माटुंगा येथील जीएसबीचा गणपती भारतातील सर्वात श्रीमंत गणपती
गणेश ही पौराणिक हिंदू
धर्मातील प्रथम पूज्य व त्या एक मुख्य देवता आहे.विघ्नहर्ता, बुद्धीची देवता आणि सर्व
देवांमध्ये गणपती बाप्पा हा प्रथम पूजनीय मानतो. गणेशोत्सव म्हणजे भक्तिभाव, श्रद्धा
आणि आनंंदाचा उत्सव ! सोबतच मांगल्य, उत्साह आणि जल्लोष यांचा संगम! श्रीगणेश उपासना
करणारे लाखो भक्त भारतात आहेत. श्रीगणेश ही तर महाराष्ट्राची लाडकी देवता आहे. ऐहिक
किंवा आध्यात्मिक सुखाच्या अपेक्षेने हे भक्त अनेक प्रकारे या देवतेची उपासना करतात.
कोणत्याही मंगल कार्याला आरंभ करताना मंगलमूर्ती श्रीगजाननाचे मंगलमय स्मरण करणे ही
सज्जनांची परंपरागत पध्दती आहे. कारण तो विघ्नहर्ता आहे. तो विघ्नराजही आहे. तो आपल्या
सामर्थ्याने विघ्नांना प्रेरणाही देऊ शकतो व विघ्नांचे दमन आणि शमनही करू शकतो.
भव्य- दिव्य गणेशमूर्ती
आणि अनोखी सजावट हे मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवाचे मुख्य आकर्षणाचे केंद्रबिंदु आहे.
मुंबईतील अशी अनेक प्रसिद्ध गणेश मंडळे आहेत, जे कित्येक वर्षांपासून गणेशोत्सवाची
परंपरा आनंदाने साजरी करत आहेत. मुंबईत सार्वजनिक गणपती आता मंडपात सज्ज झालेले पाहायला
मिळत आहे. गणपती म्हटलं की, सर्वत्र आपल्याला धामधूम आणि भक्तांची गर्दी पाहायला मिळते. मुंबईतील आकर्षणाचा
केंद्रबिंदू आणि भारतातील सर्वात श्रीमंत गणपतीची मूर्ती म्हणून मुंबईतील माटुंगा येथीलजीएसबीचा
गणपती ओळखला जातो. कर्नाटकातून आलेल्या गौड सारस्वत ब्राह्मण समुदायाने
१९५५ साली जी. एस. बी
समाजातील माधव पुराणिक यांनी या गणेशोत्सवास सुरूवात केली. त्याकाळी लहान स्वरूपात
सुरू झालेली ही गणेशपूजा आज भव्य दिव्य झाली आहे.आजही मुंबईत जी.एस.बी समाजातील व्यक्ती
एकत्र येऊन गणेशपूजा करतात.जी.एस. बी मंडळ हे सार्वजनिक गणेशमंडळ असले तरीही या गणेशमूर्तीची
स्थापना केवळ ५ दिवसांसाठी किंग सर्कल येथील जी.एस. बी स्पोर्ट्स क्लब ग्राऊंडवर केली
जाते.जी. एस. बी गणपतीसाठी खास दिखाव्याची किंवा थीमची रोषणाई केली जात नाही. हे मंडळ
केवळ धार्मिक परंपरेनुसार नियमित पूजा करते.गेली कित्येक वर्षे हे मंडळ आपली परंपरा
कायम राखून आहे. जीएसबी गणपतीची मूर्ती ही पर्यावरणपूरक असून ही मूर्ती चिकणमाती, गवत
आणि नैसर्गिकरित्या पाण्याच्या रंगानी बनवण्यात येते.मात्र मूर्तीला शुद्ध सोन्याची
आभूषणे घातली जातात. गणपतीचे अनेक अवयवही सोने-चांदीच्या दागिन्यांनी बनवलेले आहेत.
त्यामुळे कोट्यवधी रुपयांच्या दागिन्यांनी मढवलेला हा गणपती असतो. गणेशोत्सवाच्या या
पाच दिवसात विविध होम, पूजा अर्चना चालते. जीएसबी गणेश मंडळाची मुर्ती ही दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा पहिल्याच दिवशी सोनं,
चांदी अर्पण करण्यात येते. त्यामुळे कोट्यवधी रुपयांच्या दागिन्यांनी मढवलेला हा गणपती
असतो.
महागणपतीची मूर्ती ६९ किलोहून अधिक सोन्याचे दागिने आणि ३३६ किलो चांदी व इतर मौल्यवान साहित्याने सजवण्यात
आली आहे. त्यामुळेच दागिने आणि गणेशभक्तांच्या सुरक्षेसाठी मंडळाने ४७४.६४ कोटी रुपयांचा
विमा करून घेतला आहे. या विम्याच्या रकमेत सोने, चांदी आणि इतर दागिन्यांचा समावेश
आहे. याशिवाय मंडळात दर्शनासाठी येणारे भाविक, स्वयंसेवक, पुजारी, स्वयंपाकी, स्टॉल
कर्मचारी, सुरक्षा रक्षक आदींचाविमा समाविष्ट आहे. ६७. ०३ कोटी सोने, चांदी व इतर अलंकार,३७५ कोटी रुपये- स्वयंसेवक, स्वयंपाकी, पुजारी, पादत्राणे स्टॉल वरील कामगार, सुरक्षा रक्षक अपघात, शिवाय ३० कोटी रुपये मंडप, स्टेडियम, भाविक असे सार्वजनिक दायित्व विम्यासाठी आहेत. गणेशभक्तांनी अर्पण केलेल्या दागिन्यांनी
गणेशमूर्ती सजवली जाते आणि पाच दिवस अखंडपणे येथे धार्मिक विधी केले जातात. त्यामुळे
गणेशभक्त मोठ्या संख्येने येतात. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून गणेश मंडळे दरवर्षी दागिने
आणि सेवेत गुंतलेल्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी विमा उतरवतात असे जी आर भट यांनी सांगितले
वाराणसी येथील धर्मपीठ
श्री काशी मठ संस्थानशी जी. एस. बी. सेवा मंडळाची
निष्ठा आहे आणि प्रत्येक मुंबईकराच्या हृदयाच्या अगदी जवळ आहे. गणेश चतुर्थीच्या
भव्य उत्सवामुळे मंडळाला जागतिक स्तरावर प्रशंसा प्राप्त झाली आहे. सामाजिक कार्ये
आणि धर्मादाय उपक्रमांमधील वाढ हे धर्मगुरू, परमपूज्य श्रीमद् सुधींद्र तीर्थ स्वामीजी
आणि आपले सध्याचे मठाधीपती श्रीमद् संयमींद्र तीर्थ स्वामीजी यांच्या आशीर्वाद आणि
अविरत मार्गदर्शनामुळे होत असते.
सामाजिक आणि धर्मादाय
कार्यात आघाडीवर असलेल्या या संस्थेची स्थापना
१९५१ मध्ये एक ना नफा ना तोटा या तत्वावर झाली. आणि बॉम्बे पब्लिक ट्रस्ट कायदा, १९५०
अंतर्गत नोंदणीकृत झाली. जी. एस. बी. सेवा मंडळ सातत्याने गरजू आणि वंचितांपर्यंत पोहोचण्यासाठी
सतत प्रयत्नशील असते. गेल्या काही वर्षांपासून
सर्व उपक्रमांसाठी सर्व कार्यकर्त्यांसाठी
मार्गदर्शक तत्वज्ञान 'सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे संतु निरामयः' आहे. संस्थेच्या
वतीने मीरा - भाईंदर येथे १०० खाटांचे बहु-उद्देशीय धर्मादाय रुग्णालय बांधण्याचा प्रयत्न
करतो आहे. सर्वांना परवडणाऱ्या किमतीत जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा प्रदान करणे
हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. हा प्रकल्प एका प्रामाणिक मिशन स्वरूपात हाती घेतला गेला आहे आणि अपेक्षित वेळेपूर्वी तो
पूर्ण करण्यासाठी पदाधिकारी कठोर परिश्रम करत आहोत. बांधकामाला जोमाने सुरुवात झाली
आहे त्यामुळे सर्व भाविकांनी पुढे येऊन या प्रकल्पासाठी उदार हस्ते देणगी देण्याचे
आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे. तसेच मुंबई आणि ठाण्याच्या मध्यभागी असलेल्या
विविध रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांसाठी "संतुष्ट अन्न दान सेवा"
दररोज राबविण्यात येते. यापूर्वी गरिबांसाठी मुंबई, ठाणे आणि डोंबिवलीमध्ये मोफत लसीकरण
शिबिरे, कोकणातील पुराच्या वेळी, खेड, चिपळूण
तसेच केरळमधील पूरग्रस्त भागात पाणी, अन्न, कपडे इत्यादी पुरवण्यासाठी पुढाकार घेतला. शिक्षण आणि वैद्यकीय मदत, सामूहिक उपनयन, ज्ञान
शिबिर, तरुणांना करिअर मार्गदर्शन आणि इतर अनेक सामाजिक उपक्रम देखील राबविण्यात येतात.
अनेक दृष्टिहीन व्यक्तींसोबत जवळून काम करत आहोत आणि त्यांना सन्माननीय जीवन जगण्यास
मदत करण्यासाठी मदत केली जाते. आमच्या धर्मगुरूंच्या आशीर्वादाशिवाय आणि तुमच्या उदार
योगदानाशिवाय हे सर्व शक्य झाले नसते अशी गौड सारस्वत ब्राम्हण समाजातील सर्वच व्यक्तींची
भावना आहे.
या गणपती बाप्पाचे दिवस-रात्र
राबणारे कार्यकर्ते हे उद्योजक आणि पदवीधर असतात त्याचप्रमाणे निरक्षर लोकही निरपेक्ष
भावनेने सर्व कार्यात मनोभावे समरस होत असतात. स्त्री-पुरुष, लहान-थोर, गरीब श्रीमंत,
ज्ञानी-अज्ञानी, भारतातीलच नव्हे, तर परदेशातीलसुद्धा असे अनेक प्रकारचे भक्त मनोभावे
नवसाला पावणाऱ्या या बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात. श्रीगणेशाची पूजा आणि साधनेच्या
पलीकडे जाऊन प्रत्येक भक्ताशी आपुलकीचे नाते जोडणारा जी. एस. बी. सेवा मंडळाचा हा श्रीगणराया
बुद्धी आणि शौर्याचे प्रतीक आहे.
या मंडळाचे मुख्य संयोजक
डॉ भुजंग पै आहेत तर सहसंयोजक म्हणून श्री. जि दामोदर राव, गणेश प्रभू, डॉ दीपक शेणॉय,
डॉ अजित कामत, ऍड रामचंद्र किणी, श्रीमती विजया
कामत, श्रीनिवास कामत हे आहेत तर मंडळाचे विद्यमान अध्यक्ष श्री अमित पै, सेक्रेटरी विष्णू कामत, उपाध्यक्ष
कृष्णा कामत, सहसेक्रेटरी शिवानंद भट, खजिनदार विठ्ठलदास भट आहेत.
- रवींद्र मालुसरे
अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र
लेखक संघ मुंबई
९३२३११७७०४
0 टिप्पण्या