शनिवार, १६ सप्टेंबर, २०२३

निर्भीड लेखणीची पंच्याहत्तरी : विश्वनाथ पंडित

विश्वनाथ पंडित.... ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक,  महाराष्ट्रातील अनेक दैनिकातील संपादकीय पानावरील वाचकांची पत्रे या सदरातील एक ठळक नाव. निर्भीड आणि निस्वार्थी पत्रलेखनाबरोबर कुशल संघटक, दांडगा जनसंपर्क असलेले, समकालीन प्रश्नांचे भान, लोकांच्या प्रश्नांची सखोल जाण असलेले ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक पंडित हे १८ सप्टेंबर २०२३ रोजी वयाच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यानिमिताने त्यांच्या कर्तृत्वाचा वेध घेणारा हा लेख...

माझा आणि विश्वनाथ पंडित यांचा संपर्क आला तो १९८७ मध्ये . दादर-पूर्वेकडील शिंदेवाडी महापालिका शाळेत एका शनिवारी वृत्तपत्र लेखकांची प्रातिनिधिक आणि मातृसंस्था असलेल्या मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या कार्यालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी वर्तमानपत्रातून पत्रलेखन करणाऱ्या पत्रलेखकांचा परिचय मेळावा असे कार्यक्रमाचे स्वरूप होते.  कॉलेजमध्ये असतानाच मी सुद्धा सातत्याने सकाळ, नवशक्तीमधून लिहीत होतो, त्यामुळे पत्रांच्या खाली असेलेली अनेक नावे वाचत होतो. परंतु ते कोण आहेत या कुतूहलापोटी मी आवर्जून पहिल्यांदाच तिथे गेलो होतो. त्यादिवशीच अनेकांचा परिचय झाला विश्वनाथ पंडित यांनाही  भेटलो. त्यावेळी ते वृत्तपत्र लेखक संघाचे कार्याध्यक्ष होते. "आज आलात आता संघाचे सभासद व्हा आणि प्रत्येक शनिवारी संध्याकाळी येत जा" हे त्यादिवशीचे त्यांचे शब्द अजूनही माझ्या लक्षात आहेत. पुढे शनिवारी जात राहिलो, आपलयापेक्षा तरुण नवोदित कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त कशी संधी  देता येईल याचा विचार करणारे त्याठिकाणी अनेकजण होते.

माझे हस्ताक्षर सुंदर आहे हे दिवंगत माजी अध्यक्ष ग. शं. सामंत आणि गणेश केळकर यांच्या लक्षात आल्यानंतर या तिघांनी कार्यक्रमाच्या दिवशी तर नक्की यायचेच असा आग्रह केला. मुंबई-ठाण्यातील पत्रलेखक या ठिकाणी एकत्र येण्याचा शनिवार हा हक्काचा दिवस. चळवळीवर नितांत प्रेम करणारे बुजुर्ग आणि नवे अशा दोन्ही पिढीतील पत्रलेखक प्रत्येक शनिवारी शिंदेवाडीत हमखास भेटणार असा हा जणू पायंडाच पडला होता. त्या ठिकाणी मधू शिरोडकर, ग. शं. सामंत, गणेश केळकर, विश्वनाथ रखांगी, वि अ सावंत. भाई तांबे, शरद वर्तक, मिलिंद तांबे, सीताराम राणे, नंदकुमार रोपळेकर यांनी माझ्यासारख्या कितीतरी नवोदितांना संघात येण्यासाठी आग्रह केला आणि संघाचे धडे गिरवण्यासाठी कामाला जुंपले.

सध्या दैनिक वृत्तमानसमध्ये असलेले ज्येष्ठ पत्रकार सुनील शिंदे हे त्यावेळी कार्यक्रमाची बातमी सर्वप्रथम हाताने लिहायचे त्याच्या अनेक कॉपीज तयार करण्याचे काम आम्ही तयार करायचो. म्हणजे झेरॉक्स मशीनचा जन्म त्यावेळी झाला नव्हता. याचवेळी माझ्या एक लक्षात आले ते म्हणजे या संस्थेची धुरा सांभाळणारे संघातील ज्येष्ठ कायम संघाच्या हिताचा विचार निस्वार्थीपणे करीत असतात. जो पहिल्यांदा कार्यालयात येतो तो टाळे उघडल्यानंतर अगोदर हातात झाडू घेतो, साफसफाई करतो त्यानंतरच खुर्चीवर बसतो. याचबरोबर आपलयापेक्षा तरुण नवोदित कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त कशी संधी देता येईल याचाही विचार करीत असतो. विश्वनाथ पंडित हे  त्यापैकी एक. संघात त्यांनी त्यापूर्वी आणि नंतरही प्रमुख कार्यवाह हे कामाचे पद भूषविले होते. फोर्टच्या सिटी बँकेत ते चांगल्या पदावर काम करीत होते, परंतु संघात पाऊल ठेवल्यानंतर ते आपली मोठेपणाची झूल उतरवून ठेवीत असत. काम करताना जे करायचे ते मन लावून करायचे पण त्याच्या यशाचे श्रेय आपण घ्यायचे नाही, सार्वजनिक काम हे एकोप्याने करायचे असते. असे त्यांचे तत्व होते. पंडित म्हणजे व्यक्तीपेक्षा संस्था मोठी मानणारे, सतत संस्थेचे हित जपणारे, आयुष्यभर उराशी जपलेल्या मूल्यांसाठी तडजोड न करणारे, स्वतः प्रसिद्धिपासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करणारे आणि मैत्रीसाठी मृदू होणारे असे व्यक्तिमत्व असेच गुणवर्णन त्यांच्या व्यक्तिमत्वाचे करता येईल. सामाजिक, सांस्कृतिक चळवळीत चालताना कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता काही माणसांशी शांतपणे आपले काम करण्याची एक पद्धत असते. आपल्या जन्मगावी चिपळूणला स्थलांतरित होण्यापूर्वी ते ठाण्यात राहत असत. अष्टविनायक चौकात संघाच्या सहकार्याने दिवाळी अंक प्रदर्शनाचा कार्यक्रम त्यांनी ८० च्या दशकात सुरु केला. पंडितांच्या अनुपस्थितही मनोहर चव्हाण, रवींद्र मोरे यांनी ४० वर्षेहून अधिक वर्षे ही परंपरा सुरु ठेवली आहे.ठाणे जिल्हाप्रमुख स्वर्गीय आनंद दिघे नियमितपणे या प्रदर्शनाला भेट देत असत. त्याचबरोबर ठाणे शहरातील सर्वच क्षेत्रातील मान्यवर आणि वाचक हे प्रदर्शनाला भेट देण्यासाठी आवर्जून कसे येतील याचा प्रयत्न पंडित कल्पकतेने करीत असत. विशेष नवलाईची गोष्ट म्हणजे आनंद दिघे हे जाहीर मैदानी सभेत भाषणबाजीला वा पत्रकारांच्या वार्तालापाला केव्हाही सामोरे गेले नव्हते, मात्र पंडितांनी पत्रलेखक म्हणजे काय आणि संस्थेचे उपक्रम कोणकोणते आहेत हे सांगितल्यानंतर त्यांच्या आग्रहाखातर शिंदेवाडीच्या कार्यालयात वार्तालाप करण्यासाठी आले आणि स्वतःच्या खाजगी आयुष्यासह हाजीमलंग-दुर्गाडी आंदोलन आणि ठाण्याच्या विकासावर विकासावर त्यांच्या स्टाईलने दिलखूलास बोलले. प्रश्नांना उत्तरे दिली. टेंबीनाक्यावर मध्यान्नरात्रीपर्यंत गर्दीला सामोरे जात समस्येचा एकाच घावात कसा निकाल लावायचा हे माहित असलेले दिघे  ठाणेकरांना माहित होते.  दादरच्या शिंदेवाडीत त्यांची ही अनोखी दुसरी बाजू विश्वनाथ पंडितांच्यामुळे त्या दिवशी शेकडोंना अनुभवता आली.  

त्यांनी स्वतःचे 'झुंजार सह्याद्री' नावाचे पाक्षिक सुरु केले. अनेक नवोदितांना लिहिते केले आणि ठाणे शहरातील प्रश्नांना वाचा फोडण्याबरोबरच सांस्कृतिक घडामोडींचा वेध प्रामुख्याने घेतला. निवृत्तीनंतर त्यांनी आपला मुळात असणारा पत्रलेखनाचा छंद अधिक वृद्धिंगत केला. आपल्याला भावलेले आणि समाजाला उपयुक्त ठरणारे किंबहुना दिशा देणारे विचार समाजात पेरणे  हे एक नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे या विचाराने एक ध्यास घेऊन ते झपाट्याने दररोज लिहीत असतात. आजपर्यंत त्यांनी जवळपास चार हजारपेक्षा जास्त पत्रे संपूर्ण महाराष्ट्रातील विविध दैनिकातून लिहीली आहेत. या पत्राद्वारे त्यांनी समाजाच्या समस्यांना वाचा फोडली आहे. संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. समाजाला मार्गदर्शन केले. समाजस्थितीचे भान करून दिले. सावधगिरीचा इशाराही दिला. दुर्लक्षित प्रश्नांकडे लक्ष वेधले. लोकशाही व्यवस्था जिवंत राहण्यासाठी आणि समाजमनातील आंदोलने टिपण्यासाठी हे सदर फार महत्त्वाचे असते. माध्यमाला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटले जाते याचे कारण त्यांनी खरीखुरी जनतेची भाषा बोलावी असे अभिप्रेत आहे. परिवर्तनाच्या व प्रबोधनाच्या दीर्घ मुदतीच्या लढ्यासाठी पत्रलेखन आवश्यक असते. ‘वाचकांचा पत्रव्यवहार या प्रक्रियेत महत्त्वाची कामगिरी करत असतो. शिंदेवाडीच्या लहानश्या जागेत हा वैचारिक ठसा त्यांच्या मनावर खोलवर उमटला असल्याने ते आजही वयाच्या अमृत महोत्सवी वर्षात नियमित पेरते राहिले आहेत. निवृत्तीनंतरचा वेळ,बुद्धी खर्च करून आणि पदरमोड करून परखडपणे लिहिणारे विश्वनाथ पंडित हे पत्रलेखक म्हणून लोकप्रबोधनाचेच काम करत आहेत असे म्हणावे लागेल.

विश्वनाथ पंडित सध्या चिपळूण सारख्या दूर ठिकाणी असले तरी मोबाईल संपर्काच्या माध्यमातून सातत्याने संपर्कात असतात. त्यांच्याशी जुळलेला माझा स्नेहबंध आज  जिव्हाळ्याचा मैत्र बनून गेला आहे. मराठी वृत्तपत्र लेखक संघ ही आमची संस्था सध्या संक्रमणावस्थेतून जात आहे. अडचणींतून मार्ग काढण्यासाठी ते सतत मार्गदर्शन करीत असतात. एखादा कार्यक्रम ठरला की पूर्वतयारी कुठपर्यंत आली आहे ते कार्यक्रम कसा झाला याची सतत विचारपूस करीत असतात.  वृत्तपत्र लेखक संघ ही मुंबईतील जागृत नागरीकांची वैचारिक आणि सांस्कृतिक चळवळ व्हावी हे त्यांच्यासह पूर्वसूरींचे स्वप्न पूर्ण झाले आहे. आज मुंबईतील सामाजिक सांस्कृतिक चळवळीचा इतिहास लिहायचा तर इतिहासकाराला 'मराठी वृत्तपत्र लेखक संघाला' वगळून पुढे जाता येणार नाही. संघ सुद्धा चळवळीचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करताना आज त्या टप्प्यावर पोहोचला आहे, याचे श्रेय निःसंशय संघाच्या जुन्याजाणत्या कार्यकर्त्यांचाप्रमाणेच पंडित साहेबांनाही जाते. सलग ५० संमेलने मुंबईत झाल्यानंतर पुढचे संमेलन मुंबईबाहेर एखाद्या जिल्ह्यात करावे असा निर्णय आम्ही घेतला. ठाणे शहराच्या सांस्कृतिक चळवळीत अग्रेसर असणाऱ्या पंडित यांनी ते ठाण्यात होण्यासाठी मी प्रयत्न करतो असा विडा उचलला आणि त्यावेळी आमदार असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी आम्हाला घेऊन गेले. ज्येष्ठ साहित्यिक शन्ना तथा श. ना. नवरे यांच्या अध्यक्षतेखाली भरगच्च कार्यक्रम असलेले भव्य संमेलन गडकरी रंगायतनमध्ये माझ्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात झाले. परंतु विश्वनाथ पंडित यांच्या संपूर्ण सहकार्याने यशस्वीपणे पार पडले. त्यापूर्वी अ. भा. मराठी पत्रकार परिषदेचे ३२ वे संमेलन ठाणे येथे नरेंद्र बल्लाळ यांच्या पुढाकाराने झाले होते. त्या संमेलनाच्या व्यासपीठावर 'वृत्तपत्र लेखकांचा परिसंवाद'आयोजित करण्यात त्यांनी गणेश केळकर यांच्या सहकार्याने वृत्तपत्र लेखकांना मानाचे स्थान मिळवून दिले होते.

साहित्य, सामाजिक, पत्रलेखन, सांस्कृतिक, भाषा अशा विभिन्न क्षेत्रात दमदारपणे आपला ठसा उमटविणारे पंडित म्हणजे सर्वाना हवेहवेसे वाटणारे व्यक्तिमत्व. त्यांनी अनेकांना मोठे केले. स्वाभिमानाने, ताठ कण्याने कसे जागायचे याचे धडे त्यांनी अखिल भारतीय क्षत्रिय मराठा महासंघाचे अध्यक्ष असलेले त्यांचे मामा दादासाहेब मोरे यांच्याकडून घेतले. त्यामुळेच आयुष्यभर कोणासमोर ते लाचारीने झुकले नाहीत.  १९७४ ला शिवाजी महाराजांच्या ३०० व्या पुण्यतिथीचं आयोजन रायगडावर केलं होतं. मराठा महासंघ आणि  सुनितादेवी धनवटे यांच्या विनंतीनुसार  स्व. इंदिरा गांधी मेघडंबरीच्या उदघटनासाठी येणार होत्या. त्यावेळी मराठा महासंघाचे अध्यक्ष  शशिकांत पवार यांनी पाहुण्यांच्या खास कक्षात महत्वाच्या सुचना देऊन पंडित यांना आपल्या सोबत ठेवले होते. सामाजिक कार्यासाठी प्रामाणिकपणे झोकून दिल्यामुळेच माझ्या वाट्याला हा सुवर्णक्षण आला असे पंडित यांना वाटते आहे.  

अवघ्या महाराष्ट्रातील पत्रलेखकांचा सच्चा मित्र आणि मार्गदर्शक बनलेले विश्वनाथ पंडित ७५ वे अमृतमहोत्सवी वर्षाला सामोरे जात आहेत. मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई या संस्थेबरोबरच ठाणे शहरातील जिजामाता युवक मंडळ, चिपळूण तुरंबव येथील श्री शारदा समाज सेवा मंडळ या संस्थांशी त्यांचा आजही निकटचा संबंध आहे. पत्रलेखनाचा छंद जोपासताना मराठी वृत्तपत्र लेखक संघाला पर्यायाने पत्रलेखक चळवळीला मोठे करणाऱ्या या माणसाला मी अलीकडे विचारले, " पत्रलेखनातून तुम्ही काय काय मिळवलं आणि कमवलं" त्यांनी उत्तर दिले वाचकांच्या पत्रांमध्ये केवढी जबरदस्त ताकद असते हे शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनीच फक्त ओळखले होते. शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना ते स्वतः फोन करून त्याकडे ते लक्ष वेधत असत. या वृत्तपत्रीय पत्रांची दखल काही वर्षांपूर्वी संबंधित सरकारी खात्याकडून घेतली जात असे वर्तमानपत्रातून खुलासा करीत असत. परंतु आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधी निर्ढावलेले झाले आहेत. वाचकांची पत्रेही ते रिकाम्या झालेल्या खोक्यात फेकून देत असतील. भविष्यात  या पत्रांनाही ‘अच्छे दिन येतील अशी आशा बाळगू !

पत्रलेखकांना आणि पत्रलेखक चळवळीला प्रतिष्ठा प्राप्त करून देणाऱ्या निस्वार्थीपणे जागल्याची भूमिका पार पाडणाऱ्या विश्वनाथ पंडित याना उत्तम दीर्घायुरोग्य लाभो अशा यानिमित्ताने सदिच्छा !



 - रवींद्र मालुसरे

अध्यक्ष

मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई

९३२३११७७०४

शनिवार, २६ ऑगस्ट, २०२३

चित्रपटांच्या दुनियेतला मराठा योद्धा : सुभेदार तान्हाजीराव मालुसरे

 चित्रपटांच्या दुनियेतला मराठा योद्धा 



: सुभेदार तान्हाजीराव मालुसरे





शिवरायांचे सुभेदार तानाजी मालुसरे यांचा पराक्रम आणि स्वामीनिष्ठा ही कायमच शौर्यकथांचा विषय ठरली. आजवर कित्येक बखरकारांना, इतिहासाच्या अभ्यासकांना, लेखकांना, नाट्य-चित्रपटांंना या कथेनं आकर्षित केलंय. पुन्हापुन्हा सांगूनही ही कथा संपत नाही. नव्या दमाच्या कलाकाराला आपण ही कथा पुन्हा सांगावी अशी वाटते, हीच या कथेची जादू आहे. म्हणूनच आतापर्यंत तानाजींच्या आयुष्यावर पाच सिनेमे आले.
सुभेदार तान्हाजी मालुसरे यांचा पराक्रम आणि स्वामीनिष्ठा आजवरच्या बखरकारांना, इतिहासाच्या अभ्यासकांना, ललित लेखकांना, चित्रपट व नाट्य निर्माता- दिग्दर्शकांना आणि अभिनय करणाऱ्या कलाकांराना सतत प्रेरणादायी ठरला आहे, देशातील अनेक जण या अद्वितीय पराक्रमी सामर्थ्यवान पुरुषोत्तमाचे चरित्र अभ्यासून भारावले गेले आहेत, आणि ह्या वीरपुरुषाचे वेगवेगळे पैलू लोकांसमोर मांडले आहेत, यापुढेही ते मांडत राहाणार आहेत, कारण शिवचरित्र अखंड 'प्रेरणादायी' तर शिवरायांना जिवाभावाची साथ देणारे प्रसंगी बलिदान देणारे त्यांचे मावळे म्हणजे जगाच्या इतिहासात पहिल्यांदा 'गनिमी कावा' अवलंबणारे पराक्रमाचे आणि धाडसाचे एक एक सोनेरी पान !  छत्रपती शिवाजी राजांच्या चरणी आपली निष्ठा ठेवण्यासाठी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात राहणारा एक रांगडा तरुण शिवरायांच्या पदरी सामील होतो काय अन  त्यांच्याशी इतका समरस होतो काय, की स्वतःच्या मुलाचं लग्न काढलं असताना सिंहगड मोहिमेचा सांगावा आल्यानंतर हा धैर्याचा मेरुपर्वत काळासारखा धावून जातो अन वचनाच्या पूर्ततेसाठी मागे न हटता आपला अमोल देह स्वामीनिष्ठेचरणी अर्पण करीत धारातीर्थी पडतो काय.  म्हणून तानाजी मालुसऱ्यांसारखे वीरपुरुष आपली जीवनगाथा लिहून अजरामर झाले ! युगानुयुगे येतील पण तानाजी मालुसरे - सूर्याजी मालुसरे यांचा इतिहास सातत्याने नवीन पिढीला प्रेरणादायी ठरत राहणार आहे. शिवचरित्र हेच मुळात अखंड प्रेरणादायी आहे. त्यातले शिवरायांना जिवाभावाची साथ देणारे आणि प्रसंगी प्राणचं बलिदान देणारे त्यांचे मावळे म्हणजे त्यातील स्फुर्तिगाथा आहेत. जगाच्या इतिहासात 'गनिमी कावा' अजरामर करणारे हे मावळे म्हणजे पराक्रमाचे आणि धाडसाचे एक एक सोनेरी पान. त्यातील एक लखलखतं नाव म्हणजे सुभेदार तान्हाजी मालुसरे.

सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात राहणारा हा रांगडा तरुण शिवरायांच्या पदरी सामील होतो आणि त्यांच्या सैन्याचा महत्त्वाचा भाग ठरतो. महाराजांच्या ध्येयाशी तो इतका समरस होतो की, स्वतःच्या मुलाचं लग्न बाजूला ठेवून सिंहगडाची मोहीम अंगावर घेतो. या मोहिमेच्या यशासाठी तो जे जे काही करतो ते अद्भूत आणि विलक्षण असतं. या सगळ्यातून गड येतो पण सिंह जातो. आपला अमोल देह स्वराज्यचरणी अर्पण करीत तानाजी धारातीर्थी पडतो.

ही गोष्ट मराठी म्हणवणाऱ्या सर्वांना तोंडपाठ असलेली ही गोष्ट. पण तरीही आजवर या कथेची भुरळ कलामहर्षी बाबुराव पेंटर, चित्रतपस्वी व्ही. शांताराम, ज्येष्ठ दिग्दर्शक राम गबाळे, ओम राऊत आणि आता दिग्पाल लांजेकर यांना पडलीय. प्रत्येकानं ही ही ऐतिहासिक कलाकृती भव्य स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केलाय. आजपर्यंत प्रदर्शित झालेल्या नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पाच चित्रपटांचा हा मागोवा.

 

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर निर्माते प्रद्योत पेंढरकर यांचा "सुभेदार"  (२०२३ )

महाराष्ट्राच्या शिवकालीन इतिहासातील प्रत्येक पान मराठयांच्या अतुलनीय शौर्याने भरलेलं आहे. ‘सुभेदार तान्हाजी मालुसरे’ हे नाव घेतलं की, आपल्याला आठवतो तो ‘कोंढाण्याचा सिंहपराक्रम’. ‘आधी लगीन कोंढाण्याचं आन मग माझ्या रायबाचं’ म्हणत कोंढाण्यावर चढाई करणाऱ्या सुभेदार तान्हाजी मालुसरे यांचे नाव इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहिले गेले आहे. नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे हे तर शिवचरित्राच्या महान ग्रंथातील एक झळाळते सुवर्णपान! सुभेदार तान्हाजी मालुसरे म्हणजे निष्ठा, त्याग, समर्पण याचे मूर्तिमंत उदाहरण ही ओळख पटते. प्रचंड कर्तव्यनिष्ठा दाखवत स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या नरवीर तान्हाजी मालुसरे यांना स्वराज्याच्या चाकरीपुढं आपल्या संसाराचेही भान नव्हतं. स्वतःच्या मुलाचं लग्न काढलं असताना सिंहगड मोहिमेचा सांगावा आल्यानंतर हा धैर्याचा मेरुपर्वत काळासारखा धावून गेला अन् वचनाच्या पूर्ततेसाठी मागं न हटता आपला देह स्वामी निष्ठेपायी शिवप्रभूंच्या चरणी ठेवला.  लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टकातील पाचवे चित्रपुष्प असलेला ‘सुभेदार’ चित्रपट २५ ऑगस्ट २०२३ ला चित्रपटगृहांत झळकला आहे. यासंदर्भात लांजेकर यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितले, अखेरच्या श्वासापर्यंत लढणाऱ्या सुभेदार नरवीर तान्हाजी मालुसरे शिवछत्रपतींच्या योध्यांपैकी महत्वाचे नाव ! तान्हाजीरावांच्या नावाशिवाय शिवचरित्र पूर्ण होऊच शकत नाही. पण तान्हाजीराव म्हणजे केवळ सिंहगडावरची लढाई नव्हे, तर छत्रपतींच्या स्वराज्याची पायाभरणी करणारे आघाडीचे शिलेदार होते, कोंढाणा जिंकण्याची घटना ही सर्वांत मोठी असली तरी त्यामागे असलेलं त्यांचं युद्धकौशल्य, रणनिती, शत्रूला पाहिलं नसतानाही त्याच्या सामर्थ्याबद्दल आणि त्याच्या सैन्याबद्दल केलेला अभ्यास यांसारख्या अनेक बारिकसारिक गोष्टींवर या चित्रपटातून प्रकाश टाकण्यात आला आहे. इतिहास मांडताना तो भव्यदिव्य तर दाखवायचा प्रेक्षकांच्या काळजालाही भिडवायचा होता. त्यादृष्टीने कथा, सादरीकरण, ऐतिहासिक संदर्भ, त्याकाळातील भाषा, शस्त्रास्त्रे, वेशभुषेपासून अगदी अजय पुरकर यांचा अभिनयापर्यंत,  मावळ प्रांतातील भाषा याचा वापर केला. सुभेदार’ चित्रपटाविषयी सांगताना दिग्पाल लांजेकर म्हणाले, “तानाजीराव मालुसरे हे विलक्षण योद्धा होते. शूर योद्धा असण्याबरोबरच तानाजीराव प्रशासकीय कामातही खूप हुशार होते. कोकणात जाणाऱ्या अनेक रस्त्यांचे काम त्यांच्या देखरेखीखाली पूर्ण करण्यात आले होते. सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकामात सुद्धा त्यांचा काही अंशी सहभाग होता. प्रशासक म्हणून ते महाराजांच्या आणि आऊसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली कसे तयार झाले, त्यांनी स्वराज्यासाठी कसे काम केले हे दाखवण्याचा प्रयत्न ‘सुभेदार’मधून करण्यात आला आहे. “‘सुभेदार’ असे चित्रपटाचे नाव ठेवण्यामागे खास कारण आहे ते म्हणजे, ‘सुभेदार’ म्हणून ‘प्रशासकीय’ आणि ‘सैन्य’ अशी दुहेरी जबाबदारी तानाजी मालुसरे यांनी सांभाळली होती. अशा दोन्ही प्रकारचे किंवा विभागांचे ‘सुभेदार’ एकच व्यक्ती असणे हे इतिहासातील एकमेव उदाहरण आहे.”  “तुम्ही नेहमी जसा बायोपिक पाहता तसा सुभेदार चित्रपट नसेल. यामध्ये तुम्हाला महत्त्वाचे भावरुपात्मक टप्पे जसे की, सुभेदारांचे आणि आऊसाहेबांचे नाते, त्यांचे आणि शिवाजी महाराजांचे नाते कसे होते? या गोष्टी पाहायला मिळतील. तानाजी मालुसरे यांचे आऊसाहेब आणि शिवरायांशी घट्ट नाते असल्यामुळे त्यांनी स्वराज्यासाठी बलिदान देताना मागेपुढे पाहिले नाही, ही शक्ती त्यांना कुठून मिळाली? हे दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटाद्वारे केला आहे.”, असे दिग्पाल लांजेकर यांनी सांगितले. सुभेदार तानाजी मालुसरे हे तर शिवचरित्राच्या महान ग्रंथातील एक झळाळते सुवर्णपान! त्यांचं भावनिक आणि कौटुंबिक आयुष्य दाखवण्याचा प्रयत्न करत त्यांच्या शौर्याचं पराक्रमी पान उलगडण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.'
ए.ए.फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंटची प्रस्तुती असलेल्या ‘सुभेदार’ चित्रपटाची निर्मिती राजवारसा प्रोडक्शन, मुळाक्षर प्रोडक्शन, पृथ्वीराज प्रोडक्शन, राजाऊ प्रोडक्शन, परंपरा प्रोडक्शन यांनी केली आहे.प्रद्योत पेंढारकर,अनिल वरखडे, दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर, श्रमिक गोजमगुंडे, विनोद जावळकर, शिवभक्त अनिकेत जावळकर, श्रुती दौंड हे ‘सुभेदार’ चित्रपटाचे निर्माते आहेत. चिन्मय मांडलेकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत, मृणाल कुलकर्णी आऊसाहेब, स्वतः दिग्पाल बहिर्जी नाईक असे कलाकार आहेत. 
सर्वात वरचढ म्हणजे अजय पूरकर तान्हाजी मालुसरे शोभले आहेत. केवळ नजरेने एखाद्याला गारद करण्याची ताकद तान्हाजींमध्ये होती. अजय पूरकर यांची शरीरयष्टी आणि अभिनय दोन्ही गोष्टी तान्हाजी मालुसरे आपल्यासमोर जिवंत उभे करतात. शूटिंगच्या दरम्यान अजय पुरकर यांच्या पायाला जखम झाली होती. ऍक्शन सीन करताना त्यांच्या अंगठा आणि बोटाच्या मध्ये त्यांचा पाय २ इंच जखम होईल असा फाटला होता. त्याही परिस्थितीत शूटिंग पूर्ण केले होते. तान्हाजीरावांच्या भूमिकेत शिरण्यापूर्वी मी उमरठ येथील सुभेदारांच्या समाधीजवळ डोळे मिटून बसलो होतो. त्यावेळी मी त्यांना तुमचं पूर्ण चरित्र मांडतोय हे सांगितलं. त्या ठिकाणी नतमस्तक झालो आणि त्यांना विचारलं की तुम्हीच सांगा काय, कसं करायचं आहे. त्यामुळे मी सुभेदारांनाच विचारुन ही भूमिका साकारली आहे”, असेही पुरकर यांनी भूमिका साकारण्यामागची प्रेरणा सांगितली. 


कलामहर्षी बाबुराव पेंटर यांचा ' सिंहगड '(१९२२) –

चित्रमहर्षी दादासाहेब फाळकेंनी आपल्या देशात चित्रपट युगाला  सुरुवात केली तेव्हा ते मुकपट होते परंतु त्यांचा चेहरा प्रामुख्याने पौराणिक होता, तर कलामहर्षी बाबूराव पेंटरानी आपल्या सिंहगड चित्रपटाद्वारे १९२२ ला ऐतिहासिक चेहरा दिला. बाबूराव पेंटर यांना शिवचरित्रावरील चित्रपटांचे जनक म्हणावे लागेल,  शिवरायांवर नाटके खूप झाली पण चित्रपट करणारे पहिले बाबूराव पेंटरच. बाबूराव पेंटर यांनी १९२२ साली 'सिंहगड' हा पहिला शिवचरित्रपर चित्रपट बनवला. चित्रपट मूक असल्यामुळे कथाविषय सर्वाना माहिती असेल असाच हवा म्हणून कादंबरीकार ह. ना. आपटे यांची १९०३ साली लिहिलेली  'गड आला पण सिंह गेला' ही  सुप्रसिद्ध  ऐत्याहासिक कादंबरी निवडली. बाबुरावांच्या या चित्रपटाने लोकांच्या मनावर राज्य केले. हा चित्रपट अत्यंत लोकप्रिय ठरल्याने या चित्रपटाला तुफान गर्दी होऊ लागली. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांची संख्या वाढवण्यात आली. चित्रपटाच्या उत्पन्नाचे आकडे प्रसिद्ध होत असल्यामुळे यावर सरकारचेही लक्ष गेले आणि या चित्रपटाला पहिल्यांदा 'करमणूक कर' बसवला व या चित्रपटापासून हिंदुस्थानात तो कायम झाला. पुढे काही वर्षांनी लंडन येथे जागतिक प्रदर्शनात 'सिंहगड' हा चित्रपट दाखवला गेला, त्यावेळी परीक्षकांनी दिलेल्या प्रशस्तीपत्रावर पुढील वाक्य आहे- "This picture is an out standing example of sincerity of direction.
ह्या चित्रपटात छत्रपती शिवरायांची भूमिका बाबूराव पेंटर यांनी स्वतः केली. त्यांच्या बरोबर तानाजी मालुसरे ( बाळासाहेब यादव ), उदयभानू ( झुंजारराव पवार),  शेलार मामा यांची भूमिका २३ वर्षीय व्ही. शांताराम अशा प्रमुख भूमिका होत्या. या सर्व भुमिका इतिहासाच्या पानातून बाहेर आल्यासारख्या वाटत. कल्ले, दाढ्या, पगडया, कमरची घोंगडी,मुंडासे, हातातल्या काठ्या, पहरेकऱ्यांच्या खाटा, पायातल्या जाड तळाच्या वहाणा, कानातले मोठे मोठे वाळे, हातातली कडी वैगरे सर्व अगदी हुबेहुब असे. हा चित्रपट सिंहगडावर चित्रित करण्याचा बाबुराव पेंटरांचा मानस होता पण पैशाअभावी तो फोल ठरला आणि पन्हाळगडावर चित्रीकरण करण्यात आले. बाह्यचित्रीकरणाचा हिन्दुस्थानातला हा पहिलाच प्रयत्न. ऐत्याहासिक लढाया परिणामकारक दिसाव्यात यासाठी कोल्हापुरातील एक वस्ताद बाळासाहेब आणि झुंजारराव यानां शास्त्रोक्त शिक्षणासाठी दररोज येत असे. दांडपट्टा, घोडदौड, तलवार बाजींचा सराव चालू असताना एके दिवशी अचानक आग आग असा ओरडा ऐकू आला. बाबुरावांच्या स्टुडिओला आग लागली होती आणि ती चहूबाजूला पसरत जाऊन स्टुडिओ खाक झाला. यापूर्वी प्रदर्शित केलेले सैरंध्री,  वत्सलाहरण, दामाजी या चित्रपटाच्या लोकमान्य टिळक आणि नटवर्य गणपतराव जोशी यांच्यावरील लघुपटाच्या निगेटिव्ह भक्ष्यस्थानी पडल्या. मात्र एका तगड्या तरुणाने धाडसाने त्या आगीत प्रवेश करीत मोठ्या कष्ठाने बाबुरावांनी स्वतः बनविलेला देशी कॅमेरा वाचविला. आगीची बातमी ऐकून छत्रपती शाहू महाराजही आपल्या खडखड्याचे घोडे दौडवत आले. तर कोल्हापूरचे श्रीमंत सरदार नेसरीकर यानी या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी भांडवल पुरवण्याचे कबूल केले. हे दु:ख विसरुन बाबुरावानी पन्हाळा किल्ल्यांवर बाह्यचित्रण सुरु केले. पन्हाळ्याच्या तीन दरवाज्यापाशी पाऊणशे मंडळींचा मुक्काम होता, चित्रपटात काम करणाऱ्या स्त्रिया पहाटे उठून नास्ता-जेवण करीत तर चित्रपटातले नायक-खलनायक पाणी भरण्याचे तसेच प्रसंगी जेवण वाढप्याचे सुध्दा काम करीत. शुटींग दरम्यानच्या काळात एकदा घोड्याला टाच मारताना घोडे बेफाम झाले आणी बाबुराव घोड्यावरुन खाली पडले. तानाजी कोंढाण्याचा डोणगिरी कडा चढतो आहे अश्या प्रसंगासाठी आजूबाजूच्या गावात सनदी पाठवून पिळदार दोनशे मावळ्यांना हजर राहण्यास सांगितले. त्यानंतर मोहिमेवर निघतानाच्या दृश्यात एक वृध्द बाई तानाजीला आशिर्वाद देते हा प्रसंग हुबेहुब येण्यासाठी कुशिरे गावातील एका स्त्रीची निवड केली होती. हातघाईच्या लढाईत तानाजी,सूर्याजी एकत्र दिसावेत यासाठी विशिष्ट् तंत्र वापरुन दिवाळीला लावण्यात येणाऱ्या चंद्राज्योतीच्या दारुचा उपयोग केला तसेच प्रथमच मस्किंगची पध्दत अमलात आणली. सिंहगड मधील शेवटचं लढाईचं दृश्य रात्रीच्या वेळी चित्रित करायचं होतं, तानाजी व शेलारमामा घोरपडीच्या आधाराने सिंहगडावर निवडक मावळ्यांसह चढून जातात व किल्ल्याचा दरवाजा उघडून मराठा सैन्याला आत घेताना रात्रीच्या गडद अंधारात लढाईची एकच धुमचक्री चालू होते, मशालीच्या उजेडात ही दृश्ये चित्रीत होऊ शकत नव्हती. शेवटी बाबुराव पेंटरानी एक युक्ती शोधून काढली, दिवाळीला चंद्रज्योत हा दारुकामाचा एक प्रकार पेटवण्यात येतो, या चंद्राज्योतीचा खुप लख्ख पांढरा प्रकाश पडतो, या चंद्राज्योतीतील दारु दृश्यांच्या आवश्यकतेप्रमाणे एका लांब रांगेत रांगोळी प्रमाणे ठेवून ती मशालीने पेटवून त्या उजेडात लढाईची दृश्ये चित्रीत केली जात. चंद्राज्योतीचा बराचसा धुर वाऱ्याने वाहून जात असे आणी थोडाफार धूर दृश्यावर आला तरी तो मशालीचा धूर आहे असे वाटत असे. रात्रीच्या दृश्यांचे चित्रण विजेच्या दिव्याशिवाय आपल्या देशात पहिल्यांदा हे असं पार पडलं. पेन्टरानी तयार केलेले भव्य ऐतिहासिक देखावे,पडद्यांवर आलेली रोमांचकारी दृश्ये, उत्कट देशप्रेमाने ओथंबलेले वीररसाचे प्रसंग, बाळासाहेब यादवांची नरवीर तानाजीची व झुंजारराव पवारांची उदयभानुची उत्कृष्ट दणदणीत भुमिका यामुळे पुर्वीच्या सर्व मुकपटापेक्षा सिंहगड जास्त लोकप्रिय व लाभदायक झाला. चित्रपट पुर्ण झाल्यानंतर तो पाहण्यासाठी श्रीमंत नेसरीकर, श्रीमंत बापुसाहेब इंगळे, श्रीमंत कागलकर अशी राजघराण्यातील मान्यवर मंडळी उपस्थीत होती. तेव्हाच्या मुंबईतील नॉव्हेल्टी नाट्यगृहात बाबुरावानी स्वत: रेखाटलेली छत्रपती शिवाजी महाराज,नरवीर तानाजी, उदयभानू, मावळे यांची भव्य पोस्टर्स लावली. गेटवर काही लाकडी ऐत्याहासिक प्रसंग उभे केले. त्यामूळे ती पाहाण्यास लोकांची एकच गर्दी उसळली. मुंबईला नॉव्हेल्टी सिनेमागृहात हा चित्रपट सलग सोळा आठवडे चालला होता, तो पडद्यावर आला तेव्हा पावसाचे दिवस होते, आणि पावसात या चित्रपटाने सोळा आठवड्याचा रन मिळवला होता हे या चित्रपटाच सर्वात मोठं यश होतं, आपल्या देशात चित्रपटांची सुरुवात झाल्यावर इतका लॉंग रन मिळवणारा हा पहिलाच चित्रपट, संपूर्ण मुंबईचे वातावरण शिवकालींन झाले होते. नुकतीच हिंदू-मुस्लिम दंगल शमली होती त्या पार्श्वभुमिवर प्रख्यात म्यॅजेस्टिक टॉकिजने हा चित्रपट नाकारला होता. प्रचंड गर्दी पाहुन पहिल्या खेळाला पोलीसांना पाचारण केले होते, अखेर चित्रपट सुरु झाला, टायटल्स सुरु होत पडद्यांवर तानाजी आणि शिवाजी महाराजांचे दर्शन झाले, प्रेक्षकानी टाळ्या वाजवून हर हर महादेवसह दोघांच्या नावाच्या उस्फूर्त आरोळ्या सुरु झाल्या. उदयभानूच्या वाराने जेव्हा तानाजी कोसळतो तेव्हा प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आले. 

प्रभातच्या चित्रपती व्ही शांताराम यांचा  ' सिंहगड '(१९३३) –

स्वातंत्र्याचा मंत्र देणारा ऐत्याहासिक 'सिंहगड' हा बोलपट काढण्याचे प्रभात फिल्म कंपनीने ठरवले. १९२२ च्या बाबुराव पेंटरांच्या चित्रपटात व्ही. शांताराम यांनी शेलारमामांची भूमिका केली होती. पण यावेळी त्यांनी स्वतःला पूर्णपणे पडद्याआड ठेवले. शंकराराव भोसले यांनी या चित्रपटात  तानाजी मालुसरे यांची भूमिका तर कमलकुमारी (लीला चंद्रगिरी), देवलदेवीची (प्रभावती), छत्रपती शिवाजी महाराज (गणपत शिंदे) उदयभानू ( बाबुराव पेंढारकर ), बुवासाहेब (घेरेसरनाईक) मा. विनायक (जगतसिंह) केशवराव धायबर (शेलारमामा) यांनी भूमिका अविस्मरणीय केल्या. या चित्रपटाचे दिग्दर्शन करताना शांताराम यांनी नेहमीच्या रुळलेल्या चाकोरीतून न जाता काहीतरी वेगळ्या पद्धतीने अनेक दृश्य चित्रित केली, रात्रीच्या  लढाईचा  प्रसंग चित्रित करताना त्यांनी अंधारात दोन्ही पक्षांचे तुंबळ युद्ध चालू असताना तोफा डागायचे ठरवले, तोफातून एका पाठोपाठ एक याप्रकारे गोळे बाहेर पडत असताना दारूचा जो प्रकाश पडेल, त्या प्रकाशात युद्धाचा प्रकाश व काळोख असा फार गमतीचा खेळ पडद्यावर दिसत होता. ही दृश्ये या चित्रपटाची प्रमुख आकर्षण ठरली. पोवाडा हा संगीतप्रकार या चित्रपटातून प्रथमच पडद्यावर आला. इंग्रजांच्या राजवटीविरुद्ध स्वातंत्र्याचा लढा जोरात सुरु होता. त्याचवेळी या चित्रपटातून लहरी हैदर यांनी रचलेला पोवाडा 'चल उठ गड्या, चल वीर गड्या, घेऊन भाला, ढाल गड्या, शूर शिपाई शिवाजीचा तू, मर्द मराठा मावळचा ' या वीरश्रीयुक्त पोवाड्याने जनक्षोभ अधिक उसळत असे. गोविंदराव टेबे यांनी अत्यंत जोशपूर्ण संवाद लिहून अभिनय व संगीताप्रमाणे चित्रपटासाठी लेखणीचं  कसब सिद्ध केलं. जुन्या जमान्यातील हा चित्रपट, त्यावेळी विजेच्या दिव्यावर किंवा बंदिस्त साउंड प्रूफ स्टुडिओत चित्रीकरण होत नसे. चित्रपट म्हणावा तेव्हढा गतिमान झाला नव्हता तरीही त्याकाळी 'सिंहगड' प्रचंड गाजला आणि त्यातुन प्रभातच्या चालकांना पुढचे रंगीत चित्रपट निर्माण करण्याची उमेद मिळाली.


  ज्येष्ठ दिग्दर्शक राम गबाले यांचा ' नरवीर तानाजी ' ( १९५२ ) –


मुंबईच्या कोहिनूर टॉकीजचे मालक श्री कान्हेरे यांनी एक ऐत्याहासिक चित्रपट करायचे ठरवले. साहजिकच शिवरायांचा पराक्रमी शिलेदार नरवीर तानाजी मालुसरे हा विषय त्यांनी निवडून बाबुराव पैलवान (तानाजी मालुसरे), मा. विठ्ठल (छत्रपती शिवाजी महाराज ), दुर्गाबाई खोटे (जिजामाता), रायबा (मदनमोहन ) शेलारमामा (केशवराव धायबर ) यांच्याबरोबर नायिका सुलोचना, वसंतराव पैलवान असा कलाकारांचा संच निवडला. बाबुरावांचे व्यक्तिमत्व रांगडे होते. त्यांची पैलवानी देहयष्टी तानाजीच्या भूमिकेला शोभून दिसणारी होती. पण मराठी संवाद बोलण्याची त्यांची बोंब होती. या चित्रपटातील त्यांचे सारे संवाद प्रख्यात गीतकार ग दि माडगूळकर यांच्या आवाजात डब केले गेले. दिग्दर्शक म्हणून राम गबाले यांनी ऐत्याहासिक चित्रपट केला नव्हता. यात लढाया,  कुस्त्या, वाघाशी झुंज,  दांडपट्ट्याने हत्तीची सोंड छाटणे असे प्रसंग चित्रित करायचे होते. भगवानदादा यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रीकरणाला सुरुवात झाली. हत्तीची सोंड कापण्याच्या प्रसंगासाठी हत्ती पाहिजे होता, ग दि माडगूळकर यांच्या ओळखीने औंध संस्थानाचा हत्ती मिळाला. हत्ती व्ही.आय.पी असल्याने त्याचं खाणं -पिणं, राहाणे आणि माहुताची बडदास्त ठेवली गेली होती. स्टुडिओमध्येच उदयभानूच्या वाड्याचा मोठा सेट उभारला होता. रात्रीचा सीन होता. लढाई चालू असताना तानाजी दांडपट्टा चालवीत सपासप शत्रूसैन्य कापत हटवत येतो. लढाई अगदी निकारावर आल्यावर उदयभानु हत्तीवर स्वार होऊन तानाजीच्या दिशेने अंगावर येत असताना तानाजी हत्तीची सोंड हातात धरून कापतो, खरे तर तो प्रसंग अवघड होता. त्या काळात आतासारख्या स्पेशल इफेक्टच्या सोयीचा अभाव होता, ट्रकच्या टायरची ट्यूब कापून सोंडेसारखी हत्तीच्या सोंडेला दुमडून बांधली होती. सर्व तयारी झाली. माहूत त्याच्या भाषेत हत्तीला चुचकारत होता. हत्तीनं पळत येणं आणि तानाजीने सुरक्षित अंतरापर्यंत दांडपट्टा फिरवीत जाणे एव्हढाच शॉट हवा होता, सर्व तयारी झाली, तानाजी ठरलेल्या अंतरापर्यंत आला आणि हत्तीने एकदम रागावून ' हे काय बांधलय' या भावनेने पक्की बांधलेली इनर ट्यूब रागाने उडवून टाकली आणि नासधूस करू लागला.

दुसरा प्रसंग तानाजी जंगलात वाघाशी सामना करतो असा सीन होता. त्यासाठी शिकाऊ वाघ कुठे मिळेल तिथे जायचं ठरलं. पंढरपूरच्या सर्कशीत असा वाघ आहे असे समजल्यानंतर चित्रपटाचा चमू तिकडे गेला. एका बंदिस्त धर्मशाळेत झाडांच्या फांद्या, मोठमोठे दगड लावून जंगलाचा देखावा उभा करून सेट उभारला. वाघाच्या रिंगमास्टरला तानाजी सारखे केस, भरदार मिश्या, कपडे, डोक्यावर मराठेशाही पगडी, वैगरे वेशभूषा करून तयार ठेवला. वाघाचे स्वतंत्र आणि एकत्र शॉट्स घ्यायची योजना पक्की केली. कॅमेराच्या लेन्सपुरती मोकळी जागा ठेऊन डुप्लिकेट तानाजी आत सोडला. वाघाने रिंगमास्टरला आवाजावरून ओळखले परंतु आपला हा रोजचा भिडू आज हे काय करून आलाय म्हणून वाघाने डरकाळी फोडत त्याची पगडी आणि केसांचा विग उडवून दिला. मात्र पुढे बाबुराव पेहेलवानांच्या सोबत हवे तसे शॉट्स चित्रित झाले. चित्रीकरण संपल्यानंतर सर्कशीच्या चमूला एक ग्रुप फोटो काढायचा होता, वाघ मध्ये आणि त्याच्या बाजूला तो रिंगमास्टर उभा राहिला. नेहमी फोटोमध्ये मध्यभागी महत्वाच्या जागी उभे राहणारे मान्यवर यावेळी मात्र फोटोत दूर दूर उभे राहिले. हा चित्रपट सुद्धा भरपूर चालला.

अजय देवगण-ओम राऊत यांचातान्हाजी: अनसंग  वॉरियर’ (२०२०)  -

 

'हर मराठा पागल है शिवाजी महाराज का और भगवे का' अशा दमदार डायलॉगसह 'तानाजी : द अनसंग वॉरियर' हा हिंदी बहुचरर्चित  चित्रपट संपूर्ण देशभर प्रदर्शित करण्यात आला. लढवय्या तानाजींची ही वीरगाथा आधुनिक तंत्रज्ञान वापरुन बनवली होती. अंगावर शहारे आणणारी दृश्ये  चित्रपटात  साकारण्यात आली, तान्हाजींचे जीवन आणि त्यांनी मुघलांवर मिळवलेला विजय 3 डी प्रसंगांतून ७० एमएम पडद्यावर जिवंत करण्याचा प्रयत्न केला होता. अभिनेत्री काजोलने तानाजीच्या पत्नीची सावित्रीबाई यांची भूमिका साकारताना कपाळी ठसठशीत कुंकू, नाकात नथ, डोक्यावर पदर आणि करारी नजर अशा तिच्या मराठमोळ्या लुकचं तुफान कौतुक झाले होते. तसेच अभिनेता शरद केळकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली तर कोंढाण्याचा अधिकारी असणाऱ्या उदयभानू राठोडची भूमिका सैफ अली खान याने केली.  १५० कोटी रुपयांचा  बजेट असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊतने केले होते. सिनेमाविषयी बोलताना अजय देवगन म्हणाले होते की, भारताच्या इतिहासात मोलाची भूमिका बजावणाऱ्या तान्हाजीसारख्या शूरवीराची कहाणी सादर करताना मला अतिशय आनंद वाटतो आहे. मला ही कथा आपल्या देशाच्या नव्हे तर जगाच्या प्रत्येक काना-कोपऱ्यापर्यंत पोहोचलेली पहायची आहे.” आणि तसेच घडले. संपूर्ण भारतातील सर्व प्रांतातील  सर्वभाषिकांनी या चित्रपटाचे उस्फुर्त स्वागत केले. त्यामुळे या चित्रपटाने ३०० करोडहून अधिक कमाई केली होती. 
हे पाचही सिनेमा पाहिले, तरी एक गोष्ट सतत मनाला जाणवत राहते. हे शेवटी सिनेमे आहेत. तानाजी मालुसरे ही एक व्यक्ती नव्हती. तो एक जिवंत इतिहास होता. या इतिहासाकडे प्रत्येकजण आपपल्या चष्म्यातून पाहणार आहे. त्यामुळे तो प्रत्येकाला वेगळा दिसणार आहे. हा इतिहास जमेल तेवढा समजून घेऊनच, हे सिनेमे पाहायला हवेत. म्हणजे इतिहास आणि सिनेमा यातील गल्लत टाळता येईल.


रवींद्र मालुसरे
अध्यक्षमराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई
chalval1949@gmail.com 
९३२३११७७०४



बुधवार, २३ ऑगस्ट, २०२३

डॉ गजानन शेपाळ यांच्या 'रंगासभा' ग्रंथाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

*डॉ गजानन शेपाळ यांच्या 'रंगसभा' ग्रंथाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन*



*ललित कला अकादमीचे विभागीय केंद्र महाराष्ट्रात सुरु करण्यासाठी केंद्र राज्याकडे पाठपुरावा करण्याचे राज्यपालांचे आश्वासन*

*सर्जनशील आणि सांस्कृतिक उद्योगातील संधींचा कलाकारांनी लाभ घ्यावा: राज्यपाल रमेश बैस*

 मुंबई : (रवींद्र मालुसरे) - नवी दिल्ली येथील ललित कला अकादमीचे विभागीय केंद्र महाराष्ट्रात लवकरात लवकर सुरु व्हावे यासाठी आपण व्यक्तिशः लक्ष घालू तसेच केंद्र आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा करु, असे आश्वासन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे दिले.  

सर .जी. उपयोजित कला महाविद्यालय येथील प्राध्यापक डॉ. गजानन शेपाळ यांच्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या दृश्यकला विषयक लेखांचे संकलन असलेल्या 'रंगसभा' या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल बैस यांच्या हस्ते शनिवारी (दि. १९) महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडले, त्यावेळी ते बोलत होते

यावेळी प्रकाशन सोहळ्याला ललित कला अकादमीचे माजी अध्यक्ष डॉउत्तम पाचरणे, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष रविंद्र मालुसरे, ज्येष्ठ पत्रकार विवेक सबनीस, उपयोजित कला महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ संतोष क्षीरसागर कला क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.  

सर्जनशील आणि सांस्कृतिक उद्योग क्षेत्र जगातील अर्थव्यवस्थेत सर्वाधिक गतीने वाढणारे क्षेत्र आहे. कलात्मक वस्तूंचा जागतिक व्यापार सातत्याने वाढत आहे या क्षेत्रात रोजगाराच्या प्रचंड संधी निर्माण होत आहेत. या संधींचा कलाकारांनी लाभ घ्यावा असे राज्यपालांनी सांगितले. कला, शिल्पकला, वारसा, संगीत या क्षेत्रात खासगी क्षेत्राने देखील गुंतवणूक करावी असे राज्यपालांनी सांगितले.   न्यूयॉर्क येथील 'मेट गाला' फॅशन उत्सवाप्रमाणे मुंबईचा देखील कलाविषयक 'मेट कला' महोत्सव असावा अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली

राज्यातील कला महाविद्यालयांमध्ये हजारो विद्यार्थी कला शिक्षण घेत आहेत. या महाविद्यालयांचे बळकटीकरण करून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण केले पाहिजे. या दृष्टीने कला संस्थांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्याबाबत आपण शासनाला सूचना करू असेही राज्यपालांनी सांगितले

आदिवासी समाज तसेच ग्रामीण भागात लोक घरी चित्र लावतात किंवा रांगोळी काढतात. त्याचप्रमाणे शहरातील लोकांना देखील आपल्या घरी, भिंतींवर कलाकृती असावी असे वाटते. मात्र कलाकृती जनसामान्यांना परवडणाऱ्या असल्या पाहिजे. तसे झाल्यास कलेचे लोकशाहीकरण होईल असे सांगताना आपल्या कलाकृती परवडणाऱ्या नसल्या तर चीन सारखे देश आपल्या स्वस्त कलाकृती मूर्ती घरोघरी पाठवतील असा इशारा राज्यपालांनी दिला

आपण स्वतः एक छोटे दृश्य कलाकार असून जे जे स्कुलला भेट देण्याचे आपले स्वप्न होते, असे राज्यपालांनी सांगितले. गजानन शेपाळ यांनी राज्यातील अनेक ज्ञात अज्ञात दृश्य कलाकारांना तसेच कला संस्थांना आपल्या लिखाणाच्या माध्यमातून प्रकाशात आणल्याबद्दल राज्यपालांनी त्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे आयोजक असलेल्या मराठी वृत्तपत्रलेखक संघ मुंबईने अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केल्याबद्दल राज्यपालांनी संस्थेचे अभिनंदन केले.  

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगांवकर, कार्याध्यक्ष रमेश सांगळे, कोषाध्यक्ष आत्माराम गायकवाड, नितीन कदम, राजन देसाई, दिगंबर चव्हाण, विजय ना कदम, मनोहर साळवी, सतिश भोसले, सुनील कुवरे, दत्ताराम गवस, अब्बास अतार, प्रकाश बाडकर, दिलिप सावंत, नंदकुमार रोपळेकर, पास्कोल लोबो, जे जी स्कुलमधील प्रा राहुल मेश्राम, दीपक वर्मा, सौ निता चौधरी, सौ राधिका कुसुरकर-वाघ  आदींनी विशेष मेहनत घेतली.

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत सत्याची कास धरून पत्रकारिता करावी.

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत  सत्याची कास धरून पत्रकारिता करावी. सतरावे शतक प्रबोधनाचे ,  अठरावे शतक वैचारिकतेचे ,  एकोणीसावे शतक प्रगतीचे...