सोमवार, १५ जुलै, २०२४

लोकदेव श्रीविठ्ठल, वारकरी संप्रदाय आणि संतांची भूमिका

 


लोकदेव श्रीविठ्ठल, वारकरी संप्रदाय आणि संतांची भूमिका

श्रीविठ्ठलाला विष्णु-कृष्ण-रूपाचा, वैष्णव चरित्राचा आणि तदनुकूल पावित्र्यसंभाराचा लाभ झाला, तो महाराष्ट्र-कर्नाटकाच्या सीमेवरील श्रीक्षेत्र पंढरपूर नामक क्षेत्रात हे आपल्याला माहीत आहे. पंढरपूर क्षेत्रात विठ्ठलाचे वैष्णवीकरण इ. स. च्या तेराव्या शतकापूर्वीच पूर्णता पावले होते असे पंढरपूरमध्ये उपलब्ध झालेल्या प्राचीन कोरीव लेखांवरून, तेराव्या शतकातील मराठी संतांच्या वाङ्मयातील उल्लेखां वरून आणि निःसंदिग्ध प्रमाणांनी हेमाद्रिपूर्वकालीन ठरलेल्या स्कांद 'पांडुरंगमाहात्म्या 'वरून दिसून येते.

ज्ञानेश्वरकालीन सामाजिक परिस्थितिचे वर्णन करताना हा काळ धर्मग्लानीचा होता. "क्षीणः कालय- शात्पुनस्तरुणतां धर्मोऽपि सम्प्रापितः' असे त्या काळाचें वर्णन जरी हेमाद्री पंडितांच्या राजप्रशस्तीत केलेलें असले, तरी तें वस्तुस्थितीला धरून नाहीं. त्या काळात वैदिक परंपरा निष्प्रभ झाली होती, बदलत्या परिस्थितीप्रमाणें समाजाला नवी प्रेरणा देण्याचे सामर्थ्य या धर्मसंस्थेत उरला नव्हता, म्हणूनच अवच्या पंचवीस वर्षांत दक्षिणेंतील बहुतेक हिंदु-राज्यें परधर्मीय आक्रमकांना खालसा करतां आलीं. यज्ञयाग, व्रतवैकल्यें, जपजाप्य येवढ्यांपुरतेंच धर्मभावनेचे क्षेत्र आकुंचित बनलें होतें. कर्मठपणाचें अवास्तव बंड माजल्यामुळे नैतिक मूल्यांची चाड राहिली नव्हती. उच्चवर्णीयांत सुखासीनतेची चर्चा व भोगविलासाची प्रवृत्ति वाढली होती. ब्राह्मण व क्षत्रिय कर्तव्यपराङ्‌मुख झाले होते. याद‌वांच्या राजवटीत  वैदिक विद्येला भरपूर आश्रय होता; परंतु ठराविक चाकोरीतून जुन्या ग्रंथांचें चर्वितचर्वण करण्यापलीकडे वा पंडितांच्या हातून कोही विशेष कामगिरी झाली नाहीं. विज्ञानेश्वरापासून हेमाद्रीपर्यंतच्या काळांत वैदिक परंपरेंत धर्मसुधारणेच्या जिवंत प्रेरणेपेक्षां पुनरुज्जीवनाची निस्तेज प्रवृत्तीच दिसून येते. जगद्गुरू  संत तुकाराम महाराजांच्या  शब्दांत सांगावयाचे म्हणजे "अर्थ लोपलीं पुराणे। नाश केला शब्दज्ञानें। विषयलोभी मनें। साधनें बुडविलीं ॥" अश्या तर्हेची  सनातन धर्माची अवस्था त्या काळात  झाली होती. त्यामुळे देशभाषांच्या आश्रयानें सर्वसामान्य लोकांत मिसळणाच्या जैन, लिंगायत, नाथ इत्यादि पंथांचा झपाटयानें प्रसार होऊं लागला होता. परंतु या पंथांतहि एकोपा असल्याचे दिसून येत नाहीं. जैन व लिंगायत या दोघांच्यात तर अव्याहत झगडा चालू होता. त्या काळातील झगड्याच्या काही हकीकती वाचल्या म्हणजे या पंथांतील वैमनस्य किती विकोपाला गेले होते याची बरोबर कल्पना येते. इतर बहुसंख्य समाज हा तर बोलून चालून मूढ व अज्ञानी होता; पशुतुल्य जीवन कंठण्यापलीकडे त्याला दुसरी गति नव्हती. त्याच्या ठिकाणी जी थोडीबहुत धर्मश्रद्धा होती तिला कधीं उच्च विचारांची बैठक लाभलीच नाहीं. म्हणून अशांची भीतीनें किंवा स्वार्थबुद्धीने मंगळाई, जाखाई, म्हसोया, बहिरोबा इत्यादि देवतांची भक्ती करण्यापलीकडे त्यांची मजल गेली नाहीं.

वारकरी पंथानें आत्यंतिक निवृत्तीचा- मायावादाचा उपदेश करून देश दुबळा केला, नाम- संकीर्तनामुळे टाळकुटेपणान्ची साथ फैलावून समाज रसातळाला नेला असा आक्षेप नेहमींच घेतला जातो; परंतु सर्वसाधारण लोकांचे ग्रह बहुधा अगदी ढोबळ मानानें व कित्येकदां तर केवळ काकतालीय न्यायानेंहि बनलेले असतात ! गतानुगतिकत्यामुळे ते वारंवार पडताळून पाहण्याची तसदी सहसा कोणी घेतच नाहीं; त्यामुळे एकदां रूढ झालेले ग्रह उत्तरोत्तर ठाम होत जातात. प्रवृत्तिनिवृत्तींचा निर्णय इतक्या स्थूल दृष्टीनें करुन चालणार नाहीं. संत ज्ञानेश्वर एकनाथांच्या तत्वविवेचनपर ग्रंथांच्या व अभंगाचा तुलनात्मक परामर्श घेऊनच वारकरी पंथाची भूमिका निश्चित केली पाहिजे.

देखे प्राप्तार्थ जाहले। जे निष्कामता पायले । तयांही कर्तव्य असे उरहें। लोकांलागीं ॥

मार्गाधारें वर्तायें। विश्व हैं मोहरे लावावें। अलौकिक नोहावें। लोकांप्रति ।।

या ओव्यांतील आशय तर अगदी स्वष्ट आहे." नलगे सायास, जावें बनांतरा। सुखें येतो घरा नारायण !" अशी वारकरी संतांची श्र‌द्धा होती. "सुखें संसार करावा ! " पण माझा विठ्ठल आठवावा येवढेच त्यांचे सांगणें होतें. सिद्धपुरुषाने अलौकिकत्व  निरखूं नये, अगदीं सामान्य माणसाप्रमाणें वागावें, यावर त्यांचा विशेष कटाक्ष होता. ज्ञानेश्वरीत जागोजाग ज्ञानी पुरुषांची, आदर्श भक्तांची व स्थितप्रशांची वर्णन आहेत तीं जगा वेगळी वा लोकविलक्षण नाहींत, तर व्यावहारिक कर्तव्यनिष्ठेला व सामाजिक नीतिमत्तेला पोषकच आहेत.

संत ज्ञानेश्वरादी सर्व संतांची दृष्टी हीच होती. 'मराठीचिये नगरी' त्यांना 'ब्रह्म- विद्येचा सुकाळ' करावयाचा होता. शूद्रातिशूद्रांच्या मृतकल्प जीवनांत त्यांनी नवचैतन्य ओतलें, त्यांच्या मूक भावनांना वाचा फोडली. तेव्हां मराठी भाषिकांच्या महाराष्ट्र-संस्कृतीचाच पाया घातला हैं उघड आहे. आपण लोकांना नवा अनुभव, नव्या भावना, नवें जीवन देत आहों, त्यांच्यासाठीं नवसंस्कृति निर्माण करीत आहोंत, असा अहंकार, अभिनिवेश, आत्मविश्वास त्यांच्या कडून यांत जागोजाग आढळतो. चक्रधर व ज्ञानेश्वर यांची भूमिका जरी एक असली, तरी त्यांच्या व्यक्तित्वात त्यांत व कर्तृत्वांत पुष्कळच तफावत आहे. ज्ञानेश्वरांनी मराठी साहित्याची अविच्छिन्न परंपरा निर्माण केली व महाराष्ट्रांतील लोकजीवनाला सांस्कृतिक अधिष्ठान मिळवून दिले.

अशाच प्रकारें एकनाथ व तुकाराम यांनीही  प्रवृत्ति व निवृत्ति यांचा मेळ घातला आहे. "अवताराचे सामर्थ्य पूर्ण। प्रपंच-परमार्थी सावधान ॥" असें सांगून संत एकनाथांनी संत रामदासांच्या अगोदरच प्रपंच व परमार्थ यांचा समन्वय साधला आहे. केवळ एकाद‌ दुसऱ्या बंधनाच्या आधारावर मी हे  विधान करीत नाहीं. एकनाथी भागवतांत व भावार्थरामायणांत याच अर्थाची किती तरी वचने इतस्ततः आढळतात  वारकरी पंथानें समाजाला नेभळट बनविलें हा आरोप तर हास्यास्पद आहे! "अर्जुना देऊनि समाधी । सर्वेच्चि घातला महायुद्धा ॥" या उक्तींतील अभिप्राय क्रियाशीलतेचा द्योतक आहे, निष्क्रियतेचा निदर्शक नाहीं. एकनाथ महाराज शांत व क्षमाशील होते, पण तुकाराम महाराज तर न्याय निष्ठुर व आक्रमक होते ! दांभिकतेवर कठोरपणे कोरडे ओढून त्यांनी आपल्या अभंगांत सर्वत्र भक्ति आणि भूतदया, परमार्थ आणि परोपकार यांचा संगम घडवून आणला आहे. वारकरी पंथांत देवांपेक्षांहि संतांचे महत्त्व जास्त आहे:

करितां देवार्चन । घरा आले संतजन ॥ देव सारावे परते । संत सारावे आरते ॥ संत स्वतःच्या आचरणानें जगाला धडा घालून देतात :

अर्भकाचे साठीं । पंतें हाती धरिली पाटी  ॥ तैसें संत जगीं । क्रिया करूनि दाविती अंगी ॥ संत चोखा मेळा, संत गोरा कुंभार, संत सांवता माळी हे सर्व संत गृहस्थाश्रमी व कुटुंबवत्सल होते. ते आप आपले व्यवसाय निश्चयाने करीत होते. लोकांपासून ते दूर राहिले नाहीत; म्हणून त्यांच्याबद्दल लोकांना ते आपल्यांतलेच आहेत असा विश्वास वाटत होता. "नाहीं संतपण मिळत हैं हाटीं। हिंडतां कपाठीं रानीं वनीं ।" याबद्दल त्यांना शंका नव्हती; म्हणून संन्यासधर्माचें बंड त्यांनी माजविलें नाहीं कीं जैन, लिंगायत व महानुभाव या पंथांतल्याप्रमाणें यती, जंगम किंया महंत यांसारखा वेगळा संतांचा वर्गहि काढला नाहीं. मात्र "खटनट यावें, शुद्ध होउनि जायें। दवंडी पिटी भावें, चोखा मेळा ॥" ही चोखा मेळ्याची दवंडी देशांतील अठरापगड जातीना आध्यात्मिक क्षेत्रांत सारखाच दर्जा मिळवून देणारी असल्यामुळे हजारों लोकांना वारकरी पंथाची कांस धरली व खडतर संन्यासामुळे महानुभाव पंथाला मात्र शेवटी फक्त मूठभर पंडितांचाच पाठिंबा मिळाला !

वारकरी पंथ हा सर्वसंग्राहक आहे. त्यानें संकुचित सांप्रदायिकता बाळगली नाहीं, प्रतीकाचा दुराग्रह धरला नाहीं, दैवतावर रणें माजविली नाहींत. परमेश्वर सर्वव्यापी आहे व तो विविध रूपांनी नटलेला आहे; "तुका म्हणे हरि। अवघा एकला ॥ परी हा धाकुला। भक्तीसाठीं ।।" म्हणून उपासकांची भावनाच मुख्य आहे, प्रतिमा गौण आहे, याची जाणीव त्यांना होती. त्यामुळे राम, कृष्ण, दत्त, शिव इत्यादि दैवतांच्या भक्तांना त्यांनी आपल्यांत सामावून घेतले. वारकरी संतांनी तर नेहमींच विष्णु व शिव यांच्या ऐक्यावर भर दिला आहे. "शिव मस्तकी धरिला। भेद मक्तांचा काढिला ॥" वारकरी पंथांत विठ्ठलभक्तीचा महिमा विशेष आहे. पंढरीच्या या विठ्ठलानें महाराष्ट्रांतील साधुसंतांना चारशें वर्षे ग्रंथलेखन व कवित्व लिहिण्याची  स्कूर्ति दिली आहे. लक्षावधी शूद्राशूद्राना या दयामय दैवतानें आत्मोद्वाराची प्रेरणा दिली आहे, बंधुभावाचे  पाठ दिले आहेत. संत रामदासांच्या मते कोदंडधारी रामाशी तुलना केली, मात्र संतांच्या मताप्रमाणे 'विठोबा हा वारकऱ्यांच्या दृष्टीने राम, कृष्ण व विठ्ठल हे तिथेहि एकाच परमेश्वराचे अवतार आहेत. मात्र त्यांच्यें अवतारकार्य हे प्रभू रामाप्रमाणे राक्षसांच्या संहारासाठी कोदंड हाती घेऊन  निघाले नाहीत तर पतितांना पावन करण्यासाठीं, जडमूडांचा उध्दार करण्यासाठीं दलितांना आश्वासन देण्यासाठीं अहर्निश उभा राहणाऱ्या पांडुरंगाला शस्त्रास्त्रांची काय गरज . लोकदेव विठोबा हा गुलामांचा देव नाही तर गरिबांचा देव आहे. द्वारकेच्या राण्याचे ऐश्वर्य त्यानें सोडून दिलें आहे "देव भावाचा लंपट । सांडून आलासे वैकुंठ ॥" त्याचें कार्य विध्वंसक नाहीं, तर विधायक आहे. वात्सल्य, दयाशीलता, सहिष्णुता, क्षमाशीलता इत्यादि गुणांनीं तो संपन्न आहे. विठाई ही खरी अनाथांची माउली आहे. म्हणूनच तिच्याशी प्रेमानें सलगी करतांना भक्तांना कधीं संकोच किंवा भीति वाटत नाहीं. ते लडिवाळपणानें तिच्यापुढे हट्ट करतात, तिच्यावर रुसतात, रागावतात आणि पुनः भक्तीभावानें तिच्या पायांवर लोटांगण घालतात !

वारकरीपंथीय संतांनी आपल्या धर्मप्रचारासाठी एक नवें व्यासपीठ निर्माण केलें. त्यांची निरुपणें व कीर्तने यांचा थाट अगदी वेगळा आहे. पंडितांच्या पुस्तकी प्रवचनांशी किंवा हरदासांच्या दरबारी कीर्तनांशी त्यांचे यत्किंचितही साम्य नाहीं. लोकांत आत्मीयता व आत्मविश्वास उत्पन्न होण्यासाठी लोकांतीलच पुढारी आघाडीवर यावे लागतात. वारकरी पंथानें लोकांतून धर्मप्रवक्ते तयार केले, संत नामदेव हे  त्यांच्या कीर्तन संप्रदायाचे आद्य प्रवर्तक होय. "सुंबाचा करदोडा । रकट्याची लंगोटी। नामा वाळवंटी । कथा करी ॥" हे दृश्य शुद्रातिशूद्रांना खरोखरच किती स्फूर्तिदायक वाटलें असेल ? आपल्या धर्मजीवनांत ही घटना निःसंशय अभूतपूर्व अशीच होती. अध्यात्मविद्या ही आतां केवळ दशग्रंथी ब्राह्मणांची मिरास राहिली नाहीं. संत-कीर्तनकार हे महानुभावीय आचार्याप्रमाणें कोणत्याहि एका विशिष्ट वर्गाचे नव्हते. "आम्हां 'कीर्तन' कुळ धाडी" अश्या भावनेनें ते आपला जन्मसिद्ध हक्क गाजवू लागले. संत ज्ञानेश्वरांच्या भावार्थ दीपिकेनें या लोकांना कवित्वाची प्रेरणा, तशीच कीर्तनाची स्फूर्ति दिली. संत जनाबाईसारखी मामुली मोलकरीण अध्यात्माचे सिद्धान्त अभंगांत गाऊं लागली. "वेदांचा तो अर्थ आम्हांसीच ठावा। येरांनी वाहावा भार माथां !" असें आव्हानपूर्वक म्हणण्याइतका आत्मविश्वास संत तुकारामांसारख्या कुणब्यांच्या ठिकाणी उत्पन्न झाला. संत ज्ञानेश्वरांच्या मोठेपणाचें खरें रहस्य या लोकोत्तर स्फूर्तिदायकतेत  सांठविलेलें आहे.

या ठिकाणी आणखी एका आक्षेपाचें निरसन करणें जरूर आहे. 'वारकरी पंथ हा अडाणी लोकांचा पंथ आहे, त्याचा शहाणपणाशी कांही संबंध नाहीं. भोळीभाबडी भक्ति हाच त्या पंथाचा आधार असल्यामुळे हजारों लोक त्यांत सामील झाले, असा पुष्कळांचा समज आहे; पण त्यांत तिळमात्र तथ्य नाहीं. या पंथानें विद्वत्तेचें अवडंबर माजविलें नाहीं हैं खरें; परंतु त्यानें अंधभक्तीलाहि कोठेंच थारा दिलेला नाहीं. 'ज्ञानादेव तु कैवल्यम्' हैं वेदान्ताचें मुख्य सूत्र त्यानें कधींहि सोडलें नाहीं. नामसंकीर्तनासारख्या सहजसुलभ साधनाचा त्यानें उदोउदो केला; पण साधनाच्या दृष्टीनें ही केवळ पहिली पायरी आहे हें त्यानें वारंवार व निक्षून सांगितलें आहे. भक्ती ही सुळावरील पोळी आहे. भक्त होण्यासाठीं 'विष खावें ग्रासोग्रासीं' अशी खडतर साधना करावी लागते ! तें 'येरा गबाळां'चें काम नाहीं. "तुका म्हणे मिळे जिवाचीयेसाठीं। नाहीं तरी गोष्टी बोलों नये ॥" असा संत तुकारामानी रोखठोक इशारा दिला आहे. या पंथांत भाक्तभावाचा जो गौरव आहे, नामसंकीर्तनाचा जो अट्टहास आहे तो कर्मठपणाची नांगी ठेचण्यासाठी आहे; शिवाय, आत्मशुद्धीवर व सदाचरणावरहि या पंथानें खूप भर दिला आहे. त्यांत "विवेकासहित वैराग्याचे बळ " मिळविण्याची शिकवण आहे. त्याचें अभंगवाङ्मय व त्याचा कीर्तनसंप्रदाय म्हणजे धर्मशिक्षणाची एक प्रचंड मोहीमच होती असे म्हणावयास हरकत नाहीं. संत ज्ञानेश्वर हे तर ज्ञानियांचे राजेच होते. परंतु " नाचू कीर्तनाचे रंगीं। ज्ञानदीप लावृं जगीं " अशी नामदेवांचीहि प्रतिज्ञा होती. लोकांत श्रद्धा होतीच, तिला संतांनी डोळसपणा आणला.

नामदेवांचें 'मडकें' कच्चे असल्याची गोरोबा- काकांची परीक्षा, आणी विसोबा खेचरांचा अनुग्रह झाल्यानंतर 'डोळियांचा डोळा उघडिला जेणें, ' हा नामदेवांचा उदगार यांवरून वारकरी संप्रदायांत ज्ञानाला किती महत्त्व आहे हें स्पष्ट दिसतें. संतवाङ्मयांत हा आत्मप्रचीतीचा जिव्हाळा उत्कटतेनें आढळतो. "सांडिली त्रिपुटी। दीप उळजला घटी ॥ " हा अनुभव अज्ञानमूलक आहे काय ? तसे पाहिलें तर अद्वैतमताची कांस धरणाऱ्या पंथाला तरी ज्ञानाशिवाय दुसरी गतीच नाहीं. शब्दज्ञानाच्या क्षेत्रांतही  एकनाथ महापंडित होते. "जयाची बदे पूर्ण वेदांत वाणी" असा तुकोबांचा अधिकार वामनानें वर्णिलाच आहे. यानंतर शास्त्रप्रामाण्याचा विचार केला पाहिजे. चक्रधरानी वेदप्रामाण्य मानलें नाहीं म्हणून ते  क्रांतिकारक आहे ही विचारसरणी चूक असल्याचें मी आरंभीच सांगितलें आहे, संत ज्ञानेश्वरांनी वैदिक परंपरेला श्रुतिस्मृतिपुराणोक्त धर्माला प्रमाण मानले होतें. श्रुतीला तर ते साक्षात् 'माउली' म्हणतात ! बहुजनसमाजाच्या आत्मिक उन्नतीसाठीं त्यांनी वारकरी पंथाला नवें वळण लावलें. संत ज्ञानेश्वर हे वास्तववादी धर्मसुधारक होते. बौद्ध, जैन व लिंगायत या पंथांच्या सामाजिक अपयशाचे दृश्य त्यांच्यापुढें होतें. या पंथांनी वेदप्रामाण्य झुगारून देऊन चातुर्वण्यावर घाला घातला, पण त्यामुळे जातिव्यवस्था कोलमडली नाहीं, की वर्णाश्रमधर्माची समाजावरील पकड सुटली नाहीं. उलट, या पंथांचे अनुयायीच सामाजिक व्यवहारांत जातिभेद व रूढ आचार कांटेकोरपणानें पाळू लागले. त्यामुळे आचार-विचारांत विसंगति पत्करण्याचा अनवस्था-प्रसंग या पंथांवर ओढवला. या इतिहासापासून जरूर तो बोध घेऊन संत ज्ञानेश्वरांनी सामाजिक व्यवहारांत ढवळाढवळ केली नाहीं, समाजक्रांतीच्या खोट्या आशा बाळगल्या नाहीत किंवा एकदम आकाशालान्च गवसणी घालण्याचा खटाटोपहि केला नाहीं. त्यांनी फक्त धार्मिक जीवनांत समता नि बंधुभाव आणण्याचा यशस्वी उपक्रम केला. त्यांच हैं मर्यादित यश ऐतिहासिक दृष्ट्या तर फारच मोठें आहे. समाज रचनेशी निगडित असलेली अर्थव्यवस्था आरपार बदलण्याजोगी परिस्थिति त्या काळीं नव्हती; नुसत्या विचार- परिवर्तनानें हैं कार्य घडण्याचा संभव नव्हता. म्हणून धर्मसुधारकांनी सामाजिक समतेसाठी त्यावेळी जे जे प्रयत्न केले, ते ते सारे सपशेल फसले ! वारकरी संतांनी फक्त धार्मिक क्षेत्रांतील भेदभाव दूर केला. देवाच्या मंदिरांत हा ब्राह्मण, हा शूद्र असा फरक नाहीं, त्याच्या पुढें सर्व भक्त सारखे, तो फक्त भावाचा भुकेला आहे. 

"विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। 'भेदाभेद' भ्रम अमंगळ ॥"





रवींद्र मालुसरे

अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई

९३२३११७७०४

 इतर पोस्ट वाचण्यासाठी समोरची 👉अनुक्रमाणिक clik करा 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत सत्याची कास धरून पत्रकारिता करावी.

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत  सत्याची कास धरून पत्रकारिता करावी. सतरावे शतक प्रबोधनाचे ,  अठरावे शतक वैचारिकतेचे ,  एकोणीसावे शतक प्रगतीचे...