प्रभादेवी म्युनिसिपल सेकंडरी स्कुल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रभादेवी म्युनिसिपल सेकंडरी स्कुल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २२ नोव्हेंबर, २०२३

प्रभादेवी-खाडा परिसरातील आनंददायी घटना आणि ज्येष्ठ पत्रकार स्व. राधाकृष्ण नार्वेकर

 प्रभादेवी-खाडा परिसरातील आनंददायी घटना  

आणि ज्येष्ठ पत्रकार स्व. राधाकृष्ण नार्वेकर

पाच दशके पत्रकारितेत अविरत काम पत्रकारितेला आपला धर्म मानून समाजाभिमुख पत्रकारिता करणारे एक पोटतिडकीचा पत्रकार म्हणून स्व. राधाकृष्ण नार्वेकर यांची महाराष्ट्राला ओळख. त्यांचे कौटुंबिक स्नेही पत्रकार शिवाजी धुरी यांनी त्यांच्या ८५ व्या जन्मदिवसानिमित हृद्यस्पर्शी भावना व्यक्त करणारी पोस्ट नुकतीच लिहिली होती. त्यांच्याकडून माझ्या फेसबुक वॉल वर आली.

समाजासाठी ठोस असे आपण सतत काही ना काही केले पाहिजे या ध्येयाने शिक्षकीपेशा सोडून नार्वेकर यांनी पत्रकारिता निवडली होती. याचा अनुभव मी १९८६ सालापासून घेत होतो, त्यावेळी दैनिक मुंबई सकाळ प्रभादेवी दत्तमंदिर लगत असलेल्या सकाळची इमारत होती त्यातून छापला जायचा. (सध्या त्याठिकाणी टॉवर उभा आहे) मी सुद्धा त्यावेळी जनसामान्यांचे प्रश्न लिहीत असेसुप्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार माधव गडकरी यांच्या जागेवर संपादक म्हणून नार्वेकर आले होते. ढेंगभर अंतर असल्याने मी सतत तिथे जायचो त्यामुळे त्यांचा परिचय झाला होताविचारपूस करायचे आणि स्वतःकडे असलेले ज्ञान मुक्त हस्ते वाटायचे.

.....परवा शिवाजी धुरींची पोस्ट वाचल्यानंतर माझे मन ३५ वर्षे मागे गेले,त्यावेळी शापूरजी पालनजी कंपाउंड मध्ये राहणारी आणि प्रभादेवी म्युनिसिपल सेकंडरी स्कुल मध्ये शिकणारी  विजया नार्वेकर माझ्या भागातली विद्यार्थिनी महापालिकांच्या सर्व शाळांतून SSC ला पहिली आली होती आणि गुणवत्ता यादीत येण्याची तिची संधी थोडक्यात हुकली होती. साहजिकच सेंच्युरी बाजारच्या अलीकडे राहणाऱ्या सर्व नागरिकांना कमालीचा आनंद झाला होता. विजयाची दखल मुंबईतील वर्तमानपत्रांनी घ्यावी, तिच्या गुणवत्तेला प्रसिद्धी मिळावी या हेतूने मी राधाकृष्ण नार्वेकर साहेबांकडे गेलो. विषय आणि स्थानिक परिस्थिती त्यांना समजावून सांगितली. ऐकल्यावर त्यांच्यातील सामाजिक अंग जागे झाले. म्हणाले, रवींद्र या मुलीबद्दल मी स्वतः लिहितोच परंतु तिचा नागरी सत्कार सुद्धा व्हायला पाहिजे मी कार्यक्रमाला नक्की येईल. मी, रामनाथ म्हात्रे, शांताराम कांडरे, दशरथ बिर्जे, विनायक वायगंणकर, राठोड बाबूजी, कमलाकर माने, तुळशीदास शेळके अनिल जाधव,राजाराम सावंत, शिरीशेठ पाटील आणि इतरांनी कार्यक्रमाचे नियोजन केले, त्यानंतर स्टॅण्डर्ड मिलमधील ऑफिसर नंदगिरी साहेब यांनी मफतलाल हॉल (ICICI Bank) उपलब्ध करून दिला, बुधवार, दिनांक २९ ऑगस्ट १९८९ ला स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत मफतलालमध्ये कार्यक्रम झाला. खासदार शरद दिघे, आमदार शरयु ठाकूर, त्यावेळच्या मुख्याध्यापिका दाबके मॅडम, कृष्णा ब्रीद सर, रमेश परब, रामचंद्र बांधणकर हे पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. नार्वेकर साहेबांनी शब्द दिल्याप्रमाणे बातमी आणि परिस्थितीला वाचा फोडणारा एक लेख लिहिला. त्यावेळी शापुरजी पालनजी कंपाउंड, शास्त्री नगर आणि शिवसेना नगर येथील १६० घरांना पर्यायी जागा देता घरे खाली करण्याच्या नोटिसा मुंबई महानगरपालिकेने दिल्या होत्या. आम्ही कार्यकर्ते कोर्टातही केस हरलो होतो त्यामुळे हा प्रश्नही यानिमित्ताने समोर येईल असा माझा स्वार्थ होताआपण लिहीत असलेला प्रत्येक शब्द हा सामान्यजनांच्या उत्कर्षाकरीता उपयोगी पडला पाहिजे अशी त्यांनी पत्रकारिता केली...आज विजया सुखी समाधानी आयुष्य जगत आहे, तर याठिकाणचे झोपडीवासीय तेव्हा कल्पनाही केली नव्हती अशा 23 मजल्यांच्या टॉवर्समध्ये चांगल्या सोयीसुविधा असलेल्या घरात राहत आहेत....पेरलेले चांगले उगवले याचे आता समाधान आहे.



- रवींद्र मालुसरे

अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई

9323117704


बुधवार, २६ जानेवारी, २०२२

प्रभादेवी म्युनिसिपल सेकंडरी स्कुलमधील ४० वर्षानंतर वर्ग भरला.

 ४० वर्षानंतर SSC चा वर्ग भरला पुन्हा घंटा वाजली, धडे गिरवले


कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु होणार की नाहीत असा राज्यात संभ्रम असताना .... प्रभादेवी म्युनिसिपल सेकंडरी स्कुलमधील ४० वर्षापूर्वीच्या १९८२ च्या SSC च्या शाळेच्या वर्गाची बॅच पुन्हा एकदा त्यावेळचे शिक्षक सर्वश्री वासुदेव दिंडोरे सर, भालचंद्र पिळणकर सर, चौधरी सर, अरुणा केळकर मॅडम, अस्मिता गोविंदेकर मॅडम यांच्या उपस्थितीत घंटा वाजली...वर्ग भरला...यस सर - यस मॅडम 'हजर' म्हणत पट भरला...फळ्यावर त्याची नोंद झाली. ओळख परेड होत सर्वांना करीत 'पास' करीत गोल्ड मेडल प्रदान करण्यात आले, मधली सुट्टी झाली, डब्यातून खाऊ खाल्ला, टेबलावरचे डस्टर दाखवत शिक्षकांनी पुन्हा एकदा उर्वरित आयुष्यासाठी सुखी जीवनाचे धडे आपल्या भाषणातून दिले, राष्ट्रगीत होऊन शाळा सुटली. त्यावेळी व्रात्य असलेले प्रशांत भाटकर-गणेश तोडणकर कार्यक्रमाच्या प्रसंगी 'मॉनिटर' होते त्यामुळे अपेक्षेपेक्षा जास्त कार्यक्रम यशस्वी झाला,...

आज तुमच्यापैकी काहींचे चेहरे तर काहींची नावे आठवताहेत, निसर्गाचा आणि काळाचा हा महिमा आहे, पण शाळेतील गोड आठवणींना उजाळा देण्यासाठी तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने हजर राहिलात, आपल्या एकमेकांना भेटण्याचे प्रचंड कुतूहल असणार, त्यामुळेच हे आज घडले. तुम्ही होतात म्हणून शाळा आणि आम्ही होतो. त्यामुळे बदल घडला असला तरी तुम्ही आताच्या शाळेच्या इमारतीत आठवणींना उजाळा देण्यासाठी तुम्ही इच्छा होईल तेव्हा जात जा असे भावनिक उदगार वासुदेव दिंडोरे सर यांनी आपल्या भाषणात काढले. अस्मिता गोविंदेकर मॅडम आपल्या भाषणात म्हणाल्या की, जुन्या आठवणी अत्तरासारख्या कुपीमध्ये साठवून ठेवा, आणि जेव्हा केव्हा मनात निराशा येईल तेव्हा त्यांची स्मरण करा, नक्कीच ताजेतवाने व्हाल. ४० वर्षानंतर तुम्ही पुन्हा शाळेचा वर्ग भरवत आहात व तुम्ही भेटणार असे समजल्यानंतर एक शिक्षिका म्हणून मला जास्त आनंद झाला आहे. हे माझे शिक्षक आहेत असे जेंव्हा तुम्ही अभिमानाने आमची ओळख करून देता त्यावेळच्या भावना मला शब्दात व्यक्त करता येत नाहीत. माझ्या मुलांच्यावर जसे प्रेम होते तीच भावना तुमच्याही बाबतीत होती, तुम्ही नावलौकिक मिळवावा आणि महापालिका शाळेत शिकलो आहोत याचा न्यूनगंड न राहता तुम्ही भविष्यात मोठे व्हावे याहेतूने कदाचित तुम्हाला मी त्यावेळी मारले असेल, परंतु आज विठ्ठलाच्या भेटीसाठी जी तळमळ असते तीच ओढ आणि हुरहूर आज माझ्या मनात दाटली आहे. असे भावुक उदगार अरुणा केळकर मॅडम यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले. तर चौधरी सर म्हणाले की, मी वर्गाकडे येतो आहे असे दिसले की, तुमच्या वर्गात शांतता पसरायची त्यामुळे मला नक्कीच विसरला नसाल, खरं तर मी खाजगी शाळेतली चांगल्या पगाराची नोकरी सोडून गरीब मध्यमवर्गीय मुलांना चांगले शिक्षण देता यावे हे एक धेय्य मनाशी बाळगून महापालिका शाळेत शिक्षक म्हणून रुजू झालो. अनेकांना त्यावेळी याचे आश्चर्य वाटले होते पण, माझ्या कार्यकाळात तुमच्यातले अनेक गुणी विद्यार्थी भेटले त्यांची नावेही मी अजून विसरू शकलो नाही, त्यामुळे प्रभादेवी ही शाळा माझी आवडती शाळा ठरली. सुप्रसिद्ध कलाशिक्षक भालचंद्र पिळणकर सर यांनी ४० वर्षांपूर्वी सेंडऑफ देताना 'तुज पंख दिले देवाने कर विहार सामर्थ्याने' आणि 'या लाडक्या मुलांनो तुम्ही मला आधार नव हिंद युगाचे तुम्हीच शिल्पकार' ही दोन गाणी म्हटली होती ती पुन्हा वाढत्या वयातही सुरेल आवाजात म्हटली.                      
      
तर विद्यार्थ्यांच्या वतीने रवींद्र मालुसरे हे कार्यक्रमाची प्रस्तावना करताना म्हणाले की, शाळा सोडल्याच्या दाखल्यावर शाळेच्या नावाचा फक्त शिक्का आहे परंतु आमच्या मनामनात आणि आठवणीत कायमचे गेली ४० वर्षे तुम्ही राहिलात याचे एकमेव कारण म्हणजे तुम्ही निरपेक्षपणे आम्हाला घडण्या-बिघडण्याच्या वयात चांगले संस्कार देण्याचे काम केलेत. आज आशीर्वाद देण्यासाठी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलात आम्हाला स्मरणरंजन करण्याची संधी दिलीत, तोच आनंद आमच्या चेहऱ्यावर दिसतो आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमाच्या तासाला महेश पै, प्रशांत भाटकर, गणेश तोडणकर, उमेश शिरधनकर यांनी गाणी तर संगीता पाटणकर, मीनाक्षी बोरकर यांनी आपले विचार मांडले.
कार्यक्रमाला शुभांगी पेडणेकर-विलणकर, शुभांगी भुवड-बैकर, मिनाक्षी बोरकर-मोपकर, साधना बोरकर, सविता गाड-धुरी, संगीता पाटणकर-जाधव, सुनंदा धाडवे, सुरेखा चव्हाण, कल्पना किर-आंबेरकर, शोभा पोटे, रेखा चव्हाण-सुभेदार, प्रतिभा खाटपे-बहिरट, कांचन शिर्के-शिंदे, भारती चव्हाण या माजी विद्यार्थीनी तर रविंद्र मालुसरे, प्रशांत भाटकर, सचिन पाताडे, रमेश राऊळ, नरेश म्हात्रे, महेश पै, जगन्नाथ कदम, अविनाश हुळे, गणेश तोडणकर, विजय विलणकर, संतोष गुरव, गुरुनाथ पटनाईक, नंदकुमार लोखंडे, उमेश शिरधणकर, पांडुरंग वारिसे, दिनेश पांढरे, शेखर भुर्के, अनिल कदम, किशोर किर, हनुमंत नाईक, दिनकर मोहिते, शैलेश माळी, राजू दोडे, संजय धामापूरकर, दिनेश मोकल, दीनानाथ शेळके, दत्ताराम बोरकर, विश्वनाथ म्हापसेकर, संदीप केणी हे माजी विद्यार्थी उपस्थित होते.
रवींद्र मालुसरे
अध्यक्ष
मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई
9323117704






वैशिष्ट्यीकृत पोस्ट

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत सत्याची कास धरून पत्रकारिता करावी.

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत  सत्याची कास धरून पत्रकारिता करावी. सतरावे शतक प्रबोधनाचे ,  अठरावे शतक वैचारिकतेचे ,  एकोणीसावे शतक प्रगतीचे...