शुक्रवार, २४ मे, २०२४

ज्ञानपंढरीचा वारकरी – वै. श्रीगुरु ह. भ. प. हरिश्चन्द्र महाराज मोरे







ज्ञानपंढरीचा वारकरी – वै. संतचरणरज श्रीगुरु ह. भ. प.  हरिश्चन्द्र महाराज मोरे    



जन्मापासून आयुष्याच्या अंतापर्यंत “लावूनी मृदुंग श्रुतीटाळघोष | सेवू ब्रम्हरस आवडीने ||” हे संत तुकाराम महाराजांचे वचन ज्यांनी सार्थ केले असे पोलादपूरचे वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू संतचरणरज श्रीगुरु ह. भ. प. हरिश्चन्द्र महाराज मोरे यांचे नुकतेच वैशाख शु. दशमी, शनिवार, दिनांक १८ मे 2024 रोजी देहावसान झाले. आयुष्यभर केलेली ईश्वरआराधना आपल्या चरणी रुजू करण्यासाठी नियती आणि परमेश्वरही इतक्या तातडीने त्यांना वैकुंठात आपल्यापाशी बोलावून घेईल असे कुणाला स्वप्नातही वाटले नव्हते. समाजाचे नेतृत्व करणारे आम्ही काही निवडक त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी ठाणे येथील रुग्णालयात श्रीगुरु बाबांच्या भेटीला गेलो असताना, ते आमचे हात हातात घेऊन, नेहमीप्रमाणे अत्यंत आपुलकीने आमच्याशी हितगुज साधू लागले. त्यावेळेस आम्हाला अनपेक्षित अशी निर्वाणीची भाषा श्रीगुरु बाबांच्या श्रीमुखातून येऊ लागली. आता माझे कार्य संपूष्टात आले आहे ...यापुढे गुरुवर्य रघुनाथदादांना मी तुमच्याकडे सोपवतो आहे, यापुढे त्यांची आणि समाजाचीही काळजी घ्या...समाजाच्या वतीने चाललेल्या नित्य नैमित्तिक संप्रदायीक कार्यक्रमात खंड पडून देऊ नका." त्यांचे हे अंतरीचे बोल २-४ दिवसात खरे झाले. एकादशी हा वारकऱ्यांच्या जीवनातला अत्यंत महत्वाचा दिवस. काया-वाचा-मने भगवान श्री विष्णूच्या सानिध्यात राहण्याचा आणि धार्मिक व आध्यात्मिक लाभ प्राप्त करण्याचा दिवस. वैशाख शुद्ध मोहिनी एकादशीचा दिवस उगवला.
आपल्या अवतार कार्य समाप्तीची वेळ जवळ आली आहे याची महाराजांना चाहूल लागल्यानंतर त्यांच्या जीवाची घालमेल सुरु झाली. मला एकादशीला बोरजफ़ाटा येथील आश्रमात तातडीने घेऊन चला असा आदेश त्यांनी दिला. मुंबई ते पोलादपूर प्रवास सुरु झाला. गाडीने सावित्री नदीचा पूल ओलांडला... गाडी आश्रमाच्या  समोर उभी राहिली आणि "रामकृष्ण हरी" असा वारकऱ्यांचा मंत्र जपत वयाच्या ७६ व्या वर्षी, वैशाख शुद्ध दशमीला रात्री त्यांनी आपलं अवतार कार्य संपवून देह रूपाने जगाचा निरोप घेतला. एकादशीच्या पवित्र दिवशी देहावर अग्नीसंस्कार झाले. द्वादशी सावडण्याचा ( दूध पाजण्याचा ) विधी पार पडला.
दशमी, एकादशी, द्वादशी हा वारकऱ्याचा पर्वकाळ. संतचरणरज श्रीगुरु बाबांनी हा पर्वकाळ साधला आणि वारकरी संप्रदायला अपेक्षित आपल्या मरणाचा सोहळा करून घेतला.
छत्रपती शिवाजी महाराज आणि नरवीर तानाजी-सूर्याजी मालुसरेंच्या पराक्रमाने, हिंदवी स्वराज्याच्या विचाराने भारलेल्या,  आणि वारकरी परंपरेने समृद्ध पोलादपूर तालुक्यातील दाभीळ या डोंगराच्या कड्याकपारीत, प्रतापगडाच्या पायथ्याशी वसलेल्या ऐतिहासिक गावात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील सद्गुरू वै. हनुमंतबाबा हे अध्यात्मिक ऐश्वर्य संपन्न महापुरुष. त्यांनीच पोलादपूर, खेड तालुक्यात वारकरी संप्रदायाची मुहूर्तमेढ  रोवली. कौटुंबीक जबाबदारी पूर्ण व्हावी म्हणून ते डिलाईल रोडच्या पुलाजवळ गुळवाला चाळीत राहायचे आणि मिलमध्ये नोकरी करायचे. तसे पाहिले तर गरिबीची परिस्थिती परंतु आपल्या मुलाने चांगले शालेय शिक्षण घ्यावे त्याने त्याच्यावर चांगले संस्कार होतील परंतु जगाचे यथार्थ ज्ञान व्हावे आणी आध्यत्मिक संपन्नता साधता यावी यासाठी त्यांनी त्यांच्या शालेय शिक्षणासोबत अध्यमिक ज्ञानांर्जनाकडे विशेष लक्ष दिले त्यामुळे श्रीगुरु बाबांनी त्यावेळी जुनी दहावी पर्यंत शालेय शिक्षण घेतले. आणि वै हनुमंतबाबा यांच्या सानिध्यात अध्यात्मिक शिक्षणाची कास धरली. सद्गुरू हनुमंतबाबा म्हणजे निष्ठावान वारकरी होते तसेच गावागावातील समाजात परमार्थात वाढ व्हावी यासाठी पुढाकार घेणारे, त्यासाठी सातत्याने जनसंपर्क वाढविण्यासाठी प्रयत्नात राहणारे वारकरी होते. साहजिकच महाड-पोलादपूर तालुक्यातील अनेक समाजधुरीण त्यांच्या घरी येत असत. महाराजांच्या समोरच परमार्थाची चर्चा, नवनव्या कार्यक्रमांची आखणी होत असे. त्याचा योग्य तो परिणाम झाला. श्रीगुरु हरिश्चंद्र महाराज तारुण्यातच मोठ्यांचे मार्गदर्शन घेत व लहानांना मार्गदर्शन करत.  अध्यात्म पथावर मार्गक्रमण करीत होते. घरातले भक्तिपूर्ण वातावरण व बाहेर देश स्वातंत्र्य झाल्यानंतर नव्या राष्ट्रउभारणीची सुरुवात ते ऐन तारुण्यात अनुभवत होते. सुधारणावाद्यांचे समाजसुधारणा कार्य, पूर्वजांनी अव्याहतपणे शंभर वर्ष चालविलेले धर्मजागरण, संतमत जागरण असे दर्शन आंतर्बाह्य जगात घेत ते त्यावेळच्या पिढीबरोबर वाढत होते.
वडीलधाऱ्या मंडळींची घरातली नित्याची भजने, कामगार विभागात होणारी चक्रीभजने, ज्ञानेश्वरी, भागवत, भगवतगीता,कीर्तन, प्रवचन रूपातली उपासना, वाडवडिलांनी डोळसपणे केलेला संतवाङ् मयाचा अभ्यास व त्याच्या प्रसारासाठी केलेले हिमालयासारखे उत्तुंग कार्य, या सगळ्याच गोष्टींचा बालपणापासूनच महाराजांच्या मनावर ठसा उठला होता, त्यामुळे ' यन्नवे भाजने लग्न: संस्कारो नातिवर्तते । म्हणजे मडक्याच्या ओलेपणात त्यावर झालेला संस्कार बदलत नाही, असे म्हणतात ना ! तसेच झाले. व्यावहारिक जगात रमावेसे त्यांना नको वाटू लागले. त्यामुळे त्यांनी श्रीक्षेत्र अलंकापुरी (आळंदी) गाठली. तिथे त्यांच्या पूर्वपुण्याईने परमपूज्य सदानंद गुरुजींचा सहवास लाभला. श्रीगुरु बाबा आणि सद्गुरू सदानंद गुरुजी यांची जवळीक श्रीगुरु बाबांना अलौकिक अध्यात्मिक श्रीमंती देऊन गेली. त्याची प्रचिती श्रीगुरु बाबांच्या कीर्तन कलेतून अवघ्या महाराष्ट्राने घेतली.  त्याच दरम्याने वै.गुरुवर्य मामासाहेब दांडेकर, वै मारुतीबाबा गुरव, ह भ प किसनमहाराज साखरे यांच्या मौलिक मार्गदर्शनाचा लाभही त्यांना झाला. मुळातली विद्याभ्यासाची अभिरूची, त्यात संतश्रेष्ठ ज्ञानराजांच्या पुण्यपावन धर्मक्षेत्री अभ्यासाचा योग, उत्तमोत्तम मार्गदर्शक व घरचाच वडिलांचा विद्या व्यासंगाचा आदर्श, अंत:करणावरचे धार्मिक, सांप्रदायिक संस्कार  यामुळे श्रीगुरु हरिश्चन्द्र महाराजांचे धार्मिक शिक्षण कसदार झाले. वारकरी शिक्षणसंस्थेतील अभ्यासात संस्कृतभाषेचे साधारण ज्ञान आणि साहित्यशास्त्राचे चांगले मार्मिक ज्ञानही त्यांनी मिळविले.  ज्ञानेश्वरी, गीता, सकलसंत गाथा, भागवत,विचारसागर ब्रह्मसूत्र शांकरभाष्य, भामती, सिद्धांतबिंदू, विवरणप्रमेय संग्रह, सर्वदर्शनसंग्रह - इत्यादी वेदांतग्रंथाचे अध्ययन केले होते. गीतेवरील टीका व भक्तिरसायन या ग्रंथांचा अभ्यास घेतला होता, त्यांच्या निरूपणाची भाषा रसाळतेने सुंदर व आशय घनतेने प्रगल्भ झालेली जाणवत होती. आळंदीवरून विद्याभ्यास घेऊन आल्यानंतर श्रीक्षेत्र आळंदी व श्रीक्षेत्र पंढरपूरची वारी,पारायणे, प्रवचन, कीर्तन असे चतुरंग पद्धतीने त्यांनी संप्रदायाचे सेवाकार्य मोठ्या जोमाने परंतु भक्तिभावाने सुरु केले. आळंदीहून आल्यानंतर संत तुकाराम महाराज यांच्या "आजिचे हे मज तुम्ही कृपादान , दिले संतजन मायबापी !" या अभंगावर निरूपण केले होते. मात्र त्यानंतर "मी मूर्खु । जरी जाहला अविवेकु । तरी संतकृपादीपकु । सोज्वळु असे ।।" या ओवीनुसार  व 'सकळमंगळनिधी । श्रीविठ्ठलाचे नाम आधी ।।' या अभंगानुसार त्यांचे 'संतचरणरज' सेवाकार्य सुरू झाले होते.
श्री गुरू वैराग्यसंप्पन्न गंगूकाका शिरवळकर फडच्या अधिपत्याखाली सद्गुरू ह.भ.प.वै. हनुमंतबाबांच्या कृपाशीर्वादाने रचलेल्या भक्कम पायावर "सद्गुरू ह.भ.प.वै. हनुमंतबाबा मोरे वारकरी समाजाच्या" या इमारतीला त्यांनी आकाशाची उंची दिली, असे त्यांचे आध्यात्मिक आणि वारकरी संप्रदायात अनमोल कार्य आहे. वडिलांच्या पश्चात पोलादपूर, महाड, खेड,मुंबई, ठाणे, बडोदे या ठिकाणी त्यांच्या मनोगतानुसार हरिनाम सप्ताहांचे व श्रीमद ज्ञानेश्वरी पारायणांचे आयोजन त्यांनी केले. आळंदी ते पंढरपूर अशी पायी वारी आयुष्यात अनेकदा केली. प्राथमिक परमार्थ संस्काराचा माध्यम म्हणून खेडोपाडी शिस्तबद्ध, शुद्ध स्वरूपात अखंड हरीनाम सप्ताहाच्या रूपाने ज्ञानसत्र परंपरा आपल्या नंतरही पुढे सुरू राहावी यासाठी त्यांनी अभ्युदय बॅंकेतून निवृत्त झाल्यानंतर बोरजफ़ाटा येथे सावित्री, ढवळी, कामथी या तीन नद्यांच्या संगमावर संत हनुमंतबाबा वारकरी शिक्षण संस्था या नावाने धर्मशाळा उभारण्याचा संकल्प आपल्या अनुयायी शिष्यांच्याकडे व्यक्त केला. महाराजांचा हा सत्यसंकल्प सर्वानाच आवडला. संस्थेचे अध्यक्ष, श्रीगुरु बाबांचे निष्ठावंत सेवक, साळवीकोंड गावचे सुपुत्र आणि दानशूर श्री रामशेठ साळवी यांनी तात्काळ एक लक्ष रुपये देणगी देण्याची घोषणा केली. त्यानंतर याकामासाठी देणग्यांचा ओघ सुरु झाला.
महाड-पोलादपूर तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी, दानशूरांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि लहान-थोरांनी सढळ हस्ते या धार्मिक यज्ञासाठी आर्थिक रूपाने योगदान दिले.  न भूतो न भविष्यती अशी संस्था वेळेपूर्वीच उभी राहिली आणि पोलादपूर तालुक्यातील आणि मुंबई-ठाण्यातील सर्व समाजबांधवांच्या उपस्थित भव्यदिव्य उदघाटनाचा सोहळा होत या वास्तूचे समाजार्पण करण्यात आले. त्यानंतर या आश्रमातूनच महाराज समाजाच्या विस्तारासाठी आणि परमार्थ वाढीसाठी अहोरात्र झटू लागले. तालुक्यातील जीर्णशीर्ण अशा मंदिरांना आपले योग्याशिष्य पदाधिकारी देऊन वारकरी संप्रदायाच्या परमार्थस्थलाच्या स्वरूपात विकसित केले. त्यांचा जीर्णोद्धार करवून घेतला. त्यांचे  सुपुत्र ह भ प रघुनाथदादा त्यांच्या सोबत परमार्थाची धुरा वाहू लागले. रघुनाथदादांच्या विचारामुळे समाजाला एक शिस्त आली, त्यामुळे आबालवृद्धांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अधिक संख्येने लोक परमार्थाला वाहून घेऊ लागले.
अनेक ठिकाणच्या नामसप्ताहात तेथील लोकांच्या आग्रहानुसार कीर्तनादी कार्यक्रमासाठी महाराजांचे जाणे अनेक गावात होई. शिवाय अनेक ठिकाणच्या सप्ताहाचे सगळे नियोजन त्यांचे असे.
वारकरी सांप्रदायातील अनेक प्रासादिक परंपरेपैकी हनुमंत बाबांची एक परंपरा असुन तिचे जतन करुन आता ती वृद्धिंगत झालेली आहे. वारकरी पंथासारखा दुसरा पंथ नाही. पांडुरंगाची मूर्ती ही योगस्थानक आहे. वारकरी पंथातील आद्यगुरू ज्ञानेश्वर महाराजांनीही त्यांना योगीराज असे संबोधले आहे. म्हणूनच त्यांच्या समोर गेल्यानंतर प्रत्येकाचे भान हरपून जाते व कुठल्याही प्रकारचे मागणे मागितले जात नाही. कारण या मागण्यालाही मर्यादा असते. वै गुरुवर्य हनुमंतबाबा हे पोलादपूर तालुक्यातील लोकांच्या पारमार्थिक जीवनाचे निस्वार्थ सेवाभाव जपणारे पथदर्शक होते. त्यांनी स्वतःचे अधिष्ठान तयार करून साधा सोपा परमार्थ कीर्तनरूपाने मुंबईत अनेक ठिकाणी सांगितला. कॉटनग्रीनच्या श्रीराममंदिरात प्रत्येक रविवारी ते कीर्तन ऐकण्यासाठी जात असत. श्रीक्षेत्र पंढरपूर येथील जगद्गुरू संत तुकाराम  महाराजांच्या मंदिरात कार्तिकी वारीला देहूकर फडाच्या वतीने नियमित कीर्तन, बकरीअड्डा, कुलाबा, प्रभादेवी येथील श्री विठ्ठल मंदिर, करीरोड पुलाखाली पिंपळेश्वर मंदिरात शे-दीडशे भाविक श्रोत्यांसमोर अशी त्यांची कीर्तने होत असत. यासाठी त्यांना साथ देण्यासाठी गवई म्हणून गोविंद कोळी आणि पखवाज वादनासाठी विठ्ठल पवार (जांगलयाबुवा) सातत्याने असत. वारकरी सांप्रदायाची शिकवण, परंपरा व पद्धती आपल्या ग्रामीण पोलादपूर तालुक्यात वाडी-वस्त्यांवर राबविण्यासाठी त्यांनी सुरु केली. वृद्धापकाळाने त्यांचे देहावसान झाल्यानंतर साहजिकच सांप्रदायिक परंपरा पुढे चालविण्यासाठी हरिश्चंद्र महाराजांच्यावर जबाबदारी येऊन पडली. सद्गुरू हनुमंतबाबांच्या उतारवयातील प्राकृतिक विकलतेत महाराजांनी, छायेप्रमाणे त्यांच्या सोबत त्यांची सेवा केली. 'सकळ तीर्थाचिये धुरे । जिये का मातापितरे । तया सेवेसी कीर शरीरे । राहून लोण कीजे।।' ही त्यांची दृढभावना होती. भक्तवर्य पुंडलिकासारखे मातृपितृसेवन त्यांनी केले. पितृचरणांची केवळ शारीरसेवाच नव्हे तर त्यांनी जन्मभर चालविलेली अनेक  गावागावांमधील ज्ञानेश्वरी प्रवचनाची व कीर्तनाची सेवा चालवूनही पुढे त्यांनी पित्राराधन केले. व्यक्ती आपल्यातून गेली तरी त्यांच्या कीर्तीतनू, वैचारिक कास, पथ तसेच अबाधित राहत असतात. वै हनुमंतबाबा यांच्या वैकुंठगमनानंतर तसेच घडले.
आजपर्यंतच्या समाजाच्या पारमार्थिक उन्नतीसाठी महाराजांच्या कृपा-मार्गदर्शनाखाली संस्थेच्या अनुयायी गावातील अनेक ज्येष्ठ पारमार्थिक सेवाधारी, समाजधुरीण अशा अनेक मान्यवरांचे मोलाचे सहकार्य लाभले. महत्वाचे म्हणजे बोरज गावाचे सुपुत्र आणि श्रीगुरु बाबांचे पट्ट्शिष्य वै.रामचंद्र कुशाबा झाडाणेबुवा आणि त्यांच्या परिवाराने स्वतःची जागा मोठ्या स्वखुशीने संस्था उभारण्यासाठी दिली. बोरज गावची गुरुनिष्ठा काही औरंच!
वै. श्रीगुरु हरिश्चन्द्र बाबांचा सहवास आम्हाला प्रेमळ पित्याप्रमाणे लाभला. त्यामुळे तालुक्यातील वारकरी कुटुंबातील आम्हां शेकडो अनुयायींच्या जन्माचे सार्थक झाले. दाभिळ, बोरज, साळवीकोण्ड , साखर कदमवाडी, साखर-सुतारवाडी, कामथे, चांदले, वडघर, शिंगरी, चिंचवली, पुरे , गांजवणे, सातविनवाडी , तळे या अनुयायी गावांतील आम्ही समस्त अनुयायी कृतकृत्य आहोत, 
रामकृष्ण हरी
 मृत्यू हे माणसाच्या जीवनातील अंतिम सत्य आहे. जन्माला आलेल्या प्रत्येकाला मृत्यू अटळ आहे. परुंतु एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याचा आत्मा कुठे जातो हा प्रश्न अनेकांना पडतो. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे की, आत्मा कधीही मरत नाही. कोणाचा जन्म झाला तर त्याचा मृत्यू निश्‍चित आहे आणि जो मेला आहे त्याचाही पुनर्जन्म निश्चित आहे. आयुष्यात चांगले कर्म करणारेच या जीवन-मृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडू शकतात आणि परलोकात जातात. गुरुवर्य ह भ प हरिश्चन्द्र महाराजांच्या मृत्यूनंतर पुढील १३ दिवस त्यांच्या परमार्थ सेवासाधनेत खंड पडू नये म्हणून समाजाच्या वतीने तालुक्यातील महान किर्तनकारांची दररोज सायंकाळी किर्तनांची जागरण सेवा आयोजित करण्यात आली आहेत. धर्मजागरणासाठी सर्वश्री गुरुवर्य ह भ प केशवदास महाराज दळवी, अजितमहाराज गद्रे, पंढरीनाथ महाराज दळवी, बाळकृष्ण महाराज पवार, लक्ष्मण महाराज खेडेकर, भजनानंदी गुरुवर्य हरिभाऊ रिंगे महाराज, गुरुवर्य ढवळेबाबा संप्रदाय प्रमुख ह भ प गणपत महाराज मोराणकार, सदगुरु भावे महाराज वारकरी संप्रदायाचे अधिष्ठान प्रमुख गुरुवर्य ह भ प रामदादा महाराज घाडगे, सद्गुरू मोरे माऊली संप्रदायाचे अधिष्ठान प्रमुख गुरुवर्य ह भ प अनंत तथा दादामहाराज मोरे, शिरवळकर फडाचे प्रमुख गुरुवर्य ह भ प भागवत महाराज शिरवळकर आणि उत्तरकार्याच्या दिवशी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या १४ व्या पिढीचे वारसदार देहूकर फडप्रमुख गुरुवर्य ह भ प चैतन्य महाराज देहूकर यांची प्रासंगिक कीर्तने होणार आहेत.
नामा म्हणे लोपला दिनकर |
बाप ज्ञानेश्वर समाधिस्त ||
गुरुवर्य हनुमंतबाबा मोरे वारकरी संप्रदायाच्या सर्व शिष्यगणांच्या वतीने वै. संतचरणरज श्रीगुरु ह. भ. प. हरिश्चन्द्र महाराज मोरे यांना  
|| भावपूर्ण विनम्र श्रद्धांजली ||

श्री रामशेठ साळवी (अध्यक्ष)
श्री कृष्णा चं कदम के के (सेक्रेटरी)

शब्दांकन - ज्येष्ठ पत्रकार रवींद्र मालुसरे 













इतर पोस्ट वाचण्यासाठी समोरची 👉अनुक्रमाणिक clik करा 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत सत्याची कास धरून पत्रकारिता करावी.

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत  सत्याची कास धरून पत्रकारिता करावी. सतरावे शतक प्रबोधनाचे ,  अठरावे शतक वैचारिकतेचे ,  एकोणीसावे शतक प्रगतीचे...