बुधवार, २३ ऑगस्ट, २०२३

डॉ गजानन शेपाळ यांच्या 'रंगासभा' ग्रंथाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

*डॉ गजानन शेपाळ यांच्या 'रंगसभा' ग्रंथाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन*



*ललित कला अकादमीचे विभागीय केंद्र महाराष्ट्रात सुरु करण्यासाठी केंद्र राज्याकडे पाठपुरावा करण्याचे राज्यपालांचे आश्वासन*

*सर्जनशील आणि सांस्कृतिक उद्योगातील संधींचा कलाकारांनी लाभ घ्यावा: राज्यपाल रमेश बैस*

 मुंबई : (रवींद्र मालुसरे) - नवी दिल्ली येथील ललित कला अकादमीचे विभागीय केंद्र महाराष्ट्रात लवकरात लवकर सुरु व्हावे यासाठी आपण व्यक्तिशः लक्ष घालू तसेच केंद्र आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा करु, असे आश्वासन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे दिले.  

सर .जी. उपयोजित कला महाविद्यालय येथील प्राध्यापक डॉ. गजानन शेपाळ यांच्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या दृश्यकला विषयक लेखांचे संकलन असलेल्या 'रंगसभा' या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल बैस यांच्या हस्ते शनिवारी (दि. १९) महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडले, त्यावेळी ते बोलत होते

यावेळी प्रकाशन सोहळ्याला ललित कला अकादमीचे माजी अध्यक्ष डॉउत्तम पाचरणे, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष रविंद्र मालुसरे, ज्येष्ठ पत्रकार विवेक सबनीस, उपयोजित कला महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ संतोष क्षीरसागर कला क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.  

सर्जनशील आणि सांस्कृतिक उद्योग क्षेत्र जगातील अर्थव्यवस्थेत सर्वाधिक गतीने वाढणारे क्षेत्र आहे. कलात्मक वस्तूंचा जागतिक व्यापार सातत्याने वाढत आहे या क्षेत्रात रोजगाराच्या प्रचंड संधी निर्माण होत आहेत. या संधींचा कलाकारांनी लाभ घ्यावा असे राज्यपालांनी सांगितले. कला, शिल्पकला, वारसा, संगीत या क्षेत्रात खासगी क्षेत्राने देखील गुंतवणूक करावी असे राज्यपालांनी सांगितले.   न्यूयॉर्क येथील 'मेट गाला' फॅशन उत्सवाप्रमाणे मुंबईचा देखील कलाविषयक 'मेट कला' महोत्सव असावा अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली

राज्यातील कला महाविद्यालयांमध्ये हजारो विद्यार्थी कला शिक्षण घेत आहेत. या महाविद्यालयांचे बळकटीकरण करून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण केले पाहिजे. या दृष्टीने कला संस्थांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्याबाबत आपण शासनाला सूचना करू असेही राज्यपालांनी सांगितले

आदिवासी समाज तसेच ग्रामीण भागात लोक घरी चित्र लावतात किंवा रांगोळी काढतात. त्याचप्रमाणे शहरातील लोकांना देखील आपल्या घरी, भिंतींवर कलाकृती असावी असे वाटते. मात्र कलाकृती जनसामान्यांना परवडणाऱ्या असल्या पाहिजे. तसे झाल्यास कलेचे लोकशाहीकरण होईल असे सांगताना आपल्या कलाकृती परवडणाऱ्या नसल्या तर चीन सारखे देश आपल्या स्वस्त कलाकृती मूर्ती घरोघरी पाठवतील असा इशारा राज्यपालांनी दिला

आपण स्वतः एक छोटे दृश्य कलाकार असून जे जे स्कुलला भेट देण्याचे आपले स्वप्न होते, असे राज्यपालांनी सांगितले. गजानन शेपाळ यांनी राज्यातील अनेक ज्ञात अज्ञात दृश्य कलाकारांना तसेच कला संस्थांना आपल्या लिखाणाच्या माध्यमातून प्रकाशात आणल्याबद्दल राज्यपालांनी त्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे आयोजक असलेल्या मराठी वृत्तपत्रलेखक संघ मुंबईने अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केल्याबद्दल राज्यपालांनी संस्थेचे अभिनंदन केले.  

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगांवकर, कार्याध्यक्ष रमेश सांगळे, कोषाध्यक्ष आत्माराम गायकवाड, नितीन कदम, राजन देसाई, दिगंबर चव्हाण, विजय ना कदम, मनोहर साळवी, सतिश भोसले, सुनील कुवरे, दत्ताराम गवस, अब्बास अतार, प्रकाश बाडकर, दिलिप सावंत, नंदकुमार रोपळेकर, पास्कोल लोबो, जे जी स्कुलमधील प्रा राहुल मेश्राम, दीपक वर्मा, सौ निता चौधरी, सौ राधिका कुसुरकर-वाघ  आदींनी विशेष मेहनत घेतली.

लोकप्रतिनिधी आणि प्रशासनावर अंकुश ठेवण्यासाठी वृत्तपत्र लेखन महत्त्वाचे - ना. मंगलप्रभात लोढा

 वृत्तपत्र लेखक चळवळीच्या अमृतमहोत्सवी वर्षाला प्रारंभ

मुंबई : (रवींद्र मालुसरे) -  

सोशल मीडियावरील सामाजिक पत्रकारितेच्या वाढत्या प्रसारामुळे, ‘वर्तमानपत्रांतील वाचकांची पत्रे’ हा स्तंभ यापुढे दुबळा होत जाईल अशी भीती वाटत असली तरी लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी तसेच सत्ताधारी आणि प्रशासनावर अंकुश ठेवण्यासाठी संपादकीय पानावरील त्यांची हक्काची जागा अबाधित राहणे गरजेचे आहे. बोधकथेतील लहानशी चिमणी आपल्या चोचीत पाणी आणून जंगलातील आग विझवण्याचा प्रयत्न करतेयाची इतिहासाने नोंद घेतली आहे असेच तुम्ही करीत आहात. त्यामुळे तुम्ही आणि प्रिंट मीडियाने दर्पणपासून सुरू झालेली ही परंपरा टिकवण्यासाठी जबाबदारी घेणे गरजेचे आहे असे मत राज्याचे मंत्री ना मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केले. दादर येथील काणे उपाहारगृहाच्या सभागृहात वृत्तपत्र लेखक चळवळीच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या शुभारंभ कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे होते. या वेळी व्यासपीठावर संघाध्यक्ष रवींद्र मालुसरेउद्योजक सुरेशराव कदमकामगार नेते दिवाकर दळवीसामाजिक कार्यकर्ते प्रदीप मणिशंकर कवठेशिक्षणतज्ज्ञ आनंद मापुसकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

 

काळाची गरज म्हणून  समाजासाठी आवश्यक असलेली वृत्तपत्र लेखकांची ही चळवळ खंडित होणार नाही याची जाणीव ठेवून संस्थेच्या कार्यालयीन जागेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन देत ते पुढे असेही म्हणाले कीएका अर्थानेवृत्तपत्रलेखक हा समाजमनाचा ‘आरसा’ असतो. 

आसपासच्या परिस्थितीकडे डोळे- आणि कानदेखील- उघडे ठेवून पाहण्याची सवय आणि सहसा सामान्यांच्या नजरेस किंवा मनास न जाणवणाऱ्या बाबींची तत्परतेने नोंद घेण्याची सवय या बाबी उपजतच अंगी असाव्या लागतात.  वृत्तपत्रलेखकामध्ये मात्र या बाबी जाणवताततो हातात लेखणी घेतो आणि निर्भीडपणे आपले मत लिहून वर्तमानपत्राकडे पाठवून देतोभले ते छापून येवो की नाही पण हे काम तो निस्वार्थीपणे करतो. म्हणूनच वृत्तपत्रलेखक हा व्यावसायिक पत्रकार नसला तरी पत्रकाराप्रमाणेच त्याचे डोळे-कान उघडे असतातआसपासच्यासर्वांनाच दिसणाऱ्या घटनांमधील ‘बातमी’मूल्य असलेले वेगळेपण टिपण्याची क्षमता व त्याचे विश्लेषण करून त्यातील वेगळेपण नेमके निवडून लोकांसमोर मांडण्याचे कौशल्य त्याच्याकडे असते. एका अर्थाने ही पत्रकारिता क्षेत्राची ‘तिसरी बाजू’ आहे.

 

उद्योजक सुरेशराव कदम यांनी आपल्या भाषणात संघाच्या कार्याचे कौतुक करताना अमृत महोत्सवी वर्षात कार्यक्रम करण्यासाठी एक लाख रुपये देणगी दिली. 

ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक मधुकर कुबल आणि मनोहर मांदाडकर यांनी संस्थेच्या आणि वृत्तपत्र लेखन चळवळीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना जीवन गौरव पुरस्कार ना. मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे आचार्य अत्रे यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त कॉ मणिशंकर कवठे स्मृतिनिमित्त आयोजित केलेल्या 'अत्रेय प्रहारया लेख स्पर्धेचा पारितोषिक वितरण तसेच वर्तमानपत्रातून सातत्याने लिहिणाऱ्या वृत्तपत्र लेखकांचा गौरव करण्यात आला.  

२२ ऑगस्ट १९४९ फोर्टच्या तांबे उपहारगृहातील चळवळीचे पहिले संमेलन ते २२ ऑगस्ट २०२३ मामा काणे उपाहारगृहातील हे 'अमृत महोत्सवी संमेलनयाचा आणि संस्थेच्या कार्यक्रम उपक्रमांचा आढावा संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी आपल्या प्रास्ताविकात घेतला. 

संघाचे प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगांवकर यांनी सूत्रसंचालन तर आभार प्रदर्शन राजन देसाई यांनी केले. 



कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्याध्यक्ष रमेश सांगळे यांच्या नेतृत्वाखाली कोषाध्यक्ष आत्माराम गायकवाडराजन देसाईअब्बास अत्तारदिगंबर चव्हाणविजय ना कदमनंदकुमार रोपळेकरपास्कोल लोबोसुरेश पोटेसुनिल कुवरेदत्ताराम गवस यांनी विशेष मेहनत घेतली.

शनिवार, १२ ऑगस्ट, २०२३

महाराष्ट्राचा विराट महापुरुष : आचार्य अत्रे

महाराष्ट्राचा विराट महापुरुष : आचार्य अत्रे

 

[  यंदा आपण आचार्य अत्रे यांची शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष साजरे करीत आहोत. अत्रे हे खरे तर चालती बोलती सरस्वतीच ! त्यांनी मराठी भाषा आपल्या लेखणीने एका वेगळ्या शैलीने सुंदर केली. आपल्या महाराष्ट्रीय नव्या पिढीला आंदोलनांचा जो वारसा लाभला, तो बहुअंगी दमदार नवी दृष्टी देणारा आहे. आचार्य अत्रे अशा थोर सेवकांपैकी एक. झेंडूची फुले हे उत्तम मराठी विडंबन कवितांजली लिहिली, कर्मकांडाचे स्तोम माजवणाऱ्यांची पंचाईत करणारे साष्टांग नमस्कार, भ्रमाचा भोपळा सारखे नाटक लिहिले. मराठातील अग्रलेख गाजले, पत्रकार म्हणून संयुक्त महाराष्ट्राची चळवळीत लोकजागृती यशस्वीपणे केली. श्यामची आई द्वारे साने गुरुजींना घराघरात पोहोचविले. महात्मा फुले हा विलक्षण चित्रपट निर्माण करून तो काळ जिवंत करून महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाईचें कार्य सर्वांना निकोप रीतीने समजावले. वस्त्रहरण करून दांभिक नेत्यांवर सडेतोड टीका केली. नंतर त्यांच्यावर त्यांनी हृदयस्पर्शी विस्तृत मृत्यूलेखमालाही लिहिल्या. चतुरस्त्र बुद्धिमत्ता, प्रतिभा आणि बहुरंगी व्यक्तिमत्त्व लाभलेला सुपुत्र महाराष्ट्राला लाभला. अत्रे यांची लेखणी आणि वाणी यात श्रेष्ठ कोण हे सांगणे कठीण आहे. महाराष्ट्र हा त्यांचा श्वास होता. हशा आणि टाळ्यांचे ते बादशहा होते. दोन्ही शस्त्रे त्यांनी हवी तशी वापरली. अत्रे यांनी स्वतःच निर्माण केलेल्या कालखंडाचा ठसा पुसता येणार नाही यानिमित्ताने त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !  ]

 



एकोणविसावे शतक अस्ताला जाताना म्हणजे १३ ऑगस्ट १८९८ रोजी महाराष्ट्राच्या क्षितिजावर विसाव्या शतकात अनेक क्षेत्रात तेजाने तळपत राहणाऱ्या एका महान महाराष्ट्र सुपुत्राचा जन्म झाला. विद्वतेची कवचकुंडले जन्मताच घेऊन ल्यालेल्या या सुपुत्राच्या जीवनाची अखेर  १३ जून १९६९ रोजी झाली. महाराष्ट्रातील एक अजस्त्र शक्ती लोप पावली तेव्हा मराठीजणांच्या तोंडून उस्फुर्त शब्द निघाले.....दहा हजार वर्षात असा महापुरुष जन्माला नाही अन जन्मणार सुद्धा नाही.  त्या व्यक्तीचे नाव म्हणजे आचार्य प्रल्हाद केशव तथा प्र. के. अत्रे. अत्र्यांनी आपल्या झंझावाती व सर्वस्पर्शी आयुष्यात विविध क्षेत्रात केलेल्या डोंगराएव्हढ्या कामगिरीमुळेच यावर्षी त्यांची शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष साजरे करताना महाराष्ट्र त्यांचे गुणगान करणार आहे. ऐन उमेदीच्या काळात दबकत दचकत कवी म्हणून महाराष्ष्ट्र सारस्वतांच्या दरबारात वळचणीला का होईना पण कशीबशी जागा मिळवणारे अत्रे त्यानंतर आपल्या अंगच्या अचाट पराक्रमाने विडंबनकार,  शिक्षणतज्ज्ञ, नाटककार, विनोदीवक्ता, चित्रपटकथा लेखक, राष्ट्रपती पदक विजेता चित्रनिर्माता, सव्यसाची पत्रकार, महानगर पालिका आणि विधानसभेत लोकांचे प्रश्न सडेतोडपणे मांडणारा लोकप्रतिनिधी, लोकप्रिय वर्तमानपत्राचा संपादक, महाराष्ट्राला मुंबई मिळवून देण्यासाठी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अग्रणी राहून नेतृत्व करणारा झुंजार नेता. अशा एकामागून एक कर्तृत्वाची थोर दालने सहजगत्या सर करीत महाराष्ट्र मंडळीत आपला असा काही ठसा उमटवीते झाले की, गेल्या शतकाचा इतिहास लिहिताना इतिहासकारांना पदोपदी त्यांना मानाचा मुजरा करणे भागच पडणार आहे.  हुतात्म्यांच्या बलिदानातून, असंख्यांच्या त्यागातून, सेनापती बापट, एस. एम. जोशी , कॉम्रेड डांगे, प्रबोधनकार ठाकरे यांच्यासारख्या समर्थ नेत्यांच्या तेजस्वी लढ्यातून महाराष्ट्र राज्य निर्माण झाले. परंतु या नेत्यांनी उभ्या केलेल्या लढ्याला विराट स्वरूप प्राप्ती झाले ते आचार्य अत्रे यांच्यामुळेच असे यथार्थ वर्णन महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांनी एकदा केले, त्याची प्रचिती संयुक्त महाराष्ट्र लढ्यात आचार्य अत्रे यांनी 'मराठा' दैनिकाची रणभेरी वाजविली तेव्हा आली. दैनिक 'मराठा' रणांगणावर, लाखोंच्या लोकसमुदायात जन्माला आले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अनेक नामवंत नेत्यांचा जसा सहभाग होता तसेच अनेक अनामिक कार्यकर्त्यांचे योगदान होते. यांनी महाराष्ट्राला मुंबई मिळवून तर दिलीच, पण भारताच्या नकाशावर 'महाराष्ट्र' हे नाव जे आलं ते केवळ आचार्य अत्रेंच्या शक्तीमुळे, नावामुळे व दबदब्यामुळेच !
सर्वांना भाषिक राज्य मिळते मग मराठी माणसावर दिल्लीकरांचा रोष का ? मुंबई महाराष्ट्राला आणि महाराष्ट्र हे नाव राज्याला मिळत नाही असे पाहताच हा लढा यशस्वी करण्यासाठी त्यांनी सिंहझेप घेतली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र या ध्येयापोटी महाराष्ट्रभर या माणसाने शेकडो व्याख्याने देऊन रक्त ओकले, अविश्रांत झुंज दिली. आंदोलन एकहाती पेलताना त्यांच्या वाणीने व लेखणीने आग ओकली अगदी जोड्यासजोडा मारण्याची झुंजार भूमिका घेतली.

'संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे" या घोषणेत 'च' आणला  तो आचार्य अत्रे यांनी आणि म्हणून 'च'चा आग्रह कशाला असे म्हणणाऱ्या यशवंतराव चव्हाणांना आपल्या नावातील  'च'काढून टाकला तर काय होईल ते पहा असे  सुनावले ते आचार्य अत्रे यांनी. शिवछत्रपतींनी हिंदवी स्वराज्य स्थापन केली तेव्हा 'हर हर महादेव' ही मराठयांची युद्धघोषणा होती, तशी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ' झालाच पाहिजे' ही मराठी जनतेची रणगर्जना झालेली होती. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात त्यांनी यशवंतराव चव्हाण यांना धारेवर धरले होते, पण त्यांना केंद्र सरकारने संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीत बोलावले तेव्हा त्यांना निरोप देण्यासाठी जे भाषण आचार्यांनी केले ते वाचले म्हणजे त्यांच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो. ते आपल्या भाषणात म्हणाले, "आमदार यशवंतरावांच्या अंगी काही अलौकिक गुण नसते तर ते या पदाला पोहोचलेच नसते. आणि पंडित जवाहरलाल नेहरु यांनी त्यांना अडचणीच्या काळात भारताचे सरंक्षणमंत्री म्हणून पाचारण केले नसते. त्यांचा स्वभाव, त्यांचे वागणे आणि बोलणे हे सारे काही असे आहे की त्यांचे शत्रुत्व करु इच्छिणाऱ्या माणसाला सुद्धा यशस्वीपणे फार काळ शत्रुत्व करणे शक्य होत नाही असे मी माझ्या अनुभवावरून सांगतो.
२१ नोव्हेंबर १९५५ रोजी फ्लोरा फाऊंटनमध्ये गोळीबार झाला होता  व एके दिवशी १४ माणसे मारली गेली होती.मग त्यावेळचे मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजीभाई देसाई यांचा त्याच दिवशीच्या दैनिकातून आचार्य अत्रे यांनी जो उद्धार केला त्याला तुलना नाही. आचार्य अत्रे हे जेव्हा तोफ डागत तेव्हा शत्रूला साफ संपविण्याच्या तयारीनेच डागत असत. तेथे अर्धवट कारभार नव्हता. एकीकडे वेधक, भेदक शब्दांचे गाठोडे त्यांच्याकडे होते. शिव्या व ओव्या सारख्याच तोलाने वापरण्याचे शब्द सामर्थ्य त्यांच्याकडे होते. लेखणी व वाणी या दोन्ही रिद्धी व सिद्धीसारख्या त्यांच्या सेवेस हजर होत्या. त्यांच्या मदतीने त्यांनी चळवळीचे पेटत्या मशालीमध्ये  रूपांतर केले. अत्र्यांचे राजकारण कोणाला पटो वा न पटो परंतु त्यातील उत्कटता सर्वसामान्यांच्या हृदयापर्यंत जाऊन भिडली होती यात शंका नाही आचार्य अत्रे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातून जी महान कामगिरी बजावली तिला तोड नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीची गर्जना त्यांनी महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यात घुमविली. आचार्य अत्रेंनी मराठा हे दैनिक सुरु करण्याचे धाडस केले आणि त्यामध्ये ते यशस्वी झाले. पहिल्या संपादकियात त्यांनी लिहिले, महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती, भाषा आणि साहित्य ज्यांनी निर्माण केले त्या महानमंगल महापुरुषांचे भक्तिभावाने स्मरण करून, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ज्यानी आपल्या प्राणांचे बलिदान केले त्या हुतात्म्यांना वंदन करून आणि तीन कोटी मराठी जनतेच्या चरणावर आदराने मस्तक ठेऊन संयुक्त महाराष्ट्राच्या सेवेसाठी आम्ही हे मराठा दैनिक सुरु करीत आहोत. तेजस्वी लिखाणाने आणि घणाघाती वक्तृत्वाने त्यांनी भांडवलशाही वृत्तपत्रांची चांगलीच रेवडी उडविली. बहुजन विरोधी प्रचाराला सडेतोड उत्तरे देऊन त्यांनी भांडवलधार्जिण्या वृत्तपत्रांची बोबडी वळवली.

अत्र्यांमधील कलावंताने, साहित्यिकाने, मराठी जनतेची नस अचूक पडकली होती. तिच्या आशा-आकांक्षाशी हा महान  कलाकार एकरूप होऊन गेला होता. तमाम मराठी जनांच्या मनातील स्पंदने, हेलकावे, भावभावना, राग-द्वेष या साऱ्या छटा आचार्य अत्रे यांच्या लिखातून बाहेर पडतात आचार्य अत्रे म्हणजे महाराष्ट्र आणि महाराष्ट्र म्हणजे आचार्य अत्रे असे समीकरण होते. सर्वत्र संचार असल्याने सर्वांना आचार्य अत्रे आपले वाटत; कारण ते आपल्या मनातले बोलतात असे जनतेला वाटे. सारांश काय तर सारा महाराष्ट्र आचार्य अत्रे यांनी पालथा घातला, सारा महाराष्ट्र पिंजून काढला; त्यामुळे सर्वत्र सभा, प्रबोधन, परिवर्तनाचा नारा आणि अन्यायाविरुद्ध लढा यांची प्रेरणा सातत्याने मिळत गेली. मराठी माणसाला न्यायाची 'चाड' आणि अन्यायाची 'चीड' आहे. तितकी इतर प्रांतातील जनतेला नाही. असे ते मराठी माणसाचे वेगळेपण सांगताना नेहमी म्हणत असत. 'चांदया'पासून 'बांदया'पर्यंत या शब्दप्रणालीचे प्रवर्तकच आचार्य अत्रे !


अत्र्यांची वाणी आणि लेखणी मराठी माणसांच्या मनातील विचार नेमका व्यक्त करीत होती. आणि म्हणूनच महाराष्ट्रात कोणतीही छोटी-मोठी घटना घडली तर त्यावर आचार्य अत्रे मराठा मधून काय  म्हणताहेत ?  अत्र्यांनी अग्रलेखातून कोणाला ठोकून काढले आहे ? याकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष असे. आचार्य अत्र्यांमधील साहित्यिकाचा - संपादकाचा हा प्रचंड विजय होता. अत्र्यांच्या विरोधकांनी त्यांच्यावर कितीही कठोर टीकेची राळ उठवली तरी या माणसाने महाराष्ट्रावर अपरंपार प्रेम केले ही गोष्ट कुणीही नाकारू शकणार नाही. महाराष्ट्राचे मोठेपण त्यांनी पूणर्पणे जाणून घेतले होते. महाराष्ट्राचे मानदंड सूक्ष्मतेने अवलोकिले होते. आधुनिक महाराष्ट्राच्या मानदंडांचा 'तेल्या - तांबोळ्यांपर्यंत राजकारण गेले पाहिजे' संदेश जवळजवळ  ४० वर्षानंतर अमलात आणला तो याच व्यक्तीने आणि जेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेवरच दिल्लीकरांकडून घाला पडण्याची वेळ आली तेच सतराव्या शतकांतील मराठी क्षात्रधर्माची सही सही आठवण देणारा पराक्रम ऊर्ध्वबाहू करून पोट तिडकीने लढले ते अत्रेच ! अत्रे नुसते महाराष्ट्र धर्माचा जयजयकार करून थांबले नाहीत तर त्या धर्माची सरिता या विसाव्या शतकातील बहुरंगी जीवनाच्या अनेक दालनातून  फिरवत पुढे नेण्याचे श्रेय निश्चितपणे त्यांच्याकडे जावे. अत्र्यांनी अनेक क्षेत्रात मिळविलेले विजय प्रचंड होते. त्याचप्रमाणे त्यांनी पत्करलेले पराभवही तेवढेच प्रचंड होते. जीवनाबद्दलचे त्यांचे कुतूहल कधीच संपले नाही. आणि म्हणूनच जीवनाचे प्रत्येक अंग हे एक आव्हान समजून त्यांनी त्यात बेदरकारपणे प्रवेश केला. आपल्या पराक्रमाने त्यांनी त्या त्या जीवनांगाचा पूर्ण आस्वाद अन उपभोग घेतला. आणि प्रत्येक वेळी एखाद्या अनासक्त योग्याप्रमाणे ते त्या जीवनांगातून  सहजतेने मुक्त झाले. कशातही अडकून पडले नाहीत. आचार्य विनोबा भावेंना 'वनरोबा' म्हणून चपराक लागवणारे अत्रे विनोबांच्या वाङमय साहित्याचे निस्सीम भक्त बनले. सदोदित आपल्या वक्तृत्वातील विनोदाचे भुईनळे उडविणारे अत्रे, डॉ आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणावेळी हजारोंच्या डोळ्यात अश्रू आणू शकले. अत्रे सर्वत्र होते तरीही सर्वाहून अत्रे आणखी कितीतरी अधिक होते. त्यांच्या एवढे पूर्ण जीवन जगलेला माणूस शतकातून एखादाच जन्माला येतो. जीवनाची अशी एकही छटा नसेल की जिचा अविष्कार अत्र्यांच्या जीवनात झालेला नाही. राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी त्यांच्या निधनावेळी दुखवट्याचा संदेश पाठविला होता. त्यात अत्र्यांचे वर्णन "Writer & Fighter of Maharashtra' असे केले होते. राकट देशा - कणखर देशा असे महाराष्ट्राचे पूर्ण प्रतिबिंब लोकांनी आचार्य अत्र्यांच्या व्यक्तिमत्वात पहिले होते. आचार्य अत्रे नसते तर 'मराठा' दैनिक जन्माला आले नसते. आणि पुढे संयुक्त महाराष्ट्र झाला नसता. एका दैनिकाने 'मराठाने' आपल्या मातृभाषेचे एक राज्य निर्माण केले ही इतिहासातील एकमेव घटना. म्हणूनच त्यांना शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त मानवंदना !

लोकप्रियता तुझे नाव आचार्य अत्रे ! आचार्य अत्रे !! महाराष्ट्रव्यापी असे व्यक्तिमत्त्व होते त्यांचे ! महाराष्ट्रप्रेम, महाराष्ट्राचा अभिमान, मराठी बाणा, मराठीपण आणि मराठी अस्मिताच त्यांच्या जीवनातून, लिखाणातून, भाषणातून प्रदर्शित होते. मराठी माणूस, मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठी माती हीच त्यांची चतु:सूत्री होती. आचार्य अत्रेंसारखी भ्रमंती, वाचनातले सातत्य, सततचे लिखाण, सारखी बडबड, सारखी व्याख्याने, सतत वाङमयीन व्यग्रता, सारखे चिंतन, मनन, एखाद्या तपस्वी सारखे ऋषितुल्य जीवन व्यतीत केले या महापुरुषाने.  आचार्य अत्रे या एकाच प्रचंड माणसात १९२५ ते ४० या काळात दहा अलौकिक अत्रे सामावलेले होते.

साहित्याला लोककल्याणकारी स्पर्श हवा असा आग्रह धरीत राहिले. दुष्ट रूढी, दांभिकपणा, अन्याय यावर सतत घणाघाती हल्ले चढवले. प्रसिद्ध-अप्रसिद्ध, लहान-थोर गुणिजनांची मुक्तकंठाने प्रशंसा केली. समाज सुधारकांच्या आणि दिनदुबळ्यांच्या पाठिशी कायमचे उभे राहिले.
२०२३ साल हे महाराष्ट्राचे लाडके 'प्रचंड पुरुष' आचार्य अत्रे यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्ष आहे. यानिमित्ताने महाराष्ट्रभर साजेसे अनेक छोटे मोठे कार्यक्रम सर्वत्र होत आहेत. अत्र्यांएवढी अफाट आणि अबाधित लोकप्रियता स्वातंत्रोत्तर काळात कुणाही मराठी साहित्यिकाला लाभली नाही याचे हे द्योतक आहे.


 - रवींद्र मालुसरे

अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई

९३२३११७७०४

 

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत सत्याची कास धरून पत्रकारिता करावी.

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत  सत्याची कास धरून पत्रकारिता करावी. सतरावे शतक प्रबोधनाचे ,  अठरावे शतक वैचारिकतेचे ,  एकोणीसावे शतक प्रगतीचे...