उठ मराठ्या उठ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
उठ मराठ्या उठ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ३१ ऑक्टोबर, २०२३

उठ मराठ्या उठ (कोकणातल्या)

उठ मराठ्या उठ (कोकणातल्या)

गुलामांना आणि लाचारांना जात नसते असे म्हणतात, कोकणातल्या काही मराठयांचा व्यवसाय हा 'राजकारण' असल्याने शेताच्या बांधावर न जाता नेत्यांची हुजरेगिरी करीत त्यांचे वर्षाचे बाराही महिने सुगीचे दिवस म्हणूनच उपभोगत असतात, त्यांना ना आरक्षणाची गरज ना कुणबी प्रमाणपत्राची गरज ! त्यांच्या चेल्याचपाटयाना कोण सांगणार 'जात नसते ती जात' ! तुम्ही ९६ - ९२ कुळी म्हणूनच जगणार आणि मरणार आहात ! पण मयताला डोक्याचे मुंडण करणारा तुमचा सख्खा बांधव गरीबीने-उपासमारीने मरतोय हे दिसत नाही का ? तो आजपर्यंत तुम्ही फेकलेल्या तुकड्यांवर आशेने जगत होता, परंतु तो आता स्वतः च्या हक्काच्या भाकरीसाठी जागा झालाय ! ते पदरात पाडून घेईलच, परंतु यापुढे तुमची "जागा" तुम्हाला दाखवून देईल. चार महिने शेती आणि आठ महिने रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर शस्त्र घेऊन मोहिमेवर जाणाऱ्या असंख्य मावळ्यांचे आम्ही कोकणातील वारसदार ! तुम्ही नक्की कोण ते पांघरलेली राजकीय झुल झुगारून क्षणभर एकदा काय ते ठरवा ! नाही ठरवलेत तर मराठा आता 'मतदार' म्हणूनही जागा झालाय ! ज्याला ना गाव ना शेतीवाडी आणि पत्र्याच्या घरात पण स्वाभिमानाने राहतो आहे, असा फाटका माणूस मनोज जरांगे पाटील...सर्वच मराठयांचा नेता झाला आहे, मनोज जरांगे पाटील हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे.ज्याने आपले प्राण पणाला लावून झोपलेल्या मराठा समाजाला जागृत केले.घरावर तुळशीपत्र ठेवून समाजासाठी मरायला तयार झाले.

आज उपोषणाचा सहावा दिवस. अन्न, पाणी, औषध असं सर्व वर्ज्य करून हा ढाण्या वाघ गेल्या सहा दिवसांपासून प्राणांतिक उपोषणाला बसलेला आहे.चौथ्या दिवशीच प्रकृती चिंताजनक झाली होती.हात थरथरत होते. अंगात त्राण शिल्लक नाही. आवाज स्पष्टपणे येत नाही.तरिही पठ्ठ्या मागे हटायला तयार नाही. अनेकांनी विनवण्या केल्या पाटील पाणी घ्या.पाणी हे आपल्यासाठी आवश्यक आहे.तरिही ते मानायला तयार नाहीत. प्रत्येकाच्या डोळ्यात काळजी आहे. अश्रुचे मळभ दाटले आहे वाट करून दिली.भावनांचे बांध फुटले.सर्वांनी आर्त स्वरात विनवणी केली पाटील पाणी घ्या.आपला जीव तितकाच महत्त्वाचा आहे.आरक्षण तर आपण मिळवूच.मात्र आपल्या शिवाय त्या आरक्षणाला काहीही अर्थ नाही.लाख मेले तरी चालतील, मात्र लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे.असे आवाहन एका सुरात लाखों बांधवांनी केले आहे. समाजाच्या शब्दाचा मान राखत त्यांनी घोटभर पाणी घेतलं.मात्र अन्नाचा कण ही घेतला नाही.औषधाला स्पर्शही केला नाही.आणि स्पष्टपणे समाजाला ठणकावले की,असा चुकीचा आग्रह यापुढे करायचा नाही.माझ्या जिवापेक्षा समाजाचे आरक्षण महत्वाचे आहे.आणि पुन्हा पाण्याचा एक थेंबही न घेण्याचा वज्र निर्धार केला.राज्यात समाजाच्या मनात सरकार आणि प्रमुख राजकीय पक्षांविषयी एक तिडीक निर्माण झालेली आहे. मराठा आणि ओबीसी समूह यांच्यात विनाकारण द्वेषाचे वातावरण राज्य सरकारचे हस्तक व काही राजकीय पक्षांचे नेते करीत आहेत.कावळ्याच्या श्रापाने ढोरं मरत नसतं.तुम्ही कितीही पटकून घ्या.मराठा समाजासोबत ग्राउंड लेवलवर सर्व समाज भक्कमपणे उभे  आहेत.सरकारने अंत न पाहता आरक्षण द्यावे.यापुढची शांततेतील आंदोलने ही परवडणारी नसतील.सरकारने अहंकार टाळावा.कोणीही आत्महत्या करू नयेत.गावागावात आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे. आरक्षण फक्त शिक्षणासाठी हवं आहे याचा अनुभव अनेक मराठा पालक आणि विद्यार्थ्यांनी घेतला आहे, राज्यातील मराठ्यांना तात्काळ आरक्षण द्यावे. आमची लेकरं मग हिमतीने पुढे जातील अन तुमची लेकरं आमच्यावर राज्य करण्यासाठी 'काळे इंग्रज' म्हणून तुमची घराणेशाही व तुमचे वारसदार या नात्याने तुमच्या राजकीय गादीवर आणि चौकाचौकात बॅनर्सवर असतील. 

कदाचित ऊद्या गड फत्ते झालेला असेल..

पण हा गड पहायला जर आमचा सिंहच राहीला नाही तर??

मराठ्यांनो गड आला पण सिंह गेला ची पुनरावृत्ती तर होणार नाही ना?

४०० वर्षांनतर सिंहगडाच्या डोळ्यात आज पुन्हा अश्रू का दाटलेत?

पाटील आम्हाला भीती वाटतेय,आपण पाणी घ्यावे

- रवींद्र मालुसरे 

 

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत सत्याची कास धरून पत्रकारिता करावी.

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत  सत्याची कास धरून पत्रकारिता करावी. सतरावे शतक प्रबोधनाचे ,  अठरावे शतक वैचारिकतेचे ,  एकोणीसावे शतक प्रगतीचे...