मंगळवार, ९ नोव्हेंबर, २०२१

नादब्रम्हाचा उपासक सुप्रसिद्ध भजनी गायक ह.भ.प.पांडुरंगबुवा रामजी उतेकर

 

नादब्रम्हाचा उपासक

सुप्रसिद्ध भजनी गायक ह.भ.प.पांडुरंगबुवा रामजी उतेकर 

पोलादपूर तालुक्यातील सुप्रसिद्ध भजनी गायक आणि वारकरी संप्रदायाचे अर्ध्वर्यू संगीतरत्न ह.भ.प.पांडुरंगबुवा रामजी उतेकर यांचे आज (मंगळवार ९ नोव्हेंबर २०२१ ) रोजी हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ८७ व्या वर्षी  निधन झाले. त्यांच्याच गावातील वारकरी संप्रदायातील पोलादपूर मधील थोर संत ह भ प. वै ढवळे बाबा आणि गुरुवर्य वै ह भ प नारायणदादा घाडगे यांचा पांडुरंगबुवांना लहानपणापासून खुप जवळचा सहवास आणि स्नेह लाभला. किर्तनासह, भजनामध्ये आपल्या वेगळ्या शैलीतील गायनाने बुवांनी रसिकांना गेली सहा दशके मंत्रमुग्ध केले. पोलादपूर तालुक्यातला वारकरी क्षेत्राचा सुवर्णकाळ हा साधारणतः १९५५  ते  १९७५. या काळात अनेक गुरुतुल्य व्यक्ती जन्माला आली. अर्जुनमामा साळुंखे, ढवळे बाबा,नारायणदादा घाडगे, गणेशनाथ बाबा, हनवतीबुवा, हबुबुवा, ज्ञानेश्वर मोरे माउली, विठोबाअण्णा मालुसरे, ढवळे गुरुजी, भजनानंदी हरिभाऊ रिंगे, सुप्रसिद्ध पखवाजवादक रामदादा मेस्त्री, शंकर मेस्त्री, भाईबुवा घाडगे, विठोबा घाडगे (पखवाज), विठोबा घाडगे (गायक) अशी बुद्धिमान आणि ईश्वराशी समरस झालेली मोठी माणसे होऊन गेली. त्यावेळी पांडुरंगबुवा आपली गायनकला भजन-कीर्तनातून श्रोत्यांसमोर सादर करीत होते. हळूहळू त्यांचा वेगळा असा श्रोतृ वर्ग निर्माण झाला. त्यांच्या अचानक जाण्याने आजरेकर समाज फड आणि पोलादपूर तालुका वारकरी संप्रदायासह संगीत क्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने त्यांना "रायगड भूषण" पुरस्कार प्रदान करून सन्मानाने गौरविले होते. 

        सुरवातीच्या काळात तरुण वयातच त्यांना गावागावातील भजने ऐकून त्यांना भजनाची आवड निर्माण झाली. त्यानंतर मुंबईत आल्यानंतर  गायनाचार्य पं रामबुवा यादव (लोअर परेल) यांच्याकडे संगीत भजन शिकण्यास सुरुवात केली. यादवबुवांकडे काही काळ संगीत भजनाचे धडे घेतल्यानंतर सेंच्युरी गिरणीतील नोकरी आणि गावाकडची शेतीवाडी यामुळे त्यांना संगीत क्षेत्रातील शिक्षणाला वेळ देवू शकले नाहीत, मात्र त्यांनी स्वसाधनेने शास्त्रीय संगीताची साधना केली.  किर्तनात गायनसाथ करण्याची संधी लाभलेल्या पांडुरंगबुवांच्या आवाजात विशेष गोडी होती. आपल्या वेगळ्या शैलीतील गायनाने पोलादपूर, मुंबई, आळंदी, पंढरपूर परिसरातील श्रोत्यांना देखील बुवांच्या सुमधुर आवाजाची भुरळ पडली. वारकऱ्याने आयुष्यभर त्या फडाशी एकनिष्ठ राहिले पाहिजे, असा नियम वारकरी पंथात आहे.आजरेकर फडाच्या जवळपास पाच पिढ्यांशी ते एकनिष्ठ राहिले. आळंदी-पंढरपूर पायी वारीतील बऱ्याचदा ज्येष्ठ म्हणून मुख्य चाल म्हणण्याचा अधिकार फडप्रमुख त्यांना देत असत. मुंबईतील गिरणी कामगारांच्या भजन स्पर्धा होत असत त्यावेळी सेंच्युरी मिल भजन मंडळ सतत पहिला क्रमांक पटकावत असत. भजन सम्राट वै मारुतीबुवा बागडे यांच्या साथीला बुवा नेहमी असत.

 पांडुरंगबुवांना मानणारा वारकरी संप्रदायातील एक मोठा वर्ग आहे.  काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. अखेर आज हृदय विकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत माळवली. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुलगे आणि एक मुलगी , सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या अशा अचानक निघून जाण्याने संगीत क्षेत्राची फार मोठी हानी झाल्याची भावना कलाकार मंडळींकडून व्यक्त केली जात आहे.

गायकाची सारी करामत त्याच्या गळ्यावर अवलंबून असते. गाणं नुसतं डोक्यात असून चालत नाही. तेवढ्याच ताकदीनं ते गळ्यातून बाहेर पडावे लागते. त्यासाठी नैसर्गिक देणगीबरोबरच पराकोटीची  साधनाही असावी लागते. नशिबाची साथ तर लागतेच लागते. पांडुरंगबुवा उतेकर तसे खरेच भाग्यवान ! वय वर्षे ८७ या उतारवयातही त्यांचा आवाज एखादा प्रकाशाचा झोत चहुबाजुंनी अंगावर यावा, तसा श्रोत्याला भारावून टाकायचा. साऱ्या वातावरणात भरणारा हा आवाज खूपच जबरदस्त गोड. साधारणपणे बारीक, टोकदार, रुंद, घुमारदार, पिळदार, लांब पल्ल्याचा, दमसास पेलणारा. सुरेलपणा, स्वरांची  आस आणि गोडवा हेही त्यात होतेच. कोणतीही गायकी जन्माला येते तेव्हा ती परिपूर्ण नसते. हळूहळू ती परिपक्व होत जाते. गाणारा स्वरभास्कर अस्ताला गेला असला तरी त्यांची आठवण कायम राहील.  पोलादपूर वासियांच्या इतिहासात घडलेली अभूतपूर्व घटना म्हणजे त्यांचा काळातील पिढीने समृद्ध केले. पांडुरंगबंवा यांनी तर शेकडो अभंगांच्या पाठांतरामुळे वारकरी कीर्तन लोकप्रिय केले. शास्त्रीय संगीतातील रागांची तोंडओळख खेड्यापाड्यातल्या लोकांना भरभरून करून दिली. अनेकांना गाण्याची आवड लावली. खेडोपाडीच्या नुसत्याच भक्तीनं किंवा भावनेनं वेडेवाकडे गाणाऱ्यांना शास्त्रकाट्याची कसोटी दिली. त्यांचं गाणं वाढवलं. आणि संगीताच्या गाभाऱ्यात श्रद्धेचं, भक्तीच निरांजन लावलं. त्यांच्या वागण्यातला साधेपणा, गोडवा, निरागसता, समरसता, भक्ती हीच त्यांच्या गोड गळ्यातून स्वरांच्या रूपाने बाहेर पडत असे. गायकासाठी सूर हाच ईश्वर आहे व तो सच्चा लागला तरच ईश्वराला प्रिय आहे.   

या क्षेत्रात वावरताना त्यांना मानमरातब, आदर नेहमीच मिळत राहिला. पूर्वजन्मीचे सुकृत त्याला कारणीभूत असावे, ते अशा घरात जन्माला आले की तिथं स्वर-तालाची पूजा होत नव्हती. लहानपणी काहीसा पोरकेपणा वाट्याला आला होता. परंतु वर्तनातूनच आपल्यामधील कलेमध्ये हुनर दाखवत एक साधा माणूस म्हणून ते 'उजेडी राहिले उजेडी होऊन' जगले.  त्यांच्या गाण्यातला मोठा बिंदू म्हणजे भक्ती ! भक्ती  म्हणजे  भक्तिपदे गायन करणे नव्हे. तर गायकाच्या स्वभावातून निर्माण झालेला भक्तीचा भाव आणि त्या भावातून निघालेले स्वर आणि राग याच्यांशी एकरूप होऊन समर्पित होण्याची भक्ती आणि हीच गाण्यातली सर्वात मोठी शक्ती आहे. ज्या लोकांनी पांडुरंगबुवांच्या गाण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला व ज्यांना त्याची प्रचिती मिळाली ते सर्वजण धन्यता व सार्थकतेचा अनुभव करतात. म्हणूनच गेली पाच दशकांतील पिढ्यासाठी ते एक ऊर्जा स्रोत ठरले. मध्यसप्तकाचा षड्ज हा संगीतातील 'आधारस्वर' होय हा षड्ज साधारणपणे गायकाला सहजतेने लावता येण्यासारखा आणि रागानुरूप इष्ट त्या सर्व सप्तकांत फिरण्यास योग्य असा असावा लागतो. वादकाच्या बाबतीत तो वाद्य आणि वाद्यगुण यांना अनुसरून असतो. सर्व सांप्रदायातील वारकरी बंधूना नम्रपणे हात जोडून नमस्कार करणारा पांडुरंगबुवांचा प्रेमाचा आधार मात्र यापुढे नसेल मात्र त्यांची कीर्ती दिगंत उरणार आहे. 
💐भावपूर्ण श्रद्धांजली💐

 

रवींद्र मालुसरे (अध्यक्ष)

मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई

९३२३११७७०४

मंगळवार, २ नोव्हेंबर, २०२१

मराठीच्या भल्यासाठी दिवाळी अंक परंपरा जपू या !

 

दिवाळी ! दिव्यांची आरास. रांगोळीचा थाट, पक्वानांचा घमघमाट आणि फटाक्यांची आतषबाजी ! दिवाळी म्हणजे दीपोत्सव आणि दीपोत्सव म्हणजे आनंदाचा उत्साह, उल्हासाचा उत्सव ! प्रसन्नतेचा उत्सव, प्रकाशाचा उत्सव. अशी ही दिवाळी मराठी माणसांच्या नसानसातून झिरपत असते. दिवाळी म्हणजे दीप मांगल्याचा सण. रोषणाई,फराळ आणि फटाक्यांची आतिषबाजी हे दिवाळी सणाचे वैशिष्ट्य. त्याचप्रमाणे दिवाळी अंक हा दिवाळी सणाचा  एक अविभाज्य भाग आहे.  म्हणूनच दीपावली सणाची केवळ चाहूल सुद्धा अबाल वृद्धांना हर्षभरित करते.

दिवाळी' येते तीच मुळात हसत, खेळत, नाचत. सभोवताल प्रकाशाने, देदीप्यमान तेजाने उजळून टाकत. सोबतीला असतात गतकाळाच्या दिवाळीच्या आठवणी, वर्तमानकालीन अपेक्षा आणि पुढील वर्ष आनंदात, सुखासमाधात जावं, ह्या आशा आणि इच्छा. दिवाळी म्हटलं की पहाटेची अभ्यंगस्नानं, उटणी, मोती आणि म्हैसूर चंदन साबणाचे सुवास, अत्तरं, फराळ, फटाके, आकाशकंदील, पणत्या, रांगोळी, नवीन कपडे हे सारं असतंच, त्याचबरोबर दिवाळी अंक घरी आल्याशिवाय बऱ्याच मराठी घरांत ह्या सणाची पूर्तता होत नाही! दिवाळीची चाहूल लागताच मराठी माणूस आणखी एका गोष्टीत गुंतून राहतो ते म्हणजे दिवाळी अंक. ह्या दिवाळी अंकांनी मराठी मनाला मोहवून टाकले आहे.

महाराष्ट्रासह संपूर्ण भारत आणि जगभरातील काही ठिकाणी दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी होते. प्रत्येक सण, उत्सवावर त्या त्या प्रदेशातील सांस्कृतीक प्रथा, परंपरांचा प्रभाव असतो. पण, महाराष्ट्रात दिवाळी सणाचा एक वेगळाच पैलू पुढे येतो. ज्याला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात अत्यंत मानाचे स्थान आहे. हा पैलू म्हणजे दिवाळी अंक. दिवाळीच्या फराळासोबत जर दिवाळी अंक नसेल तर, त्या वर्षीची दिवाळी काहीशी सुनी सुनी गेली असे वाटते. म्हणूनच भारतीय छापाईच्या इतिहासात वाचन परंपरेचा एक मोठा आयाम दिवाळी अंकांनी व्यापला आहे. जो केवळ मराठी भाषेतच पहायला मिळतो. अर्थात, पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पूजा महोत्सवाच्या निमित्ताने विशेषांक, गुजराती भाषेतही दिवाळी अंक छापले जातात. पण, त्यांचे प्रमाण अगदीच अल्प आहे. दिवाळी अंकाची सुरुवातच मुळात साहित्यिक प्रेरणेतून झाली आहे.

या दिवाळी अंकांच्या उगमतेचा इतिहास फार 'मनोरंजक' आहे. साहित्य क्षेत्रातील दिवाळी अंकांची प्रथा सुरु केली ती मनोरंजनकार काशिनाथ रघुनाथ तथा का र मित्र यांनी १९०९ साली. एकूण २०० पृष्ठसंख्या असलेल्या या दिवाळी अंकाची किंमत केवळ १ रुपया होती. हिरव्या रंगाच्या जाड कागदाच्या मुखपृष्ठावर एक मुलगा व एक स्त्री अंक पाहत असतानाचे चित्र असलेल्या या अंकात एकूण ४२ पाने जाहिरातीची होती. मात्र सुरुवातीची २६ पाने संपल्यानंतर अनुक्रमणिका दर्शविणारी ४ पाने होती. त्यानंतरच्या पानावर भारताचे तत्कालीन राजे किंग एडवर्ड सात यांचे चित्र व त्या पुढील पानावर संपादकाचे 'दोन शब्द' होते. आजच्या जाहिरातीचे बीज त्या काळातही पेरले गेले होते याची प्रचिती या दिवाळी अंकातील 'स्वदेशी लोटस' या साबणाच्या जाहिरातींवरून येते. जाहिरातीसोबत असलेले कुपन घेऊन येणाऱ्यास एक साबण बक्षीस देण्याची ती योजना विविधोपयोगी वस्तूंच्या जाहिरातींसोबत 'दामोदर सावळाराम आणि मंडळी' यांची १६ पानी दीर्घ जाहिरात आहे. . मनोरंजनाचा हा दिवाळी खास अंक महाराष्ट्रीयांस प्रिय होवो, अशी अपेक्षा त्यांनी शेवटी व्यक्त केली आहे. बालकवींची सुप्रसिद्ध असणारी ‘आनंदी आनंद गडे’ ही कविता या पहिल्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली होती! यानिमित्ताने सांस्कृतीक प्रथा, परंपरांचा एक वेगळाच पैलू पुढे येतो. ज्याला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात अत्यंत मानाचे स्थान आहे.  गेली ११३ वर्षे मराठी साहित्याचा हा जागर अखंड होत आहे. हे सातत्य इतर भाषांमध्ये फारसे घडताना दिसत नाही. दिवाळी अंक म्हणजे मराठी भाषेची मिठ्ठास असून, ती खास महाराष्ट्राची साहित्यिक दौलत आहे. मराठी संस्कृतीमधील दिवाळी अंकांचे योगदान मोठे असून, लेखकांच्या दृष्टीने त्यांच्या जडणघडणीची ती एक शाळाच आहे. दिवाळी अंकांनी मराठी साहित्यातील विविध प्रकार हाताळले असून, त्यातून अनेक लेखक-साहित्यिक नावारूपास आले आहेत.  गेल्या ११३ वर्षांमधील  दिवाळी अंकातील साहित्यिक, कवी कोण होते यांची नुसती यादी बनवली, तरी त्यातून मराठीत किती विपुल आणि व्यापक प्रमाणावर साहित्यनिर्मिती झाली आहे हे लक्षात येते.  शतकोत्तर वर्षाच्या कालखंडात दिवाळी सणात आमूलाग्र बदल झाला आहे.  त्याला दिवाळी अंकही अपवाद ठरले नाहीत. दिवाळी व दिवाळी अंक या नात्यांमधील वीण दिवसेंदिवस अधिक घट्ट होत चालली आहे. मराठी माणसाची 'दिवाळी' दिवाळी अंकाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही ! ‘दिवाळी-दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा’ या उक्तींमधील आनंद दिवाळी साजरा करण्यातील अनेक गोष्टींइतकाच दिवाळी अंक हा त्याचा अविभाज्य भाग बनला आहे.

प्रत्येक दिवाळी अंकाचा स्वत:चा असा एक वाचक वर्ग असतो. तो शक्यतो मिळेल त्या किमतीला तो अंक विकत घेतो. यंदाही तसेच घडेल, असे दिवाळी अंक संपादक आणि  विक्रेत्यांना वाटते आहे.  कारण दिवाळी अंक आले, की त्यावर उड्या मारणारे वाचक अजूनही तितक्याच निष्ठेने ते विकत घेताना दिसतात. दिवाळीच्या फराळासोबत जर दिवाळी अंक नसेल तर, त्या वर्षीची दिवाळी काहीशी सुनी सुनी गेली असे वाटते. म्हणूनच भारतीय छापाईच्या इतिहासात वाचन परंपरेचा एक मोठा आयाम दिवाळी अंकांनी व्यापला आहे.

दिवाळी अंकांच्या निर्मितीला शंभर वर्ष होऊन गेली. आजही नव्या पिढीला एकदा तरी दिवाळी अंक प्रकाशित करायचा याची भुरळ पडत असते. दरवर्षी नवनवीन दिवाळी अंक प्रकाशित होत असतात. सध्याच्या घडीला मराठीत पाचशेहून अधिक दिवाळी अंक प्रकाशित होतात. हा आकडा आश्चर्य चकित करणारा आहे. यात दर्जेदार असे अंक खूप कमी असतात हि गोष्ट वेगळी पण आजही दिवाळी अंक नव्या पिढीला आकर्षित करतात याचं समाधान वाटतं. मजकूर कमी आणि जाहिराती जास्त असं स्वरूप अलीकडच्या अनेक दिवाळी अंकाचं दिसू लागलंय. पण तरीही दिवाळी अंकांच्या या गर्दीत स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व ते टिकवून आहेत. दिवाळी अंकांचा व्याप सांभाळणे सोपे नाही, त्यातून मिळणारे उत्पन्नही बेताचे असते. असे असूनही मराठीतले बरेचसे म्हणजे मौज, दीपावली, आवाज, चंद्रकांत, धनंजय, किस्त्रीम, साधना,हंस, नवल, शतायुषी, आक्रोश, कलाकुंज, प्रसाद, धर्मभास्कर इत्यादी  दिवाळी अंक २५, ५० किंवा किंवा त्याहून अधिक वर्षे निघत आहेत.

१९५० ते ८० या काळातील दिवाळी अंक हे खरोखर साहित्यिक  विशेषांक होते आणि ते जाहिरातींचा वापर केवळ आधार म्हणून करत. जसजसा काळ पुढे जाऊ लागला तसतशी महाराष्ट्रातील मराठी मनाची साहित्यिक, सांस्कृतीक भूक वाढत होती. यात दिवाळी अंकांनी मोलाची भूमिका बजावत हे खाद्य अधिक सकसपणे द्यायला सुरुवात केली.  या वाढत्या भुकेला मराठी प्रकाशक साप्ताहिके, मासिके, पुस्तके आणि दैनंदिन घडामोडींसाठी वृत्तपत्रे जमेल तसे खाद्य देत आहेत आजही देतात. वैचारिक देवाणघेवाण होत पुढे वाढलेली वाचकांची भूक पाहून साप्ताहिकांनी विषयनिवडीत पहिल्यांदा कात टाकली. त्याचे पडसाद दिवाळी अंकातही उमटले. कथा, कविता, नाटक, कादंबरी यांसोबतच इतर भाषांमधील लेखकांचे अनुवादित साहित्य, भाषांतरीत कथा, कादंबऱ्या, कविता, नाटकं दिवाळी अंकात छापून येऊ लागली. आज तर दिवाळी अंकांचे स्वरुप इतके बदलले आहे की, दर वर्षी मोठ्या संख्येने दिवाळी अंक बाजारात येतात व स्वत:च्या वैशिष्ट्यांसह ते वाचकांपर्यंत पोहोचतातही. विशेषतः धार्मिक, महिला, ज्योतिष, आरोग्य, रहस्यकथा, विनोद, पाककला  या वैविध्यपूर्ण प्रकारांसह ते वाचलेही जातात. काही दिवाळी अंक तर अलीकडे पाणी, सोने, गड किल्ले, नातेसंबंध इत्यादी विषयांवर दर वर्षी स्वतंत्र विषय घेऊन त्याचा विशेषांक काढत असतात. काही संपादक आता तर जाहिराती जास्त व त्याला तोंडी लावायला साहित्य अशी अवस्था आहे.

दिवाळी अंकांना बँकांच्या जाहिराती यंदा मिळालेल्या नाहीत. टाळेबंदीत बरेच नुकसान सोसल्याने खासगी कंपन्यांनीही हात आखडता घेतला. दिवाळी अंकांच्या संपादकांना स्नेहसंबंधांतून मिळालेल्या जाहिरातींवरच अवलंबून राहावे लागले आहे. गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून कोविडच्या प्रादुर्भावामुळे सर्वच पुस्तकांची व नियतकालिकांची छपाई बंद होती. प्रकाशकांच्या अडचणी आणि इतर समस्यांमुळे जो पुस्तकांचा खप आहे तो मंदावला असे म्हणता येईल. याचाच परिणाम या वर्षीच्या दिवाळी अंकांवर मोठ्या प्रमाणावर दिसून येणार आहेत. दोन वर्षे लागोपाठ जागतिक कोरोना संकट टाळेबंदीचा फटका दिवाळी अंकांनाही बसल्याचे सांगितले जाते आहे.  साहित्य फराळाची शतकी परंपरा सांगणाऱ्या दिवाळी अंकांकडे जाहिरातदारांनी पाठ फिरवली आहे. 'कोरोना'मुळे बाजारात दिवाळी अंक येणार नाहीत असे वातावरण तयार होत असतानाही आलेल्या इतर अनेक संकटांवर मात करीत, नवी जिद्द बाळगत, निराशेचे ढग बाजूला करीत गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही अनेक दिवाळी अंक तयार होऊन बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे.  'हल्ली जाहिराती मिळत नाहीत, त्या मिळाल्या तरी मागाहून त्यांचे पैसे वसूल करणे फार जिकीरीचे होते', 'वाढत्या किंमती आणि घटता वाचक या दुष्टचक्रामुळे आता अंक काढणे परवडत नाही', अशा तक्रारी कानावर येतात. या तक्रारी खोट्या आहेत, असे नाही. मात्र, तरीही पाचशेच्या घरात अंक निघतात आणि दिवाळी अंकांची परंपरा सुरू राहावी यासाठी संपादक, लेखक सतत प्रयत्न करतात हेही तेवढेच महत्त्वाचे. आता काही दिवसांपासून कुठे आपल्या भारतात जनजीवन सुसह्य होऊ पाहत आहे. परंतु जगभरात करोनाची साथ चालू आहेच,  महाराष्ट्रामधे गेल्या वर्षभरात वादळ आणि पावसाच्या  महापूराने थैमान घातलेले आपण अनुभवले  आहे. निसर्ग सर्व बाजूंनी असहकार करत असताना संकटांच्या काळात मनुष्याला सकारात्मक रहाण्यासाठी, आलेल्या संकटांशी झुंजण्यासाठी, मनाला पुन्हा उभारी येण्यासाठी साहित्य महत्वाची भुमिका बजावत असते. कोरोनाची टाळेबंदी, समुद्री वादळ, ढगफुटी पावसामुळे अनेक ठिकाणी आलेले महापूर व  विस्कळीत झालेले जनजीवन या पार्श्वभूमीवर ही स्थिती अपेक्षित असूनही संकटाच्या काळातही मराठी भाषेतील दिवाळी अंकांची ही भव्य परंपरा, आपले सांस्कृतिक वैभव जपले जावे  केवळ परंपरा खंडित होऊ नये या  हेतूने प्रकाशकांनी दिवाळी अंकांची निर्मिती केली आहे. तुम्हा-आम्हा वाचकांना वैचारिक मेजवानी उपलब्ध करून दिली जात आहे हे नक्कीच कौतुकास्पद आहे.  साहित्य त्याच्या थकलेल्या मनाला विरंगुळा देतेच देते पण त्यासोबत हे ही दिवस जातील आणि पुन्हा ताठ कण्याने उभे रहाण्याची आशा आणि इच्छा जागृत करुन संकटकाळात धीर आणि दिलासा देते.

तंत्रज्ञानाच्या युगात रोज नवनवीन बदल होत आहेत. अनेक गोष्टीत थोड्याबहुत प्रमाणात ते बदल अनुभवता येत आहेत. असाच बदल डिजिटल जगात होतोय. पहिला ‘डिजिटल’ स्वरूपातील दिवाळी अंक २००० मध्ये प्रसिद्ध झाला होता. ‘ऑनलाइन’ प्रकाशित झालेल्या घटनेला यंदा बावीस र्वष पूर्ण होत आहेत. एकवीस वर्षापूर्वी कोणी कल्पनासुद्धा केली नसेल की, इंटरनेटच्या आणि समाज माध्यमांच्या या युगात आपण पुस्तके आपल्या हातातील मोबाईलवर वाचू शकू. पण प्रत्येक दशक आपल्या बदललेल्या काळाची भाषा बोलत असतं. डिजिटल रूपात संगणकावर, मोबाइलवर आणि किंडल किंवा टॅब्लेटवर वाचता येणारे दिवाळी अंक, ऑडिओ बुक दिवाळी अंक, व्हिडीओ रूपात संवाद साधणारे दिवाळी अंक अशी एक नवी परंपराच सुरू झाली आहे.  या परंपरेनं जसं लोकप्रिय साहित्य जगभरातल्या मराठी भाषकांना तळहातावर उपलब्ध करून दिलं, तसंच यातून अनेक नवे लेखक घडवले आहेत. तो म्हणजे पुस्तके, मासिके, पाक्षिक नियतकालिके यामध्ये. तसेच प्रकाशित होणार्‍या आजच्या दिवाळी अंकांमध्ये सुद्धा ई-जगातला बदल पाहायला मिळतोय. पारंपरिक छापील दिवाळी अंकांचा आनंद घेतानाच नव्या माध्यमातील प्रयत्नांचंही स्वागत टेक्नोसॅव्ही नवीन पिढीने करायला हवे.

 भाषा आणि संस्कृती एकमेकींच्या हातात हात घालून वाटचाल करतात, एखादी भाषा नष्ट होते तेव्हा शेकडो वर्षांच्या संचितातून साकार झालेली, संपन्न झालेली संस्कृतीही लयाला जाते. आपल्या पूर्वसूरींच्या श्रमातून, कौशल्यातून, बौद्धिक-सामाजिक मंथनातून आकाराला आलेली अशी संस्कृती आपल्या डोळ्यांदेखत संपू नये असे वाटत असेल तर त्या संस्कृतीच्या खुणा आणि प्रतीक म्हणून जे उरले आहे ते जपणे, वृद्धिंगत करणे हे आपले कर्तव्य आहे याची जाणीव मराठी भाषिक अस्मिता म्हणून आपल्याच मुळा-नातवंडांमध्ये रुजवायला हवी. 

मराठी भाषा जगवा, समृद्ध करा. मराठी माध्यमाच्या शाळा ओस पडत आहेत, बंद होत आहेत. शतकी परंपरा असूनही मराठीला अभिजाततेचा दर्जा मिळत नाही. इंग्लिश माध्यमांच्या शाळांत मराठी भाषेची सक्ती करा अशा घोषणा आणि चर्चा आपण अधूनमधून करीत असतो. शंभर वर्षात अनेक आक्रमणे पचवत आणि स्वीकारत आजही चारशे-पाचशेच्या आसपास प्रसिद्ध होणारे दिवाळी अंक मराठीची पताका खांद्यावर घेऊन मिरवत आहेत. दिवाळी अंकांची ही परंपरा तशीच सुरू रहावी यासाठी प्रत्येक मराठी माणसाने आपला वाटा उचलणे गरजेचे आहे. मराठी भाषा जगवायची असेल, तिचं स्थान भक्कम करायचं असेल, तर आज आपण सर्वांनी निश्चय करणे गरजेचे आहे. 

महागडे मोबाईल आणि टी व्ही ने आपली संस्कृती बिघडवण्याचा घाट घातला आहे, पण दिवाळी अंक मराठी माणसांची सांस्कृतिक भूक भागवित आहेत. अभिरुची वाढविताहेत, मराठी वाचक वाढविताहेत त्याबद्दल ह्या अंकांच्या संपादकांना  धन्यवाद द्यायलाच हवेत. त्याचवेळी, दिवाळी अंक प्रकाशकांनी आता नव्या जगातील नव्या माध्यमांशी मैत्री करणेही गरजेचे आहे. दिवाळी अंक हे केवळ मनोरंजनाचे साधन नाही, तर ती स्वतःला समृद्ध करण्यासाठीची ती एक पर्वणी असते. कायदा न करता तिच्या संवर्धनासाठी आत्मीयतेने  मराठी वाचूया, बोलूया आणि लिहूया !

 रवींद्र तुकाराम मालुसरे,  अध्यक्ष

मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई

९३२३११७७०४  

शनिवार, २३ ऑक्टोबर, २०२१

वै ह भ प मुरलीधर ढवळे गुरुजी माणूस घडवणारा शिल्पकार

वै ह भ प मुरलीधर ढवळे गुरुजी
माणूस घडवणारा शिल्पकार  

माणूस बदलवण्याच्या प्रक्रियेत प्रबोधनाचा वाटा फार मोलाचा असतो, गेल्या हजारो वर्षांपासून वारकरी संप्रदायातील लाखो प्रवचनकार- किर्तनकारांनी आणि ज्ञानदान देणाऱ्या गुरुजनांनी प्रबोधन करीत माणसांना सन्मार्गावर आणण्याचे काम केले आहे. फरक इतकाच असतो की शिल्पकार आपल्या डोळ्यासमोर एखादे शिल्प घडवतो आणि शाळा शिक्षकाच्या माध्यमातून तर वारकरी सत्संगाच्या माध्यमातून आपल्यातला माणूस नकळत घडवत असतो.
शिक्षण आणि वारकरी कीर्तन या दोन क्षेत्राचा अवलंब करीत गेल्या वर्षापर्यंत म्हणजे वयाच्या ९१ व्या वर्षांपर्यंत कार्यरत असणारे पोलादपूर तालुक्यातील रानवडी बुद्रुक या गावचे वै ह.भ.प. मुरलीधर गेणू ढवळेगुरुजी यांनी आयुष्यभर हेच काम केले.आज त्यांच्या जन्मदिनी त्यांच्या कार्याचे महत्व आणि गरज अधिक ठळकपणे अधोरेखित व्हावी यासाठी हा लेखनप्रपंच !
समाजाला सुशिक्षित व सुसंकृत करणारा 'आधार' म्हणजे शिक्षक आणि कीर्तनकार ! पोलादपूर तालुक्यातील जणू पितामह असलेल्या गुरुजींनी असिधाराव्रत म्हणून या दोन्ही प्रांतातील भूमिका देह ठेवेपर्यंत निष्ठेने केल्या.
शिक्षण देणे हे आपल्या जीवनाचे धेय्य आहे आणि ज्ञानदानाचे समर्पण करणे हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे हे मनोमन स्वीकारलेल्या गुरुजींच्या दोन्ही कार्याची महानता भावी पिढीला आदर्शवत अन प्रेरणादायी ठरेल अशीच आहे.
शिक्षणाने व्यक्तीला समाजात राहायला शिकवले पाहिजे, हे स्पष्ट करताना डॉ. राधाकृष्णन म्हणतात. 'The importnace of education is not only in knowlege and skill but it is to help us to live with other's. आज माणूस एकेकापासून तुटत चालला असताना हा विचार किती मोलाचा आहे. या त्यांच्या विधानावरून 'विद्वान सर्वत्र पूज्यते' या वचनाची प्रचिती येते. वर्तमान काळात 'शिक्षक' हे केवळ अध्यापनकर्ता न राहता ते 'मार्गदर्शक', समुपदेशक देखील असले पाहिजेत. शिक्षकांचे व्यक्तिमत्व जितके विनयशील, संपन्न, व्यासंगी तितका परिणाम विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर व विद्यार्थ्यांना मिळणार्‍या प्रेरणेवर होत असतो म्हणून तत्त्वज्ञान कितीही बदलले अध्ययन, अध्यापनाच्या प्रक्रियेत बदल झाला तरी गुरुजींसारख्या संस्कारक्षम शिक्षकांचे महत्त्व कमी होणार नाही.

२२ ऑक्टोबर  १९३० साली रानवडी येथील शेतकरी गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे पहिली ते दुसरी शिक्षण रानवडी बुद्रुक येथील खाजगी शाळेत. तिसरी ते चौथी शिक्षण कापडे येथील सरकारी शाळेत, पाचवी ते सातवी महाड येथे त्यानंतर पी.एस.सी. परीक्षा सन १९४७ साली पास झाले. त्या काळातील हे शिक्षण त्यांना एखादी चांगली सरकारी नोकरी देऊ शकले असते. परंतु स्वतःचे शिक्षण घेतानाच त्यांना एक विचार मनोमन पटला होता. तो म्हणजे शिक्षण हे संस्कृती संवर्धनाचे साधन आहे, तर शिक्षक हा संस्कृतीचा साधक आहे. त्या दृष्टीकोनातून त्यांनी १९४८ साली स्वतःहा रानवडी येथे शाळा स्थापन करून गावातल्या मुलांना शिक्षण देण्यास सुरुवात केली.

माणसाने पावले दूरदृष्टीने टाकली तर भरारी घ्यायला वेळ लागत नाही, या पावलांना जर नम्रतेची जोड असेल तर रोवलेले पाय अधिक कटिबद्ध होतात एवढे मात्र खरे. गुरुजींनी अशीच वाटचाल सुरू केली, या शाळेला व्हॅलेंटरी शाळा म्हणून चालवल्यानंतर १९५५ मध्ये ही शाळा सरकारने स्कुल बोर्डाकडे वर्ग केली. १९६० पर्यंत रानवडी शाळेवर काम केल्यानंतर सन १९६०-६१ पनवेल येथे ते पुढील ट्रेनिंग घेऊन पास झाले. तदनंतर १९७२ ते १९८१ घागरकोंड आणि १९८१ ते १९८७ पर्यंत रानवडी येथे त्यांची नेमणूक झाली. १९८८ ला घागरकोंड येथे मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर ते सेवानिवृत्त झाले.

ज्या ज्या शाळेत त्यांनी अध्यापनाचे काम केले त्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी दर्शनी भागावर प्रथम लिहिले, "यावे शिक्षणासाठी जावे सेवेसाठी" माणसांचं मोठेपण तो किती मोठा झाला यापेक्षा त्याने किती लोकांना मोठे केले यावर त्यांचे मोठेपण मोजले जाते. गुरुजींनी त्यांच्या हयातीत विद्यार्थ्यांच्या आणि वारकरी क्षेत्रातील लोकांच्या संदर्भात नेमकं हेच केलं. जो त्यांच्या सहवासात आला तो सद्गुणांनी मोठा कसा होईल हे पाहिले त्यांनी जणू हे व्रतच स्वीकारलं होतं.

नावारूपाला आलेले इतर पुष्कळ असतात, पण एव्हढ्या पावित्र्यानं, एवढ्या मंगलतेने ढवळे गुरुजींनी आपल्या आयुष्याकडे पाहिले, की आपलं जीवन नुसते जगणे न ठरता इतरांसाठी प्रेरणा ठरेल. कुटुंब कल्याण, आदिवासी बांधवाना साक्षर करणे, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्कॉलरशिपसाठी प्रयत्न करणे अशी अनेक उदाहरणे सामाजिक बांधिलकीची त्यांच्या बाबत सांगता येतील.

शाळा ही एकाच छापाच्या विटा भाजून काढण्याचा कारखाना होऊ नये तर प्रत्येक विद्यार्थीरूपी शिल्प स्वतंत्ररीतीने घडावे याकडे गुरुजींचा कटाक्ष असे. जीवन आणि शिक्षण यांची फारकत त्यांनी कधी मान्य केली नाही. शिक्षणातून नेहमी श्रमाची प्रतिष्ठा, ग्राम स्वच्छतेचे महत्व, पर्यावरण, समाजातला बंधुभाव, साधेपणाने जगण्याची वृत्ती अंगी कशी बाणवावी त्या अनुषंगाने त्यांनी प्रयत्न केला. शिक्षणाच्या ध्यासातून आपला दिवा वादळात देखील जपून ठेवणारे गुरुजी एक खंत माझ्याकडे नेहमी बोलून दाखवीत ती म्हणजे आजच्या पालकांना आपल्या मुलांनी डॉक्टर, इंजिनिअर, सनदी अधिकारी होणे श्रेयस्कर वाटते. त्यासाठी त्यांना उत्तम शिक्षक आणि शिक्षण हवे असते, पण आपल्या व आपल्या मुलांची स्वप्ने पूर्ण करणारा त्यापैकी कुणी उत्तम शिक्षक व्हावा असे मनापासून वाटणारे फार कमी आहेत.

लहानपणापासूनच त्यांना परमार्थाची आवड होती. पोलादपूर तालुक्यातील वारकरी संप्रदायाचे अर्ध्वर्यू वै ह भ प रामचंद्र आ तथा ढवळे बाबा यांच्याकडून आदेश आल्यानंतर महाराष्ट्रातील शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या श्रीगुरु बाबासाहेब आजरेकर फड (पंढरपूर) ते माळकरी झाले. आळंदी ते पंढरपूर अशा १५ पायी वाऱ्या त्यांनी केल्या. अनेक धार्मिक ग्रंथांचे वाचन आणि अभ्यास केल्यानंतर १९६१ सालापासून कीर्तन सेवेस प्रारंभ केला. सात दशके कीर्तन प्रवचन हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला होता. संकट असो, दुःख असो, प्रवासात शारीरिक किंवा मानसिक व्यथा असोत, 'रामकृष्ण हरी' म्हणायला सुरुवात केली. आणि त्यांचे दैवत पांडुरंगाचे नामस्मरण केले की, कोणत्याही व्यथेचा त्यांच्या चेहऱ्यावर लवलेश दिसत नसायचा असे त्यांच्याच गावातील त्यांचे सहकारी रायगड भूषण सुप्रसिद्ध भजनी गायक पांडुरंग बुवा उतेकर हे सांगतात. रायगड जिल्हा, सांगली, मिरज, पंढरपूर, आळंदी, देहू, रत्नागिरी, सातारा येथे त्यांची शेकडो कीर्तने झाली आहेत. त्यांचे कीर्तन म्हणजे भक्तिरसाचा खळखळणारा प्रवाह. अभंगांचे मधुर व प्रभावी गायन, त्यातील प्रत्येक शब्दाच्या अर्थछटा उलगडून सांगण्याची विद्वता यामुळे त्यांचे कीर्तन ऐकणे म्हणजे एक अलौकिक अनुभूती असते. जितका मोठा कार्यक्रम तितके त्यांचे कीर्तन रंगून जात असे. समोर विद्वान अथवा मोठी माणसं आहेत म्हणून ते कधी बावरलेत अथवा आता काय सांगावे असा विचार त्यांनी कधीच केला नाही. कीर्तन प्रवचनासाठी बसलेला समाज बघून त्याप्रमाणे ते निरूपण करीत असल्याने त्यांच्या कीर्तनातले प्रत्येक वाक्य प्रत्येकाला भावते. श्री पांडुरंग चरणी ते इतके एकरूप झालेले असतात की, 'ते वर्तत दिसती देही | परी ते देही ना माझ्या ठायी || अशी त्यांची अवस्था होत असे. ज्या आजरेकर फडाची वारकरी परंपरा त्यांनी हयातभर जोपासली त्यावर त्यांची दृढ श्रद्धा होती. त्याकरिता त्यांनी आपले तन-मन-धन अर्पण केले. अविचाराने, अव्यवहाराचे आणि अविश्वासाचे वातावरण प्रदूषणमुक्त करायला संतविचारांचा मारा या भूमीवर सातत्याने घातला गेला पाहिजे यासाठी आपले वृद्धत्व जाणवत होते तरी ते कीर्तन सेवेच्या माध्यमातून व्यसनमुक्त समाजात चांगला माणूस घडावा या हेतूने त्यांचे 'घडो कीर्तन सेवा सदैव या हाती' या उक्तीप्रमाणे त्यांचे भ्रमण अविरत सुरु होते यादृष्टीकोनातून त्यांनी केलेल्या कार्यावर नजर टाकली, तर त्यांच्या कर्तृत्वाची जाणीव होते.


मागच्या एका भेटीत आधुनिक शिक्षण, शिक्षक आणि विद्यार्थी यासंदर्भात ढवळे गुरुजींशी साकल्याने चर्चा झाली. जग आणि आधुनिक शिक्षण पद्धती झपाट्याने बदलत असल्याचे त्यांनी मत मांडले. याविषयी बोलताना ते म्हणाले, विद्यार्थी जसा निव्वळ परीक्षार्थी असता कामा नये तसा, शिक्षकही निव्वळ 'अर्थार्जनाचे' साधन म्हणून शिक्षण क्षेत्राकडे पाहणारा असता कामा नये. 'शिक्षक' असण्याची पहिली अट 'विद्यार्थी' असणे हीच आहे. 'शिक्षक' केवळ 'पोपटपंची' करणारा, प्रश्नांना वावच न देणारा असेल तर अर्थपूर्ण ज्ञान-व्यवहार संभवणार नाही. शिक्षक-विद्यार्थी परस्परपूरक असावेत. 'चांगला' शिक्षक विद्यार्थ्यांना विचारप्रवृत्त करतो. माहिती तंत्रज्ञानाचा 'विस्फोट' झालेल्या काळात विद्यार्थी पूर्वीसारखा माहितीसाठी शिक्षकांवर अवलंबून राहिलेला नाही. माहिती देण्यासाठी सुसज्ज वाचनालयापासून ते माहिती महाजालापर्यंत अनेक साधने आज सहज विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली आहेत. त्या साधनांची योग्य ती 'दिशा' त्यांना खुली करून द्यावी लागेल. विद्यार्थी त्यामुळे भटकणार नाही. झपाट्याने बदलणार्‍या काळात सतत अद्ययावत राहणे हे शिक्षकांसाठी देखील गरजेचे बनले आहे. काळाची नवीन आव्हाने पेलण्यासाठी शिक्षक-विद्यार्थी दोघांनाही आता स्वतःला परस्परपूरक व समर्थ केलेच पाहिजे. शिक्षकांना वैदिक काळापासूनच गुरूचे स्थान आहे. त्यांच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही. आज शिक्षणाचे अवमुल्यन केला जात असल्याचे चित्र समाजात दिवस आहे. आमच्यावेळी हे कॉम्प्युटर - मोबाईल नव्हते पण मान मर्यादा आणि पावित्र्य होते. गुरू-शिष्य संबंधांमधील ती पवित्र भावना सध्या लोप पावत आहे.

१८ मे १९२० रोजी .गुरुजींचे दुःखद निधन झाले. संबंध आयुष्य भर शाळेतील विद्यार्थ्यांना व कित्येक परमार्थ साधकांना व समाजातील अनेकांना संसाररुपी भव सागरातून तरुन जाण्यासाठी दिशा दर्शक दीपस्तंभ बनून  त्यांनी काम केले.

‘विठ्ठल नामाची शाळा भरली॥ शाळा शिकताना तहान भूक हरली…॥’ अशा पवित्र वातावरणात
वारकरी संप्रदायाच्या सेवाधारी गुरुजींच्यामध्ये विचारांची आणि भावनेची श्रीमंती होती, त्याचप्रमाणे त्याग, निष्ठा, सहिष्णुता, औदार्य असे गुणही होते.


पोलादपूर तालुका हा वारकऱ्यांचा तालुका म्हणून ख्याती आहे. अगोदरच्या पिढीतील फक्त निखळ परमार्थ करणारा आणि सांगणारी गुरुजींरूपी जीवनज्योत जरी विझली असली तरी त्यांच्या सेवाकार्याचा दीपस्तंभ अध्यात्म मार्गातील नवतरुणांची वाटचाल सतत उजळवीत राहील, आज त्यांच्या जन्मदिनाच्या स्मृतींच्या प्रकाशात मात्र प्रत्येकाने आपली वाट शोधायला हवी.


- रवींद्र मालुसरे
अध्यक्ष
मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई       

शुक्रवार, १५ ऑक्टोबर, २०२१

वाचन प्रेरणा दिन

 वाचनाचे महत्त्व

वाचन’ ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे हे खाली दिलेल्या मुद्द्यावरून अधिक स्पष्ट होईल :- 

💐रवींद्र मालुसरे (अध्यक्ष-मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई)💐

वाचन प्रेरणा दिवशी विजयादशमीचा सुवर्णयोग. चला वाचूया.. विचारांचं आणि ज्ञानाचं सोनं लुटुया.

आपण लिहिलेलं प्रत्येक वाक्य भविष्यात अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरू शकतं. 

भविष्यातल्या असंख्य वाचकांसाठी लिहिते व्हा, व्यक्त होत रहा, प्रेरणा देत रहा.

वाचन म्हणजे जीवनाला उन्नत करणारी बाब असून यामुळे बुद्धीची मशागत होते. माणसाचे जीवन फुलविण्यात वाचनाचा महत्वाचा वाटा असतो. यामुळे वाचनाचा छंद जोपासून आपले जीवन समृद्ध करा. त्याचप्रमाणे जगण्याच्या परिपूर्णतेसाठी वाचन हे आवश्यक आहे. ज्ञानात वाढ करण्यासाठी वाचन हा एकमेव मार्ग आहे. केले आहे.

» ज्या देशात मोठी ग्रंथालये असतात, तोच देश मोठी प्रगती करू शकतो. भारतात आजही वाचन संस्कृती आणि ग्रंथालय यांच्या विकासाला पुरेसे महत्व दिले जात नाही 
» आजची लहान मुले देशाचे भवितव्य आहेत. आज जर त्यांचा वर्तमान चांगला असेल; तर देशाचे पुढील भविष्यही चांगलेच असेल. त्यासाठी लहान मुलांना चांगल्या सवयी असणे आवश्यक आहे. त्यामध्ये त्यांना वाचनाची सवयी लागणे अगत्याचे आहे.
» एकदा एक व्यक्ती इंग्रजी लेखक जॉर्ज बर्नाड शॉ यांच्या घरात गेली घरातील इतस्तत: पडलेली भरपूर पुस्तके पाहून त्यांनी ती बुकशेल्फ मध्ये का ठेवली नाही अशी विचारणा केली ? तेव्हा ते लेखक म्हणाले - ज्या मार्गान मी ही पुस्तके जमविली आहेत, त्या मार्गाने बुकशेल्फ जमवायला गेलो तर तुरुंगात जाईन मी. याचा अर्थ त्यांनी बरीच पुस्तके ग्रंथालयातून चोरून आणून आपला वाचनाचा छंद जोपासला होता हे यावरून लक्षात येते.

» "Shakespare read the novel 'Plutarck' and got inspired by it and started his carrier as Author. He had also read poet Milton Homer and Orids Literature."

» Author Bitcher says that if you make a book as you teacher, they will guide you how to show strength, hardwork to succeed in your life.

» Mr. George Eliot spent his many years in reading Novels.

» When you give someone a book , you do not give him just paper, ink & glue, but you give him a chance to make the possible of a whole new life. ~ Christoper Morley

» No man can be truly educated in life, unless he is a reader of books. ~ Bejamin Franklin

» A room without books is like a body without sole. ~ Cisero

राजसत्तेतल्या कारभारणी ..... महाडच्या पहिल्या नगराध्यक्षा : स्नेहल माणिकराव जगताप

राजसत्तेतल्या कारभारणी .....

महाडच्या पहिल्या नगराध्यक्षा : स्नेहल माणिकराव जगताप


स्नेहल माणिकराव जगताप ... महाडचे एक कल्पक नेतृत्व, धाडसी निर्णय क्षमता घेणारे उमदे व्यक्तिमत्त्व, आणि माणिकराव जगताप तथा आबाची राजकारणातली 'सावली; म्हणून ओळखली जाणारी त्यांची कन्या. याशिवाय अल्पावधीतच महाड-पोलादपूर-माणगाव या तालुक्यातील जनतेच्या मनामनात घर करणाऱ्या, कार्यकुशल आणि प्रचंड मेहनती वृत्ती असणाऱ्या राजकारणातील कारभारीण....

महाड हे शहर पूर्वीपासून एक व्यापारी बंदर म्हणून प्रसिद्ध होते. त्यावेळी श्री. वीरेश्वर देवस्थानच्या  गाडीतळावर मोठ्या प्रमाणावर व्यापार होत असे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली राजधानी रायगड किल्ला निवडल्यानंतर तर मराठ्यांच्या इतिहासात महाडचे भौगोलिक महत्व अधिक वाढले हा इतिहास आहे. त्यानंतर तर छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ बाबासाहेंब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाड शहराला ऐत्याहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीचा इतिहास वारसा लाभत गेला त्यात अधिकाधिक भर पडत गेली. 

महाड-पोलादपूर हा मतदारसंघ हा तसा राजकीय दृष्ट्या संवेदनशील असा हा मतदारसंघ आहे. पुर्वी महाड - पोलादपूर या मतदारसंघाची हा "समाजवाद्यांचा" मतदारसंघ अशी ओळख होती. क्रांतिवीर नाना पुरोहित, मोहन धारिया, नानासाहेब कुंटे, किशोर पवार, शांतारामभाऊ फीलसे, अशी समाजवादी नेत्यांनी नेतृत्व केले आहे. श.बा सावंत, चंद्रकांत देशमुख आणि माणिकराव जगताप अशी काही वर्षे काँग्रेसची सोडली तर १९९० नंतर हा "शिवसेनेचा" मतदारसंघ झाला. अगदी अपवादात्मक परिस्थितीत येथे काँग्रेसला यश मिळाले. महाड विधान सभा मतदार संघ हा कायम काँग्रेस विरोधी विचारांचा राहिलेला आहे. चंद्रकांत देशमुख, व माणिकराव जगताप यांना सोडले तर पुन्हा कधी या मतदार संघांत यश मिळविता आले नाही. एकदा तर सम-समान मत झाल्यामुळे चिठ्ठीवर टाकून इथला आमदार निवडला गेला होता.

गेली पंधरा वीस वर्ष या प्रतिकूल मतदारसंघात काँग्रेसचा झेंडा हातात घेऊन माणिकराव जगताप उभे होते. महाड तालुक्यातील वेगवेगळ्या जिल्हा परिषद मतदारसंघातून ते तीन वेळा यापूर्वी निवडून आले आहेत.  २००४ चा अपवाद सोडला तर विधानसभा निवडणुकीत यश त्यांना हुलकावणी देत राहिले आहे. पण त्यांनी जिद्द सोडली नव्हती,  एकदा एखाद्या उमेदवाराचा पराभव झाला किंवा तो निवडणुकीच्या राजकारणातून थोडा बाजूला झाला तर कार्यकर्त्यांचा ओघ कमी होत जातो. पण काळाच्या ओघात जेव्हा 'माजी' हा शब्द राजकारण्यांच्या मागे जेव्हा लागतो तेव्हा प्रवाहापासून माणसे दुर होत जातात, माणसांच्या गर्दीला ओहोटी लागते पण माणिकरावांना जनतेचे निर्व्याज्य प्रेम सतत लाभत आले होते. अशा प्रभावशाली राजकारण्याच्या घरी जन्माला आलेल्या स्नेहलजींना राजकारणाचे बाळकडू घरूनच मिळाले. माणिकराव जगताप यांच्या त्या सुविद्य कन्या. महत्वाच्या चर्चेसाठी घरी येणाऱ्या राजकारणातील मान्यवरांचा सहवास मिळाला त्यातूनच त्यांचे राजकीय शिक्षण झाले.शिक्षण होईपर्यंत स्नेहलताई राजकारणापासून दूरच राहिल्या. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी मुंबईतील शारदाश्रम विद्या मंदिर मध्ये माध्यमिक तर कीर्ती महाविद्यालयातून बी.एसी.एल.एल.बी शिक्षण घेतल्यानंतर अलिबागच्या एल.एल.बी. जे.एस. एम कॉलेज मधून पदवी संपादन केली.

मात्र २००९ च्या विधानसभा निवडणुकीपासून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. सुरुवातीला महाड शहरात सामाजिक कार्याला सुरुवात केली. आणि  नंतर त्या अनेक सामाजिक आणि राजकीय व्यासपीठावर दिसू लागल्या. २०१६ मध्ये त्या थेट महाड नगरपरिषदेच्या निवडणुकीत उतरल्या आणि मोठा विजय मिळवला. या विजयानंतर खऱ्या अर्थाने स्नेहलजींच्या राजकारणाराला सुरुवात झाली.

सर्वांना हसत-खेळत आपलसे करून मिळून-मिसळून राहणाऱ्या,ऐतिहासिक महाड शहराच विकासात्मक कायापालट करण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या, कर्तृत्व, वकृत्व, नेतृत्व आणि दातृत्वाचं कमालीचं समीकरण असणाऱ्या महाड नगर परिषदेच्या कार्यसम्राट नगराध्यक्षा म्हणून गेल्या ४ वर्षात स्नेहल माणिक जगताप यांनी आपला ठसा उमटवला आहे.

महाडच्या १५० वर्षाच्या नगरपालिका इतिहासात प्रथमच जनतेतून निवडून आलेल्या त्या पहिल्या महिला उमेदवार. आणि त्यासुद्धा महाराष्ट्रात सर्वात कमी वयाच्या महिला नगराध्यक्ष ठरल्या आहेत. महाड शहराचा आपल्या कारकिर्दीतला पहिला अर्थसंकल्प मांडताना नगरपालिका निवडणुकीत प्रचाराच्या काळात महाडकरांना देण्यात आलेल्या जवळपास प्रत्येक आश्वासनाची पूर्तता अर्थसंकल्पात केली. त्यामध्ये राजमाता जिजाऊ कन्यारत्न योजना (१०लाख),महाडकरांचा विमा (१५लाख),महाड शहरात वायफाय सुविधा(१५लाख), महिलांसाठी इ टॉयलेट (१५लाख),महाड शहर सुशोभीकरणासाठी

१ कोटी २५ लाख मंजूर केले. आणि हा अर्थसंकल्प सादर करताना कोणतीही करवाढ केली नाही. आपल्याला नगराध्यक्षपदाची संधी मिळाल्यास पाच वर्षात महाड शहराचा कायापालट करण्याची ग्वाही आपण निवडणूक प्रचाराच्या काळात महाडकरांना दिली होती. त्याची पूर्तता आपण केली आहे असे त्यांच्या भाषणात त्या म्हणाल्या तेव्हाच महाडकरांना भविष्यात चांगले दिवस येतील हे दिसू लागले. आणि याची प्रचिती लवकरच आली. नगरपालिकेतील चांगल्या कामगिरीमुळे अहमदनगरच्या "सह्याद्री समूहाच्या वतीने  "सह्याद्री राज्यकर्ता पुरस्कार-२०१७" गौरविण्यात आले. तर केंद्र आणि राज्य सरकारच्या स्वच्छता अभियान कार्यक्रमात रायगड जिल्ह्यात प्रथम आणि कोकणात दुसरा क्रमांकावर घेत शासनाकडून ५ कोटीचे बक्षीस सुद्धा पटकावले. महाड शहरात जनतेला स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात यावा यासाठी क्लोरियशन यंत्रणा कार्यान्वियत केली आहे.

राजकारणाचा वारसा असतानाही स्नेहल यांनी स्वबळावर आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. मोठी राजकीय पार्श्वभूमी असतानाही त्यांनी नेहमीच माणसे जोडण्याचे काम केले. संवेदनशील स्वभावामुळे लोकांचे प्रश्न वेगाने मार्गी लागावेत यासाठी त्या अनेकदा संबंधितांशी स्वतः संवाद साधतात. प्रश्न समजून घेत असतात आणि ते तातडीने उपाययोजना होत मार्गी कसे लागतील याच्या प्रयत्नात राहतात. महाड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य व केंद्र शासनाकडून जास्तीत जास्त निधी उपलब्ध व्हावा यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले, त्यांचे वडील आणि राजकारणातील 'गॉडफादर' माणिकराव जगताप यांचे नुकतेच कोरोनामुळे दुःखद निधन झाले आहे.



 त्यांच्याबद्दल तरुणांमधल्या मोठ्या वर्गाला त्यांच्याविषयी आकर्षण होते, त्यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व पुन्हा एकदा करावे अशी इच्छा अलीकडे जोर धरू लागली होती. आणि त्यांना संधी मिळाली तर अभ्यासू वृत्तीने आपले वडील नक्की विकासाच्या दृष्टीने या मतदारसंघात ते बदल घडवून आणतील असा विश्वास स्नेहलजींना होता. कोणत्याही पदावर नसताना हा विश्वास जनतेत टिकुन ठेवणं ही माणिकरावांची मोठी जमेची बाजू होती आणि हीच जिद्द एकदिवस त्याना नव्याने हि संधी मिळवून देण्यासाठी स्नेहलताई भविष्यात कठोर परिश्रम घेणार होत्या, मात्र नियतीच्या मनात वेगळेच होते. वयाच्या ५४ व्या वर्षी माणिकरावांनी हे जग सोडले. त्यांच्या निधनाने रायगड जिल्ह्यासह कोकण आणि राज्यात कार्यकर्ते आणि जनतेवर दुःखाचा डोंगर कोसळला. एक रुबाबदार व्यक्तिमत्त्व, कुशल संघटक,आक्रमक आणि तडाखेबंद वक्तृत्व काँग्रेसने आणि तमाम जनतेने गमावले. कार्यकर्ते दुःखात असताना त्यांच्या कुटुंबावर एवढा मोठा आघात झाला. असे असताना महाड नगरीच्या नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांनी वडिलांच्या म्हणजेच माणिकराव जगतापांच्या निधनाचे दुःख बाजूला सारून स्वतःला सावरत महाडवर आलेले पुराचे प्रलयंकारी संकट लक्षात घेतले. त्या दुसऱ्याच दिवशी आपल्या कार्यालयात हजर झाल्या. स्नेहल जगतापांचे आगमन कार्यालयात होताच सर्व अधिकारी वर्ग व तेथे असणारे सर्व लोक अवाक झाले होते.


आता मात्र त्यांना स्वतःच्या ताकदीवर दमदारपणे पण सावधानता बाळगत पाऊलं टाकावी लागणार आहेत.

--- रवींद्र मालुसरे

९३२३११७७०४

सोमवार, ११ ऑक्टोबर, २०२१

'अँग्री यंग मॅन' अमिताभ

 


बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन आज ८ वा वाढदिवस.  आपल्या दमदार अभिनयाने अमिताभ बच्चन यांनी चित्रपटसृष्टीवर राज्य केलं. आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी चित्रपटांसाठी व्यतीत केलं आहे. 

बॉलिवूडचा शहनशहा, बिग बी, महानायक अशी अनेक बिरुदं मानाने मिरवणारा हा बॉलिवूडचा बाप..वयाच्या ८ व्या वर्षीही रुपेरी पडद्यावर तितक्याच सशक्तपणे नायकाच्या भूमिकेत वावरणारा आणि प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचून आणण्यात यशस्वी  ठरणारा या रुपेरी पडद्यावरच्या अनभिषिक्त सम्राटाचे मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा  !

'अँग्री यंग मॅन' अशी ओळख असलेल्या अमिताभ यांनी १९६९ च्या दशकापासून सिनेसृष्टीचे रुप पालटले. चार दशकांहूनही अधिकच्या कारकीर्दीत त्यांनी १८० हून अधिक चित्रपटांत काम केले. अमिताभ हे भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वात महान आणि प्रभावशाली अभिनेत्यांपैकी एक मानले जातात. आपल्या कारकीर्दीत बच्चन यांनी अनेक पुरस्कारांवर नाव कोरलं आहे. सर्वोत्तम अभिनेता म्हणून अमिताभ बच्चन यांनी आत्तापर्यंच चार वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार पटकवलाय. अग्नीपथ, ब्लॅक, पा आणि २०१५ मध्ये आलेला पिंकू या सिनेमांसाठी बिग बींना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्याशिवाय त्यांना १४ वेळा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला आहे. सिनेमांसोबतच अमिताभ बच्चन यांनी गायक, निर्माता आणि टीव्ही होस्ट म्हणूनही काम केलं आहे.


भारत आणि जगभरातल्या सात विद्यापीठांकडून अमिताभ यांना डॉक्टरेट  देण्यात आलीय. यात इजिप्तमधल्या अकॅडमी ऑफ आर्ट्स आणि ऑस्ट्रेलिया  क्वीन्सलॅण्ड युनिव्हर्सिटीजचा समावेश आहे. देश-विदेशातले शंभराहून अधिक मानाचे पुरस्कार अमिताभ बच्चन यांच्या नावावर आहेत. भारत सरकारचा पद्मविभूषण  तर फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार अमिताभ यांना प्रदान करण्यात आलाय. लंडनमधल्या प्रसिद्ध मादाम तुसाँ या संग्रहालयात अमिताभ बच्चन यांचा मेणाचा पुतळा समाविष्ट करण्यात आलाय. हा मान मिळवणारे अमिताभ बच्चन हे आशियातले पहिले अभिनेते आहेत.

अमिताभ बच्चन हा महानायक ... पृथ्वीवरचा एकही देश असा नसेल की, महानायकाची ख्याती तिथं पोहोचलेली नाही. जिवंतपणी दंतकथा बनण्याचं भाग्य खूप कमी लोकांना मिळतं. त्यात अमिताभ अव्वल आहेत. त्यांचं रिअल लाईफसुद्धा एखाद्या फिल्मपेक्षा कमी थरारक नाही. सुरुवातीला आलेलं अपयश, त्यानंतर मिळालेलं अमाप यश, त्यानंतर करिअरला लागलेली घसरण, गांधी-नेहरु परिवाराशी दुरावलेले संबंध अशा कधी निसरड्या तर कधी पक्क्या रस्त्यावरुन अमिताभ चालत राहिले. पण हे सगळं सुरु असताना अमिताभ कधी थांबले नाहीत. चलते रहना हा त्यांच्या आयुष्याचा फॉर्म्युला राहिला. कौन बनेगा करोडपती हा शो अमिताभ बच्चन यांच्या करीयरमधला महत्वाचा टप्पा. पडत्या काळाता या टीव्ही शोने त्यांना चांगली साथ दिली. या शोसाठी अमिताभ यांचं एका दिवसाचं मानधन आहे तीन कोटी रुपये. एका सिनेमासाठी अमिताभ बच्चन  तब्बल २० कोटी रुपये मानधन म्हणून घेतात. या वयातही त्यांचा भाव अजिबात कमी झालेला नाही.

अमिताभची उमेदवारीच्या काळातील धडपड, त्याची कारकीर्द सुरू होण्यापूर्वीचा भारतीय चित्रपटसृष्टीचा प्रवास, त्याच्या समकालीन चित्रपटांचं स्वरूप, त्याचा पडता काळ याचं सखोल, हे यापूर्वी अनेकदा लिहून आले आहे. 

हिंदी चित्रपटसृष्टीचा महानायक अशी ओळख असणारे अमिताभ बच्चन यांना सुरुवातीला जंजीर, दिवार या चित्रपटातील विजय वर्मा या व्यक्तिरेखेने खऱ्या अर्थाने ‘अँग्री यंग मॅन’ची ओळख मिळवून दिली. ७२ च्या युद्धानंतर आणीबाणी लादेपर्यंतचा तो काळ म्हणजे व्यवस्थेविरुद्ध खदखद होती. ती सुरुवातीला जंजीर आणि दिवार चित्रपटातील नायक अँग्री यंग मॅन अमिताभच्या रूपाने पडद्यावर लोकांना दिसली, अभिनयाचा तो अंगार आज सुद्धा सिनेरसिकांच्या मनावर ठसलेला आहे. अडल्या-नाडलेल्यांची पिळवणूक करणाऱ्यांना ठोसे लगावणारा कोणीतरी मासिहा अवतीर्ण व्हावा असे लोकांना वाटत होते असा तो काळ. 

सलीम-जावेद यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेला ‘दिवार’ हा चित्रपट सुरुवातीपासून शेवटच्या मृत्यूच्या सीनपर्यंत मनाची पकड घेतो. अमिताभ या चित्रपटामुळे सुपरस्टार झाला तो आजही त्या पदावर विराजमान आहे. 

अमिताभ बच्चन यांनी १९६९ साली 'सात हिंदोस्तानी' या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांच्या अभिनयाच्या प्रवासाला सुरूवात झाली. परंतु 'जंजीर' या चित्रपटाने त्यांना प्रकाशझोतात आणले. त्यानंतर आतापर्यंत त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. त्यानंतर बिग बी यांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत. ७६ व्या वर्षीही अमिताभ यांच्याकडे अनेक चित्रपट येत आहेत. अमिताभ यांनी मोठ्या पडदा तर गाजवला आहे तसेच त्यांनी छोट्या पडद्यावरही आपल्या अभिनयाची भूरळ घातली आहे. रिअलिटी शो 'कौन बनेगा करोडपती' मधील त्यांचे सूत्रसंचालन खूपच लोकप्रिय आहे

दादासाहेब फाळके पुरस्कार या भारत सरकारकडून दिला जातो त्यासाठी अमिताभ यांची दोन वर्षांपूर्वी निवड केली. हा एक वार्षिक पुरस्कार असून भारतीय सिनेमांमध्ये उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या कलाकाराला हा पुरस्कार दिला जातो. सिनेसृष्टीतील त्याच्या योगदानाला सरकारने दिलेली ही कौतुकाची थाप असते. 



- रवींद्र मालुसरे 

अध्यक्ष 

मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई 

९३२३११७७०४


गुरुवार, ७ ऑक्टोबर, २०२१

सामाजिक कार्यकर्तृत्वाची दुसरी माळ

 पहिल्या महिला शास्त्रज्ञ कमला सोहनी



जीवरसायन शास्त्रामध्ये मूलभूत संशोधन करणा-या पहिल्या भारतीय महिला कमला सोहनी या ज्येष्ठ साहित्यिका दुर्गा भागवत यांच्या त्या भगिनी होत.  कमला भागवत-सोहोनी यांचं भागवत घराणं साधी राहणी, उच्च विचारसरणी असं होतं. सर्वच माणसं बुद्धिमान. घेतलेलं काम उत्तमरीत्या तडीस नेणारी. कमलाबाईंचा जन्म १९११ सालचा.  त्यापूर्वी मागच्या पिढीतली त्यांची आजी मॅट्रिक झालेली, इंग्रजीवर प्रभुत्व असलेली होती. मुलींनी शिक्षण घेतलंच पाहिजे, त्यापूर्वी लग्न नाही, या ठाम विचारांची. त्यांच्या नाती त्यांना इंग्रजीबद्दलच्या शंका विचारीत. आत्या, काका घरातले सर्वच लोक उच्च शिक्षण घेतलेले.

दुर्गाबाई, कमलाबाई आणि विमलाबाई तिघीही बहिणी शिकल्या. मुंबई विद्यापीठातून एम.एस्सी. पदवी मिळवणा-या त्या पहिल्या आणि त्या काळातील एकमेव महिला होत्या. तंत्रज्ञान संशोधन शिष्यवृत्ती आणि स्पिंगर रिसर्च शिष्यवृत्ती मिळवल्यानंतर त्यांनी ‘इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, बेंगलोर’ या संस्थेत प्रवेश मिळवला.  इंग्रजांच्या अंकित राष्ट्रातली एक हिंदुस्थानी मुलगी म्हणून त्यांना आपल्या शिक्षणासाठी संघर्ष करावा लागला. इसवी सन १९३३ मध्ये रसायनशास्त्र हा विषय घेऊन त्या पहिल्या वर्गात बी.एस्सी.ची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्यांनी वर्तमानपत्रातीत जाहिरातीनुसार शास्त्रीय संशोधनासाठी बंगलोर येथील 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ़ सायन्स'मध्ये अर्ज केला. टाटांनी १९११ मध्ये स्थापन केलेल्या या संस्थेत प्रवेश मिळणे अत्यंत प्रतिष्ठेचे समजले जाई. प्रवेशासाठी कमलाबाई पूर्णपणे पात्र होत्या, परंतु संस्थेचे प्रमुख, नोबेल पारितोषिक विजेते सर सी. व्ही. रामन यांनी 'मुलगी असल्याने प्रवेश देता येत नाही' असे कमलाबाईंना कळविले. कमलाबाई श्री. रामन यांना प्रत्यक्ष भेटल्या व 'मुलगी म्हणून माझ्यावर होणारा अन्याय मी कदापि सहन करणार नाही,आणि इथे राहून मी संशोधन करून एम.एस्सी. होणारच.' असे ठामपणे सांगितले. श्री. रामन यांनी कमलाबाईंच्या हट्टास्तव त्यांना एका वर्षासाठी प्रवेश दिला. मग वर्षभर कमलाबाईंनी बायोकेमिस्ट्री या विषयाचा झपाटून अभ्यास केला. वर्षअखेर रामन त्यांना म्हणाले. तुमची निष्ठा आणि चिकाटी पाहून असे वाटते की, यापुढे संस्थेत फक्त मुलींनाच प्रवेश द्यावा.'

 जीवरसायनशास्त्रात संशोधन करणाऱ्या डॉ. कमलाबाई सोहोनी यांचा भारतातल्या पहिल्या स्त्री शास्त्रज्ञ म्हाणून सर्वोत्कृष्ट संशोधनाचे पदक राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते २९ एप्रिल १९६० रोजी मिळालं आणि विज्ञान क्षेत्रामध्ये उत्कृष्टता आणि त्यांच्या योगदानासाठीचा शेवटचा राष्ट्रीय पुरस्कार त्यांना १९९७ मध्ये मिळाला. दरम्यान, त्यांनी परदेशात आणि देशातही संशोधनाचं महत्त्वाचं काम केलं. त्यांच्या संशोधनात्मक प्रसिद्ध लेखांची संख्या १५५ इतकी आहे. निवृत्तीनंतरही त्यांनी आपलं सारं आयुष्य अन्नभेसळी विरोधातच काम करण्यात व्यतीत केलं म्हशीचे दूध मातेच्या दुधासमान करण्याची प्रक्रिया शोधणे, दुधातील व कडधान्यांतील प्रथिने शोधणे, निरा पेयाचे परिणाम व उपयोग आणि ताडगुळाविषयीचे त्यांचे संशोधन.

१९३६ मध्ये कमलाचा प्रबंध पूर्ण झाला. तिला मुंबई विद्यापीठाकडून एम.एस्सी.ची पदवी मिळाली. आता पीएच.डी.! तिने जानेवारी १९३७ मध्ये मुंबईच्या हॉफकिन इन्स्टिटय़ूटमधे प्रवेश घेतला. औषधासाठी प्राण्यांचं विच्छेदन करण्याचं काम तिच्याकडे आलं. ते काम करता करता इकडे शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणं चालू होतं. आणि मुंबई विद्यापीठाने तिला दोन शिष्यवृत्त्या दिल्या. ‘स्प्रगर रिसर्च स्कॉलरशिप’ आणि ‘सर मंगलदास नथुभाई फॉरिन स्कॉलरशिप’ या दोन्ही शिष्यवृत्त्या मिळवणारीही ती पहिलीच विद्याíथनी. जगप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ, जीवरसायन संशोधक डॉ. डेरिक रिक्टर यांच्यामुळे कमलाला पीएच.डी.साठी १८ डिसेंबर १९३७ साली केंब्रिजमधे प्रवेश मिळाला. मुंबईत असताना १९३६ मध्ये तिने अमेरिकेच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला होता. पण वेळ टळून गेली होती. तिला पुढच्या वर्षी अर्ज करा, असं त्या विमेन विद्यापीठानं कळवलं होतं. पण कमलाने केंब्रिजला प्रवेश मिळताच त्या विद्यापीठाला कळवून टाकलं. ‘मी यंदा अर्ज करणार नाही. मला दोन शिष्यवृत्त्या मिळाल्या आहेत. माझं संशोधन चालू आहे,’ असं पत्र एका स्त्रीकडून तेही एक मागास देशातल्या स्त्रीकडून, पाहून तिथल्या उच्चपदस्थांनी जीवरसायनशास्त्राचे जनक आणि नोबेल पुरस्कार विजेते सर गॉलंड हॉपकिन्स यांना पत्र पाठवून विचारलं, ‘ही अजब मुलगी कोण? तिची माहिती कळवा.’ हॉपकिन्सनी कळवलं, ‘अत्यंत बुद्धिमान, कठोर परिश्रम करणारी ध्येयवेडी मुलगी आहे.’ हॉपकिन्सचं हे प्रशंसापत्र पाहून ‘इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ युनिव्हर्सटिी, विमेन’ फार प्रभावित झाली. त्यांनी कमलाला ताबडतोब पत्र लिहिलं, ‘‘आम्ही तुला प्रवासी शिष्यवृत्ती देत आहोत. तिच्या आधारे तू अमेरिकेत ये.’’ (१९३८) ‘काही तरी घोटाळा आहे. ही शिष्यवृत्ती तर प्रोफेसरना देतात, मला कशी?’ असा प्रश्न कमलाला पडला. तिने हॉपकिन्सना विचारलं. त्यांनी सगळी हकिगत सांगून म्हटलं, ‘यात काही घोटाळा नाही.’ अर्थात कमलाला अत्यंत आनंद झाला. मार्च १९३८मध्ये युरोपात लीग ऑफ नेशन्सची बठक होती. तेथील विद्यार्थी परिषदेला हजर राहा, असं तिला सांगण्यात आलं. तेही भारत, इंग्लड, अमेरिका या तीन देशांतील विद्यार्थ्यांची प्रतिनिधी म्हणून. कारण काय तर ती भारतीय, शिकत होती केंब्रिजमध्ये (म्हणजे युरोपात) आणि अमेरिकन फेडरेशनने तिला फेलोशिप दिली म्हणून ती अमेरिकन विद्यार्थिनीपण होती. लक्झेंबर्गला ती गेली. तिला ठरावीक प्रश्न विचारण्यात आले. आपल्या भाषणात तिने सर्व प्रश्नांची उत्तरं देऊन आपल्या संशोधनाच्या आवडीबद्दल सांगताना वडिलांचा संदर्भ दिला. घरातलं मोकळं वातावरण आणि वडिलांनी मुलगी म्हणून कधीच आडकाठी केली नाही. मला ज्यात रस होता ते शिकण्यासाठी मदत केली. तिच्या या भाषणाचं अर्थातच कौतुक झालं.

केंब्रिजला परतल्यावर तिचं संशोधनाचं काम सुरू झालं. आता तिनं व डॉ. डेरिक यांनी वनस्पतींवर काम सुरू केलं. प्रचंड आणि सातत्याने काम करत असताना तो क्षण आला. अचानक कमलाला एक महत्त्वाचा शोध लागला. बटाटय़ातील प्रेसिपिटेट हँड-स्पेक्ट्रोस्कोपमधून पाहताना तिला एक निराळ्याच रंगाची रेष दिसली. त्याचं नाव सायट्रोक्रोम ‘सी’. वनस्पतींच्या श्वसनक्रियेत महत्त्वाच्या ठरणाऱ्या या सायट्रोक्रोम घटकाचा शोध होता तो. तिने आणि मार्गदर्शक रॉबिन यांनी अधिक अभ्यास करून त्यावर लेख लिहिला. आजही जगात वनस्पतींच्या श्वसनाचा विषय चच्रेला येतो तेव्हा कमला भागवत यांचा व ‘नेचर’मधील त्यांच्या लेखाचा (१९३९) उल्लेख असतोच. ‘वनस्पतींमध्ये सायटोक्रोमचा शोध’ हा पीएच.डी.चा विषय तिला आवडला. तिने मार्गदर्शक रॉबिन यांचा सल्ला घेऊन प्रबंध लिहिला.

केंब्रिज विद्यापीठाकडून पीएच.डी. मिळवणारी ती पहिली भारतीय स्त्री आणि मराठी भाषिक. १४ महिन्यांत प्रबंध हा एक विक्रमच होता. अनेकांनी आग्रह करूनही परदेशात मिळालेलं शिक्षण, ज्ञान आपल्या देशासाठी उपयोगात आणायचं या उदात्त विचाराने ती भारतात परतली..

तत्पूर्वी, भारतात परतण्यापूर्वी एक घटना घडलेली होती.. दिल्लीच्या लेडी हार्डिज कॉलेजला ‘लेडी डफरीन फंड’ची मदत होत होती. आणि त्या फंडच्या सल्लागार समितीवर कमलाबाईंचे केंब्रिजमध्ये गुरू सर एफ. जी. हॉफकिन्स होते. त्या कॉलेजमध्ये जीवरसायनश्स्त्र विभाग नव्याने उघडण्यात येणार होता. तिथे विभाग प्रमुख म्हणून सर हॉफकिन्सनी कमलाबाईंचं नाव कळवून टाकलं. त्या वेळी कमलाबाई पीएच.डी.साठीच्या संशोधनात मग्न होत्या. त्या हॉफकिन्सना म्हणाल्या, ‘मी ज्या कामासाठी इथे आलेय ते पूर्ण झाल्याशिवाय परत जाण्याचा विचारही करणार नाही.’ हॉफकिन्सना त्याचं कौतुक वाटलं. त्यांनी दिल्लीला कळवलं, ‘ती जागा कमला भागवत यांच्यासाठी राखून ठेवावी. ते पद भरू नये.’ त्यामुळे भारतात आल्यावर १ ऑक्टोबर १९३९ पासून कमला भागवत दिल्लीत लेडी हाìडज कॉलेजमध्ये जीवरसायनशास्त्राच्या व्याख्यात्या म्हणून रुजू झाल्यामहाराष्ट्र सरकारने मुंबईतील विज्ञानसंस्थेत जीवरसायनशास्त्राचा विभाग नव्याने उघडला. तिथे कमलाबाई १९ जून १९४९ ला विज्ञान संस्थेत रुजू झाल्या. म्युझियमसमोर या विभागाला स्वतंत्र जागा मिळाली आणि कमलाबाईंनी सुसज्ज प्रयोगशाळा उभारली. आपल्या विद्यार्थ्यांना (एम.एस्सी.) त्या सहा-आठ महिने शिक्षण देऊन नंतर संशोधन करायला सांगत.

पुढे कमलाबाई इन्स्टिटय़ूटच्या संचालक झाल्या. या पदाची धुरा नि:पक्षपाती बुद्धीने सांभाळून १८ जून १९६९ रोजी निवृत्त झाल्या. प्रख्यात शास्त्रीय संशोधन संस्थेच्या त्या पहिल्या स्त्री संचालक ठरल्या. त्यांनी इतिहास घडवला. कमलाबाईंच्या संशोधनात्मक प्रसिद्ध लेखांची संख्या १५५ इतकी आहे.

त्यांचे अनेक विद्यार्थी परदेशात गुरूचं नाव उज्ज्वल करीत आहेत. विद्यार्थ्यांना त्यांनी भरभरून आणि आपुलकीने प्रेमाने ज्ञान दिलं. निवृत्त झाल्यावरही त्या स्वस्थ बसल्या नाहीत. ग्राहक मार्गदर्शन सोसायटी ऑफ इंडियासाठी काम करीत तिथेही अन्नातली भेसळ कशी ओळखायची यावरती शिबिरं घेतली. यावरती प्रात्यक्षिक देऊन खेडय़ापाडय़ात, शहरात सर्वसामान्य ग्राहकाला वापरता येईल अशी शोध पेटी तयार केली. विद्यार्थ्यांनाही प्रशिक्षण दिलं.१९९७ मध्ये आयुष्याच्या अखेरीस कमला सोहोनी यांना विज्ञान क्षेत्रामध्ये उत्कृष्टता आणि त्यांच्या योगदानासाठी राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. भारतीय वैद्यकीय संशोधन खात्याने त्यांना सन्मानित करण्यासाठी एक खास कार्यक्रम दिल्ली इथे आयोजित केला. कमलाबाई सोहोनी यांच्या सन्मानार्थ खूप प्रेक्षक सभागृहात जमले होते. सर्वानी उभं राहून टाशांचा कडकडाटात त्यांच्या कार्याला मानवंदना दिली. आणि डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच हातात पुरस्कार घेऊन उभ्या असलेल्या कमलाबाई व्यासपीठावर कोसळल्या. त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल केलं गेलं. पण अगदी थोडय़ा दिवसांत त्या गेल्याच. तारीख होती २६ सप्टेंबर १९९७. वयाच्या ८५ व्या वर्षी त्या अनंतात विलीन झाल्या. कमलाबाईंनी केंब्रिजपर्यंत धडक मारली आणि प्रत्येक ठिकाणी आपला प्रथम क्रमांक कायम राखला. कसलीही प्रसिद्धीची हाव नाही. आयुष्यभर ज्ञानार्जन आणि विद्यार्थ्यांना प्रेमाने ज्ञान देणं यात त्या रमल्या. सरकारी नोकरीतही त्यांनी देशहित पाहिलं. कुणाचाही दबाव सहन करता उत्तम काम केलं. या प्रखर बुद्धिमत्ता लाभलेल्या प्रेमळ कर्तव्यतत्पर शास्त्रज्ञस्त्रीला माझे लाख लाख प्रणाम !



..... रवींद्र मालुसरे

९३२३११७७०४

 

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत सत्याची कास धरून पत्रकारिता करावी.

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत  सत्याची कास धरून पत्रकारिता करावी. सतरावे शतक प्रबोधनाचे ,  अठरावे शतक वैचारिकतेचे ,  एकोणीसावे शतक प्रगतीचे...