प्रभू श्रीरामचंद्रांच्या १०८ रामायणांची माहिती करून घ्या
हजारो वर्षांपासून पिढ्यानपिढ्या आपण उगवतीला देव मानतो, मावळतीला हात जोडतो, सूर्याला नैवेद्य दाखवतो, चंद्राला ओवाळतो, दाही दिशांना अर्ध्य देतो, सागराची पूजा करतो, विहिरीला हळदकुंकू वाहतो, धरित्रीची पूजा बांधतो....हे सर्व करण्यामागे ज्या देवानं आकाशात अनंत तारे निर्माण केले,चंद्र-सूर्याचं दर्शन घडवले, अथांग सागर निर्माण केला, नादिनाले वाहावले, सुवासिक फुलं फुलविली, रुचकर फळं पिकवली, ऊन, वारा, पाऊस यांचा वर्षाव केला, जिवाभावाची नाती जोडायला शिकवलं, आणि अन्नासह वस्त्र, निवाऱ्याची सोय केली, देवाचा आपल्यावर, आपल्या कुळाचारावर अनंत काळ वरदहस्त असावा, देवानं आपल्यावर प्रसन्न असावं.
त्या देवाबद्दलचा नम्रभाव प्रकट करण्यासाठी आपण नित्य नियमित पूजा-अर्चाना करण्यासाठी त्याचे देवालय उभारतो, त्याची विधिवत प्राणप्रतिष्ठा करतो !
आज आपण आपल्या हिंदू धर्माची अस्मिता म्हणून प्रभू श्रीरामाच्या चरणी भक्तीभाव म्हणून "रामनवमी " साजरी करीत आहोत. राममंदिर हा आस्थेचा विषय आहे राजकारणाचा नाही, असे असताना धर्मभावना चेतवण्यासाठी अफूची गोळी देऊन देशव्यापी गुंगी आणण्याचे काम गल्लीपासून दिल्लीपर्यंत सतत होते आहे, यामागे निवडणूकीच्या मतांची बेगमी करण्याचे मनसुबे आहेतच. देशभरात ३६०० गावे राम नावावर आहेत, मात्र नव्याचे नऊ दिवस संपल्यानंतर गावागावात - वाडीवस्त्यांमध्ये असलेल्या प्रभू रामचंद्रांच्या मंदिरात झाडू मारण्यासाठी वा घंटा वाजवण्यासाठी उत्साही भक्त वर्षातून कितीवेळा जातात व आपल्या चरणांना भक्तिभावाने स्पर्श करण्यासाठी नक्की कितीजण येतात हे प्रभू श्रीरामच जाणतो !
भारतीय संस्कृतीत "राम" हे नाव फक्त एका पुरुषोत्तम अवताराचे नाही, तर धर्म, मर्यादा, आदर्श आणि भक्तीचे प्रतीक आहे. प्रभू श्रीराम हे भारतीय जनमानसाचे शाश्वत प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या नावातच एक अद्भुत शांतता, स्थैर्य आणि दिव्यता आहे. "रामरक्षा स्तोत्र” हे या दिव्य नावाच्या सामर्थ्याचे जिवंत उदाहरण आहे. श्रीरामाच्या नामस्मरणाने, त्यांच्या गुणगानाने, भक्ताच्या जीवनातील संकटे, भय, संशय आणि दुःख नष्ट होतात, ही अनुभूती शतकानुशतके भक्तांनी घेतली आहे.
रामनामाचे सामर्थ्य : रामनाम ही केवळ दोन अक्षरांची माळ नाही, ती अनंत चैतन्याची लहरी आहे. “राम” या शब्दात तीन अक्षरे - रा, आ, म – आहेत. “रा” म्हणजे रक्षण करणारा, "आ" म्हणजे आनंद देणारा आणि “म” म्हणजे मोक्षदायी. म्हणूनच रामनाम उच्चारताना भक्ताच्या हृदयात दया, करुणा, शांती आणि श्रद्धेचा महासागर उसळतो.
रामचरित्राचे तत्वज्ञान : रामरक्षेतील श्रीराम फक्त एक देवता नाहीत; ते मर्यादेचे मूर्त स्वरूप आहेत. राम म्हणजे धर्माचे आचरण, करुणेचे रूप, आणि वचनपालनाचे सर्वोच्च प्रतीक.
राम म्हणजे केवळ प्राचीन काळातील राजा नव्हेत. त्यांच्या विचारांचा, त्यागाचा, आणि न्यायप्रियतेचा आदर्श आजही तितकाच जिवंत आहे.
रामरक्षा पठण करताना आपण फक्त रामाचे स्मरण करत नाही, तर त्या आदर्शाचा अंगीकार करतो.
नक्की कोणते रामायण हे खरे रामायण म्हणून वाचावे कारण प्रत्येकाने आपापल्या परीने रामायणाचे संदर्भ आणि कथा नमूद केल्या आहेत?
आजच्या स्थितीत तरी सर्वाधिक लोकप्रिय असलेले रामायण आहे तुलसीदासांचे. आदिकाव्य रामायण फक्त वाल्मिकी चे आहे. त्याचे अनेक प्रकार आहेत तमिळ मध्ये, तेलगू मध्ये, कंबोडिया मध्ये, जावा मध्ये, थाय मध्ये… मूळ रामायण वाल्मिकी रचीत रामायण आहे. तुलसी रामायण हे जरी जास्त प्रसिद्ध असले किंवा बाजारात सहज उपलब्ध असले तरीही त्यापूर्वीचे वाल्मिकी रामायण असल्यामुळे अर्थातच तुलसीदासांनी सुद्धा वाल्मिकी रामायण वाचूनच आपले रामायण रचले असणार. आपल्या हिंदुस्थानात आजपर्यंत पुढीलप्रमाणे १०८ रामायणे उपलब्ध आहेत, ज्यांना ज्यांना श्रीप्रभू आणि सीतामैय्या जशी जशी भावली तशी तशी त्यांनी लिहिली.
वाल्मिकीरामायण
व्यासोक्तरामायण
वसिष्ठरामायण
शुक्ररामायण
नाटकरामायण
बिभीषणरामायण
ब्रम्हरामायण
अगस्तीरामायण
अध्यात्मरामायण
पद्मरामायण
भरतरामायण
धर्मरामायण
आचार्यरामायण
मुद्गलरामायण
भावार्थरामायण
कौतुहलरामायण
नावार्थरामायण
नारदरामायण
तुळसीकृतरामायण
आगमरामायण
कूर्मरामायण
स्कंदरामायण
पौलस्त्यरामायण
कलिकरामायण
अरुणरामायण
श्रीरमणीयरामायण
सन्नामगर्भरामायण
उमारामायण
गंगारामायण
प्रयागरामायण
मात्रारामायण
तीर्थरामायण
ऋषीरामायण
राजरामायण
सप्तमंत्ररामायण
दिव्यरामायण
सुखरामायण
शिवरामायण
विबुधप्रियरामायण
श्रीमन्मथमयूररामायण
पंचचामररामायण
पुष्पीताग्रारामायण
श्रीप्रियरामायण
ओवीरामायण
पूतरामायण
सत्वरामायण
काशीरामायण
जलोद्वतगतीरामायण
राममंत्ररामायण
श्री हररमणीयरामायण
श्रीमत्सुरामायण
श्रीरामायणरामायण
सद्भक्तसर्वस्वरामायण
प्रहर्षणरामायण
श्रीगुरुरामायण
सवायारामायण
स्तोत्रारामायणे दहा
पुत्ररामायण
तन्वीरामायण
आद्यार्यारामायण
दंडकरामायण
सतरामायण
बालमंत्ररामायण
नानाछंदरामायण
साररामायण
एकश्लोकीरामायण
डोहासोरटारामायण
सद्रत्ररामायण
पृथ्वीछंदरामायण
स्रग्विणिरामायण
सद्वित्तरामायण
पियुषरामायण
भावरामायण
सच्छराव्यरामायण
सौम्यरामायण
सीतारामायण
हनुमंतरामायण
पंचशतीरामायण
मंत्ररामायण
परंतुरामायण
लघुरामायण
विद्युन्मालारामायण
मंत्रगर्भसाकीरामायण
धनाक्षरीरामायण
वरदरामायण
सद्वर्भदरामायण
दामरामायण
निरोष्ठरामायण
अनुष्टपरामायण
त्रिसप्तमंत्ररामायण
कन्यारत्नरामायण
श्रवणामृतरामायण
कथासुधारामायण
गदघ्नरामायण
अभंगरामायण
नामांकरामायण
मत्तमयूररामायण
सतकीर्तीरामायण
- रवींद्र मालुसरे
अध्यक्ष,मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई
९३२३११७७०४
घरकुल सोसायटी, प्रभादेवी




2 टिप्पण्या
जय श्रीराम
उत्तर द्याहटवाछान माहिती वाचायला राम नवमी दिवसालाच मिळाली
उत्तर द्याहटवा