मंगळवार, २७ जून, २०२३

मुंबईतील आषाढी एकादशी परंपरा

 'मुंबईतील आषाढी एकादशी परंपरा'

रवींद्र मालुसरे 

महाराष्ट्र राज्य संतांची भुमी म्हणुन ओळखली जातेतर मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून पंढपूरच्या पांडुरंगाचा सोहळा म्हणजेच आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. या आषाढी एकादशी वारीची फार मोठी परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. पंढपूरला पायी जाण्याची परंपरा शतकानुशतके  सुरु आहे. देशासह जगभरातील लाखो भाविक पंढरपूर मंदिरात दर्शनासाठी येत असतात. टाळ-मृदुंगाच्या  ठेक्यावरग्यानबा-तुकारामांच्या जयघोषात ‘विठुरायाचे’ नामस्मरण करीत वारकरी विठ्ठलाच्या नामस्मरणात लीन होतात. मुंबईत विशेषतः मध्य मुंबईच्या गिरणगावात  विठ्ठल मंदिरासह काही ठिकाणी गेली अनेक वर्षे आषाढी एकादशी जल्लोषात साजरी केली जाते. बदलत्या काळासोबत मुंबई बेटावरच्या रूढी व परंपरा अस्तंगत होत आहेत. वाड्यावस्त्यांची मुंबई गगनभेदी होत आकाशाला भिडत चालली आहे. मुंबईची जीवनशैली बदलली तरी काही महाराष्ट्रीयन परंपरा अजूनही टिकून आहेत. त्यातील एक म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेली श्री विठ्ठलाची मंदिरे आणि त्यात होणारे अखंड हरिनाम सप्ताह. १९८० नंतर मुंबईतील गिरण्या आणि कारखाने धडाधड बंद झाले. कष्टकरी मुंबईबाहेर फेकला गेला आणि त्याबरोबर गिरणगावातील चाळीचाळीतून उमटणाऱ्या आणि मंदिरातील भजनांच्या सुरावटी मंदावल्या.  मुंबईतील गिरण्या आणि कारखाने बंद पडल्यानंतर कष्टकरी मुंबईकर एक तर उपनगरात फेकला गेला किंवा आपल्या गावाकडे परतला. त्यामुळे मुंबईच्या चाळीचाळीत आणि छोट्या मोठ्या मंदिरातून ऐकू येणारे भजनमंजुळ स्वर मंदावले. 

पूर्वी गिरणगावात बारश्यापासून ते लग्नाच्या सत्यनारायणाच्या पुजेपर्यंत त्यापुढे एखाद्या मृत्यूनंतर स्मशानापर्यंत ते उत्तरकार्याच्या दिवसापर्यंत भजन कीर्तन मोठ्या संख्येने होत असे. त्याची जागा आता बेंजो डीजेच्या धांगडधिंगायने घेतली आहे. अशा परिस्थितीत मुंबईची भजन संस्कृती जगविण्यासाठी निष्ठेने जी थोडी मंडळी प्रयत्न करीत आहेत त्यांचे योगदान फार मोठे आहे. पारंपरिकतेची कास धरत काहीजण मुंबईचा हा ठेवा आपापल्या परीने जपत असल्याचे दिसून येत आहे. काळाच्या ओघात मुंबापुरीतील वार्षिक अखंड हरिनाम सप्ताह क्षीण होत तर काही पडद्याआड जाऊ लागले आहेत.

मुंबई नगरीला ‘सोन्याची नगरी’ म्हटले जाते. पण त्यापेक्षा तिला मंदिराची नगरी म्हणणेच अधिक संयुक्तिक ठरेल. मुंबई नगरीत जवळ जवळ ४८१ पेक्षा अधिक मंदिरे आहेत. त्यापैकी सर्वात जास्त मंदिरे मारुतीचीत्याखालोखाल क्रमांक येतो शंकर मंदिरांचा तर देवींची मंदिरे हि पुरातन आहेत. विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीची शंभर वर्षांहून अधिक वर्षे वारकरी परंपरा जोपासणारी अनेक मंदिर सुद्धा मुंबईत आहेत. प्रत्येक आषाढी एकादशीला टाळ मृदुंगाचा गजर आणि 'ग्यानबा-तुकाराम'च्या जयघोषात तल्लीन वारकरी हेच दृश्य मुंबईतल्या मंदिरांमध्येही पहायला मिळतं.  श्री विठ्ठल रखुमाई दैवताचे भौगोलिक स्थान मुंबई शहरात कुठे आहे आणि त्याठिकाणी काय पारमार्थिक कार्यक्रम होतात याचा शोध घेण्याचा हा प्रयत्न आहे.

वडाळा - वडाळा बस डेपोजवळकात्रक रोडवरील श्री विठ्ठल मंदिर सर्वाना परिचित आहे. एकेकाळी या मिठागराच्या बेटावर व्यापारी असत. त्यातील एका व्यापाऱ्याला विठ्ठल-रखुमाई ची मूर्ती  सापडलीत्यांनी ती पंढरपूरला संत तुकाराम महाराजांना दाखवली आणि त्यांनी मंदिर बांधण्यास सांगितले अशी आख्यायिका आहे. पुढे मुंबई विस्तारात गेली आणि या मंदिराचा लौकिक वाढू लागला. आषाढी एकादशीला सर्वदूर मुंबईतील हजारो भाविक भक्त दिंड्या- पताका घेऊन येथे येत असतात.  मुंबईतील ज्या विठ्ठल भक्तांना पंढरपूर येथे जाणे शक्य होत नाहीत्यांच्यासाठी हे मंदिर एक ‘प्रतिपंढरपूर’ म्हणून उभे आहे.

प्रभादेवी - प्रभादेवी गावासाठी कै. हरी दामाजी परळकर यांच्या स्मरणार्थ त्यांची सून श्रीमती ताराबाई परळकर यांनी हे मुरारी घाग मार्गावर श्री विठ्ठल रखुमाई मंदिर  सन १९०० मध्ये हे मंदिर बांधले. गुरुवर्य अर्जुन मामा साळुंखेगुरुवर्य नारायणदादा घाडगेगुरुवर्य रामदादा घाडगे अश्या चार पिढ्या परमार्थ करीत आहेत.  सन १९१५ च्या काळात ह भ प रामकृष्ण भावे महाराज मुंबईत  'जगाच्या कल्याणाया ध्येयाने प्रेरित होऊन आले होते. रामभाऊ हे श्री विठ्ठलभक्त आणि सेवाधारी होतेहाकेच्या अंतरावरील बाळकृष्ण वासुदेव चाळीत असा सप्ताह उत्तमरीत्या पार पडल्याचे त्यांनी स्वतः अनुभवले होते. आपल्या आचार-विचाराव्दारे 'जग लावावे सत्पथीहेच कार्य ठळकपणे करणाऱ्या भावे महाराजांना रामभाऊ नाईक भेटले आणि विनंती केलीआमच्या मंदिरात सात दिवसांचा अखंड हरिनाम सप्ताह सुरु करावा. त्यांनी या सुचनेचे स्वागत केले आणि मग सन १९२१ पासून गोकूळ अष्टमी निमित्त श्रावण शुद्ध चतुर्थीपासून पुढे सात दिवसांचा दुसरा अखंड हरिनाम सप्ताह प्रभादेवीत सुरु झाला. त्याच मंदिरात पुढे काही काळानंतर माघ शुद्ध दशमी पासून सात दिवसांचा तिसरा अखंड हरिनाम सप्ताह सुरु झाला. भावे महाराजांनंतर गुरुवर्य अर्जुनमामा साळुंखे आणि गुरुवर्य ह  भ प नारायणदादा घाडगे यांनी गुरुपदाची गादी सांभाळत महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात गावोगावी श्री सद्गुरू भावे महाराज वारकरी समाजाचे पारमार्थिक कार्य अनेक अखंड हरिनाम सप्ताहाच्या मार्फत पोहोचवले आहे. सद्गुरू ह भ प श्री रामकृष्ण भावे महाराज यांनी उभारलेल्या धार्मिक चळवळीला म्हणजे मुंबई शहरातील अखंड हरीनाम सप्ताह सुरु करण्याला सन १९२३ मध्ये एकशे तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. सद्गुरू भावे महाराज ट्रस्टची श्रीक्षेत्र पंढरपूर येथे महाद्वारात सुसज्ज धर्मशाळा असून विद्यमान गुरुवर्य ह भ प रामदादा घाडगे यांच्या गुरुपदाखाली ह भ प कृष्णामास्तर घाडगे यांच्या मार्गदर्शनाने मंदिरात अनेक भाविक भक्त वर्षभर पारंपरिक धार्मिक कार्यक्रम पार पाडीत असतात. आषाढी एकादशीला मुंबईतील अनेक भजनी मंडळी तसेच दादर ते वरळी पर्यंतचे हजारो वारकरी तसेच शालेय विद्यार्थी वेशभूषा दिंड्या घेऊन या पुरातन मंदिरात देवाच्या दर्शनाला येत असतात.

बांद्रा - सरकारी वसाहतीत १९७६ पासून अस्तित्वात असलेल्या या मंदिरात श्रीविठ्ठल-रखुमाईच्या मूर्ती या काळ्या पाषाणातील तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची मूर्ती संगमरवरी स्वरूपात आहेत. संत मुक्ताबाईंची सुंदर तसबीर आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 'संत मुक्ताबाई  पुण्यतिथी समाधी सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहसाजरा होत असतो. या मंदिरातील ४० वारकऱ्यांनी अनेक वर्षे 'आळंदी ते पंढरपूरअशी  पायी वारी केली आहे. आज ही वसाहत मोडकळीस आली आहेबरेच भाविक भक्त विस्थापित झाले आहेत तरीही आषाढी एकादशीला निष्ठेने उत्सव धार्मिक पद्धतीने पार पाडीत आहेत.

सेंच्युरी मिल वसाहत हरीहर संत सेवा मंडळ - वरळी येथील कामगार वसाहतीत प्रांगणात निवृत्ती महाराज समाधी पुण्यतिथी सोहाळ्यानिमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण १९६५ पासून आयोजित केले जाते. बिर्ला परिवार आणि रामप्रसादजी पोद्दार हे खरे या धार्मिक कार्यक्रमाचे आश्रयदाते होते. गिरणी कामगारांनी सुरु केलेल्या या सोहळ्यास वै ह भ प निवृत्ती महाराज देशमुख नागपूरकर यांनी व्यापक स्वरूप दिले. अकराशे अकरा वाचक बसविण्याचा संकल्प सोडला परंतु तो २१०० पर्यंत गेला. पारायणाचार्य वै पुंडलिक महाराज वेळूकर यांनी आयुष्यभर परायणाची धुरा वाहिली तर नानासाहेब कोठेकर यांनी कीर्तन संयोजनाची जबाबदारी सांभाळली. श्रीमद भगवद्गगीता पाठाची परंपरा ह भ प राणे गुरुजी यांनी तर भजन परंपरा भजनसम्राट वै ह भ प मारुतीबुवा बागडे यांनी केले. गेल्या ५९ वर्षात माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणशंकरराव चव्हाणबाळासाहेब भारदेवि स पागे यांनी व महाराष्ट्रातील उत्तमोत्तम नामवंत कीर्तनकारांनी हजेरी लावली आहेगिरणी संपापर्यंत प्रतिष्ठा पावलेल्या या सप्ताहात श्रवणभक्तीसाठी हजारो भाविक आणि अभ्यासू हजेरी लावीत असत.  रजनीकांत दीक्षितमनोहर राणेललन गोपाळ शर्मादत्ताराम लांबतुरे आदी कार्यकर्त्यांनी आजही ही परंपरा टिकवून ठेवली आहे.

लोअर परेल - येथील बारा चाळ येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर . श्रीक्षेत्र पंढरपूरला बडवे मंडळीकडून भाविकांना होणार त्रास आणि यात्रेच्या वेळी शासनाने सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी १९६७ मध्ये जुन्नरचे कीर्तन केसरी गुरुवर्य रामदासबुवा मनसुख यांच्या नेतृत्वाखाली लढा सुरु होता. लोअर परेल येथील या मंदिरात भक्ती करणारे  ज्ञानेश्वर मोरे माऊली हे  वारकरी महामंडळाचे अध्यक्ष होते. तरुण वयातील एक अभ्यासू वक्ते म्हणून त्यांचा परिचय वारकरी पंथातील झाला होता. परंतु  ४ जानेवारी १९७३ त्यांचे निधन झाले. तत्पूर्वी त्यांनी कोकणात १८ पारायणे करण्याचा संकल्प केला होता ते हयात असताना १४ पारायणे झाली उर्वरित ४ पारायणे त्यांच्या समाजातील अनुयायी यांनी केली. त्याच्यानंतर ह भ प कृष्णाजीराव शिंदे आणि पोपट बाबा ताजणे यांनीही संप्रदाय सांभाळण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.  सध्या गुरुवर्य अनंतदादामहाराज मोरे हे उच्च विद्याविभूषित संप्रदायाचे गुरुवर्य  म्हणून धुरा सांभाळत आहेत. श्रीक्षेत्र आळंदी आणि पंढरपूरला धर्मशाळा असून लोअर परेल येथील वर्षभर नैमित्तिक धार्मिक कार्यक्रम आणि अखंड हरिनाम सप्ताह होत असतात. आषाढी एकादशीला लोअर परेल मधील भाविक मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी येत असतात. 

वरळी कोळीवाडा - श्री शंकर मंदिर हे कोळी बांधवानी १८ ऑगस्ट १९०४ मध्ये बांधले. त्यानंतर १९२२ ला आळंदी निवासी गुरुवर्य तुकाराम महाराज कबीर त्याठिकाणी आले. आणि त्यांनी अखंड हरिनाम सप्ताह सुरुवात केली. साधारण १९२५ पासून याठिकाणी त्रयी सप्ताह (तीन आठवड्यांचा) अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली. तीन आठवडे सातत्येने चाललेला असा हरिनाम सप्ताह महाराष्ट्रात इतरस्र कुठेही नाही१९५३ पासून आजतागायत हैबतबाबा दिंडी क्रमांक १ रथाच्या पुढे आळंदी ते पंढरपूर अशी पायी दिंडी वारी या मंदिरातील भाविक भक्त निष्ठेने करीत आहेत. अगोदरच्या काळात बैलगाडीतून सामान घेऊन दिंडी निघत असे. मामासाहेब दांडेकरनारायणदादा घाडगेप्रमोद महाराज जगतापकेशवमहाराज कबीर यांच्यासह शेकडो मान्यवर कीर्तनकारांनी कीर्तने झाली आहेत. या मंदिरात आरतीसाठी १९०८ पासूनचा पुरातन ढोल आहे. आषाढी एकादशीनिमित्त कोळीवाड्यातील शेकडो भाविक भक्त देवदर्शनासाठी येत असतात. विलास वरळीकर हे सध्या अध्यक्ष आहेत.

सायन - शीव म्हणजे आताच्या सायन फ्लायओव्हर जवळील श्री विठ्ठल मंदिर. श्रीधर दामोदर खरे हे १८६० साली मुंबईत आल्यानंतर सायन मध्ये स्थायिक झाले. ते एकदा पंढरपूरला वारीसाठी गेले असता त्यांनी धातूंची मूर्ती आणलीपरंतु ती चोरीस गेली. त्यानंतर त्यांनी पाषाणाची मूर्ती घडवून घेतली. त्यावेळी त्याठिकाणी आगरी-कोळी लोकांची वस्ती मोठ्याप्रमाणे होतीत्यांनी एकत्र येऊन मंदिर बांधले आणि १८९३ मध्ये मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली. पंढरपूरच्या रुक्मिणी मंदिरातील पुजारी पंढरीनाथ उत्पात यांना पुजारी म्हणून तर वासुदेव बळवंत सोमण यांच्या नेतृत्वाखाली मंदिराचा कारभार करण्यासाठी ट्रस्ट नियुक्त करण्यात आला.  प्रत्येक सणानुसार या मंदिरातील मूर्तींना आभूषणे आणि वस्त्रालंकार घालण्यात येतात. आषाढी एकादशीला मंदिराला विलोभनीय सजावट करण्यात येते.

माहीम - माहीम फाटक ते मोरी रोड या भागातील १९१६ सालचे प्रसिद्ध माहीम विठ्ठल-रखुमाई मंदिर.  १९१४-१५ मध्ये माहीम इलाख्यात प्लेगची साथ पसरली होती. भयभयीत झालेले लोक एका तांत्रिक भगताकडे गेली तेव्हा त्याने सांगितले या बेटावर श्री विठ्ठल रखुमाई मंदिराची उभारणी करा. तेव्हा १९१६ साली मंदिराचे निर्माण केले. आणि पंढरपूरला जाऊन काळ्या पाषाणाच्या मूर्ती आणल्या. तेव्हापासून आषाढी एकादशीच्या दिवशी सांस्कृतिक आणि भजनाचे कार्यक्रम हजारो गर्दीत होत असतात.

बांद्रे - बाळाभाऊ तुपे यांनी संकल्पना मांडल्यानंतर नाभिक समाजाने ९ जानेवारी १९४० साली श्री विठ्ठल-रखुमाई मंदिराची उभारणी केली. स्थानिक भाविकांच्या गर्दीत आषाढी एकादशी साजरी केली. अनेक दिंड्या येत असतात.

भायखळा - भायखळा पश्चिमेला ना म जोशी मार्गावर हे श्री विठ्ठल रखुमाई मंदिर १२९ वर्षाचे हे पुरातन मंदिर आहे. मंदिरात नित्य भजनपोथीवाचनआरतीहरिपाठ होत असतात. प्रदीर्घ चाललेली अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा निष्ठेने पार पाडली जात आहे. आषाढी एकादशीला सातरस्त्यापासून भायखळ्यापर्यंत हजारो भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात.

गोखले रोड दादर - जीवनाचा सुरुवातीचा अधिक काळ अलिबाग येथे झाल्याने अलिबागकार हे आडनाव स्वीकारलेले परंतु मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील गणपत ल गुडेकर यांनी आपल्या धार्मिक कार्याला प्रभादेवीतील गोखले रोड झेंडू फार्मसी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात १९५२ पासून श्रीराम नवमी निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात केली. गाथ्यावरील भजन,पोथी वाचनएकादशीला कीर्तन हे तेव्हापासून नित्य होत असतात. १९६८ ला अलिबागकर महाराज यांचे निधन झाल्यानंतर गुरुवर्य ह भ प गोपाळबाबा वाजे यांनी धुरा सांभाळली. आणि पंढरपूरआळंदी यासह महराष्ट्रात संप्रदाय पोहोचविला.श्रीक्षेत्र पंढरपूर येथे कासार घाटाजवळ या वारकरी समाजाची धर्मशाळा असून विद्यमान गुरुवर्य म्हणून नारायण महाराज वाजे हे समाज चालवीत आहेत. आषाढी एकादशीला दादर सैतानचौकीएल्फिस्टन परिसरातील शेकडो भक्त दर्शनाला येत असतात.

दादर पश्चिम - डी एल वैद्य रोड मठाच्या गल्लीत हे विठ्ठल मंदिर आहे. शिवाजी पार्क परिसरातील शेकडो भाविक भक्त याठिकाणी नेहमीच दर्शनासाठी येत असतात. या मंदिरात नारदीय कीर्तन परंपरा राबविली जाते. या परंपरेचे शिक्षण आणि सादरीकरण विशेषतः महिलांचा सहभाग अधिक असतो. काही वर्षांपूर्वी अखिल भारतीय कीर्तन संस्थेचे महाराष्ट्र व्यापी कीर्तन संमेलन यांनी आयोजित केले होते. आषाढी एकादशीला दिवसभर भजने आणि कीर्तने होत असतात.

विशेष म्हणजे गेल्या शतकभरातील धर्मक्षेत्रांसह खेड्यापाड्यात वारकरी पंथ आणि संतांचा विवेकी विचार पोहोचविणारे शेकडो कीर्तनकार सर्वश्री गुरुवर्य मामासाहेब तथा सोनोपंत दांडेकरधुंडा महाराज देगलूरकरगुंडामहाराजतात्यासाहेब वास्करशंकरमहाराज कंधारकर,रामचंद्र महाराज नागपूरकरअमृतमहाराज नरखेडकरबन्सीमहाराज तांबेभानुदास महाराज देगलूरकरकिसनमहाराज साखरेअर्जुनमामा साळुंखेकिसनदादा निगडीकरमारुतीबाबा कुर्हेकरजगन्नाथ महाराज पवाररामदासबुवा मनसुखह भ प गहिनीनाथ औसेकर महाराजमाधवराव शास्त्रीगोपाळबुवा रिसबूडभीमसिंग महाराजचैतन्य महाराज देगलूरकरबंडातात्या कराडकररामकृष्ण महाराज लहवितकरज्ञानेश्वर महाराज मोरेमहंत प्रमोद महाराज जगतापरविदास महाराज शिरसाटएकनाथमहाराज सदगीरकेशव महाराज उखळीकरसंदीपान महाराज शिंदेबंडातात्या कराडकरपांडुरंगबुवा घुले बळवंत महाराज औटीन्यायमूर्ती मदन गोसावीअशोक महाराज सूर्यवंशीबोडके बुवाआनंददादा महाराज मोरे अशा शेकडो वारकरी सांप्रदायातील सुप्रसिद्ध कीर्तनकारांची कीर्तने-प्रवचने झाली आहेत. मुंबईकरांच्या या मंदिरात हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने आले आहेत.

गिरण्यांच्या भोंग्याबरोबर गिरणगाव जागा व्हायचाकष्टकरी कामगार घामाने चिंब व्हायचा परंतु मराठी माणसाची संस्कृती टिकवण्यासाठी बेभान व्हायचा. फुलाजीबुवा नांगरेहातिस्कर बुवावासुदेव (स्नेहल) भाटकरशिवरामबुवा वरळीकरमारुतीबुवा बागडेखाशाबा कोकाटेहरिभाऊ रिंगेखाशाबा कोकाटे,, मारुतीबुवा बागडेतुळशीरामबुवा दीक्षितहरिबुवा रिंगेकिशनबुवा मुंगसेभगवानबुवा निगडीकरदामू अण्णा माळीपांडुरंगबुवा रावडेविठोबाबापू घाडगेबाबुबुवा कळंबेचंद्रकांत पांचाळविलासबुवा पाटीलपरशुरामबुवा पांचाळरामचंद्रबुवा रिंगे या भजनी गायकांनी आणि राम मेस्त्रीगोविंदराव नलावडेतुकाराम शेट्येमल्हारीबुवा भोईटेसत्यवान मानेगणपतबुवा लेकावलेशंकर मेस्त्रीभाऊ पार्टेविठोबाअण्णा घाडगेराम घाडगे या पखवाज वादकांनी मुंबईकरांना रात्रभर जागविले होते. मिल ओनर्स असोशिएअशन प्रभादेवीच्या मफतलाल सभागृहात मिल कामगारांच्या भजन स्पर्धा घ्यायचे. ही स्पर्धा आणि काही नामवंत काळाच्या पडद्याआड गेले असले तरी नवोदित पिढी मागचा भजन परंपरेचा वारसा टिकवून ठेवण्यासाठी तो चालविण्याचा प्रयत्न करीत आहे.  

मंदिरात धार्मिक कार्याला जोडून घेतलेली पहिली पिढी गेल्या काही वर्षात निवृत्त होऊन मुंबईच्या उपनगरात किंवा गावी वास्तव्याला गेली आहे. काहींनी या जगाचा निरोप घेतला आहे. त्यामुळे  'वारकरी प्रबोधन महासमितीचेसंस्थापक अध्यक्ष ह भ प रामेश्वर महाराज शास्त्री आणि सातारा सहकारी बँकेचे अध्यक्ष ह भ प राजाराम तथा नाना निकम हे दरवर्षी गिरणगावात दिंडी सोहळा काढीत असतात. परंतु भविष्यात उंच उंच टॉवरच्या भुलभुलैयात मुंबईतील मंदिराचा कळस आणि त्या ठिकाणचा चाललेला परमार्थ दिसेल कायकिंबहुना सुरुवातीच्या काळातला परमार्थ उभारी घेत पुन्हा उंची गाठणार आहे का या प्रश्नाचे उत्तर काळ देणार आहे.

रवींद्र मालुसरे

अध्यक्ष

मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई 

9323117704

रवींद्र मालुसरे
अध्यक्ष - मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई, ९३२३११७७०४

शुक्रवार, २३ जून, २०२३

|| नारायण नामे होऊ जीवन्मुक्त ||

 || नारायण नामे होऊ जीवन्मुक्त ||

वै. श्री सदगुरु रामकृष्ण भावे महाराज

वै. श्री सदगुरु अर्जुनमामा साळुंखे महाराज

वै. श्री सदगुरु नारायणदादा घाडगे महाराज

महाराष्ट्रातील खेड्या-पाड्यासह श्रीक्षेत्र पंढरपूर व आळंदी येथे भागवत धर्माची पताका उंचावून हरिनामाचा गजर करणाऱ्या, गेल्या शतकातील या महान सत्पुरुष त्रयींच्या पारमार्थिक कार्याची संपूर्ण महती सांगणारा 'नारायण नामे होऊ जीवन्मुक्त' हा ग्रंथ लिहून पूर्ण झाला आहे. 

श्री क्षेत्र पंढरपूर येथे कार्तिक वारी ला तो आपल्यापर्यंत पोहोचेल ...रामकृष्णहरी....

स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा |

मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा||

नारायण नामे होऊ जीवन मुक्त |

कीर्तनी अनंत गाऊ गीती ||

वैकुंठीचे जण सदा इच्छिताती |

कइ येथे येती हरिचे दास ||

यम धर्म वाट पाहे निरंतर |

जोडोनिया कर तिष्ठतसे ||

तुका म्हणे पावावया पैलपार |

नाममंञ सार भाविकांशी ||

जगद्गुरू संत तुकोबाराय यांचा पाच चरणाचा नामाचा आणि मृत्युलोकाचा महिमा सांगणारा उत्कृष्ट असा हा अभंग आहे, या अभंगात  तुकोबाराय म्हणतात, स्वर्गातील अमरत्व प्राप्त असलेले  देव म्हणतात की, हे भगवंता आम्ही मृत्यूलोकी जाऊन मनुष्य जन्माचे सार्थक करू.  नारायण नामाचा गजर करू आणि कीर्तन भजनात आनंदाने नाचू आणि पापमुक्त होऊ. याहेतूने स्वर्गातील देव भगवंताला विनंती करतात कि, आम्हाला मनुष्य जन्म द्यावा. आमचा जन्म मृत्यूलोकात व्हावा !मृत्यू लोकी असे काय आहे की स्वर्गातील देव येथे येण्यासाठी आतूर  झाले आहेत ? तेंव्हा तुकोबाराय म्हणतात," येथे त्रिवेणी संगम आहे !!...त्रिवेणी संगम म्हणजे काय तर,  पृथ्वीतलावर  देव, भक्त आणि संत आहेत. ते पवित्र पावन तीर्थक्षेत्री  वास्तव्यास असतात.आणि या भूमीत जन्म मिळाला तर....

नारायण नामे होऊ जीवन मुक्त | कीर्तनी अनंत गाऊ गीती || म्हणूनच  या अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबाराय नारायण नामाचे महत्व विषद करतात. 

मायबाप संतसज्जनहो....आपल्या सर्वांचे परमभाग्य सद्गगुरू  वै ह.भ.प. नारायणदादा रा घाडगे या संत सत्पुरुषाचा आपणाला सहवास आणि कृपाशिर्वाद लाभला. वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला सत्कर्म,सत्कार्य करायला आणि देवाधिदेव 'नारायणाचे' नाम घेण्यास शिकवले. आपली सर्व इंद्रिये बिथरतील पण नेहमी आपल्या मनाला स्थिर ठेवा. नामाच्या सामर्थ्याला प्रयत्नांची जोड दिल्यास  या जगात अशक्य काहीच नाही.  संसारातून तरूण जाण्याचा मार्ग म्हणजे भगवंताचे नामस्मरण आहे !  आणि हेच त्यांनी आपल्या कीर्तन-प्रवचनातून सोप्या भाषेत अहोरात्र सांगितले.परम श्रध्येय दादांमहाराजांची देवभक्ती,मानव भक्ती आणि त्यांच्या वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनातल्या आचार-विचार-व्यवहाराचे  मोठेपण   हे सर्व संपादित करून विद्यमान गुरुवर्य हा.भ.प. रामदादा महाराज घाडगे यांच्या आशीर्वादाने समग्रपणे "नारायण नारायण नामे होऊ जीवनमुक्त" या नावाने  जीवनचरित्र ग्रंथ आपणा समोर आणण्याचा संकल्प लवकरच माझ्याकडून पूर्णत्वास जात आहे. 

दुर्गम खेड्यातला आणि गरीब कुटुंबातला एखादा सामान्य तरुण साधक होतो....साधकाचा संत होतो संतत्वातून तो गुरुपदास आणि पुढे मोक्षाला पोहोचतो आणि विश्वाला वंद्य होतो. अशी ही दादामहाराजांची महानता सर्वांच्या हृदयी बिंबली आहे.  श्रेष्ठ सत्पुरुषांची चरित्ररेखा त्यांच्या लौकिक जन्मापासून पारलौकिक मोक्ष स्थितीपर्यंत अत्यंत लक्षणीय असते.असा हा लक्षवेधी चरित्रग्रंथ आपणासमोर येण्यापूर्वी आपल्या काही योग्य सूचना असतील तर नक्की कळवा, धन्यवाद ! 

अधिक माहितीसाठी संपर्क साधा - ९३२३११७७०४

चरित्र ग्रंथात वाचायला काय असेल 

१९ व्या शतकाच्या पूर्वार्धातील  वारकरी संप्रदायाची सद्यस्थिती       

प्रभादेवीतील श्री सद्गगुरू भावे  महाराज वारकरी समाजाविषयी


वै सद्गगुरू ह.भ.प.रामकृष्ण भावे महाराज :-


 





यांचा जन्म, त्यांचे जन्मगाव, पूर्वपीठिका,  कुळाचार, वंशावळी, शिक्षण, चरितार्थ, गुरुपरंपरा, प्रभादेवीतील मुक्काम, वारकरी संप्रदायातील कार्य, वैकुंठगमन 

वै. सद्गगुरू  ह.भ.प.अर्जुनमामा  साळूंखे 








यांचा जन्म, त्यांचे जन्मगाव, पूर्वपीठिका,  कुळाचार, वंशावळी, शिक्षण, चरितार्थ, गुरुपरंपरा, प्रभादेवीतील मुक्काम, वारकरी संप्रदायातील कार्य, वैकुंठगमन

वै. सद्गगुरू  ह.भ.प. नारायणदादा रामजी घाडगे  








यांचा जन्म, त्यांचे जन्मगाव, पूर्वपीठिकाकुळाचार, वंशावळी, शिक्षण, चरितार्थ, गुरुपरंपरा, प्रभादेवीतील मुक्काम, वारकरी संप्रदायातील कार्य

दादामहाराजांचे बालपण

दादामहाराजांचा गृहस्थाश्रम        

दादामहाराजांचे मुंबईस स्थलांतर

दादामहाराजांची परमार्थातील  वाटचाल                                    

दादामहाराजांची सदगुरू  भेट    अनुग्रह

दादामहाराजांच्या सदगुरू  कार्याचा प्रारंभ                             

दादामहाराजांच्या नेतृत्वाखाली  समाजाचा विस्तार

दादामहाराजांच्या नेतृत्वाखाली  सामुदायिक पारायण सोहळे.          

सामुदायिक पारायणाच्या  आठवणी

श्रीक्षेत्र पंढरपूर येथील समाजाच्या स्वमालकीच्या धर्मशाळेचे स्वप्न      

संकल्पपूर्ती आणि आलेल्या  अडचणी त्यावरील मात

धर्मशाळेतील समाजाच्या  परमार्थाची वाटचाल

धर्मशाळेच्या नवीन इमारतीच्या  बांधकामाचा संकल्प व पूर्तता

दादामहाराजांचे अखेरचे दिवस

दादामहाराजांचे वैकुंठगमन

याचबरोबर - समाजाच्या अनुयायी गावातील हरिनाम सप्ताहाचा सुरुवातीपासूनचा इतिहास

दादामहाराजांचे फोटो आणि आठवणी                

दादामहाराजांविषयीमान्यवरांचे वाचनीय लेख

लेखक : 

रवींद्र तुकाराम  मालुसरे 

(अध्यक्ष मराठी  वृत्तपत्र  लेखक संघ मुंबई )

9323117704


रवींद्र मालुसरे
अध्यक्ष - मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई, ९३२३११७७०४

गुरुवार, २२ जून, २०२३

बाजीराव विठोबा मालुसरे यांची उपविभागप्रमुखपदी निवड

बाजीराव विठोबा मालुसरे यांची उपविभागप्रमुखपदी निवड

(मुंबई : रवींद्र मालुसरे)

शिवसेनाप्रमुख स्व बाळासाहेबांच्या आशीर्वादाने, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब यांनी पोलादपूर तालुक्यातील साखर गावचे सुपुत्र बाजीराव विठोबा मालुसरे
यांची मुंबईतील दक्षिण मुंबई फोर्ट उपविभागप्रमुख पदी नियुक्ती झाली आहे.
बाजीराव मालुसरे हे यापूर्वी फोर्ट मुंबई येथे शाखाप्रमुख होते तर सध्या हिंदुस्थान माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार सेनेचे कार्याध्यक्ष आणि कोल्हापूर शिरोळ तालुक्याचे संपर्क प्रमुख आहेत.
राजकीय,सामाजिक आणि पारमार्थिक अशी समृद्ध परंपरा लाभलेले बाजीराव मालुसरे हे नरवीर तानाजी-सूर्याजी मालुसरे यांचे कुलोत्पन्न असून तत्कालीन कुलाबा जिल्हापरिषदेमध्ये कृषी सभापती व पोलादपूर पंचायत समितीचे उपसभापती असलेल्या स्व विठोबा आण्णा मालुसरे यांचे सुपुत्र आहेत. बाजीराव यांचे मोठे बंधू ज्ञानोबा मालुसरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष होते व त्यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवली होती. सध्या गुरुवर्य गणेशनाथबाबा संप्रदायाचे ते अध्यक्ष आहेत.
तर दुसरे बंधू तानाजी मालुसरे हे डोंबिवली येथे शिवसेना उपशहर प्रमुख आहेत. त्यांचे पुतणे अनिल ज्ञानोबा मालुसरे हे पोलादपूर तालुका शिवसेना प्रमुख आहेत.
बाजीराव मालुसरे हे फोर्टमध्ये ३५ वर्षेहून अधिक वर्षे एक जुने कट्टर शिवसैनिक म्हणून सर्वपरिचित आहेत. मुंबईतील शिवसेनेच्या अनेक संघर्ष लढ्यात अग्रेसर असलेले बाजीराव मालुसरे यांची एक बेडर आणि निर्भिड कार्यकर्ता म्हणून ओळख आहे. त्याचप्रमाणे नाईक मराठा समाजाचे कार्याध्यक्ष असलेले बाजीराव हे उत्तम अभ्यासू वक्ते आणि शिवचरित्राचे अभ्यासक आहेत. संपर्क बाजीराव मालूूसरेे 8779671894
💐🚩मनःपूर्वक अभिनंदन 💐🚩


शनिवार, १७ जून, २०२३

 कॉ. जयवंत पाटील यांची कारकीर्द म्हणजे लोकांसाठी संघर्ष - कॉ प्रकाश रेड्डी


मुंबई : (रवींद्र मालुसरे) स्वातंत्र्याच्या आधी आणि नंतरही मुंबई हे औद्योगिक शहर म्हणून प्रसिद्ध होते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर महाराष्ट्राची राजधानी म्हणून निर्माण झालेल्या या शहराचा पायाभूत विकास व्हावा यासाठी निर्भीडपणे व अभ्यासपूर्ण भाषणांनी ज्यांनी सभागृहात आणि स्वच्छ चारित्र्याने जनमानसावर छाप पाडली अशा दिवंगत कॉम्रेड जयवंत पाटील यांची जन्मशताब्दी प्रभादेवीकर वर्षभर साजरी करणार आहेतलोकांचा हा व्यक्त होणारा कृतज्ञता भाव म्हणजेच त्यांच्या कार्याला मिळालेली पोचपावती आहे असे उदगार महाराष्ट्रातील ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉम्रेड प्रकाश रेड्डी यांनी काढले. प्रभादेवी येथील आगरी सेवा संघाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे असेही म्हणाले कीकॉ. जयवंत पाटील यांची कारकीर्द म्हणजे लोकांसाठी संघर्ष असलेला तो काळ होता. मधू दंडवते यांनी दादरमधून निवडणूक लढण्याचा हट्ट त्यावेळी सोडला असता तर अल्प मतांनी पराभूत झालेले कॉ जयवंत पाटील लोकांचा एक आमदार म्हणून सभागृहात गेले असते. मुंबईतील मध्यवस्तीतील गिरणगावात झोपडपट्टीचाळीगल्लीबोळात जाऊन लोकांसाठी अहोरात्र काम केल्यामुळे कॉ. जया पाटीलकॉ मणिशंकर कवठेकॉ गणाचार्यकॉ प्र के कुरणे यांच्यासारखे कार्यकर्ते सातत्याने निवडून येत असतपरंतु ८२ च्या गिरणी संपानंतर मुंबई शहराची ओळख औद्योगिक राजधानी ऐवजी आर्थिक राजधानी म्हणून झालीत्यानंतर झालेली भ्रष्ट राजकारणी व माफियांची युती यांनी अनेक चळवळी दडपल्या. मुंबईतील लोकांच्यासाठी आवाज उठविणाऱ्या संस्था वा राजकीय पक्ष यांची मुस्कटदाबी केली त्याचा परिणाम एकेकाळी दिमाखाने फडकणाऱ्या लाल बावट्यावर सुद्धा झाला आहे हे नाकारून चालणार नाही. संसदीय राजकारणावर विश्वास असलेल्या करोडो लोकांचा लवकरच भ्रमनिरास होणार असून भविष्यात पुन्हा बळ मिळेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. 
तर प्रमुख पाहुणे म्हणून असलेले कॉ मिलिंद रानडे म्हणालेमहाराष्ट्र हे कम्युनिस्ट चळवळीची प्रदीर्घ आणि गौरवशाली परंपरा असलेले राज्य आहे. त्याला ब्रिटीश साम्राज्यवाद्यांशी स्वातंत्र्यासाठी केलेल्या संगराचा वैभवशाली वारसा आहे. या लढाईत कित्येक कम्युनिस्टांनी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली कामगार आणि शेतकऱ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. आजचा काळ हा गरिबांना जगण्यासाठी अधिक कष्ट करायला लावणारामुख्य प्रश्न बाजूला ठेवून राम मंदिरऔरंगजेबलव्हजिहाद यासारखे भावनिक धार्मिक तेढ वाढीस लावणारे प्रश्न उकरून काढून एका बाजूने देशवासियांना अडाणी आणि दुसरीकडे अंबानी - अदानी सारख्या उद्योगपतींना अधिक श्रीमंत करणारे हे सरकार आहे. अडाणी अधिक श्रीमंत कसा झाला याचा शोध सामान्यांनी घ्यायला हवा आणि त्यानंतर मुखंडपणा सोडून संबंधितांना जाब विचारायला हवा. या देशातील जनतेने काय बघायचेकाय वाचायचेकाय लिहायचे आणि कसे वागायचे हे सतत खोटं बोलणारी सत्तापिपासू लोकं ठरवीत आहेत. सर्व क्षेत्रांवर होणारे हे आक्रमक थोपविण्यासाठी संघटनात्मक पातळीवर प्रयत्न करणे गरजेचे आहे.
जयवंत पाटील यांची कारकीर्द म्हणजे संघर्ष आणि क्रांती या कल्पनांनी झपाटलेला तारुण्याचा तो काळ ! मुंबईतील गिरणी कामगारांच्या लाल-बावटयाने गाजवलेला तो काळमोलमजुरी आणि भांडवल यांच्यातील वर्गयुद्धाने सा-या मुंबईच्या जीवनावर त्या काळी चैतन्यमय राजकीय प्रभुत्वाची झिंगच चढली होती. त्याला कारणेही तशीच सबळ होती.
पत्रकार अशोक कारखानीस आपल्या भाषणात म्हणालेमुंबईतील गिरणी कामगारांच्या लाल-बावटयाने गाजवलेला तो काळमोलमजुरी आणि भांडवल यांच्यातील वर्गयुद्धाने सा-या मुंबईच्या जीवनावर त्या काळी चैतन्यमय राजकीय प्रभुत्वाची झिंगच चढली होती. त्याला कारणेही तशीच सबळ होती.
भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर गोवा मुक्तीचा लढा आणि नंतर झालेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढयात कम्युनिस्ट पक्षाने जी महत्त्वाची भूमिका पार पाडली त्यामध्ये जयवंत पाटील अग्रभागी होते. १९५७ च्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत संयुक्त महाराष्ट्र समितीने जो प्रचंड विजय मिळवला त्यात जयवंत पाटील महापालिकेवर निवडून आले.
मुंबई महापालिकेतील त्यांच्या कार्याने त्यांनी आपल्याच विभागात नव्हे तर एक निर्भिडलढाऊसर्वसमावेशक नेता म्हणून सा-या मुंबईतील नागरिकांमध्ये त्यांनी सर्वमान्यता मिळवली होती.
मोकळ्या मनाचासामंजस्य जोपासणारालोकसंग्रहात रमणारापण लोकहितासाठी सर्वस्व समर्पित करणारा नेता म्हणून जयवंत पाटील यांच्या रुबाबदार व्यक्तिमत्त्वाला त्यांच्या कार्याला मुंबईच्या गिरणी कामगारांच्या लढ्याच्या आणि मुंबई मनपाच्या इतिहासाची नोंद घेताना विसरणे शक्य नाही. लोकविरोधी शक्ती आणि त्यांची लोकविरोधी धोरणे यांच्याविरोधी भूमिका घेणे लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या प्रसार माध्यमांनी सोडून दिले आहे. काळाची गरज म्हणून लोकांचे प्रश्न हातात घेऊन जनतेचे लढे उभारण्यास कम्युनिस्टांनी कटिबद्ध होणे हाच खरा लाल सलाम जयवंत पाटील यांना अभिप्रेत ठरेल.
आगरी समाज हा नेहमीच लाल बावट्याखाली एकनिष्ठ आणि प्रत्येक संघर्ष लढ्यात अग्रेसर राहिला आहेप्रभादेवीत झोपडपट्टीत राहणाऱ्या गरिबांना आधार देण्याचे काम जयवंत पाटील यांनी केले. प्रभादेवीकर त्यांचे ऋण विसरणे शक्य नाही असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ कृष्णा ब्रीद आणि आगरी सेवा संघाचे अध्यक्ष पद्माकर म्हात्रे यांनी व्यक्त केले. कॉ उदय चौधरीकॉ एकनाथ मानेराष्ट्रवादीचे रमेश परबसुभाष मराठेमराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरेकॉ विजय कोरेकॉ डॉ. अनुराधा रेड्डीकॉ पाटील यांच्या कन्या मिलन आणि रोशन यांनीही कॉ जयवंत पाटील यांच्या आठवणी आपल्या भाषणात जागविल्या. कॉ मधुकर कदम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. विश्वनाथ घवाळीकृष्णा पाटीलअनंत मोरेचित्तरंजन कांबळे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

बुधवार, ३ मे, २०२३

सेंच्युरी बाजार जवळील भूतबंगला, फकीरशेठ चाळ आणि जांभेकर महाराज

 सेंच्युरी बाजार जवळील भूतबंगला, फकीरशेठ चाळ आणि जांभेकर महाराज 


पंजाबमधून श्रीरामकृष्ण महाराज जे निघाले ते सुरतमध्ये आले. परंतु सुरत हे त्यांचे कार्यक्षेत्र ठरणारे नव्हते. श्रीयुत कामेरकर या नावाचे मुंबईतील गृहस्थ सुरत येथे काही कामानिमित्त गेले असताना, कोणीतरी मराठी बोलणारा बुवा सुरतेच्या स्मशानात येऊन राहिला आहे अशी बातमी त्यांना लागली. त्यामुळे त्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाल्याने ते त्यांच्या भेटीसाठी गेले. तुम्ही मुंबईला चला अशा त्यांच्या विनंतीवरून मग महाराज मुंबईला आले. मुंबई हे त्यांचे कार्यक्षेत्र व्हायचे होते. मुंबईतील दुःखीकष्टी लोकांना उपकारक सहकार लाभावयाचा होता. ते मुंबईत कसे आले आणि तेथे येऊन त्यांनी कोणत्या स्वरूपाचे कार्य केले याची विस्तुत माहिती याविषयी तुम्हाला या लेखावरून होईल. अक्कलकोटच्या श्रीसमर्थ महाराजांची त्यांनी एकनिष्ठेने उपासना व भक्ती करून त्यांना प्रसन्न करून घेतले. स्वामींची श्रीरामकृष्ण महाराज जांभेकर यांच्यावर संपूर्ण कृपा होती. श्री जांभेकर महाराजांनी अनेक सिद्धी प्राप्त करून घेतल्या होत्या आणि त्यांचा सदुपयोग त्यांनी लोककल्याणासाठीच केला. कोणतीही सिद्धी असो, ती सहजसाध्य नसते. त्यासाठी अपरंपार कष्ट करावे लागतात. महाराजांनी आरामाच्या व सुखी जीवनाचा त्याग केला त्यामुळेच ते पुढे  सिद्ध पुरुष होऊ शकले. महाराज त्यांच्याकडे येणाऱ्या माणसाची कुवत ओळखत असत. बहुतेक स्वार्थ साधण्यासाठी येत असत. हे जाणत असतानाही त्यांनी प्रत्येकाला शाश्वत सुखाचा मार्ग दाखविला. त्यामुळे आजही निष्ठावंत भक्तांना त्यांचे अस्तित्व जाणवत असते. त्यांचा पोशाख साधा असे. ते लुंगी नेसत. अंगात तोकड्या हाताची कफनी, डोक्यास साईबाबासारखे फडके गुंडाळीत. 

श्री जांभेकर महाराज सेंच्युरी बाजार सिग्नलच्या अगोदर लुकास कंपनीच्या समोर असलेल्या ज्याठिकाणी आज जयंत अपार्टमेंट आहे त्या ठिकाणी  'भूतबंगला' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका घरात राहत असत. त्या घरात कोणीही राहायला तयार नसे. कारण त्या घरात भुतांचे वास्तव्य होते अशी सर्वांची समजूत होती. महाराज तेथे राहावयास आले व काही दिवस सुखात राहिले. येथे राहायला आल्यानंतर त्यांची ख्याती उत्तरोत्तर वाढत गेली. तो बंगला आपण कायमचा विकत घ्यावा असे वाटून त्याच्या ख्रिश्चन मालकाशी त्यांनी बोलणे केले होते. परंतु तो काही केल्या विकायला तयार होईना. त्यामुळे विठ्ठल मंदिरजवळ म्हणजे श्रीदत्त  मंदिरासमोरील चंपावाडीत  त्यांनी प्रभादेवीतच एका आगरी समाजातील व्यक्तीचे म्हणजे 'फकीरशेट' यांचे घर भाड्याने घेतले. 

तेथे घरापुढे आलेल्या लोकांना बसण्याउठण्यासाठी मोकळी जागा होती. मात्र घर भाड्याने देऊन फकीरशेट तो शेजारीच एका झोपडीत राहू लागला. त्याच्यापाशी नावाप्रमाणेच काही नव्हते. राहते घर भाड्याने गहाण पडले होते, नोकरी धंदा नव्हता. कुरुंबासह आयुष्याचे दिवस कसेबसे ढकलत होता. महाराजांना त्याची ही गरिबी लक्षात आल्यानंतर त्याच्यासह कुटुंबाला चांगले कपडे घातले. आणि त्याला 'फकीरशेट' या नावाने संबोधण्यास सुरुवात केली. संपूर्ण कुटुंबाचा रुबाब वाढला. त्यामुळे पुढे ते सर्वांचे फकीरशेट झाले. ते घर म्हणजेच महाराजांचा मठ झाला. आणि त्याला नंतरच्या काळात आपोआप मठाचे स्वरूप आले. देवपूजा, आरती, प्रसाद वैगरे  सुरु होऊन त्या घराचे पावित्र्य व माहात्म्य वाढले. भक्तमंडळी दिवसेंदिवस वाढत्या प्रमाणात त्या मठात येऊ लागले. येणाऱ्यांचे हेतू सफल होऊ लागले. तेथे सतत नंदादीप तेवत असे. महाराजांच्या नाना प्रकारच्या लीला तेथे चालत असत. ज्यांचे हेतू सफल होत ते तेलाचे व तुपाचे डबे तसेच लागेल तेवढे धान्य वैगरे आणून देत असत. रोज शेकडो लोक भोजन करून तृप्त होऊन जायचे. कधी काही कमी पडत नसे. महाराजांनी कधीही स्वतःजवळ पैशांचा संग्रह केला नाही. ते फक्त एकवेळ भोजन करायचे. बहुतेक दिवस उपवास करायचे. कधी कधी बेचाळीस दिवस उपोषण करीत. सकाळी व रात्री एक पेला दूध एवढाच त्यांचा त्या काळात आहार असे. ही सर्व अनुष्ठाने ते लोककल्याणासाठी करीत असत. पहाटेच्या प्रहरी काकड आरती होत असे व आरतीसाठी दोन-अडीचशे माणसे एकत्र जमायची. तर अन्नप्रसादाचा कार्यक्रम सायंकाळी सातपर्यंत चालायचा. गरीबी आणि धनिक अन्नसंतर्पणाच्या कार्यक्रमाला येत असत. 

जांभेकर महाराजांचा जीवनपट अवघा १८९८ ते १९४० म्हणजे अवघ्या ४२ वर्षाचा त्यापैकी फक्त १९३० ते १९४० दहा वर्षे प्रभादेवीत राहिले. १० जानेवारी १९४० रोजी त्यांनी शिवाजीपार्क स्मशानभूमीजवळ समाधी घेतली. आज त्याठिकाणी 'श्रीरामकृष्ण जांभेकर मठ' आहे आणि धार्मिक कार्य अखंडितपणे सुरु आहे.

- रवींद्र मालुसरे 

अध्यक्ष,मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई  

९३२३११७७०४


मंगळवार, ४ एप्रिल, २०२३

।। नारायण नामे होऊ जीवन्मुक्त ।। https://youtu.be/xEOpbg0rnRw

।। नारायण नामे होऊ जीवन्मुक्त ।।

 https://youtu.be/xEOpbg0rnRw


'ताठ कणा' मूलमंत्र देणारा देवदूत म्हणजे डॉ. पी एस रामाणी - प्रमोद शिंदे

 'ताठ कणामूलमंत्र देणारा देवदूत म्हणजे डॉ. पी एस रामाणी - प्रमोद शिंदे


मुंबई (रवींद्र मालुसरे) : जगभरातली आई आपल्या प्रत्येक मुलाला लहानपणी हेच शिकवते कीआयुष्यभर ताठ कण्याने जगत रहा. डॉ. प्रेमानंद म्हणजे पी एस रामाणी यांच्या आईने सुद्धा त्यांच्यावर तसेच संस्कार केले. त्यामुळे कुणासमोरही वाकायचंझुकयाचं किंवा माघारही घ्यायची नाही हे अंगीकारल्याने जीवनातील प्रतिकूल परिस्थितीतही ते आंतरराष्ट्रीय पातळीवर न्यूरो स्पायनल फ्लिप सर्जन म्हणून प्रसिद्ध होऊ शकले असे गौरवपूर्ण उदगार मन:शक्ती केंद्र लोणावळाचे प्रमुख विश्वस्त प्रमोद शिंदे यांनी दादर येथे काढले.

डॉ रामाणींच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्व शिष्यांच्या वतीने त्यांना नुकताच 'गुरु द्रोणाचार्य पुरस्कार' प्रदान करून गौरविले होते. याचे औचित्य साधून शांता सिद्धि चॅरिटेबल ट्रस्टच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त त्यांचा व प्रतिमा रामाणी यांचा विशेष सत्कार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.

प्रमोद शिंदे पुढे असेही म्हणाले कीमनशक्ती केंद्रात लहान मुलांना शिकवताना आम्ही विद्यार्थ्याची सर्वांगीण प्रगती व्हावी यासाठी IQ,EQ,SQ हे शिवण्यावर अधिक भर देतो. IQ=Intelligent quotient म्हणजे बुध्यांक, EQ=Emotional quotient म्हणजे भावनिक बुध्दीमत्ता बुध्यांक. SQ=Social, spiritual quotient म्हणजे सामाजिकसात्विक बुध्दीमत्ता सत्विकांक म्हणजेच IQ EQ SQ ज्या विद्यार्थ्याकडे असेल तो जीवनात ताठ कण्याने उभा राहिल. डॉक्टरांनी असहाय रुग्णांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करून जगण्याचे बळ तर दिलेच यापेक्षाही वैद्यकीय क्षेत्राला वरदान ठरणारा ते शोध लावू शकले त्यामुळे अनेकांना ते देवदूत वाटतात. 'ताठ कणाहे पुस्तक आणि चित्रपट अनेकांना प्रेरणादायी ठरो.
माणसामध्ये सत्वरजतम हे तीन गुण असतातचपरंतु सात्विक गुण स्वीकारून त्याने परोपकारी वृत्तीने जगायला शिकले व ते स्वतःत अंमलात आणले पाहिजेत. ही सवय लागली तर भगवद्गगीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे माणूस आपोआप कर्मयोग स्वीकारुन जगायला लागतोतेव्हा मोक्ष वैगरे कुठे नसतो तर तो आयुष्यात चांगले वागलो तर इथेच मिळतो. मनाला मिळणारा आनंद आणि समाधान म्हणजेच मोक्ष असे मत डॉ. रामाणी यांनी व्यक्त केले.
ज्या दिव्यांग अपंग व्यक्ती आणि मुले चालू शकत नाहीत अशा १७ जणांना शांता सिद्धि चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने व्हीलचेअर आणि वैद्यकीय वस्तूंचे विनामूल्य वाटप करण्यात आले.
याप्रसंगी 'ताठ कणाचित्रपटाचे निर्माते गिरीश मोहिते आणि पटकथा संवाद लेखक श्रीकांत बोजेवार यांनी या बायोपिकचे महत्त्व आपल्या मनोगतात सांगितले. सेक्रेटरी भूषण जाक यांनी ट्रस्टच्या सामाजिक कार्याचा आढावा आपल्या प्रास्ताविकात घेतला. सूत्रसंचालन निवेदिका स्मिता गवाणकर तर आभार प्रदर्शन डॉ तुषार रेगे यांनी केले. कार्यक्रमात 'ताठ कणाहा चित्रपट दाखविण्यात आला. खजिनदार संजय दिवाडकरकिशोर कुलकर्णीजयंत गायतोंडेविनायक पंडितसंजय कुलकर्णीसतिश दाभोळकरस्वप्नील पंडितदिपक देसाई यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत सत्याची कास धरून पत्रकारिता करावी.

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत  सत्याची कास धरून पत्रकारिता करावी. सतरावे शतक प्रबोधनाचे ,  अठरावे शतक वैचारिकतेचे ,  एकोणीसावे शतक प्रगतीचे...