मंगळवार, ६ डिसेंबर, २०२२

गिरिदुर्गांचा वाटाड्या.... दुर्गमहर्षी आप्पासाहेब परब

 गिरिदुर्गांचा वाटाड्या.... दुर्गमहर्षी आप्पासाहेब परब

                            रवींद्र मालुसरे (अध्यक्षमराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई)









आप्पा परब ..... 

एक सामान्य गिरणी कामगारदादरच्या रानडे रोडवरच्या फुटपाथवर जुनी पुस्तकेदिवाळी अंकनियतकालिके विकणारे विक्रेतेप्रख्यात नाणी संग्राहक व नाणी तज्ज्ञ  ते इतिहास संकलक - संशोधक हा आप्पांचा जीवनप्रवास ऐकून कोणीही थक्क होऊन जावे अशीच आप्पांची ८३ वर्षाची आयुष्यभराची वाटचाल आहे.

 

शिवछत्रपतींना दैवत मानणार्‍या या व्रतस्थ इतिहासपुरूषाशी माझा तीन तपाचा स्नेह आहे. मला लहानापासून वाचनाची प्रचंड भूकत्यामुळे नवीन काही शोधताना दादरमधल्या रद्दीवाल्यांच्या दुकानात डोकावत असे. रानडे रोडवरील पटवर्धन ब्रदर्स हे आयुर्वेदिक दुकान सोमवारी बंद असे त्यामुळे एक दाढीधारी व्यक्ती आपल्याकडील सर्व ठेवा बंद दुकानासमोर ऐसपैस मांडत असे. ते सहज चालता बघता येत असल्याने महिन्यातून दोन तीन सोमवारी त्याठिकाणी जाणे होऊ लागले. माझ्या 'मालुसरे' आडनावासह उमरठ-साखर या जन्मगावाचा परिचय त्यांना झाल्यानंतर तर आम्ही दोघे अधिकच जवळ आलो. पुढे डिसिल्व्हा लगतच्या सोजपाल चाळीतल्या त्यांच्या घरी माझे जसजसे जाणे झाले, तसतसा त्यांना महाराष्ट्रातील अनेक लोकांच्या घरी वा सार्वजनिक कार्यक्रमात घेऊन गेलो. आप्पांची ओळख झाल्यावर गप्पा मारताना अनेक गोष्टींचे मला अप्रूप वाटत राहिले. त्यापैकी एक गोष्ट होती. परिस्थिती कशीही असो मनाची शांतता जराही ढळू न देता ते कमालीचे स्थितप्रज्ञेत राहत. आणि माणसाच्या स्थितप्रज्ञेतही इतकी उत्कटता असते हे मला तेव्हाच प्रकर्षाने जाणवले. दुसरी गोष्ट माझ्या लक्षात आली ती म्हणजे त्यांना छत्रपती शिवरायांच्या कार्याबद्दल असणारी आत्यंतिक श्रद्धा आणि हे कार्य चिकित्सक पद्धतीने पुढे घेऊन जाणारी नवी पिढी यापुढच्या काळात कार्यरत राहील काय याबद्दल वाटणारी चिंता.

 

शिवकार्याच्या अभ्यासासाठीप्रचार-प्रसारासाठी अहोरात्र वाहून घेतलेल्या या ऋषितुल्य साधकाचे चालणेबोलणेवागणे मला याची देही याची डोळा अनुभवता आलेय याबाबत मी स्वतःला भाग्यवान समजतो. सह्याद्रीच्या रांगात महाराष्ट्राच्या कडे- कपारीत दऱ्याखोऱ्यात अखंड भटकंती करणारे आप्पा परब लाखो इतिहासप्रेमींना परिचित आहेत. इतिहासावरील निष्ठे प्रमाणेच ज्यांनी हयातभर इतिहासाचीगडकिल्ल्यांची सेवा केली असे महत्वपूर्व ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणजे आप्पा परब होय.  महाराष्ट्रातील साडेसहाशे गडकिल्ल्यांचा केवळ इतिहासच नव्हे तर त्या गडकिल्ल्यांमागील विज्ञानवास्तुशास्त्रभूगोलतत्कालीन सामाजिक - आर्थिक - राजकीय - सांस्कृतिक आणि धार्मिकदृष्टया त्यांचे महत्व सांगणारे आप्पा परब हा गडकिल्ल्यांचा चालता-बोलता इतिहास आहे. आपले अवघे आयुष्यच आप्पांनी गड - किल्ल्यांवरील संदर्भ संशोधनासाठी झोकून दिले आहे. अवतीभोवतीची परिस्थिती कितीही चंगळवादी होऊ दे आपण आपले अंगीकारलेले व्रत व्रतस्थपणे कसोशीने पाळायचे  हा खाक्या आप्पांनी आयुष्यभर जपला. ते करण्यासाठी जे काही करायचे ते प्रसंगी अपमान सोसून आप्पांनी केले. त्यांनी अक्षरशः हजारो लोकांना गडकिल्ले दाखवले पण ते करण्यासाठी त्यांनी कधी एक छदामही कोणाकडून घेतला नाही. 'जे किल्ले मावळ्यांनी तानाजी - बाजी - येसाजी यांनी प्रसंगी रक्त सांडून राखले तो माझ्या पूर्वजांचा वारसा दाखवण्यासाठीसांगण्यासाठी मला पैशाची गरज नाही.हा विचार आप्पा नेहमी जपत आले व त्या बरहुकूम ते वागत आले. 'माझा धर्म इतिहासमाझे दैवत शिवराय. माझी जात गडकिल्ल्यांची. त्या थोर युगपुरुषाने कधी जातीभेद मानला नाहीतर मग मी का मानू ?' हा उच्च विचार आप्पांनी आपल्या उरात कोरून ठेवला आहे. आप्पांचा यामागील स्वार्थ एकचआपल्या पूर्वजांच्या पराक्रमाच्या यशोगाथात्यांचे कार्यकर्तृत्व भावीपिढीला योग्यरितीने समजावे. प्रतिकूल परिस्थितीतही शिवरायांनी व त्यांच्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी केलेला असीम त्याग येणाऱ्या पिढीला आकलन व्हावा यासाठी अपार काबाडकष्ट घेऊन आप्पा ही उरफोड करीत आहेत. त्यांनी छत्रपतींच्या कार्याचा झपाटून अभ्यास केला. प्रचंड तप केलेकठोर जीवन जगले. इतिहासाची ही पाने शोधताना आणि त्यासंबंधाने विषयवार संगती लिहिताना जेव्हा भूगोल बोलत नाही तेव्हा विज्ञान व आकाशातील ग्रह तारे बोलतात या तत्वज्ञानाची सांगड घातली. गडकिल्ल्यांचा अभ्यास करताना भूगोल आणि विज्ञान एकमेकांस कसे पूरक आहेत हे त्यांनी दाखवून दिले. त्यांच्या पुस्तकांचे विषय जरी पाहिले तरी त्यांचे लिखाण हे चतुरस्त्र लेखकाचे लिखाण आहे हे समजते. आप्पांच्या वाड्.मयातील प्रज्ञाशिवाजी महाराजांचा इतिहास सांगण्यासाठी शेकडो वेळा अनेक गडांवर जावून केलेले प्रत्यक्ष प्रयत्नआणि त्यातून शिवप्रेमींना मिळणारी प्रसन्नता हे अनुभवता येते.

 

नेहमी आपल्या पाठीवर आपली सॅक बांधून घेऊन आपले पिण्याचे पाणी नेहमी सोबत ठेऊन गड चढणारे आप्पा आज महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यातून भटकंती करणाऱ्या इतिहासप्रेमींना हे आपले हक्काचे मार्गदर्शक वाटतात. त्याला कारणेदेखील तशीच आहेत. गड -किल्ल्यांसंदर्भात कोणताही अडचणींचा प्रश्न असो आणि कितीही वेळा विचाराआप्पा कपाळावर एकही आठी पडू ने देता हसतमुख चेहऱ्याने तुमचे समाधान करतात. त्यासाठी तासनतास ते माहिती पुरवतात. अनुभवाच्या दाण्यांचे पीठ ते आपल्या वाणीतून आणि लेखणीतून देतात. एखाद्या माऊलीने जात्यावर ओवी आठवावी तसा शिवकाळातला इतिहास सांगताना त्यांच्या अनुभव विचारांचे गाणे होत जाते. 'दास राहतो डोंगरीहा रामदासांचा एक श्लोक आप्पांच्या बाबतीत अगदी तंतोतंत लागू पडतो. दादरच्या आपल्या चाळीतल्या घरी आप्पा क्वचितच असतील पण रायगडराजगडसिंहगड अशा कुठल्यातरी गडावर मात्र ते नक्कीच सापडतील. कदाचित तोच त्यांचा खरा पत्ता असावा. इतकी अफाट मुशाफिरी करणारे आप्पा तसे प्रसिद्धीच्या बाबतीत मात्र शेकडो मैल दूर आहेत. त्यामागची त्यांची 'फिलॉसॉफी'' ही तितकीच वेगळी आहे. महाराष्ट्राच्या लाडक्या जाणत्या राजाचे कार्यकर्तृत्व आपल्या खारीच्या वाट्याने समाजासमोर उलगडून दाखविण्याचा प्रयत्न करीत असताना प्रसिद्धी ती  कसली मिळवायची हा त्यांचा रोखठोक सवाल आजकाल उठसुठ प्रसिद्धीच्या मागे घोडे दामटविणाऱ्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारा आहे.

 

ऊन,वारा अन पाऊस याची तमा न बाळगता दऱ्याखोऱ्यातून हिंडताना आप्पा तहानभूक विसरतात. छत्रपती शिवाजी महाराजछत्रपती संभाजी (शंभाजी)तानाजीबाजीप्रभूंसारख्या व्यक्तींमुळे आप्पांच्या प्रतिभेला अनेकदा नव्याने अंकुर फुटू लागतात. या भटकंतीत ठोस अभ्यासाने केलेले विधान ही काळ्या दगडावरची अमीट रेष ठरते. गडकिल्ल्यांतून भटकंती करताना तिथला चिरान चिरा आप्पांशी बोलतो. जणू इतिहासच वर्तमान होऊन आप्पांच्या मुखाने बोलू लागतो. हा इथे असा बाजी लढला.... तानाजी - सूर्याजी हे इथून असे दोरखंडाने गडावर चढले.... महाराजांच्या घोडीच्या टापा या इथून अशा एक ना असंख्य कथा आणि बाहू-मनगटांना स्फुरण चढविणाऱ्या घटनांची मालिका आप्पा सांगतात. म्हणूनच आप्पांविषयी म्हणावेसे वाटते की,

प्राचीवरूनि मावळतीच्याजगा सांग भास्करा ।

रायगडाचा शिवसूर्य तो कधी न मावळता ।।

सह्यगिरीत दुमदुमतील भेरीगर्जतील खोरी ।।

हिंडता फिरता तुम्हा सांगतीलत्यागाची महती ।

तुवा घडावे अन घडवावेपेटवीत ज्योती ।।

गडकिल्ल्यांतून भटकंती करणारे आप्पा अनेकदा जीवघेण्या प्रसंगातूनही गेले आहेत. रायगडावर मशिदीचे बांधकाम सुरु असल्याचे कळताच तातडीने रायगडावर धाव घेऊन ते रोखण्याचा यशस्वी प्रयत्न त्यांनी केला. त्यामुळे तिथल्या खवळलेल्या मुस्लिमांनीआप्पांना जीवे मारण्याची धमकीही दिलीपरंतु अशा धमक्यांना भीक न घालता आप्पांची रायगडावरी सुरूच आहे. आप्पांच्या अशा प्रकारच्या स्वाभिमानी घटनांची खरे तर एक मोठी जंत्रीच होईल स्वाभिमानी मराठ्यांचे उसळते रक्त पाहायचे असेल तर ते आप्पांच्या ठायीठायी बसले आहे.

 

आप्पांचा जन्म कोकणात गरीब कुटुंबात झाला असला आणि उदरनिर्वाहासाठी त्यांनी  कोहिनुर मिलमध्ये काम केले असले तरी त्यांचे व्यक्तिमत्व आणि स्वीकृत कार्य हे बौद्धिक ऋषिकार्य आहे असेच मी समजतो. मुळात त्यांच्या व्यक्तिमत्वाचा मागोवा घेणे वाटते तितके सोपे नाही. ज्ञानीपुरुषांना प्रसिद्धी मुळीसुद्धा हाव नसल्याने ते आपले जीवन चरित्र सांगण्याच्या अगर जोपासण्याच्या भानगडीत पडत नाहीत. एखाद्या ज्ञानी योग्याच्या जीवन चरित्राकडे सामान्य लौकिकदृष्टीने पाहून चालत नाही. ज्ञानी व्यक्तिमत्वाच्याज्ञानोत्तर सिद्ध स्वरूप अवस्थेतील लौकिक सदृश्य वर्तनात आणि ज्ञानसाक्षात्कार पूर्वलौकिक जीवनात पौर्वदेहिक संचिताचावंशपरंपरेतील ज्ञानमार्गी साधना परंपरेचा अनुबंध प्रकटलेला असतो. आप्पांच्या वर्तनातून तो दिसून येतो. आप्पांनी त्यांच्या आयुष्यात सातत्याने ज्ञान-कर्मनिष्ठ राहण्याचा दीर्घोद्योग केला. त्याचबरोबर कर्माला मग ते प्रापंचीकव्यावहारिक असे कोणत्याही प्रकारचे असोत्या कर्माला आप्पांनी शिवकार्याची आणि अध्यात्मशास्त्राची भक्कम  बैठक प्राप्त करून दिली. एकादृष्टीने शिवकाळाचे चिंतन करणारे  'सिद्धऋषीम्हणूनच त्यांचा अभ्यास केला पाहिजे.

 

आप्पा परब हे वास्तविक प्रसिद्धि-पराड.मुख व्यक्तिमत्त्व आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील शिवप्रेमींनी त्यांच्या कार्याची स्तुती केली. आप्पांनी वर्तमानपत्रातून लेखन केले नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या समग्र कारकिर्दीचा बारकाईने अभ्यास करीत सिद्धहस्त लेखणीने मराठी भाषेत ४० हून अधिक त्यांची ग्रंथसंपदा निर्माण केली आहे. आप्पांचा अभ्यास हा खरेतर एका मोठ्या ज्ञानशाखेचाच अभ्यास आहे. लिखित कागदपत्रे ही अधिक बोलकी व खात्रीशीर असतात. इतिहासाला कागदपत्रांच्या पुराव्यांसह वाटचाल करता येत नाहीपरंतु अलिखित संदर्भसाधने अबोल असून त्यांचा अर्थ आपणाला शोधून काढावा लागतो.

 

आधुनिक युगात इतिहासाची पाने उलगडताना भूगोलाला विज्ञान आणि अध्यात्म यांची जोड देऊन त्यांची मांडणी करणे हे ऐतिहासिक साहित्यात आजपर्यंत घडले नाही. जो जो कागद वा नाणी हाताशी सापडले त्यावर बुद्धिनिष्ठ संशोधन करून काढलेले निष्कर्ष आप्पांनी वाचकांसमोर विविध पुस्तकांच्या माध्यमातून मांडले. त्यात मुख्यतः संशोधनात्मक भाषाशैली वापरावी लागलीपण ती सर्वसामान्यांना समजेल अशी सोप्या शब्दांत त्यांनी मांडली. आणि हे मांडताना नेहमीच सचोटीविश्वाससत्य कथन या बाबींना अग्रकम दिला. प्रसंग कितीही बाका असूदे त्यांनी फायदा तोट्याचा विचार न करता आपल्या विचारधारेला कधीही तिलांजली दिली नाही. आप्पांच्या वयाने ऐंशी पार केली आहे.  तरीही आज आप्पांच्या व्यक्तित्वाकडे आणि कार्याकडे दृष्टीक्षेप टाकला तर शिवकार्याचा ध्यास घेतलेला हा योगी शरीराने  थकलेला नाहीहे प्रतित होते.  अभ्यासांती निष्कर्ष काढून आपल्या पद्धतीने मांडणी करीत त्यांचा लेखनयज्ञ पहाटेपासूनच सुरू होतो. अल्प किंमतींत छापून घेतलेली आपली ग्रंथसंपदा पदरमोड करून स्वतःच ती  जनमानसात पोहोचविणारा साहित्यिक असे त्रिविध प्रकारचे त्यांचे व्यक्तिमत्त्व सहज डोळ्यात भरते. अशी व्यक्तिमत्त्व आधुनिक काळात दिसत नाहीत.

 

संतवृत्तीच्या विभूती मग ते कोणत्याही काळातील असोतसमाजासाठी ते आपले जीवन हेतुपूर्वक आणि हेतूपुरस्पर व्यतीत करतात. त्यांचे महत्व पटते पण त्यांच्या कार्याचे माहात्म्य समजत नाही असा काहीसा विचित्र प्रकार आजच्या धारणेत निर्माण झाला आहे. अतिरेकी अभिनिवेशअनाठायी  अहंकारअनावश्यक वाचाळता यामुळे आजचे विचारविश्व पार झाकोळून गेले आहे. अशावेळी वैभवी गतकाळाचा किंबहुना आपल्या पुर्वासुरींच्या इतिहासाच्या चिंतनाचीमननाची आवश्यकता असतेच असते.

 

सह्याद्रीच्या कडेकोपऱ्यात तरुण पिढीला कोणतेही मानधन न घेता इतिहास शिकविणारा आप्पा परब हा कर्मयोगी या साऱ्या सव्यापसव्यात मात्र उपेक्षित आहे. स्वाभिमानी आप्पांना हे अशा प्रकारचे लेखन आवडणारही नाही. परंतु ही वस्तुस्थिती आहे. रुढार्थाने आप्पांच्या विषयी लिहिताना आजच्या स्वकेंद्रित होत चाललेल्या समाजापुढे एका आदर्श व्रतस्थ लेखकाचेइतिहास संशोधकांचे कार्य ठेवावे असे मनोमन वाटत आहे. शासन आणि समाज या दोन्ही घटकांनी म्हणावी तशी त्यांची दखल घेतली नाही हे शल्य शिवप्रेमीच्या मनात आहे. आजच्या या तत्वेचारित्र्यसत्यनिष्ठ विचारधारा याबाबतीत फारसे फिकीर न बाळगण्याच्या युगात नेमक्या याच गोष्टी ज्यांनी आयुष्यभर तळ हातावरच्या फोडाप्रमाणे कसोशीने जपल्या अशा आप्पा परब यांना चतुरंग पुरस्कार मिळणे ही मोठी आशादायक बाब आहे. आप्पा प्रसिद्धीपासून दूर राहण्याचा आटोकाट प्रयत्न करतातपरंतु केवळ त्यांचे व्यक्तिमहात्म्य न वाढवता तत्व आणि सामाजिक कार्य यांचा मेळ त्यांनी साहित्यातून निरपेक्षपणे कसा घेतला याची दखल 'चतुरंगनेघेतली.  ती ओळख जगाच्या कानाकोपऱ्यात सहज पोहोचविण्यासाठी विविध माध्यमांनी पुढाकार घ्यायला पाहिजे.

 

रवींद्र मालुसरे

अध्यक्षमराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई

9323117704  chalval1949@gmail.com

(रवींद्र मालुसरे हे - नरवीर तानाजी–सूर्याजी मालुसरे यांचे कुलोत्पन्नरायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील उमरठ-साखर ही ऐत्याहासिक भूमी रवींद्र मालुसरे यांची जन्मभूमी )


शिवइतिहासदुर्गअभ्यासक आप्पा परब

यांना चतुरंग सन्मान जीवन गौरव पुरस्कार


मुंबई (रवींद्र मालुसरे ) : 

तीन दशकांची सांस्कृतिक परंपरा लाभलेला चतुरंगचा जीवनगौरव सन्मान पुरस्कार युद्ध इतिहास लेखककिल्ले अभ्यासकशिवइतिहासनाणकशास्त्र अभ्यासक आणि गिरीभ्रमक बाळकृष्ण तथा आप्पा परब ( ८३ ) यांना जाहीर झाला आहे. रविवारदि १८ डिसेंबर रोजी संध्याकाळी ४ वाजता डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष असून प्रमुख उद्घघाटक म्हणून प्रवीण दुधे उपस्थित राहणार आहेत. संपूर्ण आयुष्य बेडरपणे आणि साहसी वृत्तीने इतिहासाच्या अभ्यासात व इतिहास नोंदीत व्यतीत करणाऱ्या आप्पा परब यांची जीवनगाथा डॉ विनय सहस्त्रबुद्धेसुधीर जोगळेकरमाधव जोशीप्रसाद भिडेविनायक परब यांच्याकडून ऐकता येणार आहे.
आप्पा परब हे वास्तविक प्रसिद्धि-पराड.मुख व्यक्तिमत्त्व आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील शिवप्रेमींनी त्यांच्या कार्याची स्तुती केली. आप्पांनी वर्तमान पत्रातून लेखन केले नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या समग्र कारकिर्दीचा बारकाईने अभ्यास करीत सिद्धहस्त लेखणीने मराठी भाषेत ४० हून अधिक स्वतःची ग्रंथसंपदा निर्माण केली आहे. आप्पांचा अभ्यास हा खरेतर एका मोठ्या ज्ञानशाखेचाच अभ्यास आहे. लिखित कागदपत्रे ही अधिक बोलकी व खात्रीशीर असतात. इतिहासाला कागदपत्रांच्या पुराव्यांसह वाटचाल करता येत नाहीपरंतु अलिखित संदर्भसाधने अबोल असून त्यांचा अर्थ आपणाला शोधून काढावा लागतो. ज्यावेळी इतिहास बोलत नाही तेव्हा भूगोल बोलतोज्यावेळी भूगोलही बोलत नाही तेव्हा विज्ञान बोलते...
हे वाक्य प्रत्येक शिवप्रेमींच्या मनी बिंबवणारे निस्पृह दुर्गपंढरीचे वारकरीदुर्गतपस्वी आप्पा परब यांना २०२२ चा चतुरंग पुरस्कार हा मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्व महाराष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 


आप्पासाहेब परब यांच्या सिद्धहस्त लेखणीतून प्रकाशित झालेली पुस्तके 

  • किल्ले रायगड स्थळ दर्शन
  • किल्ले राजगड स्थळ दर्शन
  • किल्ले राजगड कथा पंचविसी
  • किल्ले रायगड कथा पंचविसी
  • श्रीशिवबावनी
  • शिवरायांच्या अष्टराज्ञी
  • किल्ले पन्हाळगड कथा दशमी
  • शिवजन्म
  • किल्ले विशाळगड कथा त्रयोदशी
  • सिंधुदुर्ग
  • विजयदुर्ग
  • सिंहगड
  • लोहगड
  • दंडाराजपुरी दुर्ग
  • पावनखिंडीची साक्ष
  • रणपति शिवाजी महाराज
  • हुजुरबाज
  • छत्रपती शिवरायांचा आरमारी सुभेदार- मायाजी नाईक भाटकर
  • किल्ले पन्हाळा औरंगहणाख्यान
  • किल्ले रायगड प्रदक्षिणेच्या वाटेवर
  • किल्ले राजगड प्रदक्षिणेच्या वाटेवर
  • श्रीभवानी तरवार
  • किल्ले राजगड बखर
  • श्रीशिवदुर्ग ओवीबद्ध त्रिशतकावली
  • किल्ले राजगड घटनावली
  • घोडखिंडीची साक्ष
  • रणपती शिवाजी महाराज
  • हुजुरबाज
  • छत्रपती शिवरायांचा आरमारी सुभेदार- मायाजी नाईक भाटकर
  • किल्ले पन्हाळा औरंगहणाख्यान
  • किल्ले रायगड प्रदक्षिणेच्या वाटेवर
  • किल्ले राजगड प्रदक्षिणेच्या वाटेवर
  • श्रीभवानी तरवार
  • किल्ले राजगड बखर
  • श्रीशिवदुर्ग ओवीबद्ध त्रिशतकावली
  • किल्ले राजगड घटनावली
  • घोडखिंडीची साक्ष
  • रणपती शिवाजी महाराज
  • सिन्धुदुर्ग 
  • विजयनगर साम्राज्यातील किल्ले
  • किल्ले रायगड घटनावली - श्री शिवकाळ
  • किल्ले रायगड घटनावली - श्री शंभुकाळ
  • युद्धपती श्रीशिवराय युद्ध पंच अंग कोष 
  • पोर्तुगीज अहवालातील किल्ले भाग १ 
  • पोर्तुगीज अहवालातील किल्ले भाग २ 
  • शिवराजाभिषेक 
  • आगामी -
  • निजामी अंमलातील किल्ले 
  • बहमनी 
  • आदिली
  • मोंगल 
  • आदिली (शिवकाळ )
  • कुतूबी
  • रायगड नगरी
  • ठाणे जिल्ह्यातील किल्ले
  • युद्धपती शंभू महाराज 


शुक्रवार, २८ ऑक्टोबर, २०२२

'भुकेचा सोहळा' संदिप कळंबे यांच्या गझल संग्रहाचे प्रकाशन

   'भुकेचा सोहळा' संदिप कळंबे यांच्या गझल संग्रहाचे प्रकाशन                                  

                                         कशासाठी कुणाच्याही पुढे ना हात केले मी

                     भुकेचा सोहळा होता उपाशी साजरा केला



लहानपणापासून परिस्थितीचे चटके करीत प्रतिकूल परिस्थितीला धैर्याने सामोरे जातप्रसंगी उपाशी पोटीफुटपाथवर रात्र काढली पण वाम मार्ग न धरतासन्मार्गावर चालत राहिलेल्या संदिप शंकर कळंबे यांच्या 'भुकेचा सोहळा' या गझल संग्रहाचे प्रकाशन नुकतेच डोंबिवली येथे ज्येष्ठ गझलकार प्रशांत वैद्य आणि मराठी अभिनेत्री मेघा विश्वास यांच्या करण्यात आले.


स्वामीराज प्रकाशनाच्या वतीने दरमहा होणाऱ्या 'मराठी आठव दिवसया उपक्रमात अष्टगंध प्रकाशनाच्या वतीने या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी बालरोतज्ज्ञ डॉ सुहास चौधरीकवी-समीक्षक राजीव जोशीकल्याण सार्वजनिक वाचनालयाचे सचिवसाहित्यीक- रंगकर्मी भिकू बारस्करकवी अजित मालांडकरअनिस पत्रिकेचे संपादक उत्तम जोगदंडअनिस ठाणे जिल्हाध्यक्ष राजेश देवरुखकरअनिस कल्याण शाखाध्यक्ष डॉ बसवंतशाहू शिक्षण मंडळाचे सचिव डॉ गिरीश लटकेरंगकर्मी श्रीरंग दातेसुरेश पवारदेवेंद्र शिंदेसीताराम शिंदेराजेंद्र वाघमारेसुधा पालवेप्रज्ञा वैद्यसीमा झुंजाररावमीना ठाकरेविजया शिंदेसुनील खांडेकरश्रीकांत पेटकरसाक्षी धोरण आदी मान्यवर उपस्थित होते.
अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही आपली कविता जपणाऱ्या कवीचा हा पहिला गझलसंग्रह प्रकाशित करताना मनस्वी आनंद होतो आहे.
पोलादपूर तालुक्यातील ऐत्याहासिक उमरठ या गावचा आणि आता डोंबिवलीकर असलेला हा शायर मितभाषी आणि कलेच्या प्रांतात रमणारा आहे. संदीपने अवघ्या ३०-३२ वर्षांच्या आयुष्यात दूनियेचे रंग पाहिलेअनुभवले आणि ते पचवले केवळ आपल्या लेखणीच्या जोरावर. बालपणी आईवडिलांचे छत्र नसल्यात जमा झाल्यानंतर कविता आणि चित्रकला यांचाच आधार लाभलेल्या संदीपच्या आयुष्याच्या सोबतीला हा कवीता संग्रह यापुढच्या काळात दिशा देणारा ठरणार आहे असे उदगार गझलकार प्रशांत वैद्य यांनी याप्रसंगी काढले. अभिनेत्री मेघा विश्वास यांनी नितांत सुंदरदमदार आणि आशयघन शब्दकळा लाभलेला तरुण गझलकार आहे साहित्य विश्वात संदीपचे आणि या गझल संग्रहाचे जोरदार स्वागत होईल असे कौतुक केले. तर पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने वैचारिक दिवाळी साजरी होते आहे असे टिव्ही कलाकार सुधाकर वसईकर यांनी याप्रसंगी आपले विचार मांडले.
जन्म अपुल्यांच्या धगीमध्ये जळाला
कोळसा होतानिखारा होत गेला...
घेतले नाही जवळ मजला कुणीही
मग मला माझा सहारा होत गेला...

या पंक्ती सादर करीत आपल्या मनोगतात भविष्याच्या वाटचालीचा वेध घेताना संदिप कळंबे म्हणालेभूक लागली म्हणूनभाकरीऐवजी पैसा खाता येत नाही आणि पैसा जास्त आहे म्हणूनभुकेपेक्षा जास्त अन्न खाता येत नाही म्हणजेच जीवनात पैशाला ठराविक रेषेपर्यंतच स्थान आहे. हृदयातून येत असलेल्या काव्यप्रतिभेच्या भुकेच्या जोरावर मी गावापासून मुंबई पर्यंतच्या प्रवासातली पोटातली भूक मी सहन करू शकलो.
कार्यक्रमाचे संयोजक सुधीर चित्ते यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित केले तर केली. स्वररंग निर्मित "इये मराठीचीये नगरीआम्हां घरी नित्य दिवाळी!" हा मराठी संस्कृतीची मनोहारी अनुभूती देणारा अनोखा कार्यक्रम सादर झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला १०६ हुतात्म्यांच्या स्मारकाच्या प्रतिकृतीला पुष्पांजली अर्पण करण्यात आली. अवकाळी पावसाने पीडित शेतकऱ्यांसाठी उपस्थित रसिकांनी सढळ हस्ते जमा झालेली रक्कम नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाठविण्यात येणार आहे.

 

सोमवार, १२ सप्टेंबर, २०२२

शिवसेनेचा बालेकिल्ला कोणाचा ?

 शिवसेनेचा बालेकिल्ला कोणाचा ?

◆ महेश सावंत कोण ?
२१ मार्च २०१७ ला मुंबई मनपा ची निवडणूक झाली, या महापलिका निवडणुकीत महेश सावंत यांनी प्रभादेवी वॉर्ड १९४ मध्ये बंडखोरी केली होती. पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र 'समाधान' यांना आव्हान दिलं होतं. भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर महेशने ही निवडणूक लढवावी असा प्रयत्न त्यावेळी झाला, परंतु महेश अपक्ष उमेदवार म्हणूनच ठाम राहिला. विद्यमान नगरसेवक संतोष धुरी निवडणुकीच्या रिंगणात हे सुद्धा असल्याने व प्रभादेवीच्या घराघरात संपर्क असलेल्या महेशमुळे निवडणूक सुरुवातीपासूनच रंगात आली, अटीतटीची होणारी ही निवडणूक निकालाच्या दिवशी उद्धव साहेबांचे समाधान न होता बंडखोराला विजयाची लॉटरी लागणार अशी शक्यता आहे याचे राजकीय निरीक्षकांनी भाकीत वर्तवले होती. असे घडू नये याची कल्पना आल्याने निवडणूकीच्या २ दिवस अगोदर स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दैनिक सामना समोरच्या रस्त्यावर भव्य प्रचार सभा घेतली आणि प्रभादेवीकरांना जाहीर आवाहन केले की, "या वार्डात बंडखोरी करून काही फडकी फडकत आहेत त्याच्या चिंध्या करा !" त्याचबरोबर पक्षशिस्तीचं उल्लंघन केल्यामुळे सावंत यांची उद्धव ठाकरेंनी हकालपट्टीही केली होती. परंतु महेश सावंत यांना माहीम, वडाळा, दादर, वरळी येथील काही मोठ्या सेनानेत्यांचा छुपा पाठींबा होता हे काही गोष्टीत लक्षात येत होते.
सावंत यांना निवडणुकीत सुमारे ८३०० मते मिळाली होती. पण समाधान सरवणकर यांचा २५० मतांनी निसटता विजय झाला होता. निकालाची ती संध्याकाळ मला आठवतेय, सामना दैनिकाच्या आणि महेशच्या वाकडी चाळीच्या समोर महेशच्या निवडणूक चिन्ह असलेल्या नारळ या चिन्हावर राग काढताना शेकडो नारळ रस्त्यावर फोडीत ढीग रचला होता. पुढे ४ महिन्यानंतर मातोश्री निवासस्थानी सावंत यांना उध्दवजींनी पुन्हा शिवसेना पक्षात घेतले.
सरवणकर शिवसेना कार्यकर्ता ते आमदार अशी राजकीय वाटचाल आहे. १९९२ ते २००४ तीन वेळा नगरसेवक, त्यावेळी २००२-२००४ या दोन वर्षात स्थायी समिती अध्यक्ष. त्यानंतर २००४, २०१४, २०१९ विधानसभेत शिवसेनेचे आमदार, २००९ च्या निवडणूकीच्या वेळी तिकीट नाकारल्यानंतर नारायण राणेंच्या उपस्थितीत काँग्रेस प्रवेश करून निवडणूक लढवली परंतु पराभव झाला. २०१२ मध्ये शिवसेनेत पुन्हा प्रवेश केला.
कधीकाळी आमदार सदा सरवणकर यांचे कट्टर समर्थक अशी ओळख महेश सावंत यांची होती. २००९ मध्ये सदा यांनी विधानसभा तिकीट नाकारल्या नंतर त्यांच्यासोबत तेव्हाचे शाखाप्रमुख महेश सावंत हे सुद्धा होते, सदा सरवणकर (काँग्रेस), आदेश बांदेकर (शिवसेना) यांचा पराभव झाला आणि राज ठाकरे यांच्या मनसेचे नितीन सरदेसाई आमदार झाले. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील हा पराभव मातोश्रीला फारच अस्वस्थ करून गेला. दादर प्रभादेवीत अनेक मनसेचे अनेक नगरसेवक निवडून आले, त्यामुळे २०१४ च्या विधानसभा निवडणूकीसाठी सदा सरवणकर यांना पायघड्या घालून शिवसेना पक्षात घेतले गेले आणि पुन्हा ते आमदार झाले. आता 'आमचीच खरी शिवसेना' म्हणत पुन्हा त्यांनी शिंदेगट जवळ केला आहे. मात्र 
एकेकाळी एकाच रस्त्यावर स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या आसपासच्या चाळीत राहणारे हे दोघे मित्र एकेकाळी कट्टरमित्र होते, परंतु सध्या सरवणकर यांचे ते कट्टर विरोधक आहेत. एकनाथ शिंदे यांनी अलीकडे शिवसेनेत बंड केल्यानंतर त्यांच्या बरोबर ज्या ४० आमदारांनी बंडखोरी केली त्यात सदा सरवणकर हेही अखेरच्या काळात गोहोटी येथे सहभागी झाले.....

◆ दादर आणि ठाकरे परिवाराचे ऋणानुबंध
दादर म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला. दादर आणि शिवसेना हे अतूट बंधन ! दादर म्हणजे ठाकरे घराण्याच्या वास्तव्याचा १२० वर्षाचा कालखंड ! सुरुवातीला प्रबोधनकार मुंबईत आल्यानंतर दादरमध्ये 'मिरांडा' चाळीत राहिले, त्यानंतर प्लाझा समोर 'कामाठी चाळीत' व शेवटी सेनापती बापट यांच्या पुतळा आहे त्याठिकाणी. व्यंगचित्र साप्ताहिक मार्मिकचे वितरण तिथूनच होत असे. १३ ऑगस्ट १९६० ला दादरच्या बालमोहन विद्यालयाच्या हॉलमध्ये मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशन करून मार्मिक सुरु झाला. १९ जून १९६६ ला रितसर शिवसेनेची स्थापना झाली.
३० ऑक्टोबर १९६६ रोजी शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा शिवाजी पार्कवर तुडुंब गर्दीत झाला. एक पक्ष, एक नेता आणि एक मैदान आणि गर्दीचा उच्चांक मोडणारी शिवाजी पार्कची सभा असे समीकरण दुसऱ्या कुणाच्याही वाट्याला आले नाही. त्याला यंदा ५६ वर्षे होत आहेत. १९७१ साली शिवसेनेचे पहिले महापौर डॉ हेमचंद्र गुप्ते हे दादरच्या. त्यानंतर सुधीर जोशी, मनोहर जोशी, दिवाकर रावते, मिलिंद वैद्य, विशाखा राऊत हे मुंबईचे महापौर झाले आहेत. १९ जून १९७७ रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते दादरमध्ये शिवसेनेचा कारभार चालविण्यासाठी शिवसेना भवनाचे उद्घाटन झाले. २३ जानेवारी १९८९ रोजी शिवसेनेचे मुखपत्र 'सामना' दादरचा भाग असलेल्या प्रभादेवी येथील नागुसयाजीच्या वाडीत सुरु झाला.
१९९२ ला युतीची पहिली सत्ता आली तेव्हा मुख्यमंत्री म्हणून दादरच्या प्रि. मनोहर जोशी सरांनी शपथ घेतली. पोर्तुगीज चर्च येथे प्रबोधनकार सीताराम केशव ठाकरे यांचा पूर्णाकृती तर शिवाजी पार्कच्या प्रवेशद्वारात माँसाहेब मीनाताई ठाकरे यांचा सुंदर अर्धाकृती पुतळा आहे. १७ नोव्हेंबर २०१२ ला शिवसेनाप्रमुखांचे निधन झाल्यानंतर त्यांचे अंत्यसंस्कार शिवाजी पार्क मध्येच लाखोंच्या उपस्थितीत करण्यात आले.

◆भविष्यातली राजकीय वाटमारी
माजी शाखाप्रमुख महेश सावंत यांच्यावर होत असलेल्या अन्यायाची दखल शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी घेतली आणि त्यांची माहीम-दादर-प्रभादेवीचे विभागप्रमुख म्हणून नियुक्ती केली. सरवणकर यांच्या सोबत सावली सारखे असलेले त्यांचे अनेक निष्ठावंत पदाधिकारी उपविभाग संघटक कैलास पाटील, शाखाप्रमुख संजय भगत, शैलेश माळी व असंख्य कार्यकर्ते उध्दवजींच्या सोबत आहेत त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत मतदान आणि संघर्ष काय होणार आहे त्यातून भविष्यात सदा सरवणकर राजकीय पटलावर कुठे असतील हे काळ ठरवणार आहे. मतदार संघात ३० वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून वावरताना सरवणकर हे लोकप्रिय आणि कार्यसम्राट म्हणून परिचित आहेत. लोकांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी वेळ आणि आवश्यक ती मदत उपलब्ध करून देणारा नेता म्हणून ओळख आहे. परंतु तळागाळातील कार्यकर्ता जाग्यावरच आहे. मतदारांची सहानुभूती सध्या तरी संयमाने मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या उध्दवजींच्या बाजूने आहे. ती मतांच्या स्वरूपात निवडणुकी पर्यंत किती टिकून राहतेय हे सुद्धा महत्वाचे आहे.
शिवाय शिवसेना पक्षफुटी पुर्वी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार हे माहिम मधून विधानसभा लढवणार अशी वदंता माध्यम जगतात होती. तशी बॅनर्सबाजी सुध्दा परिसरात दिसून येत आहे. राजकारणात काहीही घडू शकते हे मागचे माविआचे सरकार पडताना दिसून आले. पोलादी आणि बलदंड असलेल्या शिवसेना पक्षात नेतृत्वाच्या विरोधात जात एव्हढ्या मोठ्या प्रमाणात बंडखोरी होऊन पक्ष संपवण्याची प्रक्रिया होईल असे कोणत्याही मराठी माणसाला स्वप्नातही वाटले नसावे. आणि पक्ष फुटल्यानंतर गद्दारांच्या विरोधात सेनाभवनावर निदर्शने आणि शिंदेंच्या विरोधात प्रतिक्रिया दिल्यानंतर आपले नेते आमदार सरवणकर बंडखोरी करीत डायरेक्ट टीव्हीच्या बातमीत गोहाटीच्या आलिशान हॉटेलमध्ये दिसतील असे स्थानिक शिवसैनिकांनाही वाटले नसेल....

- रवींद्र मालुसरे
अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ
9323117704




सोमवार, २२ ऑगस्ट, २०२२

वृत्तपत्र लेखकांनी पेनाची निब बोथट होऊ न देता निर्भीडपणे लिहावे - शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे

 मातोश्रीवर नवशक्तिच्या जमका चळवळीच्या अमृत महोत्सवाला प्रारंभ



वृत्तपत्र लेखकांशी आमचे तीन पिढ्यांचे नाते आहे. तर सहावी पिढी लोकांमध्ये काम करते आहे. आम्हा ठाकरे कुटुंबियांना पत्रकारितेच्या सोबत कलेचाही वारसा आहे. त्याची नोंद इतिहासात आहे. साहजिकच तुम्ही आणि आम्ही लोकांसाठी काम करतो आहोत. तुम्ही मला पेनाची प्रतिकृती असलेले सन्मानचिन्ह भेट दिलेत, पेनाची टोकदार निब महत्वाची असते. तुम्ही निर्भीडपणे लिहिता ती लेखणीची धार कधीही बोथट होऊ देऊ नका. बाळासाहेबांचे व्यंगचित्रांचे 'फटकारे' नावाचे पुस्तक आहे, त्यावर फटका मारणारा वाघाचा पंजा आहे. वृत्तपत्र लेखक सुद्धा समाजातले व्यंग शोधून बोचकारत असतो, साहजिकच बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांनी जसे राजकारणी दुखावतात तसे तुम्ही व्यक्त केलेल्या मतांनीही आम्ही राजकारणी आणि प्रशासन घायाळ होतो.  परंतु त्याला एक अर्थ आहे. जे पटत नाही ते निस्पृहपणे आणि निर्भीडपणे जाहीररीत्या सांगणे हे तुमचे महत्वाचे काम आहे ते तुम्ही 'कर नाही त्याला डर कशाला' या भावनेने लिहीत राहा असे आवाहन माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

वृत्तपत्र लेखक चळवळीच्या अमृत महोत्सवी वर्षाचा प्रारंभ या निमित्ताने मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वतीने मातोश्री येथे कार्यक्रम आयोजित केला होता, त्यावेळी ते बोलत होते. शिवसेना नेते आणि माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई, विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे, आमदार नितीन बानूगडे पाटील, आमदार रवींद्र वायकर, चंद्रकांतमामा वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते.

वृत्तपत्र लेखन चळवळीसाठी आणि संस्थेच्या प्रगतीसाठी महत्वपूर्ण योगदान दिलेल्या ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक सुनिल कुवरे आणि दिलीप ल सावंत यांना यंदाचा जीवन गौरव प्रदान करण्यात आला.  तर नवशक्तीचे कार्यकारी संपादक प्रकाश सावंत, संस्थेचे माजी प्रमुख कार्यवाह आणि वृत्तमानसचे सहसंपादक सुनिल रमेश शिंदे यांचा चळवळीतील योगदानाबद्दल उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

राजन देसाई यांनी संपादित केलेल्या '"शिवसेना आणि मराठी माणूस" हे वृत्तपत्र लेखकांनी व्यक्त केलेले ई पुस्तकाचे प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

सध्याचे देशभरचे वातावरण पाहाता अघोषित आणीबाणी आहे की काय अशी परिस्थिती आहे, इंदिरा गांधींनी आणीबाणी देशावर लादली होती परंतु ती घोषित आणीबाणी होती. शिवसेना प्रमुखांनी त्यावेळी आणीबाणीला पाठिंबा दिला होता तरी मार्मिकसह सर्व वर्तमानपत्रांवर आणि विचार स्वातंत्र्यावर बंधने होती. आजच्या प्राप्त परिस्थितीत मतस्वातंत्र्य मानणाऱ्यांची मग ती प्रिंट मीडिया असो वा अलीकडच्या सोशल मीडियावर तात्काळ व्यक्त होणे असो यांची जबाबदारी वाढली आहे. अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करणारी ही वृत्तपत्र लेखकांची चळवळ आणि तुम्ही जुनी जाणती परंतु समाजातील जागती मंडळी आज माझ्यासमोर आहात. बाळासाहेब मला नेहमी सांगायचे लोकांना काय पाहिजे हे समजण्यासाठी एकवेळ तू अग्रलेख वाचू नकोस परंतु सामान्य माणसांचा आवाज असलेली वाचकांची पत्रे जरूर वाच. तुमच्या जागेची अडचण आहे तेव्हा हे जागल्यांचे व्यासपीठ अबाधित ठेवण्यासाठी मी नक्की प्रयत्न करणार आहे. असे आश्वासनही उध्दव ठाकरे यांनी दिले.

सध्याच्या राजकीय परिस्थिती वर बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले की, ज्यावेळी देशभर इतर पक्षांना भारतीय जनता पक्ष अस्पृश्य होता तेव्हा शिवसेनेने हात पुढे करून त्यांच्याशी युती केली. नंतर ती वाढत गेली आणि जवळ गेलेले दुरही होत गेले. आम्हाला म्हणतात तुम्ही मोदींचा फोटो लावून निवडून आलात तर आता बाळासाहेबांचे नाव घेतल्याशिवाय मते मिळणार नाहीत आता मोदी महाराष्ट्रात चालणार नाहीत हे तुम्हाला उमगले आहे.

सुरुवातीला प्रस्तावना करताना संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ऋणानुबंध मराठी वृत्तपत्र लेखक संघाशी १९४९ च्या पहिल्या जमका संमेलनापासून कसे दृढ होते याचे अनेक दाखले दिले. संस्था आणि वृत्तपत्र लेखक अडचणीच्या काळातही नाउमेद न होता कसा कार्यक्रम-उपक्रमांद्वारे सातत्याने कार्यशील आहे. हे आपल्या भाषणात सांगताना मालुसरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने संस्था भविष्यात कार्यरत राहावी यासाठी उद्धव साहेबांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.

देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यानिमित्त ज्या ज्येष्ठ वृत्तपत्र लेखकांनी स्वातंत्र्याची पहाट पाहिली असे ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक मधू शिरोडकर, वि अ सावंत, श्रीनिवास डोंगरे, मधुकर कुबल, अनंत आंगचेकर, श्रीमती मंदाकिनी भट, डॉ दिलीप साठ्ये, कृष्णा ब्रीद, ऍड मनमोहन चोणकर, कृष्णा काजरोळकर, प्रकाश बाडकर यांचा सन्मान उध्दवजींच्या हस्ते करण्यात आला.

संघाचे प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगांवकर यांनी सूत्रसंचालन तर आभार प्रदर्शन कार्यक्रम प्रमुख राजन देसाई यांनी केले. कार्याध्यक्ष रमेश सांगळे, कोषाध्यक्ष आत्माराम गायकवाड, कार्यवाह नितीन कदम, माजी अध्यक्ष मनोहर साळवी, माजी अध्यक्ष विजय कदम, माजी अध्यक्ष प्रकाश नागणे, अरुण खटावकर, प्रशांत भाटकर, चंद्रकांत पाटणकर, दिगंबर चव्हाण, सतीश भोसले, सुनिल कुडतरकर, नारायण परब, पंकज पाटील, दत्ताराम गवस यांनी विशेष मेहनत घेतली.

मंगळवार, २ ऑगस्ट, २०२२

'मार्मिक' सुरू झाल्यापासूनच बाळासाहेबांचे काँग्रेस नेत्यांशी कसे जवळचे संबंध

 'मार्मिकसुरू झाल्यापासूनच बाळासाहेबांचे 

काँग्रेस नेत्यांशी कसे जवळचे संबंध

 - ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई


रवींद्र मालुसरे)

बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आपल्या तथाकथित भक्तीचे नाटकी प्रदर्शन करणाऱ्या भाजपने आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या एकनाथ शिंदे टीमनेउद्धव ठाकरे यांची शिवसेना संपवण्याचे ठरवले आहे. तरी या दोन गोष्टींत अर्थातच विसंगती आहे ! मात्र एका गोष्टीकडे मुद्दामहून लक्ष वेधायचे आहे. महाविकास आघाडीचा प्रयोग बाळासाहेबांना आवडला नसताअसे सांगितले जात आहे. परंतु फडणवीस सरकारात शिवसेनेच्या मंत्र्यांना काडीची किंमत नव्हती आणि म्हणून त्यांनी राजीनामे खिशात ठेवले होते. बाळासाहेब जर त्यावेळी हयात असतेतर त्यांनी 'कमळाबाई'ला शेलक्या शब्दांत सुनावूनआपल्या मावळ्यांना सरकारबाहेर पडण्याचा त्यावेळी सल्ला दिला असता. असे सद्यस्थितीच्या घटनेची मीमांसा ख्यातनाम राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी दादर येथे केली. मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई आणि आचार्य अत्रे स्मारक समिती मुंबईच्या वतीने घेण्यात आलेल्या 'कुठे नेऊन ठेवला आहे आचार्य अत्रे यांचा महाराष्ट्रया विषयावर परिसंवादाच्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर चित्रलेखाचे संपादक आणि सुप्रसिद्ध निर्भीड वक्ते ज्ञानेश महारावज्येष्ठ विधिज्ञ ऍड राजेंद्र पैज्येष्ठ उद्योजक प्रमोद घोसाळकरमराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरेदासावाचे कोषाध्यक्ष मनोहर साळवीआचार्य अत्रे स्मारक समितीच्या ऍड आरती सदावर्ते-पुरंदरे उपस्थित होते. देसाई पुढे असेही म्हणाले कीमोदी सरकारने केंद्रात शिवसेनेला महत्त्वाचे खाते दिले नाहीम्हणूनही त्यांनी जोरदार हल्लाबोल केला असता. शिवसेनेला तुच्छतेची वागणूक देणाऱ्या फडणवीसांनात्यांनी ठाकरे शैलीत फटकारले असते. उलट महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार असल्यामुळेबाळासाहेब आणि त्यांचे अधिक जमले असते. अर्थात समजा मतभेद झाले असतेतर पवारांनाही बाळासाहेबांनी सोडले नसते हा भाग वेगळा. परंतु बाळासाहेबांच्या नावाने आपल्याला हव्या त्या गोष्टीच सोयीस्करपणे सांगायच्या ही भाजपची आणि शिंदे गटाची  लबाडी आहेहे आपण सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे. शिवाय 'मार्मिकसुरू झाल्यापासूनच बाळासाहेबांचे काँग्रेस नेत्यांशी कसे जवळचे संबंध होतेहे सर्वज्ञात आहे. काँग्रेसच्या हिंदुत्ववादी दुष्मनांनी या गोष्टी दडवून आणि दुसरीकडे बाळासाहेबांची ढाल पुढे करूनउद्धव ठाकरे यांच्यावर जाणीवपूर्वक हल्लाबोल सुरू केला आहे. ही चाल सर्वजणांनी लक्षात ठेवली पाहिजे.

देशातील बहुजन समाज बुद्धीचा वापर न करता भावनेच्या आहारी जात असल्याने मातीचे गोळे डोक्यावर घेऊन बुडविले जातात. ज्या देशात माणसापेक्षा दगडाला जास्त किंमत असतेतो देश मोठा कसा होणार?  ‘चित्रलेखा’चे संपादक आणि फर्डे वक्ते ज्ञानेश महाराव यांनी या परिसंवादाचा महाराष्ट्र महोदया संदर्भात मुद्दा मांडताना असा परखड सवाल केला. आज आचार्य अत्रे असते तर महाराष्ट्रच नव्हे तर देशपातळीवर चाललेल्या एकंदर राजकीय परिस्थितीवर घणाघात केला असतात्याचबरोबर वाढती बुवाबाजीकर्मकांड आणि जातियवाद्यांवर आणखी प्रहार केले असते. आयुष्यभर त्यांनी आपल्या अग्रलेखातून आणि पुस्तके लिहून हे काम केले आहेच  ज्ञानेश महाराव आपल्या भाषणात पुढे असेही म्हणाले किसंत बहिणाबाईसंत तुकारामकबिरसंत एकनाथज्ञानेश्वरतुकडोजी महाराजयांच्या ओव्याअभंगपोवाड्यातील कडवी उद्धृत करुन भटशाही हा सामाजिक आणि राजकीय रोग असल्याचे ठासून सांगितले. सावित्रीबाई फुलेम.ज्योतिबा फुलेडॉ.बाबासाहेब आंबेडकरप्रबोधनकार ठाकरेआचार्य अत्रेशाहीर अमरशेख  इत्यादी महापुरुषांनी समाजाला जागृत करण्याचे काम केले. बुवाबाजीकर्मकांड ह्या भ्रामक गोष्टी आहेत हे आपल्या साहित्यातून मांडले. आचार्य अत्रेंचा त्याकाळातील महाराष्ट्र प्रगल्भ विचार आणि अग्रेसर भूमिका पाहता  ते काही वर्षे जगले असते तर वेगळा महाराष्ट्र दिसला असता. त्याअगोदर छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापन करताना आणि ते वाढविताना तिथी आणि मुहूर्त कधी पाहिले नाही. परंतु आजकालचा सुशिक्षित लोक अजूनही वास्तुशास्त्राचा आधार घेतात. घरात दिशा शोधणाऱ्यांची नेहमीच ‘दुर्दशा’ झालीअसे स्पष्ट करुन श्री.महाराव यांनी भावनेच्या आहारी जाण्यापेक्षा बुद्धीने विचार करावाअसे आवाहन केले.



ऍड राजेंद्र पै यांनी दोन्ही वक्त्यांनी परखड भाषेत आपले विचार मांडल्याबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी सुद्धा आज आचार्य अत्रे असते तर कसे व्यक्त झाले असते याची अनेक तत्कालीन प्रासंगिक उदाहरणे देऊन आपले विचार मांडले. 'कुटुंब रंगलय काव्यात'चे विसुभाऊ बापट यांनी शिवाजीपार्क येथील आचार्य अत्रे कट्ट्याच्या संदर्भात माहिती दिली. ऍड आरती सदावर्ते यांनी आचार्य अत्रे स्मारक समितीच्या तर रवींद्र मालुसरे यांनी मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वाटचालीचा आढावा घेतला. ज्येष्ठ वृत्त निवेदिका शिबानी जोशी यांनी सूत्रसंचालन केले तर संघाचे प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्याध्यक्ष रमेश सांगळेकोषाध्यक्ष आत्माराम गायकवाडमाजी अध्यक्ष विजय ना कदमकार्यवाह नितीन कदमसुनील कुवरेराजन देसाईनारायण परबदत्ताराम गवसदिगंबर चव्हाण,चंद्रकांत पाटणकरअनंत आंगचेकर,राजेंद्र घरतश्रीमती मंदाकिनी भटकृष्णा काजरोळकरश्रीनिवास डोंगरेदीपक गुंडयेभाऊ सावंत,शांतू डोळस यांनी विशेष परिश्रम घेतले.  


   


बुधवार, २७ जुलै, २०२२

श्रीक्षेत्र पंढरपूरला विशेष आराखडा व वारकऱ्यांसाठी सुखसोयी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 श्रीक्षेत्र पंढरपूरला विशेष आराखडा व वारकऱ्यांसाठी सुखसोयी  - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

गायनाचार्य हरिभाऊ रिंगे महाराजांचा सत्कार


मुंबई : (रवींद्र मालुसरे ) आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाच्या मंदिरात महापूजा करण्याचा मान मला मिळाला, हे माझं भाग्य समजतो. मोठ्या देवस्थानाच्या ठिकाणी भाविकांसाठी सर्व प्रकारच्या सोयी सुविधा असतात. चांगले रस्ते, पिण्याचं मुबलक पाणी, शौचालये असतात. त्याच प्रकारच्या सोयी सुविधा पंढरपुरात निर्माण करणार आहे. त्यासाठी विशेष आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आजपर्यंत जे झालं नाही ते पंढरपूरसाठी करणार असून पंढरपूरचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न केला जाणार आहे असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांना दिले. महाराष्ट्रातील प्रमुख कीर्तनकारांनी त्यांच्या मुंबईतील नंदनवन निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन सत्कार केला त्यावेळी ते बोलत होते. वारकरी सांप्रदायातील अध्वर्यू आणि ज्येष्ठ गायनाचार्य ह भ प हरिभाऊ रिंगे महाराज यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रिंगे महाराजांना मानपत्र प्रदान करण्यात आले. 
यावेळी एकनाथ शिंदे पुढे असेही म्हणाले की, केवळ हिंदुत्व आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार कायम रहावेत यासाठी आम्ही शिवसेना खासदार-आमदारांनी वेगळी वाट निवडली आहे. आम्ही बाळासाहेबांच्या तेजस्वी हिंदुत्वाच्या विचारांची ही लढाई लढतो आहोत. हे हिंदुत्व म्हणजे दुसऱ्या समाजाचा द्वेष नव्हे. हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार होत असताना त्याचा इतर धर्मावर परिणाम होणार नाही हीच भूमिका आमची कायम राहणार असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केली. सर्वसामान्य लोकांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्वसामान्यांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नसल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली. याप्रसंगी खासदार डॉ श्रीकांत शिंदे, खासदार हेमंत डोके, अंबरनाथचे आमदार डॉ बालाजी किणीकर, ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, कीर्तनकार विश्वनाथ महाराज वारिंगे, कीर्तनकार पुरुषोत्तम महाराज उगले, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे,  अंबरनाथचे नगरसेवक सुभाष साळुंखे,  नगराध्यक्ष सुनील चौधरी, आळंदीचे रविदास महाराज शिरसाट, संत मुक्ताबाई संस्थांनचे तुकाराम महाराज मेहुणकर, पैठणचे ज्ञानेश्वर महाराज इंगळे, ह भ प चंद्रभान सांगळे महाराज, मनोजकुमार गायकवाड  सिन्नरचे किशोर महाराज खरात, बदलापूरचे रवींद्र महाराज मांडे, मुरबाडचे हिम्मत महाराज गगे, शहापूरचे योगेश महाराज वागे, योगेश महाराज घरत, वासींदचे ज्ञानेश्वर महाराज शेळके, खडवलीचे नारायण महाराज बजागे, बदलापूरचे अशोक महाराज घरत, मोहन महाराज राऊत, टिटवाळाचे दशरथ महाराज किणे, आंबिवलीचे भीमसेन महाराज पाटील, ठाण्याचे जगन्नाथ महाराज म्हस्के, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राम रिंगे, नवोदित गायक चिन्मय रिंगे, आदी पारमार्थिक क्षेत्रातील शेकडो वारकरी मंडळी उपस्थित होते. 



वैशिष्ट्यीकृत पोस्ट

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत सत्याची कास धरून पत्रकारिता करावी.

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत  सत्याची कास धरून पत्रकारिता करावी. सतरावे शतक प्रबोधनाचे ,  अठरावे शतक वैचारिकतेचे ,  एकोणीसावे शतक प्रगतीचे...