बुधवार, २० एप्रिल, २०२२

शिवरायांचा विचार देशाला प्रेरक – केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया

शिवरायांचा विचार देशाला प्रेरक – केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया 


(रवींद्र मालुसरे )किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४२ व्या पुण्यतिथीनिमित्त शनिवारी (दि.१६) आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी छत्रपती शिवरायांना अभिवादन केले. या वेळी त्यांनी शिवरायांनी जातीपातीच्या आणि अंधश्रद्धेच्या पलीकडे जात अखंड भारताचे स्वप्न साकार केले. त्यामुळे बहुजन हिताय बहुजन सुखाय या त्यांच्या विचारातूनच देश पुढे गेला पाहिजे असे प्रतिपादन केले. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे आणि स्थानिक उत्सव समिती महाड यांच्या वतीने शिवपुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.केंद्रीय मंत्री आणि महान सेनानी महादजी शिंदे यांचे वंशज ज्योतिरादित्य सिंधिया यांनी प्रथम महाराजांच्या समाधीचे दर्शन घेत पुष्पहार अर्पण करीत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. त्यानंतर राजसदरस्थळी झालेल्या सभेत बोलताना त्यांनी आपण पाहुणे नसून या मातीमधलाच एक मराठा असल्याचे सांगितले. ते म्हणाले मराठ्यांचा इतिहास देशाच्या कानाकोपर्‍यात असून शौर्य, बलिदान आणि वीरता असलेला हा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कायम दूरदृष्टी पहिली. नौसेना उभी करून समुद्र तटाचेदेखील रक्षण कसे करावे हे दाखवून दिले. शिवरायांनी जातीपातीच्या पलीकडे जाऊन सर्व जाती-धर्मांच्या लोकांना सामावून घेत स्वराज्य निर्मिती केली. महाराजांच्या या विचाराचे आचरण केल्यास देशाचे कल्याण होईल. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या पन्नास वर्षांच्या कार्यकाळामध्ये अखंड हिंदुस्थानचे पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध व्हावे असे आवाहन केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज केले. ना. ज्योतिरादित्य सिंधिया पुढे म्हणाले की महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना कुळवाडीभूषण म्हणून संबोधले होते तर बडोद्याचे राजे सयाजी गायकवाड आणि कोल्हापूरचे राजर्षि शाहू महाराज यांनी शिवरायांचा विचार डोळ्यासमोर ठेवून महामानव डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणाला चालना दिली होती.छत्रपती शिवाजी महाराज हे युग प्रवर्तक होते. त्यांनी केवळ राजगादी किंवा राजसत्ता स्थापन केली नाही तर महाराष्ट्र धर्म ही संकल्पना त्यांनी हृदयात जपली होती. आगरी, कोळी, रामोशी, धनगर, मुस्लीम अशा जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन त्यांनी स्वराज्य स्थापनेचा संकल्प सोडला आणि तो तडीस नेला. पहिले आरमार छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केले. त्यांच्या आरमाराचा अभ्यास आजही जगातील अनेक देशांची नौदले करत आहेत. रायगडावरील राजसदरेवर आयोजित करण्यातया अभिवादन कार्यक्रमाला महाडचे आमदार भरतशेठ गोगावले,पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर,निवृत्त सर्जन कमांडर आणि इतिहास अभ्यासक डॉ.उदय कुलकर्णी, निवृत्त व्हॉईस ॲडमिरल मुरलीधर पवार तानाजी मालुसरे - सूर्याजी मालुसरे यांचे वंशज रवींद्र मालुसरे,अनिल मालुसरेश्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे, कार्यवाह सुधीर थोरात, सरकार्यवाह पांडूरंग बलकवडे, स्थानिक उत्सव समितीचे अध्यक्ष त्रिंबक पुरोहित, कार्यवाह संतोष कदम यांच्यासह असंख्य शिवभक्त उपस्थित होते. स्थानिक आमदार भरतशेठ गोगावले यांनी प्रतिवर्षी किल्ले रायगडावर होणारी ही वारी आपल्या आयुष्याची कर्तव्यपूर्ती असल्याची विनम्र भावनाही त्‍यांनी यावेळी व्यक्त केली. सर्व शिवभक्तांनी चालूवर्षी दाखवलेली मोठी संख्या पाहता त्यांनी आनंद व्यक्त केला. यापुढील काळातही किल्ले रायगडावर होणाऱ्या विविध कार्यक्रमांतून तसेच पाचाड येथील राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांच्या कार्यक्रमाला शिवभक्तांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही त्‍यांनी केले. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशजांचा शिवतीर्थावर गौरव ! हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४२ व्या पुण्यतिथीनिमित्त केंद्रीय वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या तानाजी मालुसरे यांच्या वंशजांचा कवड्याची माळ, धारकरी पगडी आणि भंडारा सन्मानपूर्वक देऊन शिवतीर्थ रायगड येथे सन्मान करण्यात आला उपस्थित असलेल्या समस्त मालुसरे यांच्यावतीने रवींद्र मालुसरे (अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ) यांनी हा सन्मान स्वीकारला. सिंधीया यांनी तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाच्या आठवणींना उजाळा आपल्या भाषणात दिला. यावेळी राज्याच्या विविध ७२ गावातून सुमारे शेकडो मालुसरे पुण्यभूमी रायगड येथे एकवटले होते. २५ एप्रिल १८९६ या दिवशी लोकमान्य टिळक यांच्या उपस्थितीत तानाजी मालुसरे व येसाजी कंक यांच्या वंशजांचा नारळ देऊन रायगडावर सन्मान करण्यात आला होता त्यानंतर १२७ वर्षांनी पुन्हा एकदा मालुसरे वंशजांचा सत्कार शिवतिर्थ रायगडावर करण्यात आला. सर्वश्री रवींद्र तुकाराम मालुसरे अनिल मालुसरे, मिलिंद मालुसरे (साखर), सुभाष मालुसरे, सपना मालुसरे, अनिल मालुसरे (पारमाची), नितीन मालुसरे, सुनीता मालुसरे, स्नेहल मालुसरे (गोवा साखळी) प्रदीप मालुसरे, कल्पना प्रदीप मालुसरे (कासुर्डी), संतोष मालुसरे (लव्हेरी), सुनील मालुसरे (सुधागड),शिवराम मालुसरे (किये), संजय विजय मालुसरे (धुळे), बाळासाहेब मालुसरे(निगडे), मधुकर मालुसरे ((भावे पठार), भगवान मालुसरे, रमेश मालुसरे, तुकाराम मालुसरे, विठ्ठल मालुसरे, सचिन मालुसरे, सुधीर मालुसरे, अविनाश मालुसरे, मारुती मालुसरे, पांडुरंग मारुती मालुसरे,,तेजस मालुसरे, यशवंत मालुसरे, कैलास मालुसरे,आंबेशिवथर),संतोष मालुसरे (फुरुस ), राकेश अ मालुसरे,सूर्याजी द मालुसरे, अनिल मा मालुसरे, सागर संतोष मालुसरे, अजय काशिनाथ मालुसरे (गावडी ),रमेश मालुसरे, तुकाराम मालुसरे (आंबे शिवथर), आबासाहेब मालुसरे,मंगेश मालुसरे (गोडवली), राजेंद्र मालुसरे, रुपेश मालुसरे,कुर्ले महाड), अनिल मालुसरे (बडोदा), संतोष शा मालुसरे (खोपोली), महीपत मालुसरे, गेणू मालुसरे, सोनल म मालुसरे (पारमाची), अरुण मालुसरे, धोंडिबा मालुसरे, सुनीता अ मालुसरे-सरपंच (हिरडोशी), वालचंद मालुसरे (केळघर), मेघनाथ मालुसरे (पौड), चंद्रकांत मालुसरेआदी प्रमुख मालुसरे वंशजांचा याप्रसंगी मंडळाच्या वतीने सन्मान केला. समितीच्या वतीने देण्यात येणारा श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार भारतीय नौदलातील निवृत्त सर्जन कमांडर व इतिहास संशोधक डॉ. उदय कुलकर्णी यांना या वेळी देण्यात आलातर सैन्यदल अधिकारी व्हाईस अ‍ॅडमीरल मुरलीधर पवार यांचा सपत्नीक विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात शिवरायमुद्रा आणि शिवऋषींची शिवसृष्टी या ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष श्री रघुजीराजे आंग्रे यांनी प्रास्ताविक तर सूत्रसंचालन मोहन शेटे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर राज्य सदरेपासून शिवसमाधीपर्यंत शिवप्रतिमेची पालखी मिरवणूक काढण्यात आली.

शुक्रवार, ८ एप्रिल, २०२२

कर्मे इशु भजावा

 कर्मे इशु भजावा 

अभंग गायनाची खासियत अशी, की तो देवाच्या द्वारी उभा राहून गायला, तर त्यात रंग भरतोच, परंतु जिथे असू तिथे तल्लीन होऊन अभंग गायला, तर आपल्या सभोवतालचा परिसर गाभाऱ्यासारखा पवित्र होतो. समाधीस्थ अवस्था तयार होते आणि त्या आनंदात टाळ, चिपळ्या, मृदंगही नाचू लागतात. सगळे विठ्ठलमय होतात. तिथे रंक-राव असा भेदभाव उरतच नाही. कारण तो दरबार ईश्वराचा असतो. त्याचा कृपाप्रसाद सर्वांना सारखा मिळतो. सर्व विषयांशी संग सुटतो आणि केवळ विठुनामाचा संग जडतो. त्याचप्रमाणे विविध गुणांनी, विविध अभिव्यक्तीनी आणि वैविध्यपूर्ण स्वभावांनी बनलेली अनेकविध माणसं समाजात वावरत असतात. सारीच माणसं जिवंत असतात. पण ज्या माणसांत चैतन्य असते, कर्तृत्वाची स्फुल्लिंगं प्रज्वलित झालेली असतात, जीवनाचा अन्वयार्थ ज्यांना ज्ञात झालेला असतो अशीच माणसं जिवंत वाटतात आणि समाजातल्या अशा विखुरलेल्या चैतन्यमयी माणसांमुळे समाजपुरुष जिवंत साहे असे वाटते. अशी कर्तृत्ववान माणसं समाजाची भूषण असतात. इतकेच नव्हे तर अशी माणसं समाजाची कवचकुंडल असतात. असंच एक कवचकुंडल पोलादपूर तालुक्यातील लहुळसे गावात ८० वर्षांपूर्वी एका अज्ञानी, दरिद्री, विपन्नावस्थेत वावरणाऱ्या कुटुंबात जन्माला आले, जे पुढे संपूर्ण महाराष्ट्रात भजनानंदी हरिभाऊ रिंगे महाराज म्हणून समाजाला ललामभूत ठरले.

धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चार पुरुषार्थ मानले जातात. त्यात पहिले तीन भौतिक उद्देश आहेत.. चौथा ज्ञानी. त्याला एका कामासाठी देवाने मर्त्यलोकी पाठविलेला असतो. 'जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती' असे जगायचे कल्याण चिंतने आणि त्यासाठी देह कष्टविणे हे संतांच्या कर्तव्यापैकी एक आहे. हरिभाऊंनी आयुष्यभर आवडीच्या क्षेत्रात केलेले भव्यदिव्य काम पाहता ते एक व्यक्ती आहे असे मी मानत नाही, त्यांचं जीवन आता पारमार्थिक क्षेत्रातील एक विचार बनलेला आहे.

मनुष्याला त्याच्या जन्माला आल्यानंतर जेव्हा संतसंग किंवा सत्संग लाभतो तेव्हा त्याच्या पाठीमागे पूर्वपुण्याई, पूर्वजन्माचे संस्कार व सुकृत असते.रिंगेमहाराजांचा सहवास आपल्या सर्वाना लाभतो आहे हे आपले परम भाग्यच. 


हरिभाऊंना मुंबईत आल्यानंतर परम पूजनीय गुरुवर्य ज्ञानेश्वर मोरे माऊली यांचा सहवास लाभला. त्यांच्या हातून तुळशीची माळ घेतल्यानंतर त्यांचे जीवन पूर्ण आंतरर्बाह्य बदलले. तुझ्या गळ्यात सूर आहे ...तुम्ही आयुष्यभर सुरात गात चला. नंतर भजन सम्राट खाशाबा कोकाटे यांच्याकडे संगीताची रागदरबारी शिकण्यासाठी जाऊ लागले. गात राहिले... शिकत राहिले...वयाच्या २० व्या वर्षांपासून आता वयाच्या ८० व्या वर्षांपर्यंत त्यांचा रोजचा सराव आणि साधना यामुळे  हरिबुवा रिंगेमहाराज यांची नाममुद्रा श्रद्धेने आणि कर्तृत्वाने मंतरलेली झाली आहे. महाराजांनी महाराष्ट्रात वारकरी गायन क्षेत्रात संस्मरणीय कार्य केले आहे. गेली ६० वर्षे अखंड साधना केल्यामुळे स्वतः सुरेल आणि पल्लेदार पहाडी आवाजाचे ते जसे धनी आहेत तसेच शेकडो गुणिजन विद्यार्थ्यांचे ज्ञानदान करणारे गुरुजींही आहेत. श्री पांडुरंगाचे आणि संत ज्ञानेश्वर माऊलींचे वारकरी आणि निस्सीम भक्त म्हणून महिन्याची वारी करणारे अशा अनेकविध नात्यांनी ते जसे समाजात सुपरिचित आहेत. तशी प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपल्या सत्वसंपन्न व्यक्तिमत्वाची मुद्रा उमटवली आहे. उदा. दोन वर्षांपूर्वी लहुलसे गावात द्वादशी व्रताचा करण्याचा संकल्प त्यांनी गावकऱ्यांसमोर मांडला. गावाने त्यांचा शब्द प्रमाण मानला, एकजुटीने एकमताने उभा राहिला. न भूतो न भविष्यती असा कोकणात महायज्ञ सुफळ संपन्न झाला.

हाती घेतलेलं कोणतंही काम करताना त्यांचे केवळ कोरडं कर्तव्य नसतं, तर ते भावस्निग्ध व्रत असतं. ते काम सरस आणि सकस व्हावं, कार्यपूर्तीला सौजन्याचं कोंदण हवं याची त्यांना सतत जाणीव असते.  आपले अनेक विद्यार्थी, सहकारी आणि स्नेही यांच्या भल्यासाठी ते जीवाचं रान करतात.

त्यांच्या प्रत्येक श्वासात प्रभुनाम स्मरणाची स्पंदने आहेत.पारमार्थिक तळमळ असणारे आणि अध्यात्मिक जीवन जगणारे असे हरिभाऊ रिंगे यांच्या वयाच्या ८० व्या वर्षपूर्ती निमित्त कृतज्ञता सोहळा संपन्न होत आहे. कर्मानेच ईश्वराची सेवा करावी लागते. सेवा करण्याला भजन म्हणतात. म्हणजे सर्व सुखासाठी 'कर्मे ईशु भजावा' हेच खरे. हरिभाऊ रिंगे महाराज यांचा जीवनपट नजरेसमोर आणला तर कर्माने ईश्वराला भजावे म्हणजे 'कर्मे ईशु भजावा' चा अर्थ अधिक स्पष्टपणे लक्षात येईल.

हरिभाऊंना माणसाची विलक्षण ओढ आहे. अनेक स्तरांतील आणि विविध व्यवसायातील माणसंविषयी त्यांना उत्कट प्रेम आहे. दोष कुणात नसतात ? दोष बाजूला ठेऊन माणूस शोधायचा असतो, असे अनेक उभे आडवे धागे जुळवीत समाज जीवनाचं वस्त्र ते विणत असतात. हरिभाऊ ८० वर्षानंतरची वाटचाल करीत असताना त्यांची उमेद पूर्वीसारखीच उदंड आहे. प्रतिकुलता झेलत आणि चैतन्य उधळत जगावं कसं याचा वस्तुपाठ म्हणजे हरिभाऊंचे जीवन आहे.

हरिभाऊंनी आयुष्यभर नाद ब्रम्हाचा अर्थ सांगितला व लेखाच्या विद्वान संगीत तज्ज्ञांपेक्षा काकणभर सरस असे भारतीय शास्त्रीय संगीतावर आपले चिंतन मांडले. विद्यादानासारखे श्रेष्ठ दान नाही. विद्यादान हे म्हणजे आत्मानंद देणारे ज्ञानदान होय. सतचित आनंद देणारे ज्ञान. यासाठी योग्य गुरु योग्य शिष्यासाठी जीवन जगतो आणि योग्यतेचा शिष्य भेटल्यावर अनेक कसोट्यांतून नेल्यावर नाते निर्माण होते.  मानवधर्म मानणाऱ्या वारकरी संप्रदायाची विचारधारा जगाला मार्गदर्शक ठरेल, अशी हरिभाऊंची धारणा आहे. नभोमंडलात तळपणाऱ्या भास्काराप्रमाणे रिंगेमहाराज आपल्या शिष्यगणांसह अवघा महाराष्ट्र फिरत असतात. ऐसी कळवल्याची जाती करी लाभावीण प्रीती श्री तुकोबारायांच्या उक्तीप्रमाणे भाविक भक्तगणांना गेली ६० वर्षे दीपप्रकाशात रिंगे महाराज सन्मार्ग दाखवीत आहेत. कर्तव्यतत्पर माणसाला विश्रांती माहीत नसते. संगीत क्षेत्राची अफाट बौद्धिक ताकद असलेले कल्पक कलावंत जेव्हा एखाद्या समाजात निर्माण होतात तेव्हा त्या समाजाच्या परंपरेच्या दृष्टीने सांस्कृतिक आणि भौतिक पातळीवर काही नवे घडत असते. काळाच्या ओघात समाजात सतत स्थित्यंतरे घडत असतात. मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात स्वतःला झोकून देणारे आणि तन-मन-धन अर्पण करणारे निष्काम महापुरुष ठामपणे उभे राहातात तेव्हाच इतिहासात नोंद घेणारे बरेचसे त्यांच्याकडून घडत असते. पोलादपूरच्याच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्र प्रांतात हरिभाऊंनी वारकरी गायन क्षेत्रात केलेले काम उल्लेखनीय असेच आहे.

वारकरी गायन क्षेत्रातील एक तपस्वी म्हणून त्यांनी हजारॊना जे ज्ञान दिले ते देताना त्यांच्या कर्मात निष्कामता होती. कर्मामध्ये निष्कामता येणे अत्यंत अवघड आहे. जो निष्कामतेने कर्म करतो त्यास 'कर्मयोगी' असे म्हणतात. कर्मामध्ये निष्कामता येण्यासाठी कर्माचे तत्व नीट समजले पाहिजे. जे करावयाचे आहे ते भगवंतासाठीच करावयाचे आहे असा भाव मनात निर्माण करावयाचा म्हणजेच निष्काम कर्म करावयाचे. सर्वव्यापी ईश्वर भावाने केलेले कर्म हे निष्काम कर्मच होते. यालाच दुसरे नाव 'भक्तिमार्ग' असे आहे. ती वाट परमात्म्याच्या पर्यंत पोहोचते व जीवास परमात्मरूप करते. हरिभाऊंनी ईश्वर भक्ती त्यांच्या विचारातून व आचारातून जाणवते कारण महाराज हे सच्चे वैष्णव आहेत. जीवन पराकोटीचं समर्पित केले की जीवन जीर्णशीर्ण होत नाही. सूर्याला म्हातारपण येत नाही. दर्या कधीच संकोचत नाही. चंद्र कधीच जुना होत नाही. विनाश कधीच त्यांच्याजवळ पोहोचत नाही. त्यांच्यात ना स्थित्यंतर ना कायापालट होतो.

भजनानंदी सुप्रसिद्ध भजन सम्राट ह भ प हरिभाऊ रिंगे महाराज हे ८१ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत त्याबद्दल अंतःकरणपूर्वक शुभेच्छा ! यांनी हरिभाऊंनी मंगल जीवनाची, गौरवमय ऐंशी वर्षाची कारकीर्द पूर्ण केल्याचे निमित्त साधून त्यांच्या अभिष्टचिंतन करण्याची हि सुवर्णसंधी लाभली आहे, विश्वात्मक देवाच्या या महान भक्तास उत्कृष्ट, आरोग्य, दीर्घायुष्य, समाधान व शांती व सर्व भाविक भक्तांना एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे त्यांचे आध्यात्मिक मार्गदर्शन लाभून त्यांचे जीवन पुढील अनेक वर्षे कृतार्थ होवो हीच माउलींच्या चरणी प्रार्थना. माणूस किती वर्षे जगला यापेक्षा कसा जगला हे महत्वाचे आहे. 'कसा' हा शब्द संबंधित व्यक्तीची जीवनपद्धती, संस्कार व तिच्या जीवनविषयक ध्येयाचा निर्देशक असतो.

हरिभाऊ हे कुटुंबाचे, गावाचे, समाजाचे, वारकरी संप्रदायाचे उपकारकर्ते. आपल्यावर ज्यांनी उपकार केले, त्याची जाणीव मनात असून उपकार कर्त्याविषयी मनात सदैव सद्भावना असणे व त्याला अनुसरून उपकारकर्त्याशी वेळप्रसंगी तसे आपले वर्तन असणे ही झाली 'कृतज्ञता' या शब्दाची व्याख्या. आपल्या भारतीय संस्कृतीची जी अंगे उपांगे आहेत, त्यात कृतज्ञतेचा समावेश होतो. ....या चार शब्दांची ही शब्दसुमने त्यांच्या चरणी अर्पण !

-




रवींद्र मालुसरे (
अध्यक्ष )

 मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई  ९३२३११७७०४ 


१२७ वर्षानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रातील समस्त मालुसरे परिवाराचा सन्मान होणार

     

 रायगड किल्ल्यावर ३४२ वा शिवपुण्यतिथी सोहळा

श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि स्थानिक उत्सव समिती महाड यांच्या वतीने रायगड किल्ल्यावर ३४२ वा शिवपुण्यतिथी सोहळा दि १५ व १६ एप्रिल २०२२ रोजी आयोजित केला आहे. यावेळी भारत सरकारमधील केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ना ज्योतिरादित्य शिंदे (सिंधिया) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. भारतीय नौदलातील निवृत्त सर्जन कमांडर आणि इतिहास संशोधक डॉ उदय कुलकर्णी यांना अकरावा श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार, व्हाईस ऍडमिरल मुरलीधर पवार यांना सैन्यदल अधिकारी सन्मान पुरस्कार तर सरदार घराण्यासाठी देण्यात येणारा सन्मान पुरस्कार यंदा महाराष्ट्रातील ७० हून अधिक गावांत स्थायिक असलेल्या समस्त मालुसरे परिवाराला देण्यात येणार असल्याची घोषणा सरकार्यवाह पांडुरंग बलकवडे यांनी केली आहे.



१२७ वर्षापूर्वी २५ एप्रिल १८९६ मध्ये लोकमान्य टिळकांच्या उपस्थितीत झालेल्या पहिल्या उत्सवात त्यावेळी तानाजी मालुसरे व येसाजी कंक इत्यादींच्या वंशजांस मानाचे नारळ देण्यात आल्याची नोंद त्यावेळच्या दैनिक केसरी आणि ऐतिहासिक दप्तरात करण्यात आली आहे. असिम त्यागाच्या इतिहासाची परंपरा लाभलेला मालुसरे परिवार पुन्हा एकदा या सुवर्ण क्षणाला सामोरा जात आहे.

हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी साखर, एरंडवाडी, सातारा जिल्ह्यातील  गोडोली, फुरुसपारगड, पारमाची, किवे, आंबेशिवथर, लव्हेरी, जामगाव मुळशी, जळगाव, धुळे, बारामती, कासुर्डी गुमा (भोर), शिवथर, निगडे (भोर), हिर्डोशी अशा महाराष्ट्रातील ७० गावांतील  मालुसरे परिवारातील ज्येष्ठ मान्यवर व्यक्ती आणि तरुण सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. 

रायगडवरील पहिल्या उत्सवाची कहाणी -

रायगड हा अखिल भारतातील एक दुर्भेद्य किल्ला ! १० मे १८१८ कर्नल प्रॉथरने नेतृत्वाखाली इंग्रजांनी रायगडचा ताबा घेतला, किल्ल्यावर एक घर व एक धान्याचे कोठार तेवढे इंग्रजांच्या अग्निवर्षावातून बचावले होते, शिवछत्रपतींचा राजवाडा पूर्णपणे उध्वस्त झाला होता, शिवछत्रपतींची समाधी सुद्धा भग्न झाली होती...पण प्रयासाने ओळखू येण्यासारखी होती, ही पडझड जितकी इंग्रजांच्या तोफखाण्यामुळे झाली होती तितकीच विखुरलेल्या मराठेशाहीमुळे सुद्धा झाली होती. सर्वत्र भग्न इमारतींचे अवशेष दिसत होते, गडावरील रस्ते, हारीने असलेल्या सुंदर इमारती, मंदिरे भग्न झाली होती, रायगडावरील दफ्तरखाना जळून खाक झाला होता. त्यानंतर रायगडचा उध्वस्त किल्ला जंगलखात्याच्या ताब्यात जाऊन तेथे वस्ती उरली नव्हती, रायगडचे राजकीय महत्व नष्ट झाले होते, पुढे १८८३ पर्यंत रायगडावर कोणी प्रवासी चढून गेल्याची नोंद नाही. इतके औदासिन्य लोकांत पसरले होते. पूढे मुंबईहून बोटीने नागोठणे आणि नंतर टांग्याने खडखडत लोक रायगडावर पोहोचत असत, पाचाडचा मुजावर सैद महम्मद किंवा वाडी येथील श्रीधर भगवान शेठ सोनार यांपैकी कोणीतरी गड दाखविण्याचे काम करीत. १८८५ मध्ये वर्तमानपत्रातून काही तुरळक उल्लेख येऊ लागले, १८८७ मध्ये गोविंद बाबाजी वरसईकर जोशी यांनी रायगड किल्ल्याचे वर्णन असे पुस्तक लिहिले, जोशी यांनी छत्रपतींच्या समाधीच्या जीर्णोद्धार सरकारी खर्चाने व्हावा असे लिहिले, यातूनच पुढे २५ एप्रिल १८९६ रायगडावर पहिला महोत्सव करण्यात आला, बारा मावळचे प्रतिनिधीसह महत्वाच्या जागी यावेळी माणसांची दाटी झाली होती, मेळ्याची पदे, विनायकशास्त्री अभ्यंकरांचे कीर्तन, शिवरामपंताचे भाषण, लोकमान्य टिळकांचे समारोपाचे भाषण, गंगाप्रसादाजवळ प्रसादाचे भोजन, छबिना इत्यादी कार्यक्रम व्यवस्थित झाल्यानंतर "तानाजी मालुसरे व येसाजी कंक इत्यादींच्या वंशजांस मानाचे नारळ देण्यात आले." इ.स. १८१८ पासून १८९६ पर्यंतच्या रायगडाच्या सुप्तावस्थेनंतरचा हा पहिला उत्सव होय....


या कार्यक्रमाचा हा पूर्ण इतिवृत्तांत त्यावेळी दैनिक केसरीमध्ये प्रकाशित झाला होता.

रवींद्र मालुसरे - अध्यक्ष 

मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई 

९३२३११७७०४




वैशिष्ट्यीकृत पोस्ट

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत सत्याची कास धरून पत्रकारिता करावी.

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत  सत्याची कास धरून पत्रकारिता करावी. सतरावे शतक प्रबोधनाचे ,  अठरावे शतक वैचारिकतेचे ,  एकोणीसावे शतक प्रगतीचे...