शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३

सत्यशोधक समाज 150


सत्यशोधक समाज :  शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष

१८१८ साली पेशवाई अस्तास गेली आणि हिंदुस्थानात ब्रिटिशांचा एकछत्री अंमल सुरु झाला. हा काळ म्हणजे सांस्कृतिक दृष्टीने अवनतीचा काळ  म्हटला पाहिजे, ब्राम्हण कर्मकांडात बुडाले होते, समाजामध्ये कनिष्ठ जातीच्या लोकांना सामाजिक आणि बौद्धिक जीवनात कोणतीच प्रतिष्ठा नव्हती. वर्ण जातिस्त्रीदास्य व धर्मास प्राप्त झालेले विकृत स्वरूप यामुळे तत्कालीन समाजाची स्थिती दयनीय झाली होती, शोषक आणि शोषित अशा दोन वर्गामध्ये समाजाचे विभाजन झाले होते. १८६० साली भारतीय दंड संहिता अस्तित्वात आल्यानंतर दळणवळणाच्या आधुनिक साधनामुळे लोकांचा परस्परांशी संपर्क वाढला.  विचारांची देवाणघेवाण व बदलत्या जगाचा परिचय यामुळे संकुचितपणाची जागा उदारमतवादाने घेतली.  आधुनिक शिक्षण पद्धतीने हिंदू - मुस्लिम पारंपरिक, धार्मिक, शिक्षणसंस्था मागे पडल्या इतिहास, गणित, भूगोल, सृष्टीविज्ञान अशा आधुनिक विद्याशाखांनी धार्मिक विद्यांचे स्थान घेतले. शब्दप्रामाण्यवर आधारित कोणतीही जुनी धर्मसंस्था समाजाचा विकास खुंटवणारी आहे, हे नवशिक्षितांच्या लक्षात आले, त्यातून धर्मचिकित्सा सुरु झाली, यालाच ब्रिटिश राजवटीतला प्रबोधनाचा काळ असे म्हणतात, या काळात उदारमतवादी ब्रिटिश सत्तेच्या आगमनामुळे व ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या संपर्कामुळे सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रात अनेक प्रकारच्या गोष्टींच्या चर्चा सुरू झाल्या, विशेषतः हिंदू धर्मातील कालबाह्य रूढी परंपरेबद्दल व पुरोहित शाहीच्या वर्चस्वाबद्दल, अमानुष जातीप्रथेबद्दल, स्त्रियांच्या दयनीय स्थितीविषयी लिहिणाऱ्यांची संख्या वाढली. उलटसुलट चर्चा सुरू झाली होती.आपल्या समाजात प्राचीन काळापासून धार्मिक आणि सामाजिक जीवनाच्या व्यवच्छेदक सीमारेषा कधीही स्पष्ट झालेल्या दिसत नाहीत. त्यामुळे प्रत्येक सामाजिक प्रश्नाचा कोठे ना कोठे धर्माशी संबंध आलेला आहे. प्रथम सामाजिक सुधारणा की राजकीय स्वातंत्र्य हा वाद एकोणिसाव्या-विसाव्या शतकात निर्माण झाला होता लोकहितवादी, महात्मा फुले, न्या रानडे, गोपाळ गणेश आगरकर यांच्याप्रमाणेच मुकुंदराव पाटील यांनी सामाजिक सुधारणेचा पक्ष घेतला. देशाच्या स्वातंत्र्याची कळकळ असणे योग्य असले तरी समाजाच्या अधोगतीकडे दुर्लक्ष करून देशाची उन्नती होणे अशक्य आहे . सर्व समाजात शांतता, समता आणि ममता यांचा प्रसार करून सर्व मागासलेल्या वर्गाची विद्यादेवीच्या मंदिरात परस्परांशी ओळख पटविणे, देशबंधुत्व अनुभवास आणून देणे ही देशोन्नतीची अंगे आहेत असे त्यांना वाटत होते तत्कालीन राजकीय चळवळ आणि बहुजन समाजाची समाजोन्नती या परस्पराहून भिन्न असल्याने ही राजकीय चळवळ मागासलेल्या व उपेक्षित वर्गाच्या उन्नतीस मारक आहे त्यामुळे बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी सामाजिक सुधारणाच महत्वाच्या आहेत असा विचार त्यांनी व्यक्त केला.

इंग्रजांच्या अमलांत विशेषतः बंगाल प्रांतात बदलाचे वारे वाहू लागले होते, महाराष्ट्रात सुद्धा ते लवकरच पोहोचले.  महाराष्ट्रातील बुद्धिप्रामाण्यवादी, सुधारणावादी, शिक्षित वर्गाने ब्रिटिश राजवटीतील सुधारणांचा स्वीकार आनंदाने केला. या मंडळींनी वैयक्तिक प्रयत्नांबरोबरच संघटनात्मक प्रयत्ननांवर देखील विशेष जोर दिला. उच्च शिक्षित अत्यंत बुद्धिमान व समाजोद्धाराची तळमळ असणाऱ्या समाजसुधारकांनी प्रबोधनाचा लढा सुरू केला, आर्य समाज, ब्राम्हो समाज, प्रार्थना समाज यांची भूमिका मात्र वेगळी म्हणजे वेद हे ईश्वरनिर्मित आहेत अशी त्यांची श्रद्धा होती. या तीन समाजाचे संस्थापक वरिष्ठ ब्राम्हण जातीतील होते, आध्यात्मिक समतेसाठी त्यांचे प्रयत्न होते परंतु त्यांचा सर्वसामान्य जनतेशी फारसा संबंध नव्हता, या तीन समाजाच्या पार्श्वभूमीवर सत्यशोधक समाजाने खेड्यापाड्यातील जनसामान्यांच्या मनात स्थान मिळविले, तसेच त्यांच्या जाणिवांना, आकांक्षाना आधुनिक भारताच्या जडणघडणीत जोतिबा फुले यांचे योगदान महत्वपूर्ण आहे.  ब्राम्हो समाज, प्रार्थना समाज, आर्य समाज, परमहंस सभा, मानवधर्म सभा, यांच्याप्रमाणे सत्यशोधक समाजाचे लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, न्या महादेव गोविंद रानडे, गोपाळ गणेश आगरकर, भाऊ महाजन, विष्णुशास्त्री पंडित, महात्मा फुले यांनी माणसाला साध्य मानले आणि व्यक्तिवाद, विवेकवाद, इहवाद या आधारभूत तत्त्वावर स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, न्याय, सहिष्णुता या मूल्यांवर आधारित नवसमाजरचना निर्माण करण्यासाठी प्रबोधन केले. साहित्य, नियतकालिके, कृतीकार्यक्रम इत्यादींच्या माध्यमातून प्रबोधनाचा विचार सर्वदूर पोहोचविण्याचा प्रयत्न केला. संघटनात्मक समाजसुधारणेचे कार्य करताना हे सर्वजण एकेश्वरवादी होते सर्व मानव एकाच ईश्वराची अपत्ये आहेत, ईश्वराची आराधना करण्यासाठी पुरोहितांची आवश्यकता नाही, महात्मा फुले यांना तर कोणताही धर्मग्रंथ, धर्मसंस्था आणि समाजसंस्था ईश्वरप्रणित आहे असे वाटत नव्हते . सारे ग्रंथ माणसानेच निर्माण केलेले आहेत त्यांच्या भोवती ईश्वरी आज्ञेचे वलय निर्माण करून समाजाची वंचना केली जाते असे त्यांचे प्रतिपादन होते. आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासातील सत्यशोधक चळवळ ही एक गतिशील परिवर्तनवादी सामाजिक चळवळ होती. महात्मा फुले यांनी  आपल्या सहकाऱ्यांसमवेत २४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना करून आपल्या कार्याला संघटनात्मक  रूप दिले. धर्मसत्तेखाली भरडले व अर्थसत्तेखाली पिळलेले शेतकरी, शेतमजूर, दलित, पददलित, स्त्रिया आदी शोषित जनसमूह हे सत्यशोधक चळवळीच्या केंद्रस्थानी होते. सत्यशोधक चळवळीने आमूलाग्र सामाजिक परिवर्तनाचाआग्रह धरला. बहुजन समाजाच्या सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक परिवर्तनाचा अपूर्व लढा दिला. हजारो वर्षांपासून दबलेल्या, पिचलेल्या, शोषलेल्या जनसमूहाने प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध आपले मानवी हक्क व मानवी प्रतिष्ठेसाठी पुकारलेले ते एक लोकआंदोलन होते. सत्यशोधक चळवळीचा मराठी जनसमूहांच्यावर दूरगामी परिणाम झाला. आधुनिक महाराष्ट्राचा पुरोगामी विचार घडविण्यात सत्यशोधक चळवळीचे सर्वाधिक श्रेय आहे. सत्यशोधक चळवळ खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलेली आधुनिक भारतातील पहिली प्रबोधनपर लोकचळवळ होती.

महात्मा जोतिबा फुले यांनी सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून समाजाच्या पुनर्मांडणीचे  बीजारोपण केले. सत्यशोधक चळवळ ही परिवर्तनाची चळवळ म्हणून सतत उल्लेखलेली गेली, पण त्याबरोबर च ती शेतकऱ्यांना आत्मभान देणारी , त्यांचे मागासलेपण आणि शोषण यांची कारणमीमांसा करणारी महाराष्ट्रातील पहिली शेतकरी चळवळ होय.  सत्यशोधकांनी शेतकऱ्यांच्या जीवनातील अठराविश्वे दारिद्रय दुःख अज्ञान श्रद्धा अंधश्रद्धा याचबरोबर त्यांना नागविणारी प्रस्थापित व्यवस्था यांचे वस्तुनिष्ठ चित्र सत्यशोधकीय नियतकालिकांतून मराठी जनसमुहापुढे ठेवले या देशात सर्वाधिक शोषित उपेक्षित हा शेतकरीच असून त्याची मनमानी लूट प्रत्येकजण कशी करत असतो याचे वास्तव लोकभाषेतून निर्भीडपणे मांडले गेले.  परंतु सत्यशोधक चळवळीचा शेतकरी आणि शेती विषयक विचार कोणीच गंभीरपणे घेतला नाही याचे कारण शेतकऱ्यांविषयी असलेला तुच्छताभाव आणि त्याच्या जगण्याची दखलच न घेण्याची अभिजन मानसिकता हे आहे शोषणाची मुळे शोधताना धर्मसंस्था, राज्यसंस्था, सरंजाम शाही नोकरशाही याचबरोबर इथला सामान्य जो शेतकऱ्यांच्या श्रमावर जगत होता तोही शेतकऱ्यांची मनमानी लूट करीत होता सत्यशोधक चळवळीचा श्वासच हा मुळी शेतकरी होता त्यामुळे त्यांनी या घटकांचा समाचार घेताना शेतकऱ्यांमधील घातक समजुती, रूढीपरंपरा अडाणीपणा यासारखे त्याचे जगणे उध्वस्त करणारे घटक या साऱ्यांवर सत्यशोधक चळवळीने रोखठोक आसूड ओढले.

महात्मा फुले व सत्यशोधक चळवळीने मध्यमवर्गीय, नागर, पांढरपेशा वर्गाबाहेर असलेल्या ग्रामीण शेतकरी कष्टकरी दलित वंचित जनसमूहांच्या मागासलेपणाची व शोषणाची मूलगामी मीमांसा केली व त्यांच्या समग्र मुक्तीचे क्रांतीतत्व मांडले. महात्मा फुल्यांच्या विचारांचे अधिष्ठान लाभलेली सत्यशोधक चळवळ ही प्रामुख्याने शोषित जनसमूहांना केंद्रित ठेवून निर्माण झाली होती, तसेच मानवी हक्काच्या प्रस्थापनेसाठी एका पर्यायी शोषणमुक्त, समतामूलक समाजरचनेची गरज प्रतिपादन करणारी अशी ही चळवळ होती, या चळवळीने सामाजिक व धार्मिक सुधारणांसाठी ध्येयधोरणे निश्चित करून ती यथाशक्ती राबविण्याचा प्रयत्न केला. सत्यशोधकीय साहित्य, विधिविवाह, शेतकरी संघटन, कामगार संघटन, नियतकालिके, सत्यशोधक जलसे, प्रबोधन कीर्तने - प्रवचने, शिक्षण प्रसार अशा विविध क्षेत्रात व्यापक रचनात्मक कार्य उभे राहिले.

दीड शतक उलटल्यानंतर महात्मा फुले यांचे चरित्र आणि कार्य, त्यांची महानता, महात्मेपण उत्तरोत्तर प्रभावित आणि प्रकाशमान होत चालले आहे, काही प्रतिगामी शक्ती त्यांचे चरित्रहनन करतात परंतु सनातन विचारांच्या लोकांनीही आता जोतीरावांचे मोठेपण मान्य केले आहे, पण ज्या स्तरातील लोकांसाठी, बहुजन शेतकरी कामगारांसाठी सत्यशोधक चळवळ निर्माण झाली होती, त्यांना आता या समाजाचे महत्त्व वाटत नाही, त्यांना सत्यशोधक विचारसरणीचा विसर पडला आहे, सारा समाज गुलामगिरीतून मुक्त व्हावा, समाजात सुधारणा व्हावी, त्यांची नैतिक प्रगती घडून विवेकमूल्यांची अभिवृद्धी व्हावी हा सत्यशोधक समाज स्थापनेमागील हेतू होता, पण स्वातंत्र्यानंतर समाजाचा विवेक वाढला नाही, याउलट भ्रष्टाचार, काळाबाजार, शोषण करणाऱ्या प्रवृत्ती वाढल्या, भारतीय राज्यघटनेने सर्वांना समान संधी व समान हक्क दिले पण अस्पृश्यांवर अन्याय होतच आहेत, खेड्यापाड्यात स्त्रियांचे शिक्षण वाढले नाही, समाजात आजही म्हणावा तसा बुद्धिवादी दृष्टीकोन निर्माण झाला नाही. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाला आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे याचाच अर्थ सत्यशोधकांचे कार्य आजही संपले नाही, दीडशे वर्षानंतरही अपेक्षित यश प्राप्त झाले नाही त्यामुळे आता सत्यशोधक समाजाने काही गोष्टीचा फेरविचार करणे काळाची आवश्यक आहे.

 


- रवींद्र मालुसरे

अध्यक्ष,मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई

९३२३११७७०४

रविवार, १७ सप्टेंबर, २०२३

सार्वजनिक गणेशोत्सव : राष्ट्रीय ऐक्याचे प्रतीक


सार्वजनिक गणेशोत्सव : 

राष्ट्रीय ऐक्याचे प्रतीक

- रवींद्र मालुसरे


भारताचे लक्षवेधी सांस्कृतिक वैशिष्टये ठरलेला आणि मुख्यतः महाराष्ट्रासह सध्या देशापरदेशात भूषणावह असलेला व १३० वर्षाची परंपरा लाभलेला वार्षिक सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या थाटामाटाने आणि उत्साहाने सुरु होत आहे. श्रावण महिना संपत आला की वेध लागतात ते आपल्या प्रिय गणरायाच्या आगमनाचे. बाप्पा नुसता आठवला तरी मन कसं प्रसन्न होतं. उत्सवप्रियता हा मानवी जीवनाचा एक विशेष भाग आहे, भारतीय परंपरेतील एक धारा असलेली मराठी संस्कृती ही उत्सवप्रधान आणि उत्साहवर्धक आहे. श्रावण-भाद्रपद-अश्विन-कार्तिक या चातुर्मासात तर अनेक उत्सवांची रेलचेल असते. गणपती हे तर प्राचीन काळापासून मराठी माणसांचे लोकप्रिय दैवत आहे. मूलतः हि आर्येतर देवता. वैदिक मंत्र्यांच्या घोषात वैदिकांनीही ती स्वीकारली. आणि पाहता पाहता सर्व स्तरात ती विकास पावत गेली. ज्ञानाच्या क्षेत्रात तो बुद्धिदाता तर सकाम साधना करताना तो विघ्नहर्ता म्हणून ठरला. त्याची मनापासून भक्ती केली तर तो साधकाच्या मार्गातील सर्व विघ्ने दूर करतो आणि सर्व प्रकारची मनोवांछित सुखे प्रदान करतो अशीही श्रद्धा ह्या दैवताविषयी जनसामान्यात मनात दृढमूल झाली आहे. प्रत्येक मंगल कार्याच्या शुभप्रसंगी श्रीगणेशाचे आवाहन करण्याची व्यक्तिगत पातळीवर किंवा कौटुंबिक पातळीवरील पूजाअर्चा हि पूर्वापार परंपरा आहे.

गणपतीचे रूप हे ओंकाराकार आहे. ओंकारावर बुद्धी व लक्ष केंद्रित केली तर भौतिक ऐश्वर्य,वैश्र्विक सामर्थ्य, बौद्धिक साक्षात्काराची प्राप्ती होते. तसेच गणपती हा समूहाचा नेता आणि तत्वज्ञानाची देवता. त्याचप्रमाणे गणेश हि विद्येची देवता ! साहित्यापासून संगीतापर्यंत आणि समरांगणापासून भोजनापर्यंत अधिवास करीत असते. श्री गणेश हि अन्य देवतांपेक्षा अगदी आगळी देवता ! ती गणांची देवता म्हणून तिला 'गणपती' हे अधिदान प्राप्त झालेले आहे. भाद्रपद शु || चतुर्थीला 'वरदा चतुर्थी' असेही म्हणतात. त्या दिवशी गणपतीची मृण्मयमूर्ती घरी आणून सिद्धीविनायक या नावाने तिची दिड दिवस स्थापना करून विधिपूर्वक पूजा केली जाते.
शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या साम्राज्याचे प्रतिध्वनी पुढे मराठेशाहीच्या आणि पेशवाईच्या वैभवातून सांस्कृतिक जीवनात उमटू लागले. पेशवाईत शनिवारवाड्यात श्री ची स्थापना,पूजा,अर्चना,आरती,मंत्रजागर वैगरे धार्मिक कार्यक्रम यथासांग केले जात असे. त्याचबरोबर या उत्सवात विद्वान, कथेकरी, हरिदास यांचे व शाहीर, कलावंतिणी यांचे कार्यक्रम होत असत. विसर्जनाचा कार्यक्रम सुद्धा फुलांनी शृंगारलेल्या पालखीतून वाजत गाजत थाटामाटात होत असे. स्वतः श्रीमंत पेशेवे इतर सरदार व दरबारी प्रतिष्ठीतांसह पालखीबरोबर असत. पुढे ब्रिटिश आमदानीतही शिंदे,होळकर,पवार,पटवर्धन यासारख्या स्वतंत्र संस्थाने असलेल्यांच्याकडे गणेश उत्सव इतमामाने होत असे.
इ स १८९२ मध्ये पुण्याचे सरदार नानासाहेब खाजगीवाले हे ग्वाल्हेर येथे गेले असताना दरबारी गणेश उत्सव सार्वजनिक स्वरूपात करीत असल्याचे त्यांना दिसून आले. त्यावरून हा उत्सव यापेक्षाही अधिक आनंद आणि उत्सवी स्वरूपात पुण्यामध्ये करावा अश्या कल्पनेने ते परत आल्यानंतर श्री खाजगीवाले, श्री धोडवडेकर व श्री भाऊ रंगारी यांचे तीन सार्वजनिक गणपती बसले. सार्वजनिक गणेश उत्सवाची हि कल्पना लोकमान्य टिळकांना आवडली. या उत्सवाच्या माध्यमातून विस्कळीत होत चाललेला हिंदू समाज संघटित होवून ब्रिटिशांच्या विरोधात स्वातंत्र्याच्या आंदोलनाचे पाऊल पुढे पडेल हि कल्पना लोकमान्यानी हिरीरीने अमलात आणण्याचे ठरवून कार्यारंभाला सुरुवात केली. लोकमान्य हे जनसामान्यांच्या नाड्या पकडणारे, सांस्कृतिक घटनांना उजाळा देणारे जसे संस्कृती पूजक होते तसेच राष्ट्र उत्थानाचा सतत विचार करणारे एक थोर तत्वचिंतक सुद्धा होते. सर्वधर्मसमभाव निर्माण करण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात सुरु केलेला या उत्सवाबाबत प्रारंभी काही लोकांनी या गणेश उत्सवाला आक्षेप घेतला. समाजातील विशिष्ट वर्गाचा हा उत्सव असून मुसलमानांच्या मोठ्या प्रमाणात निघणाऱ्या ताबूत मिरवणुकांना विरोध करण्यासाठी हे टिळकांच्या डोक्यातून निघाले असल्याची टीका जाहीरपणे लोक करू लागले. महाराष्ट्रात त्या वेळी काही ठिकाणी प्लेगची साथ पसरली होती, आता हि साथ का पसरली तर देवघरातला गणपती चौकात आणून बसविला म्हणून अशी सडकून टीका होऊ लागली. परंतु लोकमान्यांच्या प्रभावी राष्ट्रव्यापी नेतृत्वापुढे या आक्षेप घेणाऱ्यांचे काही चालले नाही. पुण्यात सार्वजनिक गणपती स्वतः टिळकांनी १८९४ मध्ये विंचूरकरांच्या वाड्यात बसवला. याबाबत अलीकडे वाद असला तरीही या उत्सवाला सार्वजनिक व आंदोलनाची पार्श्वभूमी करण्याचा मान लोकमान्यांनाच जातो.

लोकमान्य टिळकांनी पारतंत्र्याच्या काळामध्ये या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले. त्यामागे मुख्यतः लोकशिक्षण आणि समाज जागृती हाच एकमेव उद्देश होता. शिवाय या सार्वजनिक उत्सवामध्ये समाजातील सर्व जाती-धर्माचे,श्रीमंत-गरीब अशा विविध समाज घटकांनी गुण्यागोविंदाने एकत्र यावे आणि सलोखा,सहकार्य आणि बंधुभावाचा नात्याने परस्परातील नाते घट्ट होऊ शकेल असाही या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप देण्याचा त्यांचा विधायक हेतू होता. सश्रद्ध भावनेने साजऱ्या भावनेने साजऱ्या होणाऱ्या या उत्सवाला लोकमान्यांचा खरा उद्देश लोकशिक्षण आणि लोकजागृती असाच होता. आणि त्याच कारणास्तव उत्सव काळामध्ये दहा दिवस समाजसुधारक,विचारवंत,
अभ्यासक यांची व्याख्याने होऊ लागली. अर्थात त्या भाषणाचा अंतस्थ हेतू सामान्य जनतेला पारतंत्र्याचे तोटे आणि स्वातंत्र्याचे फायदे समजावून सांगणे हाच होता. यथावकाश अशा वैचारिक प्रबोधनाचा, समाज जागृतीच्या मार्गदर्शक उपक्रमांमध्ये करमणुकीच्या कार्यक्रमांची भर पडली. स्वातंत्रोत्तर काळात मात्र यथावकाश लोकशिक्षण आणि लोकजागृती ही उद्दिष्टये क्षीण होऊ लागली.
टिळकपर्वात सार्वजनिक गणपती उत्सव म्हणजे ज्ञानाची सदावर्तेच होती. स्वतः लोकमान्य टिळक,न चि. केळकर, नाट्याचार्य खाडिलकर,काळकर्ते परांजपे,महर्षी शिंदे, मदन मोहन मालवीय, सरोजिनी नायडू, बिपीनचंद्र पाल, आचार्य विनोबा भावे, साने गुरुजी, सेनापती बापट, रँग्लर परांजपे, वीर सावरकर, दादासाहेब खापर्डे यांच्यासारखे हिंदू वक्ते ज्याप्रमाणे होते, त्याप्रमाणे मौलवी सय्यद मुर्तुजा, बॅ. आझाद, डॉ एस. एम. अल्लि, जनाब गुलशेरखान, रसुलभाई यासारखे मुसलमान वक्तेही होते. परदेशी मालावर बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण, स्वदेशाचे स्वराज्य याचा प्रचार यातून मोठ्या प्रमाणात होत असे. पुण्यातील सोट्या म्हसोबाच्या गणपतिच्यापुढे ह.भ. प. सोनोपंत दांडेकरांच्या अध्यक्षतेखाली श्री गुलाम दस्तगीर यांची सतत ७३० दिवस व्याख्याने झाली. पुढे गांधीयुगातही गणेश उत्सवात राष्ट्रीय चळवळीने अधिक जोर धरला. खादीचा प्रचार, सत्य, अहिंसा, सत्याग्रह, असहकार, कायदेभंग, ग्रामोध्दार, अस्पृश्यता निवारण, जातीभेद निर्मूलन यासारख्या अनेक उपक्रमांची माहिती जनतेला होऊ लागली. त्याचबरोबर गणेशोत्सवातील मेळ्यातुन अनेक कलावंत, वक्ते, कीर्तनकार, नृत्यकार, शाहीर,
गवई, नट यांच्या कलेला वाव मिळाला. समाजातून नेतृत्व पुढे येऊ लागले. दातृत्व वाढीस लागले. समाजा-समाजातील भेदाभेद दूर होऊन समता प्रस्थापित होण्यास फार मोठे सहाय्य झाले. आजघडीला गणपती उत्सवाचे स्वरूप बदलले आहे. हा उत्सव अधिकाधीक करमणूक प्रदान होत गेला. तरी त्याचे भावनिक अस्तित्व आजही टिकून आहे. थोडक्यात काय देवांचा देव श्री गणेश हा इथल्या सामाजिक उत्थानासाठी आवश्यक अशा प्रेरणा जागवणारा देव आहे. इथल्या सांस्कृतिक समन्वयाच प्रतीक होऊन राहिलेला देव आहे. गेल्या १२५ वर्षात समाजात, देशात आणि जगातही प्रचंड स्थित्यंतरे झाली. लोकमान्यांनी म्हणा कि भाऊसाहेब रंगारी यांनी म्हणा सार्वजनिक गणेशोत्सवाचे लावलेल्या या रोपट्याचा वेल अमरवेलीसारखा चांगलाच फोफावला आहे. महाराष्ट्रातीलच गणेशोत्सवाची संख्या ६० हजाराहून अधिक आहे. दिवसेंदिवस यात वाढ होतच आहे पण'गणेश' बाजूला पडून 'उत्साही उत्सवच' जास्त होत आहे हि दुःखदायक बाब आहे.

देशहिताची कृती सर्वसामान्यांच्या मनातही उफाळून यावी या हेतूने टिळकांनी स्थापन केलेल्या गणेशोत्सवाच्या आजच्या स्वरूपाबद्दल खंत व्यक्त करावीशी वाटतेय. या उत्सवाचे आज जाहिरातीकरण अधिक होत आहे. काहीजण आपल्या प्रतिष्ठेसाठी तर काहीजण मोठेपणातून सर्वप्रकारचे लाभ मिळवण्यासाठी या उत्सवाचा वापर करीत आहेत. लोकमान्यांनी या उत्सवातील आपला उदात्त हेतू राष्ट्रीय बाणा जागृत करण्यासाठी व जपण्यासाठी ठेवला. तो हेतू नष्ट होतो कि काय असेच वाटत आहे.
यावेळी गणेशोस्तव साजरा करताना परिस्थितीचे आत्मभान जागे ठेवत राष्ट्रीय एकात्मता, सलोखा व सर्वधर्म समभावाशी सुसंगत वर्तन आणि आपापल्या कुटुंबाचे आरोग्य यांचे पुरेपूर भान ठेवून सुसंकृत महाराष्ट्राला साजेसा सार्वजनिक गणेशोत्सव सोहळा पार पाडावा. संत ज्ञानेश्वरांनी भगवद्ग गीतेवरील भाष्य 'ज्ञानेश्वरी' या ग्रंथाला प्रारंभ करताना विद्यादाता श्री गणेशाची प्रार्थना करतानाच प्रार्थना आळवली आहे, "देवा तूंचि गणेशु सकळमति प्रकाशु." गणराया तू येत आहेस तर तुझ्या दिव्यप्रकाशाने सारे घरदार,परिसर आणि विश्वही उजळून जावो. सर्वांच्या मनातल्या अंधाराचाही विनाश होवो. तुझ्या मूर्त स्वरूपाची आम्ही जरी पूजा करीत असलो, तरी तूच या विश्वाचा निर्माता आहेस, तू ज्ञानरूप आणि विज्ञानरुप आहेस. तू ओंकार स्वरूप विश्वव्यापी आहेस. सारे ब्रह्मांड व्यापून टाकले आहेस. तुझे आगमन आम्हाला नवी जिद्द,निर्धार आणि नवे बळ देणारे ठरावे.

रवींद्र मालुसरे

९३२३११७७०४

अध्यक्ष
मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई

शनिवार, १६ सप्टेंबर, २०२३

निर्भीड लेखणीची पंच्याहत्तरी : विश्वनाथ पंडित

विश्वनाथ पंडित.... ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक,  महाराष्ट्रातील अनेक दैनिकातील संपादकीय पानावरील वाचकांची पत्रे या सदरातील एक ठळक नाव. निर्भीड आणि निस्वार्थी पत्रलेखनाबरोबर कुशल संघटक, दांडगा जनसंपर्क असलेले, समकालीन प्रश्नांचे भान, लोकांच्या प्रश्नांची सखोल जाण असलेले ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक पंडित हे १८ सप्टेंबर २०२३ रोजी वयाच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यानिमिताने त्यांच्या कर्तृत्वाचा वेध घेणारा हा लेख...

माझा आणि विश्वनाथ पंडित यांचा संपर्क आला तो १९८७ मध्ये . दादर-पूर्वेकडील शिंदेवाडी महापालिका शाळेत एका शनिवारी वृत्तपत्र लेखकांची प्रातिनिधिक आणि मातृसंस्था असलेल्या मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या कार्यालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी वर्तमानपत्रातून पत्रलेखन करणाऱ्या पत्रलेखकांचा परिचय मेळावा असे कार्यक्रमाचे स्वरूप होते.  कॉलेजमध्ये असतानाच मी सुद्धा सातत्याने सकाळ, नवशक्तीमधून लिहीत होतो, त्यामुळे पत्रांच्या खाली असेलेली अनेक नावे वाचत होतो. परंतु ते कोण आहेत या कुतूहलापोटी मी आवर्जून पहिल्यांदाच तिथे गेलो होतो. त्यादिवशीच अनेकांचा परिचय झाला विश्वनाथ पंडित यांनाही  भेटलो. त्यावेळी ते वृत्तपत्र लेखक संघाचे कार्याध्यक्ष होते. "आज आलात आता संघाचे सभासद व्हा आणि प्रत्येक शनिवारी संध्याकाळी येत जा" हे त्यादिवशीचे त्यांचे शब्द अजूनही माझ्या लक्षात आहेत. पुढे शनिवारी जात राहिलो, आपलयापेक्षा तरुण नवोदित कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त कशी संधी  देता येईल याचा विचार करणारे त्याठिकाणी अनेकजण होते.

माझे हस्ताक्षर सुंदर आहे हे दिवंगत माजी अध्यक्ष ग. शं. सामंत आणि गणेश केळकर यांच्या लक्षात आल्यानंतर या तिघांनी कार्यक्रमाच्या दिवशी तर नक्की यायचेच असा आग्रह केला. मुंबई-ठाण्यातील पत्रलेखक या ठिकाणी एकत्र येण्याचा शनिवार हा हक्काचा दिवस. चळवळीवर नितांत प्रेम करणारे बुजुर्ग आणि नवे अशा दोन्ही पिढीतील पत्रलेखक प्रत्येक शनिवारी शिंदेवाडीत हमखास भेटणार असा हा जणू पायंडाच पडला होता. त्या ठिकाणी मधू शिरोडकर, ग. शं. सामंत, गणेश केळकर, विश्वनाथ रखांगी, वि अ सावंत. भाई तांबे, शरद वर्तक, मिलिंद तांबे, सीताराम राणे, नंदकुमार रोपळेकर यांनी माझ्यासारख्या कितीतरी नवोदितांना संघात येण्यासाठी आग्रह केला आणि संघाचे धडे गिरवण्यासाठी कामाला जुंपले.

सध्या दैनिक वृत्तमानसमध्ये असलेले ज्येष्ठ पत्रकार सुनील शिंदे हे त्यावेळी कार्यक्रमाची बातमी सर्वप्रथम हाताने लिहायचे त्याच्या अनेक कॉपीज तयार करण्याचे काम आम्ही तयार करायचो. म्हणजे झेरॉक्स मशीनचा जन्म त्यावेळी झाला नव्हता. याचवेळी माझ्या एक लक्षात आले ते म्हणजे या संस्थेची धुरा सांभाळणारे संघातील ज्येष्ठ कायम संघाच्या हिताचा विचार निस्वार्थीपणे करीत असतात. जो पहिल्यांदा कार्यालयात येतो तो टाळे उघडल्यानंतर अगोदर हातात झाडू घेतो, साफसफाई करतो त्यानंतरच खुर्चीवर बसतो. याचबरोबर आपलयापेक्षा तरुण नवोदित कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त कशी संधी देता येईल याचाही विचार करीत असतो. विश्वनाथ पंडित हे  त्यापैकी एक. संघात त्यांनी त्यापूर्वी आणि नंतरही प्रमुख कार्यवाह हे कामाचे पद भूषविले होते. फोर्टच्या सिटी बँकेत ते चांगल्या पदावर काम करीत होते, परंतु संघात पाऊल ठेवल्यानंतर ते आपली मोठेपणाची झूल उतरवून ठेवीत असत. काम करताना जे करायचे ते मन लावून करायचे पण त्याच्या यशाचे श्रेय आपण घ्यायचे नाही, सार्वजनिक काम हे एकोप्याने करायचे असते. असे त्यांचे तत्व होते. पंडित म्हणजे व्यक्तीपेक्षा संस्था मोठी मानणारे, सतत संस्थेचे हित जपणारे, आयुष्यभर उराशी जपलेल्या मूल्यांसाठी तडजोड न करणारे, स्वतः प्रसिद्धिपासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करणारे आणि मैत्रीसाठी मृदू होणारे असे व्यक्तिमत्व असेच गुणवर्णन त्यांच्या व्यक्तिमत्वाचे करता येईल. सामाजिक, सांस्कृतिक चळवळीत चालताना कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता काही माणसांशी शांतपणे आपले काम करण्याची एक पद्धत असते. आपल्या जन्मगावी चिपळूणला स्थलांतरित होण्यापूर्वी ते ठाण्यात राहत असत. अष्टविनायक चौकात संघाच्या सहकार्याने दिवाळी अंक प्रदर्शनाचा कार्यक्रम त्यांनी ८० च्या दशकात सुरु केला. पंडितांच्या अनुपस्थितही मनोहर चव्हाण, रवींद्र मोरे यांनी ४० वर्षेहून अधिक वर्षे ही परंपरा सुरु ठेवली आहे.ठाणे जिल्हाप्रमुख स्वर्गीय आनंद दिघे नियमितपणे या प्रदर्शनाला भेट देत असत. त्याचबरोबर ठाणे शहरातील सर्वच क्षेत्रातील मान्यवर आणि वाचक हे प्रदर्शनाला भेट देण्यासाठी आवर्जून कसे येतील याचा प्रयत्न पंडित कल्पकतेने करीत असत. विशेष नवलाईची गोष्ट म्हणजे आनंद दिघे हे जाहीर मैदानी सभेत भाषणबाजीला वा पत्रकारांच्या वार्तालापाला केव्हाही सामोरे गेले नव्हते, मात्र पंडितांनी पत्रलेखक म्हणजे काय आणि संस्थेचे उपक्रम कोणकोणते आहेत हे सांगितल्यानंतर त्यांच्या आग्रहाखातर शिंदेवाडीच्या कार्यालयात वार्तालाप करण्यासाठी आले आणि स्वतःच्या खाजगी आयुष्यासह हाजीमलंग-दुर्गाडी आंदोलन आणि ठाण्याच्या विकासावर विकासावर त्यांच्या स्टाईलने दिलखूलास बोलले. प्रश्नांना उत्तरे दिली. टेंबीनाक्यावर मध्यान्नरात्रीपर्यंत गर्दीला सामोरे जात समस्येचा एकाच घावात कसा निकाल लावायचा हे माहित असलेले दिघे  ठाणेकरांना माहित होते.  दादरच्या शिंदेवाडीत त्यांची ही अनोखी दुसरी बाजू विश्वनाथ पंडितांच्यामुळे त्या दिवशी शेकडोंना अनुभवता आली.  

त्यांनी स्वतःचे 'झुंजार सह्याद्री' नावाचे पाक्षिक सुरु केले. अनेक नवोदितांना लिहिते केले आणि ठाणे शहरातील प्रश्नांना वाचा फोडण्याबरोबरच सांस्कृतिक घडामोडींचा वेध प्रामुख्याने घेतला. निवृत्तीनंतर त्यांनी आपला मुळात असणारा पत्रलेखनाचा छंद अधिक वृद्धिंगत केला. आपल्याला भावलेले आणि समाजाला उपयुक्त ठरणारे किंबहुना दिशा देणारे विचार समाजात पेरणे  हे एक नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे या विचाराने एक ध्यास घेऊन ते झपाट्याने दररोज लिहीत असतात. आजपर्यंत त्यांनी जवळपास चार हजारपेक्षा जास्त पत्रे संपूर्ण महाराष्ट्रातील विविध दैनिकातून लिहीली आहेत. या पत्राद्वारे त्यांनी समाजाच्या समस्यांना वाचा फोडली आहे. संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. समाजाला मार्गदर्शन केले. समाजस्थितीचे भान करून दिले. सावधगिरीचा इशाराही दिला. दुर्लक्षित प्रश्नांकडे लक्ष वेधले. लोकशाही व्यवस्था जिवंत राहण्यासाठी आणि समाजमनातील आंदोलने टिपण्यासाठी हे सदर फार महत्त्वाचे असते. माध्यमाला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटले जाते याचे कारण त्यांनी खरीखुरी जनतेची भाषा बोलावी असे अभिप्रेत आहे. परिवर्तनाच्या व प्रबोधनाच्या दीर्घ मुदतीच्या लढ्यासाठी पत्रलेखन आवश्यक असते. ‘वाचकांचा पत्रव्यवहार या प्रक्रियेत महत्त्वाची कामगिरी करत असतो. शिंदेवाडीच्या लहानश्या जागेत हा वैचारिक ठसा त्यांच्या मनावर खोलवर उमटला असल्याने ते आजही वयाच्या अमृत महोत्सवी वर्षात नियमित पेरते राहिले आहेत. निवृत्तीनंतरचा वेळ,बुद्धी खर्च करून आणि पदरमोड करून परखडपणे लिहिणारे विश्वनाथ पंडित हे पत्रलेखक म्हणून लोकप्रबोधनाचेच काम करत आहेत असे म्हणावे लागेल.

विश्वनाथ पंडित सध्या चिपळूण सारख्या दूर ठिकाणी असले तरी मोबाईल संपर्काच्या माध्यमातून सातत्याने संपर्कात असतात. त्यांच्याशी जुळलेला माझा स्नेहबंध आज  जिव्हाळ्याचा मैत्र बनून गेला आहे. मराठी वृत्तपत्र लेखक संघ ही आमची संस्था सध्या संक्रमणावस्थेतून जात आहे. अडचणींतून मार्ग काढण्यासाठी ते सतत मार्गदर्शन करीत असतात. एखादा कार्यक्रम ठरला की पूर्वतयारी कुठपर्यंत आली आहे ते कार्यक्रम कसा झाला याची सतत विचारपूस करीत असतात.  वृत्तपत्र लेखक संघ ही मुंबईतील जागृत नागरीकांची वैचारिक आणि सांस्कृतिक चळवळ व्हावी हे त्यांच्यासह पूर्वसूरींचे स्वप्न पूर्ण झाले आहे. आज मुंबईतील सामाजिक सांस्कृतिक चळवळीचा इतिहास लिहायचा तर इतिहासकाराला 'मराठी वृत्तपत्र लेखक संघाला' वगळून पुढे जाता येणार नाही. संघ सुद्धा चळवळीचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करताना आज त्या टप्प्यावर पोहोचला आहे, याचे श्रेय निःसंशय संघाच्या जुन्याजाणत्या कार्यकर्त्यांचाप्रमाणेच पंडित साहेबांनाही जाते. सलग ५० संमेलने मुंबईत झाल्यानंतर पुढचे संमेलन मुंबईबाहेर एखाद्या जिल्ह्यात करावे असा निर्णय आम्ही घेतला. ठाणे शहराच्या सांस्कृतिक चळवळीत अग्रेसर असणाऱ्या पंडित यांनी ते ठाण्यात होण्यासाठी मी प्रयत्न करतो असा विडा उचलला आणि त्यावेळी आमदार असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी आम्हाला घेऊन गेले. ज्येष्ठ साहित्यिक शन्ना तथा श. ना. नवरे यांच्या अध्यक्षतेखाली भरगच्च कार्यक्रम असलेले भव्य संमेलन गडकरी रंगायतनमध्ये माझ्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात झाले. परंतु विश्वनाथ पंडित यांच्या संपूर्ण सहकार्याने यशस्वीपणे पार पडले. त्यापूर्वी अ. भा. मराठी पत्रकार परिषदेचे ३२ वे संमेलन ठाणे येथे नरेंद्र बल्लाळ यांच्या पुढाकाराने झाले होते. त्या संमेलनाच्या व्यासपीठावर 'वृत्तपत्र लेखकांचा परिसंवाद'आयोजित करण्यात त्यांनी गणेश केळकर यांच्या सहकार्याने वृत्तपत्र लेखकांना मानाचे स्थान मिळवून दिले होते.

साहित्य, सामाजिक, पत्रलेखन, सांस्कृतिक, भाषा अशा विभिन्न क्षेत्रात दमदारपणे आपला ठसा उमटविणारे पंडित म्हणजे सर्वाना हवेहवेसे वाटणारे व्यक्तिमत्व. त्यांनी अनेकांना मोठे केले. स्वाभिमानाने, ताठ कण्याने कसे जागायचे याचे धडे त्यांनी अखिल भारतीय क्षत्रिय मराठा महासंघाचे अध्यक्ष असलेले त्यांचे मामा दादासाहेब मोरे यांच्याकडून घेतले. त्यामुळेच आयुष्यभर कोणासमोर ते लाचारीने झुकले नाहीत.  १९७४ ला शिवाजी महाराजांच्या ३०० व्या पुण्यतिथीचं आयोजन रायगडावर केलं होतं. मराठा महासंघ आणि  सुनितादेवी धनवटे यांच्या विनंतीनुसार  स्व. इंदिरा गांधी मेघडंबरीच्या उदघटनासाठी येणार होत्या. त्यावेळी मराठा महासंघाचे अध्यक्ष  शशिकांत पवार यांनी पाहुण्यांच्या खास कक्षात महत्वाच्या सुचना देऊन पंडित यांना आपल्या सोबत ठेवले होते. सामाजिक कार्यासाठी प्रामाणिकपणे झोकून दिल्यामुळेच माझ्या वाट्याला हा सुवर्णक्षण आला असे पंडित यांना वाटते आहे.  

अवघ्या महाराष्ट्रातील पत्रलेखकांचा सच्चा मित्र आणि मार्गदर्शक बनलेले विश्वनाथ पंडित ७५ वे अमृतमहोत्सवी वर्षाला सामोरे जात आहेत. मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई या संस्थेबरोबरच ठाणे शहरातील जिजामाता युवक मंडळ, चिपळूण तुरंबव येथील श्री शारदा समाज सेवा मंडळ या संस्थांशी त्यांचा आजही निकटचा संबंध आहे. पत्रलेखनाचा छंद जोपासताना मराठी वृत्तपत्र लेखक संघाला पर्यायाने पत्रलेखक चळवळीला मोठे करणाऱ्या या माणसाला मी अलीकडे विचारले, " पत्रलेखनातून तुम्ही काय काय मिळवलं आणि कमवलं" त्यांनी उत्तर दिले वाचकांच्या पत्रांमध्ये केवढी जबरदस्त ताकद असते हे शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनीच फक्त ओळखले होते. शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना ते स्वतः फोन करून त्याकडे ते लक्ष वेधत असत. या वृत्तपत्रीय पत्रांची दखल काही वर्षांपूर्वी संबंधित सरकारी खात्याकडून घेतली जात असे वर्तमानपत्रातून खुलासा करीत असत. परंतु आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधी निर्ढावलेले झाले आहेत. वाचकांची पत्रेही ते रिकाम्या झालेल्या खोक्यात फेकून देत असतील. भविष्यात  या पत्रांनाही ‘अच्छे दिन येतील अशी आशा बाळगू !

पत्रलेखकांना आणि पत्रलेखक चळवळीला प्रतिष्ठा प्राप्त करून देणाऱ्या निस्वार्थीपणे जागल्याची भूमिका पार पाडणाऱ्या विश्वनाथ पंडित याना उत्तम दीर्घायुरोग्य लाभो अशा यानिमित्ताने सदिच्छा !



 - रवींद्र मालुसरे

अध्यक्ष

मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई

९३२३११७७०४

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत सत्याची कास धरून पत्रकारिता करावी.

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत  सत्याची कास धरून पत्रकारिता करावी. सतरावे शतक प्रबोधनाचे ,  अठरावे शतक वैचारिकतेचे ,  एकोणीसावे शतक प्रगतीचे...