गुरुवार, १२ सप्टेंबर, २०२४

नरवीर तान्हाजी-सूर्याजी मालुसरेंच्या साखर गावात ऐत्याहासिक कार्याची मुहूर्तमेढ

 




नरवीर तान्हाजी-सूर्याजी मालुसरेंच्या साखर गावात ऐत्याहासिक कार्याची मुहूर्तमेढ


निवृत्त सैनिक नायक पंढरीनाथ मालुसरे  यांची  भव्य मिरवणूक आणि सत्कार

 इतर पोस्ट वाचण्यासाठी समोरची 👉अनुक्रमाणिक clik करा 


सुभेदार नरवीर सूर्याजी मालुसरे यांच्या साखर गांवातील देशसेवेतून निवृत्त झालेले सैनिक नायक पंढरीनाथ मालुसरे यांची ग्रामस्थांकडून पितळवाडी फाट्यापासून गावापर्यंत ग्रामस्थांनी त्यांची विविध फुलांच्या हारांनी सजविलेल्या ओपन जीपमधून सपत्नीक ढोल ताश्यांच्या आवाजात आणि फटाक्यांची आतषबाजी करून भव्य मिरवणूक काढून शेकडो समाजबांधवांच्या साक्षीने सत्कार करण्यात आला. या सत्काराच्या निमित्ताने सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर जवानाचे स्वागत करण्याचा हा प्रयत्न पोलादपूर तालुक्यात आणि नरवीर तान्हाजी - सूर्याजी यांचा वारसा सांगणाऱ्यांकडून  एक नवीन पायंडा पडला असून, या कृतीचे स्वागत करताना इतर ग्रामस्थांनी सुद्धा हा आदर्श घ्यावा अशा महाड -पोलादपूर तालुक्यातील जनतेमध्ये सकारात्मक प्रतिक्रिया उमटल्या आहेत.  बेळगाव येथे भारतीय सैन्यदलात 6 मराठा लाईट इन्फ्रन्ट्रीमध्ये देशसेवा बजावून  22 वर्षांनंतर सेवानिवृत्त होऊन नायक पंढरीनाथ मालुसरे हे सहकुटूंब आपल्या जन्मभूमीत परतले आहेत. ज्या जवानांच्या हाती आपलं आयुष्य सोपवून आपण देशात निर्धास्त राहत असतो ते आपली कर्तव्यपूर्ती केल्यानंतर जेव्हा परततात तेव्हा महाराष्ट्रात तरी गावागावातील मराठी माणसाने एकत्र येऊन त्यांचे स्वागत करायला हवे असा प्रघात झाला देशभावना अधिक बळकट निर्माण होण्यासाठी मदत होईल.

पितळवाडी येथे रिक्षा चालक - मालक संघटनेच्यावतीने पंढरीनाथ यांचे भव्य स्वागत करून सत्कार केला. ह भ प लक्ष्मणमहाराज खेडेकर यांनी याप्रसंगी आपले विचार मांडले. पंढरीनाथचे आई वडील आज हयात नाहीत मात्र त्यांनी हे स्वप्न पाहिले होते. पाण्यातला मासा झोपतो कसा असा सवाल करीत आईवडील पाठिशी नसताना लेकराची झेप गरुडासारखी झाली पाहिजे, पंढरीनाथाच्या कर्तृत्वाची गणना यात केली पाहिजे.



यावेळी जनतादल सेक्युलरचे रायगड जिल्हाध्यक्ष भगवान साळवी, सचिन खेडेकर, बोरज ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंच शिवाजी ज्ञानोबा मालुसरे, श्याम वरणकर, ज्ञानोबा कुंभार, स्वप्नील कुंभार, संदीप वरणकर, पंढरीनाथ जाधव, तुकाराम गायकवाड, विलास जाधव लक्ष्मण केसरकर, मिलींद मालुसरे, राजू गायकवाड, विनायक केसरकर, दिपक पार्टे, संजय चोरगे, संतोष खेडेकर, भाऊ तुडीलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या मिरवणुकीत महाडच्या माजी नगराध्यक्ष आणि उबाठा पक्षाच्या महाड - पोलादपूरच्या नेत्या स्नेहल माणिकराव जगताप-कामत यांनी सेवानिवृत्त सैनिक पंढरीनाथ मालुसरे यांना शुभेच्छा दिल्या. मिरवणुक साखरच्या आई नवलाई ग्रामदैवतेच्या मंदिराजवळ आल्यानंतर सेवानिवृत जवान मालुसरे यांनी सहकुटुंब देवीचे मनोभावे दर्शन घेतले. यानंतर आई नवलाई ग्रामविकास मंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात गावातील ज्ञानोबा मालुसरे, भरत चोरगे, महादेव चोरगे, नारायण चोरगे गुरुजी, गोविंद चोरगे, सहदेव सुतार, गोविंद सुतार या मान्यवरांच्या हस्ते पंढरीनाथ मालुसरे यांचा ग्रामस्थ्यांच्या वतीने सत्कार सोहळा करण्यात आला.

शिवसेना तालुका प्रमुख अनिल मालुसरे यांनी सुरुवातीला कार्यक्रमाची प्रस्तावना करताना  शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्यासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या सुभेदार नरवीर तान्हाजी मालुसरे आणि सुर्याजी मालुसरे यांच्या कुळाचा लढाऊ वारसा सांगणाऱ्या देशसेवेतून निवृत्त सैनिक पंढरीनाथ मालुसरे यांच्या सैनिकी सेवेचा आढावा घेतला. बेळगाव, जम्मू काश्मीर(सांभा), नॉर्थ सिक्कीम, नॉर्थ ईस्ट सिक्कीम, पुणे, जम्मू काश्मीर(आखनूर ), पश्चिम बंगाल, न्यू दिल्ली, मध्य प्रदेश, साऊथ सुदान देश, खंजळवान गुरेझ सेक्शन, पठाणकोट या ठिकाणी त्यांनी आपली ड्युटी बजावली. विशेषत: जम्मू काश्मीरमध्ये सांभा येथे (2004), नॉर्थ सिक्कीम बंकर येथे (2006), नॉर्थ ईस्ट सिक्कीम लांचूग येथे (2007), जम्मू काश्मीर आखनूर येथे (2012), युनायटेड नेशन-दक्षिण आफ्रिका येथे साऊथ सुदान (2017),जम्मू काश्मीर खंजळवान गुरेझ सेक्शन येथे (2019) या ठिकाणी झालेल्या सैन्यदलाच्या महत्वाच्या ऑपरेशन मध्ये त्यांना कामगिरी बजावता आली. आमच्या साखर गावाला मोठी देशसेवेची तसेच समाजसेवेची परंपरा असून यापूर्वी पहिल्या जागतिक महायुद्धात परदेशात शहीद झालेले सुभेदार भाऊराव मालुसरे, स्वातंत्र्यसेनानी अंबाजीराव मालुसरे, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सखाराम चोरगे, बिठोबा अण्णा मालुसरे, रामचंद्र खोत, गेणबा खोत, मारुती सुतार, घावरे, महादेव चोरगे यांचे योगदान फार मोठे आहे.

या कार्यक्रमात देशसेवेतून निवृत्त झालेले सैनिक माजी सैनिक नायब सुभेदार सुनील चोरगे, प्रदीप मालुसरे, पांडुरंग तांदळेकर, उमरठचे गणपत कळंबे, रामदास कळंबे यांना व्यासपीठावर सन्मानाने बसविण्यात आले होते.  नायक पंढरीनाथ मालुसरे यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणारे सुभेदार मनोहर धनवट यांचादेखीत यावेळी सत्कार करण्यात आला. 

रानवडीचे माजी सरपंच निवृत्ती उतेकर, चंद्रकांतदादा मोरे, तुकाराम मोरे गुरुजी,   विष्णू सणस, मुंबई पोलीस शिवप्रसन्न पवार तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे कोकण कार्याध्यक्ष शैलेश पालकर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. साखर गावचे माजी सरपंच भरत चोरगे, ह.भ.प. चंद्रकांत घाडगे यांनी नायक पंढरीनाथ यांच्यावर गौरवपर भाषण केली. सत्काराला उत्तर देताना नायक पंढरीनाथ मालुसरे यांनी भारतीय सैन्यदलामध्ये भरती झाल्यानंतर मातृछत्र गमावले पण ग्रामदैवतांनी माझी काळजी घेऊन 22 वर्षांच्या सेवेनंतर सुखरूप गावामध्ये आलो. त्याबद्दल आई नवळूबयेचे ऋण व्यक्त केले. 

दृष्टय लावणारा हा कार्यक्रम नेटकेपणाने यशस्वी करण्यासाठी साखर गावातील सर्व वाड्यातील तरुणांनी विशेष मेहनत घेतली. उपस्थित सर्व नागरिकांचे आभार मिलिंद महादेव मालुसरे यांनी मानले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत सत्याची कास धरून पत्रकारिता करावी.

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत  सत्याची कास धरून पत्रकारिता करावी. सतरावे शतक प्रबोधनाचे ,  अठरावे शतक वैचारिकतेचे ,  एकोणीसावे शतक प्रगतीचे...