐकून कोणीही थक्क होऊन जावे अशीच आप्पांची ८३ वर्षाची आयुष्यभराची वाटचाल आहे.

 

शिवछत्रपतींना दैवत मानणार्‍या या व्रतस्थ इतिहासपुरूषाशी माझा तीन तपाचा स्नेह आहे. मला लहानापासून वाचनाची प्रचंड भूकत्यामुळे नवीन काही शोधताना दादरमधल्या रद्दीवाल्यांच्या दुकानात डोकावत असे. रानडे रोडवरील पटवर्धन ब्रदर्स हे आयुर्वेदिक दुकान सोमवारी बंद असे त्यामुळे एक दाढीधारी व्यक्ती आपल्याकडील सर्व ठेवा बंद दुकानासमोर ऐसपैस मांडत असे. ते सहज चालता बघता येत असल्याने महिन्यातून दोन तीन सोमवारी त्याठिकाणी जाणे होऊ लागले. माझ्या 'मालुसरे' आडनावासह उमरठ-साखर या जन्मगावाचा परिचय त्यांना झाल्यानंतर तर आम्ही दोघे अधिकच जवळ आलो. पुढे डिसिल्व्हा लगतच्या सोजपाल चाळीतल्या त्यांच्या घरी माझे जसजसे जाणे झाले, तसतसा त्यांना महाराष्ट्रातील अनेक लोकांच्या घरी वा सार्वजनिक कार्यक्रमात घेऊन गेलो. आप्पांची ओळख झाल्यावर गप्पा मारताना अनेक गोष्टींचे मला अप्रूप वाटत राहिले. त्यापैकी एक गोष्ट होती. परिस्थिती कशीही असो मनाची शांतता जराही ढळू न देता ते कमालीचे स्थितप्रज्ञेत राहत. आणि माणसाच्या स्थितप्रज्ञेतही इतकी उत्कटता असते हे मला तेव्हाच प्रकर्षाने जाणवले. दुसरी गोष्ट माझ्या लक्षात आली ती म्हणजे त्यांना छत्रपती शिवरायांच्या कार्याबद्दल असणारी आत्यंतिक श्रद्धा आणि हे कार्य चिकित्सक पद्धतीने पुढे घेऊन जाणारी नवी पिढी यापुढच्या काळात कार्यरत राहील काय याबद्दल वाटणारी चिंता.

 

शिवकार्याच्या अभ्यासासाठीप्रचार-प्रसारासाठी अहोरात्र वाहून घेतलेल्या या ऋषितुल्य साधकाचे चालणेबोलणेवागणे मला याची देही याची डोळा अनुभवता आलेय याबाबत मी स्वतःला भाग्यवान समजतो. सह्याद्रीच्या रांगात महाराष्ट्राच्या कडे- कपारीत दऱ्याखोऱ्यात अखंड भटकंती करणारे आप्पा परब लाखो इतिहासप्रेमींना परिचित आहेत. इतिहासावरील निष्ठे प्रमाणेच ज्यांनी हयातभर इतिहासाचीगडकिल्ल्यांची सेवा केली असे महत्वपूर्व ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणजे आप्पा परब होय.  महाराष्ट्रातील साडेसहाशे गडकिल्ल्यांचा केवळ इतिहासच नव्हे तर त्या गडकिल्ल्यांमागील विज्ञानवास्तुशास्त्रभूगोलतत्कालीन सामाजिक - आर्थिक - राजकीय - सांस्कृतिक आणि धार्मिकदृष्टया त्यांचे महत्व सांगणारे आप्पा परब हा गडकिल्ल्यांचा चालता-बोलता इतिहास आहे. आपले अवघे आयुष्यच आप्पांनी गड - किल्ल्यांवरील संदर्भ संशोधनासाठी झोकून दिले आहे. अवतीभोवतीची परिस्थिती कितीही चंगळवादी होऊ दे आपण आपले अंगीकारलेले व्रत व्रतस्थपणे कसोशीने पाळायचे  हा खाक्या आप्पांनी आयुष्यभर जपला. ते करण्यासाठी जे काही करायचे ते प्रसंगी अपमान सोसून आप्पांनी केले. त्यांनी अक्षरशः हजारो लोकांना गडकिल्ले दाखवले पण ते करण्यासाठी त्यांनी कधी एक छदामही कोणाकडून घेतला नाही. 'जे किल्ले मावळ्यांनी तानाजी - बाजी - येसाजी यांनी प्रसंगी रक्त सांडून राखले तो माझ्या पूर्वजांचा वारसा दाखवण्यासाठीसांगण्यासाठी मला पैशाची गरज नाही.हा विचार आप्पा नेहमी जपत आले व त्या बरहुकूम ते वागत आले. 'माझा धर्म इतिहासमाझे दैवत शिवराय. माझी जात गडकिल्ल्यांची. त्या थोर युगपुरुषाने कधी जातीभेद मानला नाहीतर मग मी का मानू ?' हा उच्च विचार आप्पांनी आपल्या उरात कोरून ठेवला आहे. आप्पांचा यामागील स्वार्थ एकचआपल्या पूर्वजांच्या पराक्रमाच्या यशोगाथात्यांचे कार्यकर्तृत्व भावीपिढीला योग्यरितीने समजावे. प्रतिकूल परिस्थितीतही शिवरायांनी व त्यांच्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी केलेला असीम त्याग येणाऱ्या पिढीला आकलन व्हावा यासाठी अपार काबाडकष्ट घेऊन आप्पा ही उरफोड करीत आहेत. त्यांनी छत्रपतींच्या कार्याचा झपाटून अभ्यास केला. प्रचंड तप केलेकठोर जीवन जगले. इतिहासाची ही पाने शोधताना आणि त्यासंबंधाने विषयवार संगती लिहिताना जेव्हा भूगोल बोलत नाही तेव्हा विज्ञान व आकाशातील ग्रह तारे बोलतात या तत्वज्ञानाची सांगड घातली. गडकिल्ल्यांचा अभ्यास करताना भूगोल आणि विज्ञान एकमेकांस कसे पूरक आहेत हे त्यांनी दाखवून दिले. त्यांच्या पुस्तकांचे विषय जरी पाहिले तरी त्यांचे लिखाण हे चतुरस्त्र लेखकाचे लिखाण आहे हे समजते. आप्पांच्या वाड्.मयातील प्रज्ञाशिवाजी महाराजांचा इतिहास सांगण्यासाठी शेकडो वेळा अनेक गडांवर जावून केलेले प्रत्यक्ष प्रयत्नआणि त्यातून शिवप्रेमींना मिळणारी प्रसन्नता हे अनुभवता येते.

 

नेहमी आपल्या पाठीवर आपली सॅक बांधून घेऊन आपले पिण्याचे पाणी नेहमी सोबत ठेऊन गड चढणारे आप्पा आज महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यातून भटकंती करणाऱ्या इतिहासप्रेमींना हे आपले हक्काचे मार्गदर्शक वाटतात. त्याला कारणेदेखील तशीच आहेत. गड -किल्ल्यांसंदर्भात कोणताही अडचणींचा प्रश्न असो आणि कितीही वेळा विचाराआप्पा कपाळावर एकही आठी पडू ने देता हसतमुख चेहऱ्याने तुमचे समाधान करतात. त्यासाठी तासनतास ते माहिती पुरवतात. अनुभवाच्या दाण्यांचे पीठ ते आपल्या वाणीतून आणि लेखणीतून देतात. एखाद्या माऊलीने जात्यावर ओवी आठवावी तसा शिवकाळातला इतिहास सांगताना त्यांच्या अनुभव विचारांचे गाणे होत जाते. 'दास राहतो डोंगरीहा रामदासांचा एक श्लोक आप्पांच्या बाबतीत अगदी तंतोतंत लागू पडतो. दादरच्या आपल्या चाळीतल्या घरी आप्पा क्वचितच असतील पण रायगडराजगडसिंहगड अशा कुठल्यातरी गडावर मात्र ते नक्कीच सापडतील. कदाचित तोच त्यांचा खरा पत्ता असावा. इतकी अफाट मुशाफिरी करणारे आप्पा तसे प्रसिद्धीच्या बाबतीत मात्र शेकडो मैल दूर आहेत. त्यामागची त्यांची 'फिलॉसॉफी'' ही तितकीच वेगळी आहे. महाराष्ट्राच्या लाडक्या जाणत्या राजाचे कार्यकर्तृत्व आपल्या खारीच्या वाट्याने समाजासमोर उलगडून दाखविण्याचा प्रयत्न करीत असताना प्रसिद्धी ती  कसली मिळवायची हा त्यांचा रोखठोक सवाल आजकाल उठसुठ प्रसिद्धीच्या मागे घोडे दामटविणाऱ्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारा आहे.

 

ऊन,वारा अन पाऊस याची तमा न बाळगता दऱ्याखोऱ्यातून हिंडताना आप्पा तहानभूक विसरतात. छत्रपती शिवाजी महाराजछत्रपती संभाजी (शंभाजी)तानाजीबाजीप्रभूंसारख्या व्यक्तींमुळे आप्पांच्या प्रतिभेला अनेकदा नव्याने अंकुर फुटू लागतात. या भटकंतीत ठोस अभ्यासाने केलेले विधान ही काळ्या दगडावरची अमीट रेष ठरते. गडकिल्ल्यांतून भटकंती करताना तिथला चिरान चिरा आप्पांशी बोलतो. जणू इतिहासच वर्तमान होऊन आप्पांच्या मुखाने बोलू लागतो. हा इथे असा बाजी लढला.... तानाजी - सूर्याजी हे इथून असे दोरखंडाने गडावर चढले.... महाराजांच्या घोडीच्या टापा या इथून अशा एक ना असंख्य कथा आणि बाहू-मनगटांना स्फुरण चढविणाऱ्या घटनांची मालिका आप्पा सांगतात. म्हणूनच आप्पांविषयी म्हणावेसे वाटते की,

प्राचीवरूनि मावळतीच्याजगा सांग भास्करा ।

रायगडाचा शिवसूर्य तो कधी न मावळता ।।

सह्यगिरीत दुमदुमतील भेरीगर्जतील खोरी ।।

हिंडता फिरता तुम्हा सांगतीलत्यागाची महती ।

तुवा घडावे अन घडवावेपेटवीत ज्योती ।।

गडकिल्ल्यांतून भटकंती करणारे आप्पा अनेकदा जीवघेण्या प्रसंगातूनही गेले आहेत. रायगडावर मशिदीचे बांधकाम सुरु असल्याचे कळताच तातडीने रायगडावर धाव घेऊन ते रोखण्याचा यशस्वी प्रयत्न त्यांनी केला. त्यामुळे तिथल्या खवळलेल्या मुस्लिमांनीआप्पांना जीवे मारण्याची धमकीही दिलीपरंतु अशा धमक्यांना भीक न घालता आप्पांची रायगडावरी सुरूच आहे. आप्पांच्या अशा प्रकारच्या स्वाभिमानी घटनांची खरे तर एक मोठी जंत्रीच होईल स्वाभिमानी मराठ्यांचे उसळते रक्त पाहायचे असेल तर ते आप्पांच्या ठायीठायी बसले आहे.

 

आप्पांचा जन्म कोकणात गरीब कुटुंबात झाला असला आणि उदरनिर्वाहासाठी त्यांनी  कोहिनुर मिलमध्ये काम केले असले तरी त्यांचे व्यक्तिमत्व आणि स्वीकृत कार्य हे बौद्धिक ऋषिकार्य आहे असेच मी समजतो. मुळात त्यांच्या व्यक्तिमत्वाचा मागोवा घेणे वाटते तितके सोपे नाही. ज्ञानीपुरुषांना प्रसिद्धी मुळीसुद्धा हाव नसल्याने ते आपले जीवन चरित्र सांगण्याच्या अगर जोपासण्याच्या भानगडीत पडत नाहीत. एखाद्या ज्ञानी योग्याच्या जीवन चरित्राकडे सामान्य लौकिकदृष्टीने पाहून चालत नाही. ज्ञानी व्यक्तिमत्वाच्याज्ञानोत्तर सिद्ध स्वरूप अवस्थेतील लौकिक सदृश्य वर्तनात आणि ज्ञानसाक्षात्कार पूर्वलौकिक जीवनात पौर्वदेहिक संचिताचावंशपरंपरेतील ज्ञानमार्गी साधना परंपरेचा अनुबंध प्रकटलेला असतो. आप्पांच्या वर्तनातून तो दिसून येतो. आप्पांनी त्यांच्या आयुष्यात सातत्याने ज्ञान-कर्मनिष्ठ राहण्याचा दीर्घोद्योग केला. त्याचबरोबर कर्माला मग ते प्रापंचीकव्यावहारिक असे कोणत्याही प्रकारचे असोत्या कर्माला आप्पांनी शिवकार्याची आणि अध्यात्मशास्त्राची भक्कम  बैठक प्राप्त करून दिली. एकादृष्टीने शिवकाळाचे चिंतन करणारे  'सिद्धऋषीम्हणूनच त्यांचा अभ्यास केला पाहिजे.

 

आप्पा परब हे वास्तविक प्रसिद्धि-पराड.मुख व्यक्तिमत्त्व आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील शिवप्रेमींनी त्यांच्या कार्याची स्तुती केली. आप्पांनी वर्तमानपत्रातून लेखन केले नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या समग्र कारकिर्दीचा बारकाईने अभ्यास करीत सिद्धहस्त लेखणीने मराठी भाषेत ४० हून अधिक त्यांची ग्रंथसंपदा निर्माण केली आहे. आप्पांचा अभ्यास हा खरेतर एका मोठ्या ज्ञानशाखेचाच अभ्यास आहे. लिखित कागदपत्रे ही अधिक बोलकी व खात्रीशीर असतात. इतिहासाला कागदपत्रांच्या पुराव्यांसह वाटचाल करता येत नाहीपरंतु अलिखित संदर्भसाधने अबोल असून त्यांचा अर्थ आपणाला शोधून काढावा लागतो.

 

आधुनिक युगात इतिहासाची पाने उलगडताना भूगोलाला विज्ञान आणि अध्यात्म यांची जोड देऊन त्यांची मांडणी करणे हे ऐतिहासिक साहित्यात आजपर्यंत घडले नाही. जो जो कागद वा नाणी हाताशी सापडले त्यावर बुद्धिनिष्ठ संशोधन करून काढलेले निष्कर्ष आप्पांनी वाचकांसमोर विविध पुस्तकांच्या माध्यमातून मांडले. त्यात मुख्यतः संशोधनात्मक भाषाशैली वापरावी लागलीपण ती सर्वसामान्यांना समजेल अशी सोप्या शब्दांत त्यांनी मांडली. आणि हे मांडताना नेहमीच सचोटीविश्वाससत्य कथन या बाबींना अग्रकम दिला. प्रसंग कितीही बाका असूदे त्यांनी फायदा तोट्याचा विचार न करता आपल्या विचारधारेला कधीही तिलांजली दिली नाही. आप्पांच्या वयाने ऐंशी पार केली आहे.  तरीही आज आप्पांच्या व्यक्तित्वाकडे आणि कार्याकडे दृष्टीक्षेप टाकला तर शिवकार्याचा ध्यास घेतलेला हा योगी शरीराने  थकलेला नाहीहे प्रतित होते.  अभ्यासांती निष्कर्ष काढून आपल्या पद्धतीने मांडणी करीत त्यांचा लेखनयज्ञ पहाटेपासूनच सुरू होतो. अल्प किंमतींत छापून घेतलेली आपली ग्रंथसंपदा पदरमोड करून स्वतःच ती  जनमानसात पोहोचविणारा साहित्यिक असे त्रिविध प्रकारचे त्यांचे व्यक्तिमत्त्व सहज डोळ्यात भरते. अशी व्यक्तिमत्त्व आधुनिक काळात दिसत नाहीत.

 

संतवृत्तीच्या विभूती मग ते कोणत्याही काळातील असोतसमाजासाठी ते आपले जीवन हेतुपूर्वक आणि हेतूपुरस्पर व्यतीत करतात. त्यांचे महत्व पटते पण त्यांच्या कार्याचे माहात्म्य समजत नाही असा काहीसा विचित्र प्रकार आजच्या धारणेत निर्माण झाला आहे. अतिरेकी अभिनिवेशअनाठायी  अहंकारअनावश्यक वाचाळता यामुळे आजचे विचारविश्व पार झाकोळून गेले आहे. अशावेळी वैभवी गतकाळाचा किंबहुना आपल्या पुर्वासुरींच्या इतिहासाच्या चिंतनाचीमननाची आवश्यकता असतेच असते.

 

सह्याद्रीच्या कडेकोपऱ्यात तरुण पिढीला कोणतेही मानधन न घेता इतिहास शिकविणारा आप्पा परब हा कर्मयोगी या साऱ्या सव्यापसव्यात मात्र उपेक्षित आहे. स्वाभिमानी आप्पांना हे अशा प्रकारचे लेखन आवडणारही नाही. परंतु ही वस्तुस्थिती आहे. रुढार्थाने आप्पांच्या विषयी लिहिताना आजच्या स्वकेंद्रित होत चाललेल्या समाजापुढे एका आदर्श व्रतस्थ लेखकाचेइतिहास संशोधकांचे कार्य ठेवावे असे मनोमन वाटत आहे. शासन आणि समाज या दोन्ही घटकांनी म्हणावी तशी त्यांची दखल घेतली नाही हे शल्य शिवप्रेमीच्या मनात आहे. आजच्या या तत्वेचारित्र्यसत्यनिष्ठ विचारधारा याबाबतीत फारसे फिकीर न बाळगण्याच्या युगात नेमक्या याच गोष्टी ज्यांनी आयुष्यभर तळ हातावरच्या फोडाप्रमाणे कसोशीने जपल्या अशा आप्पा परब यांना चतुरंग पुरस्कार मिळणे ही मोठी आशादायक बाब आहे. आप्पा प्रसिद्धीपासून दूर राहण्याचा आटोकाट प्रयत्न करतातपरंतु केवळ त्यांचे व्यक्तिमहात्म्य न वाढवता तत्व आणि सामाजिक कार्य यांचा मेळ त्यांनी साहित्यातून निरपेक्षपणे कसा घेतला याची दखल 'चतुरंगनेघेतली.  ती ओळख जगाच्या कानाकोपऱ्यात सहज पोहोचविण्यासाठी विविध माध्यमांनी पुढाकार घ्यायला पाहिजे.

 

रवींद्र मालुसरे

अध्यक्षमराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई

9323117704  chalval1949@gmail.com

(रवींद्र मालुसरे हे - नरवीर तानाजी–सूर्याजी मालुसरे यांचे कुलोत्पन्नरायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील उमरठ-साखर ही ऐत्याहासिक भूमी रवींद्र मालुसरे यांची जन्मभूमी )


शिवइतिहासदुर्गअभ्यासक आप्पा परब

यांना चतुरंग सन्मान जीवन गौरव पुरस्कार


मुंबई (रवींद्र मालुसरे ) : 

तीन दशकांची सांस्कृतिक परंपरा लाभलेला चतुरंगचा जीवनगौरव सन्मान पुरस्कार युद्ध इतिहास लेखककिल्ले अभ्यासकशिवइतिहासनाणकशास्त्र अभ्यासक आणि गिरीभ्रमक बाळकृष्ण तथा आप्पा परब ( ८३ ) यांना जाहीर झाला आहे. रविवारदि १८ डिसेंबर रोजी संध्याकाळी ४ वाजता डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष असून प्रमुख उद्घघाटक म्हणून प्रवीण दुधे उपस्थित राहणार आहेत. संपूर्ण आयुष्य बेडरपणे आणि साहसी वृत्तीने इतिहासाच्या अभ्यासात व इतिहास नोंदीत व्यतीत करणाऱ्या आप्पा परब यांची जीवनगाथा डॉ विनय सहस्त्रबुद्धेसुधीर जोगळेकरमाधव जोशीप्रसाद भिडेविनायक परब यांच्याकडून ऐकता येणार आहे.
आप्पा परब हे वास्तविक प्रसिद्धि-पराड.मुख व्यक्तिमत्त्व आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील शिवप्रेमींनी त्यांच्या कार्याची स्तुती केली. आप्पांनी वर्तमान पत्रातून लेखन केले नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या समग्र कारकिर्दीचा बारकाईने अभ्यास करीत सिद्धहस्त लेखणीने मराठी भाषेत ४० हून अधिक स्वतःची ग्रंथसंपदा निर्माण केली आहे. आप्पांचा अभ्यास हा खरेतर एका मोठ्या ज्ञानशाखेचाच अभ्यास आहे. लिखित कागदपत्रे ही अधिक बोलकी व खात्रीशीर असतात. इतिहासाला कागदपत्रांच्या पुराव्यांसह वाटचाल करता येत नाहीपरंतु अलिखित संदर्भसाधने अबोल असून त्यांचा अर्थ आपणाला शोधून काढावा लागतो. ज्यावेळी इतिहास बोलत नाही तेव्हा भूगोल बोलतोज्यावेळी भूगोलही बोलत नाही तेव्हा विज्ञान बोलते...
हे वाक्य प्रत्येक शिवप्रेमींच्या मनी बिंबवणारे निस्पृह दुर्गपंढरीचे वारकरीदुर्गतपस्वी आप्पा परब यांना २०२२ चा चतुरंग पुरस्कार हा मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्व महाराष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 


आप्पासाहेब परब यांच्या सिद्धहस्त लेखणीतून प्रकाशित झालेली पुस्तके 

  • किल्ले रायगड स्थळ दर्शन
  • किल्ले राजगड स्थळ दर्शन
  • किल्ले राजगड कथा पंचविसी
  • किल्ले रायगड कथा पंचविसी
  • श्रीशिवबावनी
  • शिवरायांच्या अष्टराज्ञी
  • किल्ले पन्हाळगड कथा दशमी
  • शिवजन्म
  • किल्ले विशाळगड कथा त्रयोदशी
  • सिंधुदुर्ग
  • विजयदुर्ग
  • सिंहगड
  • लोहगड
  • दंडाराजपुरी दुर्ग
  • पावनखिंडीची साक्ष
  • रणपति शिवाजी महाराज
  • हुजुरबाज
  • छत्रपती शिवरायांचा आरमारी सुभेदार- मायाजी नाईक भाटकर
  • किल्ले पन्हाळा औरंगहणाख्यान
  • किल्ले रायगड प्रदक्षिणेच्या वाटेवर
  • किल्ले राजगड प्रदक्षिणेच्या वाटेवर
  • श्रीभवानी तरवार
  • किल्ले राजगड बखर
  • श्रीशिवदुर्ग ओवीबद्ध त्रिशतकावली
  • किल्ले राजगड घटनावली
  • घोडखिंडीची साक्ष
  • रणपती शिवाजी महाराज
  • हुजुरबाज
  • छत्रपती शिवरायांचा आरमारी सुभेदार- मायाजी नाईक भाटकर
  • किल्ले पन्हाळा औरंगहणाख्यान
  • किल्ले रायगड प्रदक्षिणेच्या वाटेवर
  • किल्ले राजगड प्रदक्षिणेच्या वाटेवर
  • श्रीभवानी तरवार
  • किल्ले राजगड बखर
  • श्रीशिवदुर्ग ओवीबद्ध त्रिशतकावली
  • किल्ले राजगड घटनावली
  • घोडखिंडीची साक्ष
  • रणपती शिवाजी महाराज
  • सिन्धुदुर्ग 
  • विजयनगर साम्राज्यातील किल्ले
  • किल्ले रायगड घटनावली - श्री शिवकाळ
  • किल्ले रायगड घटनावली - श्री शंभुकाळ
  • युद्धपती श्रीशिवराय युद्ध पंच अंग कोष 
  • पोर्तुगीज अहवालातील किल्ले भाग १ 
  • पोर्तुगीज अहवालातील किल्ले भाग २ 
  • शिवराजाभिषेक 
  • आगामी -
  • निजामी अंमलातील किल्ले 
  • बहमनी 
  • आदिली
  • मोंगल 
  • आदिली (शिवकाळ )
  • कुतूबी
  • रायगड नगरी
  • ठाणे जिल्ह्यातील किल्ले
  • युद्धपती शंभू महाराज 


शुक्रवार, २८ ऑक्टोबर, २०२२

'भुकेचा सोहळा' संदिप कळंबे यांच्या गझल संग्रहाचे प्रकाशन

   'भुकेचा सोहळा' संदिप कळंबे यांच्या गझल संग्रहाचे प्रकाशन                                  

                                         कशासाठी कुणाच्याही पुढे ना हात केले मी

                     भुकेचा सोहळा होता उपाशी साजरा केला



लहानपणापासून परिस्थितीचे चटके करीत प्रतिकूल परिस्थितीला धैर्याने सामोरे जातप्रसंगी उपाशी पोटीफुटपाथवर रात्र काढली पण वाम मार्ग न धरतासन्मार्गावर चालत राहिलेल्या संदिप शंकर कळंबे यांच्या 'भुकेचा सोहळा' या गझल संग्रहाचे प्रकाशन नुकतेच डोंबिवली येथे ज्येष्ठ गझलकार प्रशांत वैद्य आणि मराठी अभिनेत्री मेघा विश्वास यांच्या करण्यात आले.


स्वामीराज प्रकाशनाच्या वतीने दरमहा होणाऱ्या 'मराठी आठव दिवसया उपक्रमात अष्टगंध प्रकाशनाच्या वतीने या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी बालरोतज्ज्ञ डॉ सुहास चौधरीकवी-समीक्षक राजीव जोशीकल्याण सार्वजनिक वाचनालयाचे सचिवसाहित्यीक- रंगकर्मी भिकू बारस्करकवी अजित मालांडकरअनिस पत्रिकेचे संपादक उत्तम जोगदंडअनिस ठाणे जिल्हाध्यक्ष राजेश देवरुखकरअनिस कल्याण शाखाध्यक्ष डॉ बसवंतशाहू शिक्षण मंडळाचे सचिव डॉ गिरीश लटकेरंगकर्मी श्रीरंग दातेसुरेश पवारदेवेंद्र शिंदेसीताराम शिंदेराजेंद्र वाघमारेसुधा पालवेप्रज्ञा वैद्यसीमा झुंजाररावमीना ठाकरेविजया शिंदेसुनील खांडेकरश्रीकांत पेटकरसाक्षी धोरण आदी मान्यवर उपस्थित होते.
अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही आपली कविता जपणाऱ्या कवीचा हा पहिला गझलसंग्रह प्रकाशित करताना मनस्वी आनंद होतो आहे.
पोलादपूर तालुक्यातील ऐत्याहासिक उमरठ या गावचा आणि आता डोंबिवलीकर असलेला हा शायर मितभाषी आणि कलेच्या प्रांतात रमणारा आहे. संदीपने अवघ्या ३०-३२ वर्षांच्या आयुष्यात दूनियेचे रंग पाहिलेअनुभवले आणि ते पचवले केवळ आपल्या लेखणीच्या जोरावर. बालपणी आईवडिलांचे छत्र नसल्यात जमा झाल्यानंतर कविता आणि चित्रकला यांचाच आधार लाभलेल्या संदीपच्या आयुष्याच्या सोबतीला हा कवीता संग्रह यापुढच्या काळात दिशा देणारा ठरणार आहे असे उदगार गझलकार प्रशांत वैद्य यांनी याप्रसंगी काढले. अभिनेत्री मेघा विश्वास यांनी नितांत सुंदरदमदार आणि आशयघन शब्दकळा लाभलेला तरुण गझलकार आहे साहित्य विश्वात संदीपचे आणि या गझल संग्रहाचे जोरदार स्वागत होईल असे कौतुक केले. तर पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने वैचारिक दिवाळी साजरी होते आहे असे टिव्ही कलाकार सुधाकर वसईकर यांनी याप्रसंगी आपले विचार मांडले.
जन्म अपुल्यांच्या धगीमध्ये जळाला
कोळसा होतानिखारा होत गेला...
घेतले नाही जवळ मजला कुणीही
मग मला माझा सहारा होत गेला...

या पंक्ती सादर करीत आपल्या मनोगतात भविष्याच्या वाटचालीचा वेध घेताना संदिप कळंबे म्हणालेभूक लागली म्हणूनभाकरीऐवजी पैसा खाता येत नाही आणि पैसा जास्त आहे म्हणूनभुकेपेक्षा जास्त अन्न खाता येत नाही म्हणजेच जीवनात पैशाला ठराविक रेषेपर्यंतच स्थान आहे. हृदयातून येत असलेल्या काव्यप्रतिभेच्या भुकेच्या जोरावर मी गावापासून मुंबई पर्यंतच्या प्रवासातली पोटातली भूक मी सहन करू शकलो.
कार्यक्रमाचे संयोजक सुधीर चित्ते यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित केले तर केली. स्वररंग निर्मित "इये मराठीचीये नगरीआम्हां घरी नित्य दिवाळी!" हा मराठी संस्कृतीची मनोहारी अनुभूती देणारा अनोखा कार्यक्रम सादर झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला १०६ हुतात्म्यांच्या स्मारकाच्या प्रतिकृतीला पुष्पांजली अर्पण करण्यात आली. अवकाळी पावसाने पीडित शेतकऱ्यांसाठी उपस्थित रसिकांनी सढळ हस्ते जमा झालेली रक्कम नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाठविण्यात येणार आहे.

 

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत सत्याची कास धरून पत्रकारिता करावी.

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत  सत्याची कास धरून पत्रकारिता करावी. सतरावे शतक प्रबोधनाचे ,  अठरावे शतक वैचारिकतेचे ,  एकोणीसावे शतक प्रगतीचे...